शैलेश विजया सोमनाथ महाजन
प्रत्येकाच्या मनात अनेकदा द्वंद्व सुरू असते. प्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपिअर यांच्या ‘हॅम्लेट’ नाटकातील ’ “To be, or not to be, that is the question…’ असाच काहीसा प्रकार सुरू असतो. पण हेही लक्षात घेतलं पाहिजे, सामाजिक स्तरावरही असेच द्वंद्व सुरू असते. राष्ट्र उभारणीसाठी विरोध कोणाचा? तर आपलाच! आपल्याच देशातल्या नागरिकांचा, का?
अज्ञानापोटी की अतिज्ञानामुळे? अहंकारापोटी? स्वार्थापोटी? की प्रवृत्तीच वाईट आहे, म्हणून! काम करायला नको, सर्व गोष्टी फुकट पाहिजेत अशा कामचोर लोकांचा? माझी, आमची सत्ता जाईल म्हणून? सर्व कारभार बिनबोभाट व्हावा म्हणून? सहज दुसऱ्यांना फसवून आपला स्वार्थ साधता येतो, की येत नाही म्हणून? की दुसऱ्यांशी लागेबांधे आहेत, म्हणून? शत्रूशी हात मिळवणी केली, म्हणून? देशप्रेम म्हणून की, देशद्रोही म्हणून?
विरोध कोणाचा? रस्त्यावर थुंकणाऱ्यांचा की, न थुंकणाऱ्यांचा? टॅक्स भरणाऱ्यांचा की, न भरणाऱ्यांचा? सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तणूक करणाऱ्यांचा की, सभ्यतेच्या सर्व मानमर्यादा सांभाळणाऱ्यांचा? दगडफेक अन् जाळपोळ करून आपल्याच देशाचे नुकसान करणाऱ्यांचा की, शांतप्रिय मार्गाने राहणाऱ्यांचा? नक्की विरोध कोणाचा?
शासकीय योजनांचा लाभ, सोयी-सुविधा फुकटात पदरात पाडून घेणाऱ्यांचा की, योग्य मोबदला देऊन सोयीसुविधा घेणाऱ्यांचा? बळीराजाच्या बाजूने उभे राहणाऱ्यांचा की, दलालांच्या बाजूने उभे राहणाऱ्यांचा? दंगल, बॉम्बस्फोट यासारख्या अतिरेकी कारवायांना खतपाणी घालणाऱ्यांचा, की त्याविरुद्ध कडक कारवाई करणाऱ्यांचा? नक्की विरोध कोणाचा?
हेही वाचा – या ‘तरुणां’च्या कार्यशक्तीचा देखील विचार व्हावा!
काश्मीर प्रश्न चिघळत ठेवून, अतिरेकी कारवायांना प्रोत्साहन देणाऱ्यांचा, आपल्या लष्करावर दगडफेक करणाऱ्यांचा की, काश्मीर प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा? चीन, पाकिस्तान यासारख्या शत्रूराष्ट्रांचा बागुलबुवा उभा करून भारताचे मनोधैर्य खच्ची करणाऱ्यांचा की, वेळीच चीन आणि पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्यांचा? नक्की विरोध कोणाचा?
मीडिया आमच्या ताब्यात आहे, म्हणून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्यांचा की, मीडियाचा योग्य वापर राष्ट्र उभारणीसाठी करणाऱ्यांचा? माझ्या हातात सोशल मीडिया आहे, मी काहीपण करू शकतो. म्हणून विरोध? फेक न्यूज आणि फेक फॉरवर्ड पोस्ट, यावर विश्वास ठेऊन मत बनवणाऱ्यांचा विरोध की, अभ्यासपूर्ण सोशल मीडिया वापरणाऱ्यांचा विरोध?
नक्की विरोध कोणाचा असतो आणि कशासाठी असतो? फार पूर्वीपासून असा विरोध नेहमीच होता राहिला आहे. आजपण होत आहे आणि पुढेही होत राहणार आहे. हे सर्व द्वंद्व चांगल्या आणि वाईटांमध्ये कायमच चालू असते. असे बरेच विषय आहेत आणि ते आपल्याला माहीत आहेत. आपण सर्वजण जाणते आहोत. योग्य वेळी याबाबत निर्णय घ्यावाच लागेल. नेहमी दुष्ट प्रवृत्तीला नष्ट करण्यासाठी चांगल्या प्रवृत्तीने एकत्र येण्याची खरी गरज असते. प्रसिद्ध लेखक व. पु काळे म्हणतात, ‘’आत्मानं सतत रक्षेत्!’ स्वत:चं रक्षण करावं, पण कशापासून? – परचक्रापासून – no! राजा no! युद्ध वारंवार होत नाहीत आणि झालीच तर मिलिटरी आहे. भारताने अणुबॉम्ब पण बनवला आहे. आपण सिव्हिलियन. आपला बुद्धिभेद करणारी माणसं सतत भोवती हिंडत असतात, त्यांच्यापासून स्वत:चं रक्षण केलं पाहिजे…’
हेही वाचा – स्वयंपाकघर अन् अर्थशास्त्र, समाजशास्त्राचे नियम