प्रणाली प्रशांत वैद्य
भाग – 16
सकाळचा मंद वारा, चहाच्या वासाने भरलेलं अंगण आणि घरभर पसरलेलं एक वेगळंच औपचारिक वातावरण… सगळं काही आज खास वाटत होतं…..गुरुजींचं आगमन ही एक साधी बाब नव्हती, तर जणू काही घराच्या प्रत्येक कोपऱ्यात एक अदृश्य चेतना निर्माण झाली होती…
गाडीचं हॉर्न ऐकताच आनंदी आणि सुमित्रा आजी धावत अंगणात आल्या. आराध्याही त्यांच्या मागून आली, तिचं मन थोडं बेचैन पण उत्सुक होतं… गुरुजी गाडीतून उतरले. मध्यम उंची, त्यांच्या कपाळावर चंदनाचा टिळा आणि चेहऱ्यावर शांततेचं, पण आतून धगधगतं तेज! त्यांच्या नजरेत अशी धार होती, जी समोरच्याला उकलून टाकायची ताकद बाळगून होती…
सगळ्यांनी वाकून नमस्कार केला. गुरुजींनी प्रेमाने हात वर केला आणि आपल्या संथ पण ठाम आवाजात विचारलं —
“आराध्या…”
सुमित्रा आजीने आराध्याकडे पाहिले… आराध्या गुरुजींसमोर उभी राहिली. ती नजरेला नजर देण्याचा प्रयत्न करत होती, पण गुरुजींचं शांत, खोल जणावणारं व्यक्तिमत्व तिला थोडं भारावून टाकत होतं. गुरुजी तिच्याकडे पाहून म्हणाले –
“तुझ्या डोळ्यांत फार काही आहे… भीतीही आहे, पण त्याहून अधिक आहे जिद्द. हे वय आहे स्वतःला शोधण्याचं, गोंधळून जायचं नाही. तुझ्या पंखांना जरा जागा दे, उडावं लागतं कधीकधी घरट्याच्या बाहेर!”
आराध्याला वाटलं, काहीतरी आत उलगडतंय… ती हळूच विचारते –
“मी काय करावं गुरुजी?”
गुरुजी हसले…
“तू नोकरी कर. स्वाभिमान असतो स्वतः उभं राहण्यात. सुमित्रा सांगत होती, तू खूप समजूतदार आहेस. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भरारी घेऊ शकतेस… विश्वास ठेव… आणि प्रयत्न कर.”
हेही वाचा – गुरुजी म्हणतात, तुझा जन्म काही कारणासाठी आहे आराध्या!
गुरुजींचं हे बोलणं आराध्यासाठी एक नवी दिशा दाखविणारं होतं. ती नुसतीच मान हलवते, पण तिच्या आत सुरू झालेली हालचाल स्पष्ट जाणवत होती.
गुरुजी पुढे वळले, सुमित्रा आजीजवळ काही कुजबुजले. आनंदी गुरुजींना आत घेऊन गेली, पण आराध्या अजूनही दाराशीच उभी होती. तिच्या आयुष्याचा नवा अध्याय जणू तिथूनच सुरू होत होता…
पहिल्या मजल्यावरून माधव त्या सगळ्याकडे पाहत होता. आराध्याचं त्याच्याकडे लक्ष गेलं. त्याच्या डोळ्यात अनोखं सावट आणि चेहऱ्यावर एक धोकादायक शांतता आराध्याला जाणवली…
दुपारचं ऊन आता झिरपत होतं, पण हवेत एक अघोषित शांतता दरवळत होती. माधव मुख्य दाराच्या चौकटीला टेकून उभा होता. त्याच्या नजरा सारख्या घराच्या आत-बाहेर फिरत होत्या.
आराध्या बागेतल्या झाडांमध्ये हरवली होती, पण माधवचं लक्ष तिच्यावरच होतं — जणू तो तिच्या हालचालींचं आकलन करत होता. तेवढ्यात आनंदी चहाचा कप घेऊन आली. माधव चहा घेत म्हणाला, “आवडली वाटतं ही नवी पाहुणी आराध्या… काहीतरी वेगळं आहे तिच्यात.”
