राजीव जोशी
गेल्या सहा महिन्यांपासून आमची भेट झाली नव्हती मीच जाणूनबुजून तिला भेटणं टाळत होतो. त्या दिवशी अचानक तिचा कॉल आला… फोनवर तिची आई होती… मला बोलली, “आत्ताच्या आत्ता तुला आमच्या घरी यायला जमेल? नको येच ताबडतोब.”
आठवतोय मला तो दिवस… इच्छा नसताना तिच्या घरी गेलो. नेहमीप्रमाणे खुर्चीत बसली होती. कसला विचार करत होती देवाला माहीत. पण तिच्या डोळ्यात माझी ओळख नव्हती. ज्या डोळ्यांमुळे आमची मैत्री झाली, त्या डोळ्यांत माझ्यासाठी नजर नव्हती. मी जवळ गेलो, तिचा हात हातात घेतला आणि विचारलं, “कशी आहेस?” शून्य नजरेने माझ्याकडे बघत तिने हातातला हात काढून घेतला आणि क्षणार्धात मला सगळं आठवलं…
एकेकाळी एवढी बडबडी होती… मी बोलायचो तिला, “काय गं किती बोलतेस? जन्माला आलीस तेव्हा देवाने तुझ्या घशात स्टॉपचं बटण नाही का लावलं?” हे ऐकून खूप हसायची…
आठवतेय मला आमची भेट… दहा वर्षांपूर्वीची! ठाण्याला स्टेशनवर उभा होतो दुपारची वेळ खूप वेळ ट्रेन न आल्यामुळे प्लेटफ्रॉमवर खूप गर्दी होती. मी पण इकडे-तिकडे बघत टाइमपास करत होतो, तेवढ्यात मागून माझ्या पाठीवर कोणीतरी टॅप केले. मी वळून बघितलं, ती होती… मला बोलली “हाय, तुझे डोळे खूप छान आहेत. गेले अर्धा तास मी तुझ्या डोळ्यांकडे बघत आहे, मला खूप आवडले तुझे डोळे. मला आवडेल तुझ्याशी मैत्री करायला… करशील माझ्याशी मैत्री?” मी हस्तांदोलन केलं… एकमेकांची नाव सांगायची प्रथा पार पडली आणि तेवढ्यात एक सूचना झाली की, पुढील सूचना मिळेपर्यंत एकही ट्रेन रवाना होणार नाही.
त्यानंतर ती आणि मी तीन तास गप्पा मारत होतो. वेळ कसा गेला समजलंच नाही आणि अचानक तिने मला विचारलं, “तुझं लग्न झालंय?”
मी हसलो आणि बोललो “नाही अजून… पण करीन की तुझ्याशी!”
त्यावर ती बोलली, “यात काय हसायचं?”
बोललो, “अगं, काही नाही, झालंय माझं लग्न एक वर्ष झालं. आणि तुझं?”
ती बोलली की, “अजून नाही… ठरलंय, पुढच्या महिन्यात साखरपुडा आहे. नक्की ये बायकोला घेऊन. लव्ह मॅरेज आहे. लास्ट थ्री ईयर्सपासून आमचं अफेअर आहे.” मग आम्ही एकमेकांचे फोन नंबर घेतले, तेवढ्यात ट्रेन आली आणि मी निघालो. नंतर रोज आम्ही एकमेकांना फोन करायचो, खूप गप्पा मारायचो. मी तिच्या घरी जायला लागलो, ती पण वरचेवर घरी यायला लागली आणि काही दिवसांतच ती आमच्या घरातलीच झाली.
हेही वाचा – मानखुर्द फलाट अन् सनी म्हणजेच ‘हृतिक’!
आठवतंय मला त्या दिवशी रविवार होता. सकाळी तिचा कॉल आला… “आत्ता लगेच भेट, आपल्याला शॉपिंगला जायचं आहे. माझा नवरा पण येणार आहे, त्याला मी तुझ्याबद्दल सांगितलंय. त्यालाही तुझे डोळे बघायचे आहेत.”
