पूर्वार्ध
रेवती आंघोळ करून तयार होत होती. तिचा नवरा डॉ. मधुर नाश्ता करत होता, त्याला रेवती म्हणाली, “मधुर, माझ्यासाठी आज एक काम कर…”
“काय?”
“बारा वाजता देवीच्या देवळात महाआरती असते, तू आता दवाखान्यात गेलास की, साडेअकराला घरी ये आणि मला देवळात सोड…”
“अगं, पण मला कसं जमेल?”
“जमेल… बाकी पुरुष बघ आपल्या बायकोला घेऊन सायंकाळी फिरायला जातात, हॉटेलात जातात, मॉलमध्ये जातात आणि देवळात पण जातात, तू माझ्याबरोबर कुठे येतोस का?”
“अगं, त्यांचं आणि माझं प्रोफेशन वेगळं आहे, मला सायंकाळी दवाखान्यात जायचे असते आणि…”
“आणि नाही नि बिणी नाही… पुढचे सर्व मला माहीत आहे. तुला देवळात यायची फारशी इच्छा नसते.. मग आत येऊ नको ना! मला आरतीला सोड आणि फक्त अर्ध्या तासाने घरी आण. एकदिवस पेशन्ट थोडी वाट बघतील…”
“अगं पण… तुला सोडायला जायला इथून वीस मिनिटे, परत घरी सोडायचे, म्हणजे मला अर्धा तास बाहेर वाट पहात राहायला हवी…”
हेही वाचा – पाप आणि पुण्य
“मग तू आत का येत नाहीस आरतीला? तेवढेच पुण्य…”
“प्रत्येकाची पुण्य मिळविण्याची कल्पना वेगवेगळी असते. तुला देवींची ओटी भरून, आरती करून पुण्य मिळते, असे वाटते… मला तसे नाही वाटत. मला माझ्या पेशन्टना रोगमुक्त केल्यानंतर त्यांचे आशीर्वाद महत्त्वाचे वाटतात…”
“ठीक आहे… तू येतोस की नाही साडेअकराला ते बोल…”
“मी येईन पण बाहेर बसेन तुझी वाट बघत. त्यानिमित्ताने तो परिसर पहाणे होईल आणि कोणी ओळखीचे भेटले तर…”
“गप्पा! बरोबर?”
“अगं गप्पा पण मारायला हव्यात, त्यामुळे समाज कळतो… लोकांना सध्याच्या परिस्थितीबद्दल काय वाटते, हे कळते… एक भारतीय नागरिक म्हणून लोकांचा आरसा पण पाहायला हवा!”
“तू आरसा बघ किंवा आणि काय बघ… मी साडेअकराला तुझी वाट पाहतेय…”
“ठीक, मी येतो अकराला…”
डॉ. मधुरने स्कूटर स्टार्ट केली आणि तो दवाखान्यात गेला.
मधुर दवाखान्यात पोचला. आज कोणता तरी सण होता, त्यामुळे नेहमीसारखी गर्दी नव्हती. त्याने एप्रन अंगात चढविला आणि पेशन्ट तपासायला सुरुवात केली. अधूनमधून त्याचे लक्ष हातातील घड्याळाकडे जात होते.. साडेअकराला रेवतीला घरी येतो म्हणून सांगितले आहे.. तसे रेवतीला पण फारसे बाहेर जाता येत नाही.. एकतर आपले घर शहरापासून लांब आहे आणि दुसरे म्हणजे आपली आई आपल्यासोबत असते. सध्या ती बहिणीकडे गेली आहे म्हणून नाहीतर तिला एकटीला घरी सोडून रेवती कुठे जात नाही.
सव्वाअकराला डॉ. मधुर बाहेर पडला. जाताजाता तो मंदाला म्हणाला,
“मंदा… मी रेवतीला घेऊन देवीच्या देवळात जातोय. एक वाजेपर्यंत येतो. पेशन्टना सांग डॉक्टर एकनंतर येतील.”
