यश:श्री
हत्ती या प्राण्याबद्दलचे कुतूहल कायमच अबालवृद्धांना असते. त्यामुळेच सर्कस असो वा (हत्ती असलेला) चित्रपट सर्वांचे लक्ष हत्तीवरच असते आणि चर्चाही हत्तीचीच होते. दिसायला जरी अजस्त्र असला तरी, त्याला माणसाळवले जातं. जंगली हत्ती माणसाळवता येतो आणि त्याला पाळीव बनविण्यासाठी काही ठराविक कालावधी लागतो. त्यांना माणसाळवताना हुशार आणि तज्ज्ञ माहुतांना बरेच प्रयत्न करावे लागतात. हे हत्ती एकदा माणसाळले की, ते त्या माहुताच्या सर्व आज्ञा पाळतात. हळूहळू माहुतही त्याला पोटच्या पोराप्रमाणे जपतो. अनेक वर्षे पालनपोषण केलेला, प्रेमाने खाऊ घातलेला हत्ती हरवला किंवा मृत झाला, तर त्याच्या माहुताला खूप दुःख होते. हत्तीला जिथे बांधून ठेवले जाते, ती जागा तसेच दोरखंड पाहून त्याला अतिव दुःख होते.
जंगली हत्तीला माणसाळवल्यानंतर त्याला प्रशिक्षित करताना, माहुत विशिष्ट शब्दांचा वापर करतो. यासाठी काहीवेळा काही संस्कृत तर काही हिंदुस्थानी शब्दांचा वापर करण्यात येतो. ‘जिवाक चिंतामणी’ मध्ये वलयसुंदरम या जंगली हत्तीवर नायक जिवाकन कशाप्रकारे नियंत्रण मिळवतो आणि त्याच्यावर स्वार होतो, याचे वर्णन करण्यात आले आहे… जिवाकनच्या गळ्यात सुगंधी पुष्पांची माला असून तो ‘अप्पुटू अप्पुटू’, ‘अटू अटू’ आणि ‘अई अई’ असे म्हणत त्या हत्तीच्या पाठीवर थापटी मारल्या. त्यामुळे जिवाकनच्या निर्देशानुसार तो त्या आज्ञेचे पालन करू लागला, असा उल्लेख आहे.
हेही वाचा – संवेदनशील हत्ती अन् इंग्रजी साहित्य…
पण या जंगली हत्तीला माणसाळवण्याचे प्रयत्न माहुतांसाठी काहीवेळेस जीवघेणेही ठरतात. संतापलेला हत्ती माहुताला चिरडतो. भलेही माहुताबरोबर हत्तीची दाट जवळीक असली, तरी तो त्याला मारतो. यासंदर्भात ‘नालादियार’मध्ये कवीने असा इशारा दिला आहे – हत्तीच्या आकाराच्या तसेच संतापी व्यक्तींशी मैत्री टाळावी किंवा सोडून द्यावी. मात्र कुत्र्यासारखा जीव लावणाऱ्या व्यक्तींशी मैत्री करावी. कितीही प्रेम लावले असेल तरी, हत्ती माहुताला मारतो. मात्र, कुत्र्याबरोबर जवळीक असलेली व्यक्ती त्याला मारायला गेली, तरी तो कुत्रा त्याच्याबद्दल शेपटी हलवून प्रेमच व्यक्त करतो… थोर विदुषी दुर्गाबाई भागवत यांनी जवळपास 28 वर्षांपूर्वी लिहिलेल्या एका लेखात हा संदर्भ सापडला.
हत्ती शीघ्रकोपी समजला जातो. त्याची जर कोणी खोडी काढली, तर तो सहन करू शकत नाही. यासंदर्भात काही कथा प्रसिद्ध आहेत. एका युवकाने हत्तीस काहीतरी खायला दिले, परंतु त्यात त्याने दगड ठेवला होता. त्यामुळे संतापलेल्या हत्तीने तोच दगड त्या युवकास मारला. तसेच, एका टेलरच्या मुलाने नदीवर जाणाऱ्या हत्तीला सुई टोचली असता नदीवरून येताना हत्तीने आपल्या सोंडेतील पाणी दुकानातील महागड्या कपड्यांवर उडवून ते सर्व कपडे खराब केले…
हेही वाचा – हत्तीचे स्मशान!… वास्तव काय?
हत्ती हा कळप करून राहणारा प्राणी आहे. कुठेही जायचे असले तरी आपल्या नेत्याच्या मागोमाग जातात. ते कधीही नेत्याशिवाय राहात नाहीत आणि त्यांच्या नेत्याचा मृत्यू झाला, तर ती जागा दुसरा हत्ती घेतो. अर्थातच, त्या जागी मजबूत आणि धाडसी हत्ती नेतृत्व करतो. या हत्तीला ‘ओरुत्तल’ असे म्हणतात, असेही दुर्गाबाई भागवत यांनी नमूद केले आहे.
कळपाने जात असताना हे हत्ती ज्वारी तसेच बाजरीची पिके किंवा उसाच्या मळ्यांमध्ये घुसून त्याची नासधूस करतात. या हत्तींना पळवून लावण्यासाठी गोफणचा वापर करण्यात येतो. बाजरी तसेच ज्वारीच्या शेतामध्ये मचाण उभारले जाते आणि त्यावर रखवालदार उभा राहून शेत उद्ध्वस्त करणाऱ्या हत्तींना गोफणाद्वारे पिटाळून लावतो. गोफणातून मारलेला दगड अतिशय वेगाने जातो आणि हत्तींवर आदळतो, असे दुर्गाबाईंनी त्या लेखात म्हटले आहे. तथापि, आजही अनेक ठिकाणी हत्तीचे कळप येऊन उभे शेत उद्ध्वस्त करत आहेत आणि शेतकरी हतबल आहेत.
क्रमश:


