“चला उद्या रविवार छान आरामात उठणार आणि निवांत आवरणार… रोजची गडबड असतेच उद्याची सुटी मात्र एन्जॉय करणार… असेही उद्या बरेच दिवसांनंतर घरात कोणीच नाही, त्यामुळे काय केव्हाही उठा केव्हाही आवरा! असा विचार मनात करून मी झोपण्याच्या तयारीला लागले.
खरंच उद्या मी घरी एकटीच होते. नवरा, पोरं, सासू-सासरे त्यांच्या त्यांच्या काही कारणांमुळे आज संध्याकाळीच घराबाहेर गेले, जे एकदम सोमवारी सकाळनंतर घरी येणार होते. मी तर मनात केव्हाच हुश्श केलं होतं! सगळ्यांना बाय करून आता आरामात बसले होते. कोणी बोलायला नाही की, कोणी काही म्हणायला नाही…
“चला, मॅडम बरेच दिवसांत निवांत बसून पुस्तक पण वाचलेले नाही आज जरा बघू एखादे पुस्तक घेऊ वाचायला…” असे म्हणत मी पुस्तकांच्या कपाटाजवळ गेले. बरेच दिवसांत असे निवांत त्यांच्याकडे बघितले नव्हते. मग काय एकेक पुस्तक हातात घेत “हे पुस्तक केव्हा घेतले? का घेतले? कोणी दिले?” असे अनेक विचार मनात येत गेले… आणि त्याच्या आठवणींमध्ये किती वेळ पुस्तकांसमोर बसले, माझे मलाच लक्षात आले नाही. अचानक फोनची रिंग वाजली आणि मी दचकून भानावर आले. माझ्याकडे कामाला येणाऱ्या मावशींचा फोन होता… “उद्या आले नाही तर चालेल का? असेही तुम्ही एकट्याच आहात. मजा करा. मी पण माझ्या घरच्यांबरोबर थांबते,” असे म्हणून त्यांनी पण सुटी घेतली.
हेही वाचा – आठवणींचे कपाट!
एकही पुस्तक न वाचता नुसताच पुस्तकांचा पसारा मांडून बसले होते. “राहू दे असाच पसारा आधी काहीतरी खाऊन घेते नंतर निवांत एखादे पुस्तक वाचत बसते,” असा विचार करून मोर्चा स्वयंपाकघराकडे वळवला. सगळेजण जाताना खाऊन, थोडेफार बरोबर घेऊन गेले होते त्यामुळे खायला भरपूर होते. एकटी किती खाणार ना, त्यामुळे त्यातीलच काहीतरी घेऊ खायला असा विचार केला आणि ओट्याजवळ उभी राहिले. रोज स्वयंपाकाची गडबड असते, त्यामुळे आरामात कोणत्याच गोष्टींचा आनंद घेता येत नाही. त्यामुळे आज जेवणाचा आनंद घेऊ, असे ठरवून छान एकटीसाठीच ताट वाढून घेतले. ताट वाढताना ताट-वाटी, स्वयंपाकाची भांडी यांच्याकडे लक्ष गेले, किती प्रेमाने हे भांडे मी घेतले… अरे, हे तर लग्नातील रूखवतामधील… हे सासुबाईंनी दिलेले… हे अजून कोणी… असे एकेक नाव समोर येत गेले आणि मी पुन्हा आठवणींमध्ये गुंतले… किती ती भांडी (पसाराच की!) थोड्यावेळात जेवण करून सर्व आवरून पुस्तकांकडे पुन्हा मोर्चा वळवला.
आज पुस्तक वाचायला घ्यायचेच आणि आजपासून पुन्हा पुस्तक वाचायला सुरुवात करायची, असे ठरवले. इतक्यात मैत्रिणींचा फोन आला. तिच्या शेजारी माझी टेलर रहाते, तिच्याकडे मला ड्रेस शिवायला द्यायचे होते, ते घेण्यासाठी घरी जाताना मैत्रीण येणार होती. झालं पुन्हा पुस्तक बाजूला ठेवून कपड्यांच्या कपाटाकडे आले. पिशवीत ड्रेस मटेरियल काढूनच ठेवले होते. ती पिशवी बाहेर काढून ठेवली.
“अरे हे काय? लेकीने जाताना सगळे कपडे अस्ताव्यस्त करून ठेवले होते. काय तर तिला साडी हवी होती. मग मॅडमनी पूर्ण कपडे खाली-वर करून ठेवले होते. बरं झालं आत्ताच लक्ष गेलं, नाहीतर सोमवारी कामाला जाताना माझीच गडबड झाली असती…” असे स्वत:शी म्हणून मीच तो कपड्यांचा पसारा आवरायला घेतला. सगळा कप्पा बाहेरच ओढला. आधी छान घड्या घालू मग लावू, असे ठरवले. एकेक कपडा घडी घालायला हातात घेतला आणि रमले की मी भूतकाळात! हा ड्रेस घातल्यावर कोण-कोण काय-काय म्हणाले? ड्रेस कुठे घेतला? साडी कोणी घेतली? केव्हा घेतली? आईची साडी घेऊन आले तो क्षण… तसेच यांनी घेतलेली पहिली साडी आता नेसत नसले तरी कपाटात जपून ठेवली आहे. बापरे, किती ते कपडे! असेच वाटले काही वेळ पण पुन्हा, अरे अजून तर साडीचा हा प्रकार नाही घेतला, या रंगाची साडी नाही की माझ्याकडे… या रंगाच्या किती साड्या झाल्या, आता नाही घ्यायचा हा रंग…” असे सगळे विचार स्वत:शी करत बसले.
