“माझे 200 रुपये बाकी आहेत तुझ्याकडे… लक्षात आहे ना?” कोणीतरी कानात बोलले त्याच्या आणि त्याला जाग आली. अस्वस्थ होऊन उठला तो… घड्याळ्याकडे नजर टाकली. पहाटेचे तीन वाजलेले. हा आवाज ओळखीचा होता. खूप वर्षांपूर्वी अगदी त्याच्या जवळचा… पण नेमका कोणाचा? त्याच्या लक्षात येत नव्हते. त्याने पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला, पण झोप आता दूर पळाली होती. कोणाचा आवाज असावा आणि दोनशे रुपये कोणाकडून घेतले… जाम आठवेना त्याला. व्यवहाराला अगदी चोख होता तो. कोणाचा एक पैसा कधी ठेवला नव्हता. पण हे 200 रुपये? डोक्यात प्रकाश पडत नाहीये आपल्या.
अचानक लखलखले डोक्यात त्याच्या… प्रकाश… हो प्रकाशच तो! त्याचा कॉलेजमधला लास्ट ईयरचा रूम पार्टनर. एक्झाम फी भरायला नेमके 200 रुपये कमी पडत होते. मुदतीचा शेवटचा दिवस. घरून मनी ऑर्डर केलेली, पण मिळाली नव्हती. वर-खाली झाला त्याचा जीव. पण देवासारखा धावून आला प्रकाश. खरेतर, 30 वर्षांपूर्वी बरीच मोठी रक्कम होती ती. नंतर मनी ऑर्डर आली, पण प्रकाश काही कामासाठी गावी गेला होता. याची परीक्षा संपली तरी तो परतलाच नव्हता. तेव्हा हॉस्टेलवर तसा निरोप देऊन निघून आला होता तो. प्रकाशला त्याने पत्रही लिहिले की रिझल्टच्या दिवशी भेटू. तुझे पैसे देतो तेव्हाच… पण त्या दिवशीही प्रकाश आलाच नव्हता. त्याच्या गावाकडच्या मित्राने सांगितले की, तो गावीही नाही आता.
नाईलाजाने तो पैसे घेऊन परत आला…
एकदम भरून आले त्याला. ऐनवेळेस पैसे मिळाले नसते तर, वर्ष वाया गेले असते त्याचे… आणि तो चक्क विसरूनच गेला त्याला! मग आठवले त्याला कॉलेजच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर विषय झाला होता त्याचा… तो दिल्लीत कुठेतरी जॉब करतो एवढेच सांगितलं कोणीतरी. नंतरही काहीच माहिती मिळाली नाही त्याच्याबद्दल.
सकाळ होताच त्याने एकापाठोपाठ फोन करणे चालू केले मित्रांना. पण कोणालाच माहीत नव्हते त्याच्याबद्दल. मग एक क्लू मिळाला. सध्या तो गावाला असल्याचा! गाव त्याचे चांगलेच लक्षात होते. पत्रव्यवहारामुळे… कॉलेजमध्ये असताना केलेला! पत्ता आता आठवत नव्हता. पण कोणालातरी विचारता येईल… खेडेगाव होते त्यावेळी, आता वाढले असेल… तरी किती वाढणार?
हेही वाचा – सुमी अन् रंगलेला काचापाणी खेळ!
सहा तासावर गाव होते. त्याने कार काढली तेव्हा पत्नीलाही आश्चर्य वाटले… असे अचानक?
तो गावी पोहचला तेव्हा संध्याकाळ होत आलेली. गाव तसे बऱ्यापैकी असावे, तरीही त्याने प्रकाशचे नाव घेताच लोकांनी लगेच घर कुठे ते सांगितले. एक जण तर मोटरसायकलवरून थेट घरापर्यंत आला सोबत. म्हणजे? त्याच्याकडे येणारे अनेक असावेत?
घर जुन्याकाळी बांधलेले असावे. आता थोडा आधुनिकतेचा टच दिलेला होता… टाइल्स वगैरे बसवून. तो गाडी लावून आत जाताच त्याला बाहेर पाच मिनिटे थांबवण्यात आले आणि पाणी देऊन आत नेण्यात आले. तिथे एका पलंगावर प्रकाश झोपलेला होता. त्याला कळलेच नाही आधी… तसेही त्याला बघून कितीतरी वर्षे झाली होती. पण आता त्याला बघून तर धक्काच बसला. अगदी बारीक झालेली शरीरयष्टी… बरगड्या मोजता येतील इतक्या वर आलेल्या… गालफड आत गेलेली…. त्याने हाक मारली, “प्रकाश… प्रकाश…”
प्रकाशने मोठ्या मुश्किलने डोळे उघडले. सुरुवातीला त्याने ओळखले नाही. नंतर त्याच्या डोळ्यात आनंद दाटून आला…
“सचिन…”
“तू कसा आलास?” त्याने थरथरत्या स्वरात मोठ्या मुश्किलीने विचारले.
“तुझे 200 रुपये द्यायचे होते ना? ते द्यायला आलो.”
“कुठले 200 रुपये?”
