वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय तिसरा
प्रकृतेर्गुणसंमूढाः सज्जन्ते गुणकर्मसु । तानकृत्स्नविदो मन्दान् कृत्स्नविन् न विचालयेत् ॥29॥
एथ कर्मी तोच लिंपे । जो गुणसंभ्रमें घेपे । प्रकृतीचेनि आटोपें । वर्ततु असे ॥184॥ इंद्रियें गुणाधारें । राहाटती निजव्यापारें । तें परकर्म बलात्कारें । आपादी जो ॥185॥
मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा । निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः ॥30॥
तरी उचितें कर्में आघवीं । तुवां आचरोनि मज अर्पावीं । परी चित्तवृत्ति न्यासावी । आत्मरूपीं ॥186॥ हें कर्म मी कर्ता । कां आचरेन या अर्था । ऐसा अभिमानु झणें चित्ता । रिगों देसी ॥187॥ तुवां शरीरपरा नोहावें । कामनाजात सांडावें । मग अवसरोचित भोगावे । भोग सकळ ॥188॥ आतां कोदंड घेऊनि हातीं । आरूढ पां इये रथीं । देईं आलिंगन वीरवृत्ती । समाधानें ॥189॥ जगीं कीर्ती रूढवीं । स्वधर्माचा मानु वाढवीं । मग भारापासोनि सोडवी । मेदिनी हे ॥190॥ आतां पार्था निःशंकु होई । या संग्रामा चित्त देईं । एथ हें वांचूनि कांहीं । बोलों नये ॥191॥
ये मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवः । श्रद्धावन्तोऽनसूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः ॥31॥
हें अनुपरोध मत माझें । जिहीं परमादरें स्वीकारिजे । श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे । धनुर्धरा ॥192॥ तेही सकळ कर्मी वर्ततु । जाण पां कर्मरहितु । म्हणोनि हें निश्चितु । करणीय गा ॥193॥
ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् । सर्वज्ञानविमूढांस्तान् विद्धि नष्टानचेतसः ॥32॥
नातरी प्रकृतिमंतु होउनी । इंद्रियां लळा देउनी । जे हें माझें मत अव्हेरुनी । ओसंडिती ॥194॥ जे सामान्यत्वें लेखिती । अवज्ञा करूनि देखिती । कां हा अर्थवादु म्हणती । वाचाळपणें ॥195॥ ते मोहमदिरा भ्रमले । विषयविखें घारले । अज्ञानपंकी बुडाले । निभ्रांत मानीं ॥196॥ देखें शवाचां हातीं दिधलें । जैसें कां रत्न वायां गेलें । नातरी जात्यंधा पाहलें । प्रमाण नोहे ॥197॥ कां चंद्राचा उदयो जैसा । उपयोगा नवचे वायसा । मूर्खा विवेकु हा तैसा । रुचेल ना ॥198॥ तैसे ते पार्था । जे विमुख या परमार्था । तयांसी संभाषण सर्वथा । करावें ना ॥199॥ म्हणोनि ते न मानिती । आणि निंदाही करूं लागती । सांगें पतंग काय साहती । प्रकाशातें ॥200॥ पतंगा दीपीं आलिंगन । तेथ त्यासी अचूक मरण । तेवीं विषयाचरण । आत्मघाता ॥201॥
हेही वाचा – Dnyaneshwari : तरी पुरतेपणालागीं, आणिकु दुसरा नाहीं जगीं…
अर्थ
प्रकृतीजन्य गुणांनी मोहित झालेले लोक गुणांच्या, कर्मांच्या ठिकाणी आसक्त होतात. सर्वज्ञ पुरुषाने त्या असर्वज्ञ पुरषांना चाळवू नये. ॥29॥