आज खरंच मला निवांत वेळ होता. रोज ॲाफिसची गडबड, घरातील कामांची गडबड यामध्ये स्वत:कडे पण निवांत बघायला वेळ मिळत नाही, तेथे आपल्या वस्तूंकडे, माणसांकडे तरी बघायला कुठे वेळ मिळायला! पटापट कपाट आवरून ठेवले. छान वाटत होते. किती दिवसांनी हे असे आरामात आवडीचे काम करण्याचे सुख अनुभवले होते.
तसे तर रात्रीचे 10 वाजले होते. लवकर झोपायचे ठरवले होते. पण पुस्तकं अजून वाट बघत आहेत, हे लक्षात होते. त्यामुळे पुन्हा पुस्तकांकडे आले. सर्व पुस्तकं बघता बघता नजर गेली संत साहित्याच्या पुस्तकाकडे. बाबांनी दिलेले हे पुस्तक नेहमी विचारतात वाचले का पुस्तक? कसे वाटले? काय समजले? वाचलेच नाही तर काय सांगणार!
असो, आता हेच पुस्तक वाचायला सुरुवात करू, असा विचार केला. पुस्तक हातात घेतले आणि छानपैकी घरातील कोपरा निवडून पुस्तक वाचायला सुरूवात केली. एक-दीड तास कसा गेला, समजलाच नाही. सुरुवातीला वेगवेगळे अभंग आणि पुढे माहिती असलेल्या या पुस्तकातही मराठी वारकरी संतवाङ्मयामध्ये, विशेषतः ज्ञानेश्वरीतील 16-221 मध्ये “घातलेयां धर्माचा पसारा” नामदेवांच्या गाथेत ‘ वाणी गांधीपण, पाठी पसारा । घेवोनि संसारा आलों असे” तर चोखामेळ्यांच्या अभंगात ‘मांडिले दुकान,घातला पसारा’ असे वाचनात आले आणि या संतांनी पण कसे पसाऱ्याचे वर्णन वेगवेगळ्या पद्धतीने केले आहे, ते बघितले… आणि विचार करू लागले, खरंच किती हा पसारा घरातील छोट्या वस्तूंपासून अगदी विश्वाचा पसारा यापर्यंत किती मोठा विषय हा. अचानक आजी वापरायची त्या ओळी आठवल्या
सुईमागे दोरा संसाराचा पसारा
आकाशात वारा खाली वावटळीचा पसारा
जगाचा पसारा देव झाला आसरा
बहुरत्ना वसुंधरा तिच्यात वस्तूंचा पसारा
आला उंदरांचा मारा घरात मातीचा पसारा
किती त्या बायकांचे साहित्याचे ज्ञान. (खरंतर, साहित्याचा सुद्धा पसारा खूप आहे, पण तेथे व्याप्ती किंवा विस्तार असे शब्द जास्त योग्य वाटतात, हो ना? आणि महत्त्वाचे म्हणजे तो पसारा न आवरलेलाच छान आहे…)
आज मला हा पसारा अचानक आवरायला मिळाला, पण तसे तर याचे पण खास काही दिवस असतात, जसे की कोणी पाहुणे अचानक घरी येणार आहेत, किंवा दिवाळीपूर्वी! आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शेवटचा पेपर झाल्यावर आवरावयाचा पसारा. वस्तूंचे पसारे आवरायला सोपे असतात, पण आठवणींचे पसारे कसे आवरायचे!
हेही वाचा – गोफ… सुखद आठवणींचा!
मोबाइलमध्ये खूप फोटो, मेसेज झाले तर तो storage full असे दाखवतो. मग आपण जे नको असतील, असे काही फोटो काढून टाकतो. काही नको असलेले मेसेज पण काढून टाकतो आणि जागा करतो. तसे आपल्या आयुष्यात पण करायला हवे ना! नको असलेल्या वस्तूंबरोबर नको असलेल्या, जुन्या आठवणींचा पसारा पण आवरायला हवा ना. वेळच्या वेळी हे करायला हवे नाहीतर एखाद्या दिवशी आपले पण storage full होईल.
जुन्या वस्तूंचा पसारा आवरणे आपल्या हातात आहे, पण दृष्टीचा पसारा आवरणे काही आपल्या हातात नाही. तेथे त्या निर्मात्याला काही कधी storage fullचा मेसेज येणार नाही… कारण तो निर्माता काही काही वेळाने हा पसारा आवरतच असतो. जर त्या निर्मात्याला पसारा आवरणे चुकले नाही तर, आपण कोण वेडे हा पसारा सांभाळणारे.
शेवटी जगी हा खास वेड्यांचा पसारा आहेच!


