उत्तरार्ध
त्या दिवशी स्नेहल, पार्वती आणि रंभा यांनी ठरवले, घराचे काम सुरू करण्याआधी मुंबादेवीला नमस्कार करून येऊ. म्हणून तिघींनी महालक्ष्मी स्टेशनवर जमायचे ठरविले. स्नेहल गोरेगावहून निघाली. तिने पार्वतीला फोन केला, तेव्हा तिला कळले ती पण मुलुंडवरून निघाली आहे. रंभा माहीममध्ये राहत होती… ती पण निघाली. सकाळी अकरा वाजता तिघी मैत्रिणी महालक्ष्मी स्टेशनवर दोन नंबर प्लॅटफॉर्मवर भेटल्या. प्लॅटफॉर्मवरील गर्दी कमी होताच, तिघी जिना चढायला लागल्या. पुढे रंभा, मधे पार्वती आणि तिच्या मागे स्नेहल अशा पायऱ्या चढता चढता पाचव्या पायरीवर असताना स्नेहलच्या छातीत कळ आली आणि गडगडत खाली जाऊ लागली… मागून येणाऱ्या माणसाने तिला अडवले आणि तो ओरडू लागला…
“गिर गयी.. गिर गयी…”
रेल्वे पोलीस आले.. स्ट्रेचर मागविले गेले आणि बाहेर ॲम्ब्युलन्स आली… ती ॲम्ब्युलन्स जसलोकच्या दिशेने धावू लागली. भांबवलेल्या पार्वती आणि रंभा बरोबर होत्या… त्या रडत होत्या. काय करावे त्यांना सुचेना.. मग पटकन रंभाने मोबाइल काढला आणि शंकरला फोन लावला.
शंकर आर्किटेक्ट सामंत यांच्या ऑफिसमध्ये बसून त्यांच्याशी घराच्या प्लॅनसंबधी चर्चा करत होता… कुठल्या दिशेला देवखोली.. कुठे किचन असे बोलत असताना त्याचा मोबाइल वाजला… त्याने पाहिले रंभाचा फोन होता. तो मनात म्हणाला, ‘या तिघी भेटल्या नाही का अजून?’
त्याने फोन कानाला लावला तर कसली तरी गडबड सुरू होती आणि रंभा रडत होती…
“अगं काय झालं?”
“स्नेहलला जसलोकमध्ये नेत आहेत… बहुतेक…”
“काय… काय झालाय?”
“तुम्ही ताबडतोब जसलोकमध्ये पोहोचा… आम्ही ॲम्ब्युलन्समध्ये आहोत… स्नेहल बेशुद्ध आहे!”
रंभाला पुढे बोलता येईना.
हेही वाचा – स्नेहल रेल्वेपुलावरून गडगडत खाली आली…
शंकर झटकन बाहेर पडला, लिफ्टने खाली आला… त्याने एक टॅक्सी पकडली. टॅक्सी जसलोकच्या दिशेने धावू लागली. त्याचा पार्वतीशी संपर्क सुरू होताच… त्याला कळले स्नेहल सहाव्या मजल्यावर कार्डियाक विभागात आहे. त्याने टॅक्सी सोडली आणि धावत लिफ्ट पकडली आणि तो सहाव्या मजल्यावर पोचला. काचेचे दार उघडून तो आत शिरला तर, त्याला पार्वती आणि रंभा समोर दिसल्या… त्या मुसमूसत म्हणाल्या…
“स्नेहलला आत घेतलं आहे. मघा डॉक्टर तुमची चौकशी करत होते. तुम्हाला बोलवायला सांगत होते…”
धडधडत्या काळजाने शंकर आत गेला… सोबत पार्वती आणि रंभा पण आत गेल्या… तिथल्या डॉक्टरना तो भेटला. डॉक्टर म्हणाले, “सॉरी मी… शंकर… स्नेहल इज नो मोअर… कार्डियाक फेल… नो चान्स…”
शंकर मोठ्याने किंचाळला आणि धाडकन खाली पडला…
0000
शंकर भकास डोळ्याने सर्वांकडे पाहात होता… आजूबाजूला त्याचे चुलत भाऊ, वाहिनी, गुंडू काका, संतोष सारे होते. शिवाय, स्नेहलच्या मैत्रिणी, त्त्यांचे नवरे, बँकेतील सहकारी… पण शंकर गप्प होता. शेवटी त्याची सहचारिणी गेली होती. त्याच्या आयुष्यातील हा दुसरा फटका होता. काही वर्षांपूर्वी त्त्यांची लाडकी लेक गेली होती. पण एकमेकांना सांभाळत त्यानी आयुष्य पुढे नेलं होत, पण आज… तिची शेवटची इच्छा होती, गावी स्वतःचे घर बांधायची… तिला झाडें लावायची होती… आंबा कलमे आणि काजू कलमे… जाई-जुईचे वेल सोडायचे होते… एक कुत्रा पाळायचा होता… तिला एक मांजर हवं होत… शेजारी तिची मैत्रीण पार्वती घर बांधणार होती आणि त्याच्यापुढे रंभा… मग तिघी भरपूर गप्पा मारणार होत्या… एकमेकींना वाट्या पोहोचवणार होत्या… पण…
“संतोष, मला घर बांधायचे नाही. तिच्यासाठीच तर घर… आता कोण राहणार त्या घरात? ती जागा विकून टाक… मी मुंबई पण सोडणार. या घरात तिच्या आठवणी आहेत… मला लांब जायचे आहे, अगदी लांब…”
“असा विचार करू नकोस शंकर… तिची इच्छा होती ना घर बांधायची?” – गुंडू काका.
