भाग – 2
भालचंद्र नेमाडेंच्या ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीच्या पहिल्या दोन भागांत असलेले कथानक या लेखाच्या पहिल्या भागात पाहिले. खंडेराव विठ्ठल या पुरातत्वात पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्याचे हे स्वगत आहे. हा मूळचा मोरगाव नावाच्या खेड्यात राहणारा श्रीमंत शेतकऱ्याचा मुलगा असून शिकण्यासाठी शहरात येऊन राहिला आहे. सिंधू संस्कृती ते विसाव्या शतकातल्या सामान्य भारतीयांचा तो प्रतिनिधी आहे. कादंबरीची सुरुवात, ‘कोण आहे? मी खंडेराव. तू कोण आहेस? मी तू आहे…’ अशी आहे.
तिसऱ्या भागाची सुरुवात बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात खंडेराव प्रवेश घेतो, या प्रसंगाने होते. तिथला क्लार्क मोरगावच्या एका मुलीचा मुलगा असल्याने खंडेरावाला घरी घेऊन जातो. त्या बडोद्याच्या आत्याला जुन्या आठवणी येतात, गाववाल्यांबद्दल ममता वाटते. त्यातच आंब्यांच्या निमित्ताने एकत्र आलेले सगळे नातेवाईक आठवतात… त्यावेळचे वापरातले शब्द, मापे आठवतात… भावडूच्या मृत्यूनंतर खंडेराव एकटाच राहिला असल्याने ती वंश चालू ठेवण्यासाठी लग्न करायचा आग्रह करते. खंडेरावाच्या वडिलांची पहिली पत्नी वारल्यावर ते उदास होतात, त्यावेळी एक जण त्यांना सांगतो की, भाग्यवंताची बाईल मरते आणि अभाग्याचा बैल. बायकोची किंमत बैलापेक्षा कमी आहे.
चिंधीआत्याला सासरी खूप छळ सहन करावा लागतो. तिला वैदू स्त्री विचारते, नवरा मारायचं औषधं देऊ का? वाचताना सुन्न व्हायला होतं. खंडेरावाच्या आजोबांच्या हातून चुकून मांजर मरते. त्यांचा अंधश्रद्धांवर विश्वास नसला तरी, केवळ इतर लोक सांगत आहेत म्हणून अरिष्ट टाळण्यासाठी काशीला सोन्याची मांजर वाहायला जातात. परतताना राजस्थानातले महाल पाहून भारावून जाऊन मोरगावला वाडा बांधायचे ठरवतात. मोरगावाचे घर उकरताना वस्तू मिळू लागतात, जशा मोहोन्जो दारोत उत्खननात मिळत होत्या. टोलेजंग वाडा उभा राहतो. खंडेरावापुढे आता हा पेच निर्माण झाला आहे. गावी राहावे की, संशोधन पुरे करावे? खंडेराव स्वतःला विचारतो की, तू इथे राहणार आहेस का? अन्यथा वाड्याचा डोलारा त्याच्यासाठी कुचकामी ठरणार असतो.
हेही वाचा – Bookshelf : ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ कादंबरीचा आवाका मोठा
हुनाकाका एकोणीसाव्या वर्षी देशाच्या स्वातंत्र्यासाठी फाशी जातो आणि त्याची पत्नी आंधळी होते. या घरात एक आंधळी काकू, एक मुकी काकी आहे, पण त्यांचा चरितार्थ चालला संयुक्त कुटुंबामुळे… प्रत्येकाला आधार मिळत होता.
एक वकील, एक आर्किटेक्ट, एक रेल्वेत गार्ड, एक पाटबंधारे खात्यात असे चार जावई भरपूर हुंडा घेऊनही लालची राहतात. भ्रष्टाचार करतात. प्रत्येक जण समाजाचा पाया पोखरतो आहे. खंडेरावाला शेतीधंदा काही जमणार नाही, असे ते म्हणत राहतात. सगळ्या बहिणी जावयांसकट उन्हाळ्याच्या सुट्ट्यांत तीन महिने मोरगावला येऊन राहातात, तेव्हा घरातली सून सोनाचे काबाडकष्ट करून हाल होतात. खंडेरावची आई कजाग सासू आहे. तिला घालून पाडून बोलते. असे असूनही आईपुढे सोनाचा पती भावडू काही बोलू शकत नाही आणि खंडेराव सुद्धा.