आनंदीने थोडं हसत उत्तर दिलं, “हो, गोड मुलगी आहे. फार समंजस आणि सहनशील… वयाच्या मानानं खूपच समजूतदार.”
माधव थोडा गंभीर झाला. त्याने कपाच्या तळाशी पाहात विचारलं – “काय गं, शर्वाय येणार तरी कधी? बरेच दिवस झाले ना? इथं काही गोष्टी त्याच्या अनुपस्थितीत खूप बदलल्या आहेत.”
आनंदीला काहीसं खटकतं. ती सावधपणे उत्तर देते, “येतोच म्हणालाय लवकर…. पण का रे? अचानक त्याचं नाव का?”
माधवच्या डोळ्यात आता एक विचित्र चमक आली. त्याच्या आवाजात गूढपणा मिसळला, “शर्वाय आहे तो … तो इथे असता, तर काही गोष्टी माझ्याच हातात राहिल्या नसत्या… तो काही विसरलेला नाही. आणि…”
आनंदी काही क्षण गप्प राहते. तिच्या मनात कालवाकालव होते. आराध्या लांबून हे पाहात असते, पण तिला ऐकू मात्र येत नाही…
तेवढ्यात माधव हसत हसत म्हणतो, “आता पाहू, त्याच्या परतीची वेळ आणि नियती काय घेऊन येतेय! काहीतरी उलगडणार आहे, हे नक्की.”
दिवस सरत होते… आराध्या हळूहळू घरात रमू लागली होती. सुमित्रा आजी आणि आनंदीने तिला खूप माया लावली होती. एका शांत संध्याकाळी, आराध्या त्यांच्यासोबत गच्चीवर बसली होती. गार वाऱ्यावर जुन्या आठवणींच्या धाग्यांमध्ये दोघी आजी-सुना रंगल्या होत्या.
“आराध्या,” सुमित्रा आजी प्रेमाने म्हणाल्या, “आपल्या घरातल्या आणखी एका व्यक्तीची ओळख करून द्यायची राहिली आहे, शर्वाय! माझा नातू, आनंदीचा मुलगा. फारच हुशार आणि समंजस… त्याच्या वडिलांचा लहानसा व्यवसाय होता, पण त्या मुलानं त्याला इतक्या मोठ्या उंचीवर नेलंय की, सगळे आश्चर्यच करतायत.”
आनंदीचा चेहरा उजळला. त्या हसत म्हणाल्या… “शर्वाय म्हणजे आमचा अभिमान आहे गं. सध्या परदेशात एका महत्त्वाच्या प्रोजेक्टसाठी गेला आहे. पण म्हणतो आहे, लवकरच परत येणार. त्याच्या परतीची वाट सगळेच बघतायत.”
आराध्या भारावून ऐकत होती. तिच्या डोळ्यांपुढं शर्वायचं एक अकल्पित, तेजस्वी चित्र उभं राहत होतं — जो आजवर भेटला नाही, पण त्याच्या बाबतीत बोलताना दोघींच्या चेहऱ्यावरचं प्रेम आणि अभिमान तिला स्पष्ट जाणवत होता.
आनंदी (गर्वाने) म्हणाली, “शर्वाय, माझा मुलगा. अगदी लहानपणापासून वेगळा होता तो. अभ्यासात हुशार, पण त्याचबरोबर जबाबदारही. दिवाकरांनी आपला बिझनेस त्याच्या हाती दिला, तेव्हा कुणालाच वाटलं नव्हतं की, तो एवढं मोठं साम्राज्य उभं करेल.”