मग याने त्याला आठवण करून दिली, कितीतरी वर्षांपूर्वीची… आणि शंभरच्या दोन नोटा त्याच्या हातात ठेवल्या. त्याला आठवले..
“पण त्यासाठी एवढ्या दूर?”
त्याने खूप वेळ याचा हात हातात धरून ठेवला. जुनी मैत्री आठवत… आसवे गाळत…
रात्र झाल्यामुळे प्रकाशच्या मुलाने त्याला निघूच दिले नाही आणि प्रकाशनेही… जेवण झाल्यावर बाहेर खाटेवर झोपताना त्याच्या मुलाने सांगितले सारे…
प्रकाशच्या परीक्षेच्या नेमके काही दिवस आधी वडील तडकाफडकी वारले हार्ट अटॅकने. वडिलांचे क्रियाकर्म होत नाही, तोच इस्टेटीचे बखेडे उभे झाले. बरेच दिवस कोर्टकचेऱ्या चालल्यानंतर कंटाळून ओळखीच्या माणसाबरोबर तो थेट दिल्लीला निघून गेला. तिथे मात्र एका कंपनीत चिटकून राहण्याचा फायदा झाला… परमनन्ट झाला. तिथेच सेटल झाला. सगळे काही सुरळीत चालू असताना पोटाचा कॅन्सर डिटेक्ट झाला. कंपनीकडून औषधोपचारासाठी भरपूर मदत दिली, पण रोगाने दाद दिली नाही. अखेर मरायचेच आहे तर, गावी जाऊनच मरू, हा विचार करून तो पुन्हा गावी आला… आणि आता मृत्यूची वाट पाहात आहे…
दिवसभराच्या शारीरिक आणि मानसिक थकव्याने त्याला झोप लागली… तरी स्वप्नात त्याच्याबरोबर घालवलेले कॉलेजचे दिवसच दिसत होते त्याला. पहाटे कसल्याशा गलक्याने जाग आली त्याला. अशुभाच्या शंकेने तो धावत आत गेला. शंका खरी ठरली होती. प्रकाश रात्रीच केव्हातरी जग सोडून निघून गेला होता. त्याच्या हातात मात्र अजूनही काल त्याने दिलेले 200 रुपये होते…
प्रकाशचा अंत्यविधी करून खिशात जितक्या नोटा होत्या, त्या प्रकाशच्या मुलाच्या हातात जबरदस्तीने देऊन तो घरी परतला… किमान आपण त्याला अंतकाळी भेटू शकलो आणि त्याच्या ऋणातून मुक्त होऊ शकलो, याचे समाधान घेऊन!
0000
खूप दिवस झाले आणि अगदी अचानक एका सकाळी प्रकाशचा मुलगा त्याच्या घरी आला. काहीशा आश्चर्याने आणि आनंदाने त्याने त्याचे स्वागत केले. खाणेपिणे होताच मुलाने विषय काढला…
“वडिलांचे वर्षश्राद्ध आहे 15 दिवसांनी… तुम्हाला तेच सांगायला आलो…”
“आणखी एक…” मुलाने रबर लावलेल्या काही नोटा त्याच्यापुढे ठेवल्या.
“हे काय?”
“तुम्ही निघताना मला दिलेले पैसे. आठ हजार सातशे!”
“अरे पण, ते तुला खर्च करायला दिले होते. परत घेण्यासाठी नाही…! आणि तुला एकदम मोजून-बिजून ठेवायला कोणी सांगितले?”
“पप्पांनी!”
“म्हणजे?”
“गेले काही दिवस रोज पप्पा माझ्या स्वप्नात येतात आणि तुम्हाला पैसे परत करायला सांगतात. ही रक्कम त्यांनीच सांगितली. मी तर मोजलेही नव्हते. ते म्हणाले, वर्षाच्या आत परत कर…”
हेही वाचा – …अन् अंकूसोबत नव्याने संसार सुरू केला!
थरथरत्या हाताने त्याने पैसे घेतले. तेवढ्यात त्या मुलाने एक चांगल्यापैकी शर्टपीस त्याच्या हातात ठेवला. काहीशा आश्चर्याने त्याने विचारले,
“हे कशासाठी? का हेही प्रकाशनेच द्यायला सांगितले?”
“हो. पप्पा म्हणाले, पहिल्यांदा आपल्या घरी आला माझा मित्र आणि रिकाम्या हाताने गेला. तेव्हा…”
प्रकाशचा मुलगा आग्रह करूनही न थांबता निघून गेला आणि हा त्या शर्टपीसवर हात फिरवत नि:शब्द… हे खरंच असतं का? त्याने स्वप्नात येऊन आठवण करून देणे… मरण्याआधीची भेट… आणि आता आपल्याच मुलाच्या स्वप्नात येणे… मृत्यूनंतर स्वप्नात येणे, त्याने ऐकले होते. पण जिवंतपणी स्वप्नात येणे याला काय म्हणता येईल? त्याचे आपले ऋणानुबंध काय? काही गोष्टी तर्क वगैरेच्या पलीकडील असतात…
त्याने कॅलेंडरवर प्रकाशच्या वर्षश्राद्ध असलेल्या दिवसाला गोल केले. हो… जावेच लागणार होते त्याला!