आपले साहेब आज बायकोला घेऊन देवळात जात आहेत, हे ऐकून मंदाला आश्यर्यच वाटले. पण काही न बोलता तिने मान हलवली.
मधुर घरी पोहोचला. त्याने स्कूटर घराबाहेर लावली आणि मोठी चारचाकी बाहेर काढली. एकतर देवीचे मंदिर सहा किलोमीटरवर होते आणि दुपारचे ऊन होते… त्याने हॉर्न वाजवताच देवीसाठी ओटी घेऊन रेवती बाहेर पडली, तिने घराला कुलूप लावले आणि ती गाडीत बसली.
“किती दिवसांपासून माझ्या मनात होतं… देवीची ओटी भरायची आणि महाआरतीला पण हजर राहायचं… पण जमतच नव्हतं. माझी आई रोज फोनवर विचारत असते… देवीची ओटी भरलीस का म्हणून? पण वेळ यावी लागते म्हणतात ना…”
“आज योग्य वेळ आली काय?”
“अरे, ते बाजूच्या बंगल्यातील नाडकर्णी आहेत ना… त्या नाडकर्णीना हल्ली बरे नसते. म्हणून सावित्रीबाई म्हणजे मिसेस नाडकर्णीना देवीला गाऱ्हाणे घालायचे आहे, आपल्या नवऱ्याच्या तब्येतीसाठी…”
“बरं मग?”
“आज त्या आपल्या नवऱ्याला घेऊन देवीच्या देवळात जायच्या होत्या. म्हणजे सकाळीच गेल्या पण त्या… त्यांनी मला विचारले तुम्ही आज देवळात याल का? म्हणजे काय होतं, देवीच्या देवळात जाताना रिक्षा मिळते पण येताना काही वाहन मिळत नाही! म्हणून त्या म्हणाल्या, तुम्ही आणि डॉ. मधुर जर आज देवीच्या दर्शनाला आलात तर, येताना गाडीची सोय होईल…”
डॉ. मधुर हसत म्हणाला, “असं काय? म्हणजे तुम्हाला आज घरचा ड्रायव्हर हवा होता तर…”
“तसं नाही रे… मला पण देवीची ओटी भरायचीच होती… लग्नाला चार वर्षे झाली आणि अजून…”
“त्याकरिता डॉ. दीक्षित यांची ट्रीटमेंट सुरू आहे ना? आणि मधेच देवी…”
“असू दे. माझा आहे विश्वास…”
मधुरने देवीच्या देवळाजवळ गाडी उभी केली, रेवती त्यातून उतरली आणि देवळाच्या दिशेने चालू लागली. मधुरने गाडी कामत मेडिकलच्या दिशेने वळवली. अशोक कामत त्याचा कॉलेजमधील मित्र. अशोकने दुकानात येणाऱ्या मधुरकडे पाहिले आणि तो ओरडला…
“अरे मध्या! आज दवाखाना बंद ठेवून इकडे कुठे?”
“आली आज मित्राची आठवण… तुला कुठे येते माझी आठवण?”
“अरे बाबा, रोज येते. तुझे पेशंट या भागात पण आहेत… ते दुकानात येतात तू लिहून दिलेली औषधे घ्यायला. पण तू या वेळी? आणि ते पण पेशन्टना सोडून?”
“अरे, आज रेवतीला देवीच्या महाआरतीला यायचं होत. तिला सांगत होतो रिक्षाने जा. पण तिचे म्हणणे दुपारी या भागात रिक्षा मिळतं नाहीत. त्यामुळे आज थोडावेळ दवाखान्यातून वेळ काढला आणि तिला इकडे घेऊन आलो.”
“बरं… म्हणजे वहिनी देवळात आणि तू बाहेर?”
“ज्याला जिथे आवडतं तिथे त्याने जावे.. तिला देवळात जायला आवडते, मला माणसांत मिसळायला आवडते! तुझ्या दुकानात दहा मिनिटे बसले तर दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या बातम्या आणि माणसे भेटतात…”
“ये ये… बरं वाटलं,” असं म्हणून कामतने खुर्ची पुढे केली आणि टाळी वाजवून चहाची ऑर्डर दिली.