सुमित्रा आजी (डोळ्यांत चमक) : “खरं सांगू आराध्या, आम्ही फक्त त्याला मूल म्हणून वाढवलं. पण शर्वायने त्याला मूल्य दिलं. कुठलाही निर्णय घेण्याआधी तो आमच्याशी बोलतो. गुरुजींचा सल्ला घेतो. कामातही चोखपणा आणि विचारपूर्वक घेतलेले निर्णय हे त्याचे वैशिष्ट्य.”
आराध्या मनातच विचार करत होती — “एखाद्या मुलाबद्दल इतका अभिमान… आणि एवढा समंजस? खरंच त्याला भेटायला आवडेल.”
आनंदी पुढे म्हणाली : “सध्या परदेशात आहे, पण त्याचं मन इथल्या लोकांमध्ये आणि आपल्यातच गुंतलेलं असतं.”
आराध्याच्या मनात नकळत त्याचं एक सुंदर, स्थिर आणि प्रगल्भ रूप तयार होऊ लागलं होतं. तिच्या डोळ्यांत एक हलकीशी आपुलकी चमकू लागली होती – “तो इथं आला की, भेट होईल का आपली?”
हे तिनं विचारलं नाही, पण आजींच्या चेहऱ्यावरचा हसरा भाव पाहून तिला उत्तर सापडल्यासारखं वाटलं. पुढचा क्षण, पुढचा दिवस आणि पुढची भेट – आता ती शर्वायच्या प्रतिक्षेत होती! पण तिच्या अनभिज्ञतेतच, दुसऱ्या मजल्यावर कोणी तरी सावध नजरेने तिच्या मनात तयार होणाऱ्या त्या चित्रावर काळी छाया टाकण्याची वाट पाहात होतं…
आराध्या त्या रात्री शांत झोपली नाही…. शर्वायचाच विषय तिच्या डोक्यात होता… त्याच्या वर्णनाने तिचं मन भरून आलं होतं. पण त्या शांततेला एक वेगळीच झिणझिणीत अस्वस्थता चिकटून होती… जणू काही झोपेच्या परसात कोणी दबकत डोकावतंय, नजर टाकतंय. त्या रात्री, वाड्याच्या मागच्या अंगणात अंधारात एक सावली डोलत होती… हातात एक जाड पुस्तक आणि दुसऱ्या हातात एक लहानसा उपकरण – स्कॅनर.
हेही वाचा – आराध्याने सुमित्रा आजींच्या घरी प्रवेश केला अन्…
माधव… चेहऱ्यावर गूढ मिश्कील हास्य. तो वाड्याच्या जुन्या देवघराच्या आतल्या कपाटापर्यंत पोहोचतो. एक बंद कप्पा उघडतो. त्यातून एक लहानशी पेटी बाहेर काढतो, त्यात आराध्याच्या जन्माच्या आधीचं, पण तिच्या बद्दलचं एक गुपित असतं… त्यावर तो स्कॅनर ठेवतो.
माधव पुटपुटतो, “आराध्या, तुझं येणं काही योगायोग नाही. तुला इथे आणणं हा ‘पूर्वनियोजित प्लॅन’ आहे… शर्वाय! त्याच्यापासून तुला दूर ठेवायचंय… कारण तू जर त्याच्या जवळ आलीस, तर माझं हे सगळं फसणार आहे…”
दुसऱ्या दिवशी सकाळी आनंदी आणि सुमित्रा आजी तिच्यासोबत देवपूजेला बसल्या होत्या. घरात शांतता होती. तेवढ्यात माधव मागून येतो… अगदी सौम्य आवाजात म्हणतो, “आराध्या, तुला इथे चांगलं वाटतंय नं?”
आराध्या (हसून) : हो… खूप.
त्याच्या नजरेत जणू आस्था नाही, पण भविष्याचं नियंत्रण आहे.
आता आराध्या काही गोष्टी ओळखू लागणार होती… वाड्याच्या त्या जुन्या भिंती, गुप्त दालनं… आणि शर्वायचं येणं!
पण हे सगळं घडण्याआधी कोणीतरी तिच्या पायाखालची जमीन हादरवणार होतं…
क्रमशः