“होती हो काका, पण आता तीच नाही तर कुणासाठी घर बांधू?”
“मग कुठे जाशील शंकरा?”
“काका, मी पालघरजवळ एक वृद्धाश्रम पाहिला होता पूर्वी… मला तो आवडला होता. स्नेहलला पण तो आवडला होता. तिथेच जाईन मी… आता माझा निर्णय झालाय.. तुम्ही कुणीही मला अडवू नका..”
सारे गप्प बसले.
स्नेहलला जाऊन पंधरा दिवस झाले आणि आपले मोजके सामान घेऊन शंकर पालघरच्या वृद्धाश्रमात भरती झाला. त्याला सर्व विसरायचे होते… या आश्रमात त्याला अखेरपर्यत रहायचे होते. त्या आश्रमाचे प्रमुख काका देशमुख. सकाळी पाच वाजता उठत आणि संपूर्ण आश्रमाची झाडलोट करत. मग विहिरीवरील मोटर चालू करत आणि टाक्या भरत. मग सर्वांसाठी चहा करत… कुणाला कॉफी करत. सतत कामात रहायचे. आश्रमात त्यांनी भाजी लावली होती… ती खुडून आणत… मग इतर माणसे येत आणि नाश्ता सुरू होई… त्यानंतर जेवणाची तयारी. स्वतः ते भाजी चिरून देत. मग आश्रमातील राहायला आलेल्या मंडळीसोबत चर्चा करत, त्त्यांचे प्राब्लेम ऐकत. या आश्रमात रोज डॉक्टर येई, सर्व वृद्ध लोकांना तपासून औषध देई.
या आश्रमात शंकरला अनेक वृद्ध भेटले. काही जण रोजच्या एकसुरेपणाला कंटाळून आले, परदेशी जायचे असल्याने काहींना मुलांनीच तिथे ठेवले होते… काही जणांचे कुणीच पाहाणारे नव्हते… पण पैसे आहेत म्हणून आणि मुलाबाळांना त्रास नको म्हणून ते तिथे रहात होते.
शंकरला या आश्रमात चार महिने झाले होते. एक दिवस काका देशमुख शंकरच्या खोलीत आले. आणि म्हणाले,
“मग शंकरराव… बोला… तुम्ही कसे काय माझ्या आश्रमात आलात? मुलांनी इथे पाठवलं की…”
“नाही नाही काका, मी माझ्याच दैवावर चिडलो आहे, माझ्यावर देवाने अन्याय केला आहे. माझी मुलगी अकाली गेली आणि चार महिन्यांपूर्वी…”
शंकर बोलत राहिला आणि काका शांतपणे ऐकत होते. त्याचे बोलणे पूर्ण ऐकल्यावर काका म्हणले,
“म्हणजे तुमचे घर तुम्ही बांधले नाहीच. जागा घेऊन ठेवली आहे… त्यामुळे या माझ्या आश्रमात येऊन राहिलात. शंकरराव, तुम्हाला सांगतो, मी पण तुमच्यासारखा नाशिकच्या एका वृद्धाश्रमात रहायला गेलो होतो. मुलांना मी नको झालो होतो. तेव्हा त्या आश्रमात एवढी गर्दी झाली होती की, नवीन कुणाला ते घेऊच शकत नव्हते. त्यावेळी माझ्या मनात आले, समाजाला जर एवढ्या वृद्धाश्रमांची गरज असेल तर, आपणच का एखादा आश्रम सुरू करू नये? ही जागा माझ्या नावावर होती, मी धडपडू लागलो… समाजातील अनेक भल्या लोकांनी मला मदत केली, अनेक संस्था मागे उभ्या राहिल्या आणि मग उभा राहिला आश्रम! पहिल्या दिवसापासून येथे माझ्यासारख्या वृद्धांची गर्दी झाली… पण निरपेक्ष बुद्धीने आणि सचोटीने हे काम करायला हवं… इथे फायदा-तोटा पाहू नये. देवळे बांधण्यापेक्षा हे मोठे काम आहे. आता समाजाला याची गरज आहे आणि यापुढे वाढणार आहे. मी मित्र म्हणून बोलतोय, असे समजा… शंकरराव, तुम्ही वीस गुंठे जागा विकत घेतलेली आहे, आता तुम्ही घर बांधणार नाहीत, मग एक वृद्धाश्रम का नाही उभारत? तो असा उभा करा की लोकांना वाटले पाहिजे, आपण मंदिरात आलो आहोत. काही तरी पवित्र आहे येथे… काय तुमच्या पत्नीचे नाव होते?”