वेळ ठरली, जागा ठरली… वेळेवर मी पोहोचलो. अर्धा तास वाट बघितली आणि नंतर तिच्या घरी पीसीओवरून कॉल केला. फोनवर तिची आई होती; मला बोलली, “अरे, ते दोघे केव्हाच निघालेत. पोहोचतील एवढ्यात. ट्रॅफिकमध्ये अडकले असतील.” मी “ओके” बोलून फोन ठेवला. नंतर जवळजवळ दोन तास वाट बघून घरी परत आलो. मनात आलं की, कदाचित तिच्या होणाऱ्या नवऱ्याला मला भेटायची इच्छा नसेल म्हणून ते दोघंच शॉपिंगला गेले असतील…
रोज रात्री झोपायच्या आधी आम्ही एकमेकांना गुड नाईट करायला फोन करायचो.. पण तिचा फोन आला नाही म्हणून मी फोन केला. पण फोन कोणीच उचलला नाही. दुसऱ्या दिवशी पहाटेच तिच्या आईचा कॉल आला आणि I m shocked! मला भेटायला येताना त्यांचा अपघात झाला होता. मी लगेच हॉस्पिटलला गेलो. तिच्या हाताला प्लास्टर होतं. मी गेल्या गेल्या तिनं मला मिठी मारली आणि रडायला लागली. खूप वेळ फक्त रडत होती आणि रडता रडता बोलली, “त्याला काही झालं ना, तर मी जीव देईन. त्याच्याशिवाय जगणं हा विचार पण मला करवत नाही.” तिला शांत करण्यापलीकडे तेव्हा माझ्या हातात काहीच नव्हतं.
त्याला खूप मार लागला होता… कोमामध्ये होता! डॉक्टर म्हणाले होते की, “नो होप्स”! असेच काही दिवस गेले, पण त्याच्यात काहीच सुधारणा नव्हती. आता तिच्या जीवाची घालमेल मला बघवत नव्हती. सारखी रडायची किंवा नुसता विचार करत बसायची. कोणी काही विचारलं तर फक्त हसायची. नंतर त्याच्या घरच्यांनी त्याला अमेरिकेला न्यायच ठरवलं आणि त्यांच्याबरोबर ती पण गेली.
अमेरिकेला गेल्यानंतर तिच्या आईकडून समजलं की, त्याच्यात काहीच फरक पडला नव्हता. ती आता त्याची आई झाली होती. जशी एक आई आपल्या बाळाची काळजी घेते, तशीच ती त्याची काळजी घेत होती. कारण तो पूर्ण बारा व्हावा, हीच तिची इच्छा होती. आता त्याच्या घरचे तिला दोष द्यायला लागले होते. तिचा अपमान करायला लागले होते. “पांढऱ्या पायाची, तुझ्याच मुळे हा अपघात झाला… तूच जबाबदार आहेस,” असं बोलायला लागले होते. “निघून जा, इथून चालती हो… दळभद्री…” असंही बोलले आणि हा अपमान सहन करून ती तिथेच होती. त्याची सेवा करत होती. असेच काही महिने निघून गेले आणि एका पहाटे तिचा कॉल आला, खूप खूश होती, कारण तो शुद्धीवर आला होता. त्याने डोळे उघडले होते, दहा महिन्यांनंतर! आणि काही दिवसांत ते सगळे परत भारतात आले.
ते भारतात आल्यावर दोन दिवसांनी मी त्याला बघायला त्याच्या घरी गेलो. त्याला बघितलं आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली… तो शुद्धीवर आला होता, पण डोक्याला मार लागल्यामुळे तो आता मंदबुद्धी झाला होता. त्याला मान सुद्धा वरती करता येत नव्हती. सारखी लाळ गळत होती. डोळे थोडे तिरळे झाले होते… पण ती तोंडावर दाखवायला खूप खूश होती. तिच्या मनातलं वादळ मला समजत होतं. माझ्याकडे बघायची तिच्यात हिम्मत नव्हती. तो बोलायचा प्रयत्न करायचा, पण त्याला नीट बोलता येत नव्हतं… अस्पष्ट, अशुद्ध बोलत होता. त्याला अशा अवस्थेत बघून मला तिची काळजी वाटत होती. त्याच्या विरुद्ध बोलणं, तिला आवडत नव्हतं. ती एकच बोलायची, “कसा पण आहे, माझा आहे. तुमचा संबंध नाही…”
रोज सकाळी ती त्याच्या घरी जायची अपमान सहन करायला आणि तो सहन करता करता त्याची सेवा करायला. त्याला अंघोळ घालणं, त्याचं शी-शू काढणं, त्याचा नाष्टा, जेवण हे सगळं करून बिचारी रात्री घरी यायची. हे असंही प्रेम असतं, तेव्हा मला समजलं आणि मनात विचार आला की, “अरे, मग आपण करतो ते काय नक्की?” असो…
मी पण जायचो त्याला बघायला. तिची काळजी वाटत होती. तिची घुसमट आम्हाला कोणालाच बघवत नव्हती. पण तिच्या चेहऱ्यावर कायम आनंद आणि एक आशा की, हा नक्की बरा होईल…!
