स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. ‘फूड कॉर्नर’मध्ये अशाच काही टीप्स पाहूयात –
- चिवडा करण्यासाठी लागणारे खोबऱ्याचे काप जर अगदी पातळ आणि आकाराने एकसारखे म्हणजे समान लांबीचे असले तर चिवड्याची शोभा वाढतेच, त्याचबरोबर गृहिणीचेही सुगरण म्हणून कौतुक होते. त्यासाठी सोपा उपाय… बाजारातून खोबरे आणल्यानंतर ते प्लास्टिकच्या पिशवीत घालून फ्रीजमध्ये ठेवा आणि मग बघा कसे मनपसंत तसेच हव्या त्या आकाराचे सुरेख काप होतात ते! शिवाय, खोबरे किसायलाही सोपे जाते. फार जोर लागत नाही. फ्रीज नसल्यास काप करण्याआधी खोबरे अर्धा- पाऊण तास पाण्यात भिजत ठेवा आणि मग काप करा.
- आप्पे करताना त्यातील थोडेसे पीठ शिल्लक राहिल्यास काय करावे, असा प्रश्न पडतो. एकदा आप्पे खाल्ल्यानंतर पुन्हा तेच खायला नको वाटते. तेव्हा आप्पे करतानाच जास्त पीठ भिजवावे. आप्पे केल्यानंतर त्याच पिठाचा दुसऱ्या दिवशी उत्तप्पा करावा. खूप सुंदर होतो.
हेही वाचा – Kitchen Tips : इडली ढोकळा, फिंगर चिप्स अन् बटाटेवडे…
- मक्याच्या कणसाची उसळ करताना कणसे किसून झाल्यावर फोडणी न करता सर्व मसाला मिसळून प्रेशर कुकरमध्ये शिजवून घ्यावा. कुकरमधून काढल्यावर फोडणी द्यावी आणि एक वाफ आणावी. उसळ सुटी आणि मोकळी होते. सारखी हालवावी लागत नाही. पातेल्याला चिकटत नाही. गॅसचीही बचत होते.
- पेपर डोशाचे मिश्रण मिक्सरमधून काढताना त्यात एक मध्यम आकाराचा कांदा चिरून टाकावा आणि अर्धी वाटी दुधामध्ये थोडे बेसन कालवून त्यात मिसळावे आणि पीठ आंबवण्यास ठेवावे. याने डोसा एकदम पातळ आणि कुरकुरीत होतो. तव्याला अजिबात चिकटत नाही.
- दूध आणि मलई विरजलेले ताक केल्यानंतर लोण्याचा गोळा काढला जातो. ताकात प्रथिने, कर्बोदके तसेच जीवनसत्त्वे, क्षार राहतात. ताक गाळल्यावर गाळणीतला चोथा पोळ्या करताना पिठात मिसळावा. पोळ्या खुसखुशीत आणि चवदार होतात. शिवाय, नेहमीचे मोहन पिठात घालावे लागत नाही. चोथ्याबरोबर हिरवी मिरची आणि कोथिंबीर चिरून घातल्यास लज्जतदार पराठे करता येतात.
हेही वाचा – Kitchen Tips : दहीवडा, सँडविचची चटणी अन् रगडा पॅटीस बनवताना हे करून पाहा
- बटाटाभजी ही सगळ्यांची आवडती गोष्ट; परंतु बटाट्याचे पातळ आणि सारखे काप काढणे, हे वेळ खाऊ काम. कापांना मीठ लागावे म्हणून ते मिठाच्या पाण्यात ठेवावे लागतात. यासाठी सोपी युक्ती म्हणजे बाजारात ‘बटाटा पापड’ म्हणून वेफर्सच्या आकाराचे पापड मिळतात. मुलांना अगर पाहुणे आल्यास तळून देता येतात. यातलेच काही बटाटा पापड पाच मिनिटे गार पाण्यात भिजत घालावेत. हे काप भज्याच्या पिठात बुडवून भजी तळावीत. भजी एकसारखी गोल आणि झटपट होतात तसेच जास्त कुरकुरीत लागतात.