रेवती देवळात गेली. अजून फार गर्दी नव्हती, तुरळक माणसे होती, आरतीच्या वेळी देऊळ आणि परिसर भरून जातो. रेवती देवीची ओटी भरायला म्हणून आत आली, तेव्हा तिला नाडकर्णी दाम्पत्य दिसले. दोघे डोळे मिटून देवीचे स्तोत्र म्हणत असावे, बहुतेक. रेवतीने देवीची ओटी भरली, पुजाऱ्याने तिला तीर्थ आणि प्रसाद दिला… तो घेऊन ती मिसेस नाडकर्णींच्या बाजूला बसली.. मिसेस नाडकर्णी तिला बघून हसल्या.
“एकटीच आलीस, डॉक्टर नाही आले काय?”
“आले आहेत, मला दारात सोडलं त्यांनी आणि त्त्यांचा मित्र आहे ना, कामत केमिस्ट… त्याच्याकडे गेलेत…”
“मग आत आले नाहीत ते? बहुदा ही डॉक्टर मंडळी नास्तिक असतात…”
“मधुरला नास्तिक नाही म्हणता येणार. तो लहानपणापासून आंघोळ केल्यावर अथर्वशीर्ष म्हणतोच. सकाळी बाहेर पडताना घरच्या देवांना नमस्कार करतो. पण मग मात्र कुठल्या देवळात जात नाही की, कसला उपास करत नाही. पण त्याचा मला विरोध नसतो. मी उपास करते, त्याला तो कधीच काही म्हणत नाही. उलट, मेडिकल सायन्सच्या दृष्टीने उपास चांगला… पण उपासाला साबूदाणा किंवा बटाटे खाणे योग्य नसते, असे त्याचे म्हणणे.”
“आरती बारा वाजता सुरू होईल. डॉक्टर बाहेर आहेत ना? इथे रिक्षा मिळत नाहीत म्हणून विचारले?”
“तो कामतकडे आहे. आरती झाली की, मिसकॉल दे म्हणाला. मग आपण जाऊ. मिस्टरांची तब्येत कशी आहे?”
“नरमच आहे. आज देवीचा प्रसाद घेतला की, बरे वाटेल…”
“अहो, पण ट्रीटमेंट घ्यायला नको का? अंगावर काढू नका…”
“जाऊ दोन दिवसांनी. माझा या देवीवर विश्वास आहे. तिचे चमत्कार ऐकलेत मी.”
हेही वाचा – हळदीकुंकू… जुनी प्रथा मोडून काढणारे!
“ते असू दे. पण उद्याच त्यांना चांगल्या डॉक्टरकडे न्या. मी मधुरला सांगते, तो तुम्हाला चांगला डॉक्टर सुचविल.”
एवढ्यात देवळातील घंटा मोठमोठ्याने वाजायला लागल्या. मोठी आरती पेटवली गेली आणि झपझप माणसे आरतीसाठी जमा झाली… टाळ-मृदंग वाजू लागले, लोकांनी टाळ्या वाजून आरती म्हणायला सुरवात केली…
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारीं…
रेवतीच्या बाजूला मिसेस नाडकर्णी आणि त्यांच्या बाजूला नाडकर्णी टाळ्या वाजवत आरती म्हणत होते…
जयदेवी जयदेवी जय महिषासुरमर्दिनी…
आरती टिपेला पोहोचली असताना मिसेस नाडकर्णी एकदम ओरडल्या,
“अहो काय होतंय.. काय होतय…?”
रेवतीने पाहिले.. मिसेस नाडकर्णी खाली वाकल्या होत्या आणि खाली पडलेल्या नाडकर्णीना उठवत होत्या. रेवती पण खाली बसली आणि तिने पाहिले, नाडकर्णी निपचित पडले होते आणि मिसेस नाडकर्णी मोठमोठ्याने “आरती थांबवा… आरती थांबवा” अशा ओरडत होत्या.