एक दिवस अचानक तिने कोणालाही न पटणारा निर्णय घेतला, त्याच्याशी अशा अवस्थेत लग्न करण्याचा. ती एक आत्महत्या होती. “काय ही फालतुगिरी?” मी बोललो तिला, “वेड लागलंय का तुला?” त्यावर मला बोलली, “हे बघ मित्र आहेस ना माझा! मग मला मदत कर, नाहीतर चालता हो माझ्या लाइफमधून… माझं मी बघायला समर्थ आहे.” मी बोललो की, “बघ त्याच्याकडे, त्याला त्याची लाळ पण पुसता येत नाही. धड जेवता येत नाही. नीट बोलता पण येत नाही आणि लग्न करणार आहेस त्याच्याशी? त्यापेक्षा जशी आहेस, तशीच राहा आणि त्याची सेवा कर.”
काय चुकलं होत माझं! तिचं आयुष्य बरबाद होताना मला बघवत नव्हतं. तेव्हा तिने मला हात जोडले आणि बोलली, “मला तू जवळची मैत्रीण म्हणतोस ना, मग प्लीज मला मदत करू शकत नाहीस तर, मधे येऊ नकोस, माझं मी बघून घेईन…” सगळ्यांनी समजावून सुद्धा तिने त्याच्याशी लग्न केलं. आता त्याच्या घरच्यांना एक फुकटची आया मिळाली होती.
हेही वाचा – सखीचा मंद झालेला श्वास अन्…
आता तिच्या लग्नाला महिना झाला असेल आणि एका पहाटे तिचा फोन आला… पहाटेचे चार वाजले होते. फोन उचलला आणि जे ऐकलं त्याने माझी झोपच उडाली. आधी फक्त रडली आणि बोलली, “एक सांगू का? पण प्लीज कोणाला सांगू नकोस. माझ्या घरी पण नाही. हात जोडते…” मी म्हणालो, “नाही सांगणार बोल काय झालं?”
त्यावर ती बोलली, “हा माझ्याबरोबर सेक्स नाही रे, रेप करतो! दिवसातून आठ ते दहा वेळा. माझी इच्छा असो किंवा नसो खूप त्रास होतो रे, आता नाही सहन होत. Now I have no option, मीच निवडलंय हे आयुष्य; पण आता नाही रे सहन होत. माझ्या वेदना नाही रे त्याच्यापर्यंत पोहोचत…” खूप रडली आणि मला आता तिचाच राग येत होता. पण आता सुद्धा काहीही करू शकत नव्हतो मी. काय करणार? “डिव्होर्स घे,” असं बोलू शकत होतो, पण तिला आवडल नसतं. नंतर तिच्या आईकडून समजलं की, ती प्रेग्नन्ट आहे. चौथा महिना होता तिला. तिने एक गोंडस मुलीला जन्म दिला. एवढी गोड होती ती, जशी काही एक परीच! बारसं वगैरे झालं आणि परत ती सासुरवाडी गेली. असेच काही महिने गेले वर्ष झालं. मुलीचं करता करता सगळं सहन करत होती.
आता मुलगी दोन वर्षांची झाली होती… एक दिवस त्याला घरात फिट आली परत बेशुद्ध पडला. लगेच त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि तो दोन दिवसांनी शुद्धीवर आला, तेव्हा तो पूर्ण नॉर्मल होता जसा अक्सिडेंट व्हायच्या आधी होता तसा! पण हा आनंद फार काळ टिकला नाही. तिच्या कडेवर असलेल्या मुलीला बघून तो बिथरला आणि बोलला, “कोणाचं आहे हे पाप? माझं नक्कीच नाही.” सगळ्यांनी सांगून पण त्याचा विश्वास बसत नव्हता. त्याचं एकच म्हणणं होतं की, “तिने शेण खाल्लं बाहेर आणि माझं नाव घेत आहे.”