“स्नेहल”
“मग एक ‘स्नेहमंदिर’ उभारा… कसले दुसऱ्याच्या आश्रमात राहता? उभे करा स्नेहमंदिर!”
काकांच्या बोलण्याने शंकरारवांच्या मनात ऊर्जा निर्माण झाली… होय, खरेच समाजाला, माझ्यासारख्या अनेक वृद्धाना आश्रमाची गरज आहे. आपली जागा तर आहे… संतोष पाठीमागे आहे, गावची शेजारीपाजारी मंडळी आहेत… मुंबईत बऱ्याच ओळखी आहेत. स्नेहलचे मित्रमंडळ आहे… तिची आठवण कायमची राहील, असे काहीतरी उभे करायचे.
दुसऱ्या दिवशी काकांचा आश्रम सोडून शंकर मुंबईत आला. त्याने ही कल्पना अनेकांना सांगितली. स्नेहलच्या मैत्रिणीनी पण आपण यात भाग घेतो, तसेच फंड जमवतो, असा शब्द दिला.
मग परत एकदा शंकर, सामंत आर्किटेककडे गेला आणि घराचा प्लॅन रद्द करून बारा खोल्यांचा आश्रमचा प्लॅन तयार करून घेतला. मग तो गावी आला आणि संतोषला घेऊन प्लॅनप्रमाणे बांधकाम सुरू केले. त्याने मुंबईतली जागा विकली… आपले आणि स्नेहलचे पैसे या बांधकामात घातले. कोकणात एक वृद्धाश्रम उभा राहतोय आणि एक व्यक्ती निरपेक्ष वृत्तीने काम करतोय, हे पाहून अनेकांनी पैसे दिले. स्नेहलच्या मैत्रिणीनी मोठ्ठी रक्कम उभी केली. आठ महिन्यात बांधकाम पुरे झाले. मोठी विहीर बांधून झाली… एका दानशूर व्यक्तीने सर्व फार्निचर दिले… कुणी दिवे दिले, कुणी पंखे दिले… एका संस्थेने किचनमधील सर्व मटेरिअल पुरविले… दीढ वर्षात ‘स्नेहमंदिर’ उभे राहिले!
मग आजूबाजूला फुलझाडे, आंबे, फणस यांची झाडे आली. एका व्यक्तीने एक गाडी भेट दिली. ॲम्ब्युलन्स भेट मिळाली. रोज व्हिजिट करणारे डॉक्टर भेटले…
हेही वाचा – एक स्त्री म्हणून माझं काय चुकलं?
लोकात ‘स्नेहमंदिर’ची चर्चा सुरू झाली… ज्येष्ठ मंडळी येत राहिली… काही कायमची, काही थोडया दिवसासाठी. शंकर पूर्ण दिवस संस्थेच्या कामात मग्न झाला… सकाळी पाचपासून रात्री बारा… हा त्त्याचा दिनक्रम होऊ लागला. काही वर्षांनी स्नेहलची मैत्रीण पार्वती आणि तिचा नवरा येथे आले… पाठोपाठ रंभा पण येथेच आली.
स्नेहमंदिरमध्ये कायमची गर्दी होऊ लागली… मग अजून बांधकाम, अजून खोल्या… अजून स्टाफ… मग बरीच निरपेक्ष काम करणारी माणसे येत राहिली. अनेक संस्था फंड देत राहिल्या… सारे कसे छान…
शंकरला काका देशमुखची रोज आठवण होई… काका म्हणत, “या समाजाला किती तरी आश्रमांची गरज आहे… अनेक वृद्धांना आसरा हवा आहे.”
स्नेहलला या जागेत दोघांपुरते घर बांधायचं होत.. पण ती अचानक गेली आणि तिची आठवण म्हणूंन उभे राहिले हे ‘स्नेहमंदिर’. तिच्यासारख्या अनेक ज्येष्ठांचे मंदिर…