खंडेराव शाळेचे वर्णन करताना म्हणतो की, दोनच जण कॉलेजपर्यंत शिकले, एक वैज्ञानिक झाला आणि दुसरा स्वत: खंडेराव! झोपणाऱ्या शिक्षकांचे, मुलांचे आणि पालकांचे कोणाचेही शिक्षणाकडे लक्ष नव्हते, आस्था नव्हती. उलट, शिकले तर शेतीला हात कमी होईल, असे वाटायचे.
15 ऑगस्ट 1947 रोजी हुनाकाकामुळे मोरगाव सर्वोदय सुधारणांसाठी निवडले गेले. तलाठी, पाटील कुलकर्णी भिल्ल वस्तीवर स्वातंत्र्य दिन साजरा करायला गेले, तेव्हा त्या लोकांनी आम्ही स्वतंत्रच आहोत, पारतंत्र्यात कधीच नव्हतो, असे सांगितलं. अज्ञानात सुख असते आणि स्वातंत्र्यामुळे त्यांच्या जगण्यात काही फरक पडणार नसतो. गांधीहत्येच्या वेळी मोरगावातले लोक आपापल्या परीने घटनेचा अर्थ लावत होते. तर्क करत होते. निळूकाका या संघवादी माणसाबद्दल सांगताना खंडेराव म्हणतो, ब्राह्मणांची घरे जाळली, त्यांची वाताहात झाली आणि निळूकाकाला कणगीत लपून बसावे लागले, अशी आठवण सांगतो. थोडक्यात याच देशातले लोक एकमेकांचे शत्रू झाले. खंडेराव व्यथित होतो. इथे तिसरा भाग संपतो.
चौथ्या भागात खेडेगावातल्या वैद्यकीय सेवेबद्दलचे वास्तव समोर येते. निळूकाकाच्या बहिणीच्या, सुमीच्या बाळंतपणात वैद्यकीय उपचार न मिळाल्याचे भीषण परिणाम भोगावे लागतात. अशा किती स्त्रियांना त्रास सहन करावा लागत असेल! आजही लागतो आहे.
बायको ही घरात फुकट येणारी वस्तू आहे. नुसते कपडे आणि जेवण द्यायचे. मुलगी असंलेली बरी, लग्न करून सासरी जाते, मुलगे जन्मभर पोसावे लागतात, असे एकजण म्हणतो. निळूकाका बायको ओढून आणण्यात पटाईत असतो म्हणजे ज्याची बायको नांदायला तयार नसते, तिला माहेराहून उचलून आणायचे. स्त्रीला माणूस मानणेच नाकारले आहे, मग स्त्रीस्वातंत्र्याचा प्रश्न येतो कुठे? गावातली एक मुलगी शिकते, याचे खंडेरावाला कौतुक वाटते.
जंगले नष्ट करण्याचं पाप कृषी संस्कृतीचं, असं खंडेराव म्हणतो. कष्ट न करणं म्हणजे सांस्कृतिक विकास. शिक्षण म्हणजे शरीर श्रमातून सुटका! शिकले की, शेतीत उन्हातान्हात कष्ट करावे न लागता थंडगार खोलीत बसून काम करता येते. पुन्हा दरमहा वेतन मिळते. भावडू म्हणतो, मागच्या जन्मात काही तरी पाप केलं म्हणून शेतकरी झालो.
म्हशींना झालेल्या टोणग्यांना किती क्रूरतेने वागवले जाते, हे वाचल्यावर, दूध पिताना आता अपराधी वाटू लागले आहे. शेजारी राहणारा खाटिक आणि बकरे यांचे वर्णन वाचून अंगावर काटा येतो. माणसाचा इतिहास क्रौर्याचाच आहे.