आता ती पूर्ण संपलेली होती. जीव द्यावा हाच विचार तिच्या मनात आला आणि हा विचार तिने मला बोलूनही दाखवला. पण जीव दिल्यावर आपल्या मुलीचं काय? हा मोठा प्रश्न तिच्या पुढे होता. डीएनए टेस्ट करून ती सिद्ध करू शकत होती आणि तसा सल्ला पण तिला मी दिला होता, पण तिने एक वेगळाच निर्णय घेतला त्याला घटस्फोट द्यायचा. कारण त्याला आता ती नको होती, बाहेर तोंड काळं करून आलेली! मला एकच बोलली, “हे बघ, तो सुखी तरच मी सुखी.”
कोणत्याही प्रकारची प्रॉपर्टी, पैसा, पोटगी न घेता तिने घटस्फोट घेतला. या निर्णयाने आता ती एकटी पडली होती. तिच्या माहेरचे पण तिलाच दोष देत होते.
सगळ्यांची बोलणी खाऊन आता तिचं एकटीच आयुष्य सुरू झालं होतं. एके ठिकाणी जॉब बघितला. हळूहळू तिच्या घरचे पण नॉर्मल झाले. तिचा जॉब आणि मुलगी यात ती छान रमली होती. सगळं सुरळीत चालू झालं. खूप वर्षांनी ती सुख बघत होती. नक्कीच मनातून दुःखीच होती, पण दाखवत नव्हती. मुलगी पण आता चार वर्षांची झाली होती. सगळं नॉर्मल चालू असताना एका रात्री झोपेत तिला रक्ताची उलटी झाली. आतड्यांचा कॅन्सर झाला होता. “लास्ट स्टेज,” डॉक्टर बोलले. काय नशीब घेऊन जन्माला आली हेच मला समजत नव्हतं. लाइफमध्ये दु:ख येतं, पण किती? त्याला काही मर्यादा असतात की नाही? “अजून काय काय भोगावं लागणार आहे, मला सांग ना!” मला विचारत होती, पण तेव्हा सुद्धा माझ्याकडे उत्तर नव्हतं. “होशील बरी,” असं मी बोललो आणि ती खूप हसली. असो…
तिचं ऑपरेशन करावं लागणार होतं… ते झालं. एक फूट आतडे काढून टाकावं लागलं होतं आणि त्यात आता केमो चालू झाली होती. खूप अंगाची आग व्हायची तिच्या. चिडचिड करायला लागली होती आणि हा सगळा राग कोणावरही काढू शकत नव्हती. हे प्रॉब्लेम्स कमी होते म्हणून की काय देव जाणे, पण अंघोळ करून आल्यावर अंग पुसताना ऑपरेशनचे टाके उसवले आणि घरात फक्त रक्त, रक्त आणि रक्तच… तसल्या अवस्थेत पोटाला परकर आणि टॉवेल गुंडाळून बिचारीला हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टर बोलले, “नो होप्स. कसे तरी टाके घातले आहेत, रक्त थांबलं आहे. पण परत असं झालं तर टाके नाही बसणार, कारण कातडी रबरसारखी झाली होती. सुई नाही घुसणार आत. जा घरी घेऊन. जास्तीतजास्त एक ते दोन दिवस..”
या सगळ्या आठवणीतून मी बाहेर आलो, तेव्हा तिला शेवटची घरघर लागली होती… आणि तेव्हा पण तिच्या तोंडात त्याचं नाव… बिचारीच्या किती भोग आयुष्यात? शेवटी कोणाचीही इच्छा नसताना त्याला घरी बोलावलं. तोही आला, त्याने तिचा हात हातात घेतला… तिने एकदा त्याच्याकडे आणि एकदा मुलीकडे पाहिलं आणि गेली दुसऱ्या प्रवासाला…
एकदाची सुटली. देवाला एकच प्रार्थना की, देवा एवढे भोग कोणाच्या नशिबात असतील तर बाबा रे, त्याला जन्म नको देऊस! आज तिला जाऊन तीन वर्ष झाली. तिची मुलगी तिच्या आईवडिलांकडे असते.
काय काय भोगलय तिने, पण तोंडातून एक चकार शब्द न काढता, कोणालाही दोष न देता!
त्रिवार वंदन अशा मैत्रिणीला… प्रेयसीला… बायकोला… आणि एका आईला… त्रिवार वंदन!
मोबाइल – 9004101589


