वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय सहावा
हा विचारूनि अहंकारु सांडिजे । मग असतीच वस्तु होईजे । तरी आपली स्वस्ति सहजें । आपण केली ॥71॥ एऱ्हवीं कोशकीटकाचिया परी । तो आपणपया आपण वैरी । जो आत्मबुद्धि शरीरीं । चारुस्थळीं ॥72॥ कैसे प्राप्तीचिये वेळे । निदैवा अंधळेपणाचे डोहळे । कीं असते आपुले डोळे । आपण झांकी ॥73॥ कां कवण एकु भ्रमलेपणें । मी तो नव्हें गा चोरलों म्हणे । ऐसा नाथिला छंद अंतःकरणें । घेऊनि ठाके ॥74॥ एऱ्हवीं होय तें तोचि आहे । परि काई कीजे बुद्धि तैशी नोहे । देखा स्वप्नींचेनि घायें । की मरे साचें ॥75॥ जैसी ते शुकाचेनि आंगभारें । नळिका भोविन्नली एरी मोहरे । तरी तेणें उडावें परि न पुरे । मनशंका ॥76॥ वायांचि मान पिळी । अटुवें हियें आंवळी । टिटांतु नळी । धरुनि ठाके ॥77॥ म्हणे बांधला मी फुडा । ऐसिया भावनेचिया पडे खोडां । कीं मोकळिया पायांचा चवडा । गोंवी अधिकें ॥78॥ ऐसा काजेंवीण आंतुडला । तो सांग पां काय आणिकें बांधला । मग नोसंडी जऱ्ही नेला । तोडूनि अर्धा ॥79॥ म्हणऊनि आपणपया आपणचि रिपु । जेणें वाढविला हा संकल्पु । येर स्वंयबुद्धी म्हणे बापु । जो नाथिलें नेघे ॥80॥
जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः । शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः ॥7॥
तया स्वांतःकरणजिता । सकळकामोपशांता । परमात्मा परौता । दुरी नाहीं ॥81॥
हेही वाचा – Dnyaneshwari : ऐकें संन्यासी तोचि योगी, ऐसी एक्यवाक्यतेची जे जगीं…
अर्थ
विचार करून हा अहंकार टाकावा आणि मग असलेले आपले स्वरूप ओळखून ब्रह्मरूप व्हावे, म्हणजे आपण आपले कल्याण केल्यासारखे सहजच होईल. ॥71॥ नाहीतर, जो शरीर हेच उत्तम समजून, तेथे आत्मबुद्धी ठेवतो, तो कोशकिड्याप्रमाणे आपला आपणच शत्रू होतो. ॥72॥ ऐन लाभाच्या वेळेला करंट्याला आंधळेपणाचे डोहाळे कसे होतात पहा! तो आपले असलेले डोळे आपणच झाकून घेतो. ॥73॥ किंवा कोणी एक (मनुष्य) वेड लागल्यामुळे पूर्वीचा जो मी तो मी आता नाही, मी चोरला गेलो, असे म्हणतो. (आणि) आपल्या मनात असा नसताच आग्रह घेऊन बसतो. ॥74॥ एऱ्हवी, हल्ली तो जो आहे, तो पूर्वीचाच आहे; पण काय करावे? त्याच्या बुद्धीला तसे वाटत नाही. पाहा, स्वप्नातील तलवारीच्या वाराने कोणी खरोखर मरतो काय? ॥75॥ (पोपटाला धरण्याकरिता बांधलेल्या नळीवर पोपट बसल्यामुळे) जेव्हा पोपटाच्या वजनाने ती नळी उलट बाजूला फिरते, तेव्हा वास्तविक त्याने तेथून उडून जावे, परंतु (ही नळी सोडली तर, आपण पडू आणि मरू, या) त्याच्या मनातील शंकेचे समाधान होत नाही. ॥76॥ मग व्यर्थच तो मान इकडेतिकडे करतो आणि संकोचलेल्या छातीने नळीला आवळीत (ती नळी) चवड्यात धरून राहतो. ॥77॥ मग तो मनात म्हणतो की, मी खरोखरच बांधला गेलो आहे; अशा (या) कल्पनेच्या खोड्यात सापडतो आणि मग मोकळा असलेला आपल्या पायांचा चवडा अधिकच गुंतवतो. ॥78॥ त्याप्रमाणे विनाकारण अडकलेल्या त्या पोपटाला दुसर्या कोणी बांधले आहे काय? अशा स्थितीत त्याला ओढून, अर्धा तोडून जरी नेला, तरी तो काही केल्या नळी सोडत नाही ॥79॥ म्हणून ज्याने आपला संकल्प (देहाभिमान) वाढविला आहे, तो आपला आपणच शत्रू होय. श्रीकृष्ण म्हणतात, दुसरा जो खोट्याचा (मिथ्या देहाचा) अभिमान घेत नाही, तो आत्मज्ञानी म्हणावा. ॥80॥
ज्याने आपले मन जिंकले आहे आणि जो अत्यंत शांत आहे, त्याच्या ठिकाणी आत्मा हा आत्मभावाने राहतो. (तो अनुभवाने परमात्मरूप बनतो.) शीत अथवा उष्ण, सुख अथवा दु:ख, मान अथवा अपमान, ही प्राप्त झाली असता तो शांत निश्चल असतो. ॥7॥
अशा त्या पुरुषाने आपले अंत:करण जिंकल्यामुळे आणि त्याच्या इच्छा निवृत्त झाल्यामुळे त्याला परमात्मा कोठे पलीकडे लांब नाही.॥81॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : तंव हांसोनि श्रीकृष्ण म्हणे, तुझें नवल ना हें बोलणें…
(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)