पुरातत्वात बीए आणि मग एमए करण्यासाठी खंडेराव विद्यापीठात येतो. त्याला शेती सुटल्याचा आनंद जास्त आहे. तो पर्यटकांसाठी गाईडचे प्रशिक्षण घेतो. या भागात विद्यापीठे आणि त्यात चाललेला भोंगळ कारभार खंडेराव सांगतो. पत्रकारितेत असलेला भष्टाचार सांगताना अनंतराव नावाचा मित्र वर्तमानपत्र काढायचं ठरवतो आणि त्यात बातम्या काय आणि कशा छापायच्या हेही आधीच ठरवतो. तो म्हणतो, ‘काश्मीरमध्ये गोळीबार, इतके लोक ठार’ रोज फक्त आकडा बदलायचा. वर्तमानपत्राचं नाव मजेशीर वाटलं तरी, त्यात खोल अर्थ आहे. हा लोकशाहीचा चौथा स्तंभ… तोही असा किडलेला.
विद्यापीठाच्या इमारती वाढल्या, विद्यार्थ्यांची संख्या वाढली. मुलांचे विड्या, सिगरेट पिणे वाढले… त्यामुळे हे विकणाऱ्या टपऱ्या वाढल्या… लोक इंग्लिश स्पेलिंग प्रमाणे ‘विड्यानगरी’ म्हणू लागले. उत्तर पत्रिका न तपासलेले गठ्ठे रद्दीत सापडले, पण त्यांचा निकाल तर जाहीर झाला होता. यामुळे नव्या वर्तमानपत्राला मजकूर मिळाला आणि कवीला कविता करायला विषय! सगळेच भ्रष्ट असल्यामुळे कोणी कोणाविरुद्ध कार्यवाही करत नाही. कुलसचिवाची नेमणूक, त्याचा विरोध, हिंसक वळण, बेघर लोकांचे अतिक्रमण, त्यांचे जळणासाठी झाडे तोडणे इत्यादीतून कथानक पुढे जाते. युनेस्कोमधल्या भाषणात मानवाच्या उत्क्रांतीबद्दल सांगताना चतुष्पादाचा द्विपाद झाल्यामुळे झालेले नुकसान तो सांगतो. पंचेन्द्रिये कर्मेंद्रिय राहिली नाहीत, त्यांचा उपयोग बदलला हे सांगताना नाकाचा आणि कानाचा उपयोग चष्मा लावण्यासाठी होतो, असे म्हणतो.
अनुवंशिकतेने नसलेला, परंतु परंपरेने चालू ठेवलेला व्यवहार किंवा संस्कार म्हणजे संस्कृती अशी व्याख्या खंडेराव करतो. भाषणात ‘प्रेम, माया, सहजीवन’ ही मूल्ये तुच्छ वाटत आहेत, हा मुद्दा मांडतो. खंडेरावला लहानपणीचा मित्र रघू भेटायला येतो. वडिलांना भेटायला चलायची गळ घालतो. इथे पाचवा भाग संपतो.
सहाव्या भागात वडिलांच्या मृत्यूचे वर्णन आहे. मृत्यू आणि संलग्न क्रियाकर्म यावर हा जवळ जवळ शंभर पानी भाग आहे. सिंधू संस्कृती कशी लयाला गेली, यावर वेगवेगळी मते आहेत. पण संस्कृती लयाला जातेच, हेच खरे उत्तर. विठ्ठल गेल्यावर पंचक्रोशीतले लोक भेटायला येतात. इथे तुम्हाला कोणी क धी एकटे सोडत नाही -अगदी सरणावर सुद्धा.
कापूराची वाती उजळली ज्योती ठायीच समाप्ती झाली तैशी! असे जीवन असते.
दुःखाचा आवेग ओसरल्यावर कुटुंबीयांना आणि आप्तेष्टांना व्यवहार सुचू लागतो. स्वार्थी-नि:स्वार्थी, सुष्ट-दुष्ट राजकारणी वेगवेगळे सल्ले देऊ लागतात. संपत्ती हा केंद्रबिंदू बनतो. सगळ्या चिमण्या उडून गेल्यावर हा एकटाच कावळा खंडेराव उरतो, असे तो म्हणतो. गीतेच्या पंधराव्या अध्यायात ‘ऊर्ध्वमूलं अधः शाखं’ या श्लोकाचा अर्थ त्याला कळतो. मोहोन्जो दारोपासून आजपर्यंत मरण बदलले नाही. लेखकाने मृत्यूवर मोठे चिंतन लिहिले आहे.
