येई वो विठ्ठले माझे माऊली ये
निढळावरी कर ठेवूनी वाट मी पाहे…
आलीया गेलीया हाती धाडी निरोप
पंढरपुरी आहे माझा मायबाप…
विठ्ठलाची ही आरती मला फार आवडते. ‘येई वो…’ किती प्रेमाने, लडिवाळपणे, आपलेपणाने विठू माऊलीला साद घातलेली आहे… “अरे ये रे…”
लांबवर कोणी दिसतंय का हे बघायला आपण कपाळावर (निढळावर) आडवा हात धरतो. डोळे बारीक करून कोणी दिसतंय का, हे आतुरतेने बघायला लागतो. तशीच आम्ही तुझी वाट बघतोय… तू येरे….
आमचा प्रतिपाळ करणारा तो माय आणि बाप दोन्ही आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांबरोबर त्याला निरोप दिलेला आहे… त्यामुळे त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलो आहोत… तो येणार ही मनाशी खात्री आहे… त्याची वाट बघण्यातही आनंद आहे!
पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला
गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला… 2
अंतरंगातला प्रकाश उजळला तरच हे डोळे दिपवून टाकणार आभाळभर पसरलेलं, झळकलेलं रूप दिसेल. प्रत्यक्ष विठ्ठल येणार आहे, त्याचं रूप असं भव्यदिव्यच असणार… कल्पनेच्या राज्यात जाऊन बघा बरं ते रूप. मग गरुडावर बसून येणारा तो कैवारी दिसेल… पण तो माझा कैवार म्हणजे पक्ष कधी आणि कसा घेईल… याचाही मला विचार करायला हवा. त्यासाठी माझी बाजू सत्याची, न्यायाची हवी. मगच तो माझ्या साथीला येईल.
हेही वाचा – आठवण आषाढी वारीची
असो नसो भाव आम्हा तुझीया ठाया
कृपादृष्टी पाहे माझ्या पंढरीराया… 3
महाराजांना आपली स्थिती कशी आहे, हे पूर्ण माहीत आहे; ते ओळखून आहेत. तुझ्याबाबतीत आमचा भाव इतका शुद्ध, सात्विक, निरामय नाही. आम्ही प्रपंचात अडकलो आहोत. तुझ्याकडे काहीतरी मागायलाच येतो. संकटात असलो की तुझी आठवण काढतो. स्वतःचे हे अवगुण माहीत असूनही अत्यंत लडिवाळपणे हक्काने ते सांगत आहेत… कारण तो सर्वांत जवळचा आहे. इथे त्याला म्हणूनच “माझ्या पंढरीराया”अ से संबोधले आहे! तू आम्हाला क्षमा कर आणि आमच्याकडे कृपाळू नजरेने पहा…
हेही वाचा – वारी पंढरीची… जीवनाचे तत्वज्ञान शिकवते!
विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी
विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी… 4
विठ्ठलाचा आशीर्वाद मिळाला की, मग काय रोजच दिवाळी… दिवाळी म्हणजे पूर्णानंद आणि तो रोजच मिळणार… मग सुखाला काय कमी? म्हणूनच आपला सात्विक भाव एकत्र करून त्याची आरती करायची… आरती म्हणजे काय तर आर्त स्वराने हृदयातून साद घालून म्हटली जाते ती आरती! आता अंतकरणात भक्तीची निरांजन पेटवायची. सद्विवेकाचा कापूर लावायचा. मनोभावे आरती करायची… तरच ती विठ्ठलापर्यंत पोहोचेल. इतका मनोरम आणि निर्मळ भाव आमच्यात हवा. आरती म्हणताना ती आस आमच्या शब्दांतही हवी… असं हे या आरतीतल आपल्याला नीट समजलेल आहे.
इथपर्यंत झालं…
आता आपल्याला कृती करायची आहे. शांतपणे डोळे मिटून घ्यायचे. आरती नुसती तोंडाने म्हणायची नाही तर, ती अंतःकरणपूर्वक म्हणायची. त्यातला मूळ अर्थ जाणून घ्यायचा. शाब्दिक अर्थापेक्षा खूप वेगळे काही सांगायचं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. मग जबाबदारी वाढते. आपल्याला तसं वागायचं बंधन येतं. पण हे बंधन हवंसं आहे. या बंधनात कोणाची जबरदस्ती नाही. तर विठ्ठल प्रेमाने आपणच बांधून घ्यायचं आहे.
आपल्याला प्रगत करणारं उन्नतीकडे नेणारं, असं हे आहे. ते पूर्णपणे अंगी बाणून घेऊया. विठ्ठलाला अनन्य शरण जाऊया… मग तो येईलच त्याची वाट पाहूया… प्रत्यक्ष विष्णुदास नामांनीच हे सांगितलेलं आहे, ते सुद्धा कितीतरी वर्षांपूर्वी…
एक सांगू का, आपणही मनापासून बोलावून तर बघूया. मग प्रेमाने त्याला हाक घाला बरं..
येई वो विठ्ठले माझे माऊली ये…