सिंधू संस्कृतीपासून आजपर्यंतचे हे कालचक्र एकरेषीय नाही तर, हिंदू गणनेप्रमाणे चक्राकार आहे. ’पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननीं जठरे शयनं’ हे चक्र अव्याहत सुरू आहे.
हेही वाचा – बनगरवाडी… लहानसे खेडं पूर्ण विश्वाचे प्रतिनिधी
या पुस्तकावर उलटसुलट मते आहेत. पुस्तक बरेच मोठे असल्याने वाचून कसे होईल, दडपण येते. मधे-मधे लांबण लागले आहे, असेही वाटते. काही वेळा पकड सुटते. सुरुवातीला काही संकल्पना समजणारही नाहीत, पण तरीही पुस्तक वाचत पुढे गेलो की, उत्सुकता वाटू लागते. देशाच्या परिस्थितीवर कटू, पण सत्य भाष्य लेखक करतो, आरसा दाखवतो. पुस्तक वाचून झाल्यावर विचारांना खाद्य मिळते, आत्मपरीक्षण करावेसे वाटते. उषःकाल होता होता काळरात्र कशी झाली? याचे विदारक दर्शन घडते.
कादंबरीत मध्ययुगीन काळ फारसा आलेला नाही. जनपदे, महाजनपदे, चंद्रगुप्त मौर्य, ग्रीक, शक, हूण, सातवाहन, गुप्त, वाकाटक, चोल, विजयनगर साम्राज्य, शिवाजी महाराज आणि त्यानंतरचे इस्लामिक आक्रमण हा काळ आला नाही. अर्थात, मग कादंबरी खूप मोठी झाली असती, दोन भागांत करावी लागली असती. आपले भक्ती संप्रदाय, संतपरंपरा मोठी आहे. अभंग आणि श्लोक लेखकाने लिहिले आहेतच, पण त्यांचा समाजमनावर असलेला पगडा अजून दाखवला असता तर, महत्त्व अधोरेखित झालं असतं. लेखकाने सत्य समोर ठेवले आहे, पण या परिस्थितीवर उपाय सुचवला नाही. यावर मात कशी करायची ते सांगितले नाही. देवाचे गाऱ्हाणे खंडेराव ऐकत असताना कादंबरी संपते. कदाचित, आता एवढेच हातात आहे, असे लेखकाला सुचवायचे असेल.
लेखकाने भारतीय संस्कृतीचा विस्तृत पट मांडला आहे. त्यांचा इतिहासाचा अभ्यास, भाषेवरचे प्रभुत्व, निरीक्षणशक्ती आणि विनोदबुद्धी यामुळे विषय मनावर ठसतो, विचार करायला भाग पाडतो. लेखकाने केवळ मनोरंजनात्मक लिहायचे नसून समाजातल्या विधातक प्रथा, रूढी, समजुती यावर कठोर भाष्य करायचे असते. त्यांनी हे कर्तव्य निभावले आहे. तू आणि मी एकच आहोत (जीवोब्रह्म) हे अद्वैतवादाचे सार कादंबरीच्या सुरुवातीला सांगून शेवटी कठोपनिषदातील कोणी जन्मत नाही वा मरत नाही (न जायते म्रियते वा कदाचिन) सांगितले आहे, असे वाटते.
कालौघात निरुपयोगी, निकृष्ट असलेले नष्ट होते, हा सृष्टीचा नियम आहे. हजारो वर्षं असलेला हिंदू धर्म नष्ट झाला नाही. तो कसा आणि का टिकला? याचे उत्तर या कादंबरीत मिळते. लेखकाबद्दलचे पूर्वग्रह (असतील तर) बाजूला ठेवून कोऱ्या मनाने हे पुस्तक (खूप मोठे असले तरी!) वाचायला हवे ते याचसाठी.