या जगात जो प्रकृतीच्या तावडीत सापडून गुणांना वश होऊन वागतो, तोच कर्मात बद्ध होतो. ॥184॥ गुणांच्या योगाने इंद्रिये आपापले व्यापार करतात. त्या दुसर्यांनी (गुणांनी) केलेल्या कर्माचा कर्तेपणा जो बळेच आपणाकडे घेतो (तो कर्मात बद्ध होतो.) ॥185॥
चित्तवृत्ती माझ्या ठिकाणी ठेऊन सर्व (उचित) कर्मे समर्पण करून निरिच्छ आणि निरहंकार होऊन, संशयरहित असा तू युद्ध कर. ॥30॥
तरी सर्व विहित कर्मे करून, ती मला तू अर्पण कर. परंतु चित्तवृत्ती मात्र आत्मस्वरूपी ठेव. ॥186॥ हे विहित कर्म, मी त्याचा कर्ता अथवा अमुक कारणाकरिता मी त्या कर्माचे आचरण करीन, असा अभिमान कदाचित तुझ्या चित्तात येईल, तर तो येऊ देऊ नकोस. ॥187॥ तू केवळ देहासक्त होऊन राहू नकोस, सर्व कामनांना टाकून दे आणि मग सर्व भोगांचा यथाकाली उपभोग घे. ॥188॥ आता तू आपल्या हातात धनुष्य घेऊन या रथावर चढ आणि आनंदाने वीरवृत्तीचा अंगीकार कर. ॥189॥ या जगात तू आपली कीर्ती रूढ कर आणि आपल्या धर्माचा मान वाढव; आणि पृथ्वीला या दुष्टांच्या ओझ्यापासून सोडव. ॥190॥ आता अर्जुना, संशय टाकून दे आणि या युद्धाकडे लक्ष दे. या प्रसंगी युद्धाशिवाय दुसरी गोष्ट बोलू नकोस ॥191॥
जे श्रद्धावान आणि निर्मत्सर मानव माझे हे मत नित्य अनुसरतील, ते देखील कर्मापासून मुक्त होतील. ॥31॥
अर्जुना, हा माझा यथार्थ उपदेश जे मोठ्या पूज्यबुद्धीने मान्य करतात आणि विश्वासपूर्वक त्याप्रमाणे वागतात ॥192॥ ते सर्व कर्मे करीत असले तरी, ते कर्मरहित आहेत, असे अर्जुना तू समज. म्हणून हे कर्म अवश्य करणीय आहे. ॥193॥
पण जे मत्सरी लोक हे माझे मत अनुसरत नाहीत, ते सर्व प्रकारच्या ज्ञानाविषयी मूढ, अविवेकी आणि नष्ट आहेत, असे समज. ॥32॥
नाहीतर प्रकृतीच्या अधीन होऊन आणि इंद्रियांचे लाड करून जे लोक या माझ्या मताचा तिरस्कार करून, ते टाकून देतात ॥194॥ जे याला एक किरकोळ गोष्ट समजतात, जे याच्याकडे अनादराने पाहातात किंवा जे वाचाळपणे याला पुष्पित वाणी म्हणतात ॥195॥ ते लोक अविवेकरूपी दारूने मत्त झाले आहेत आणि विषयरूपी विषाने व्यापलेले आहेत आणि अज्ञानरूपी चिखलामध्ये फसलेले आहेत, असे नि:संशय समज. ॥196॥ पाहा प्रेताच्या हातात दिलेले रत्न ज्याप्रमाणे व्यर्थ जाते अथवा जन्मांधाला दिवस उगवल्याचा उपयोग नाही ॥197॥ किंवा, ज्याप्रमाणे चंद्राचा उदय कावळ्यांच्या उपयोगी पडत नाही; त्याप्रमाणे हा विचार मूर्खांना रुचणार नाही. ॥198॥ अर्जुना, याप्रमाणे जे या परमार्थाकडे तोंड फिरवणारे असतील, त्यांच्याशी मुळीच भाषण करू नये. ॥199॥ ते या उपदेशाला तर मानीत नाहीतच आणि उलट त्याची निंदा देखील करू लागतात; म्हणून सांग, पतंग प्रकाशाला सहन करू शकतील? ॥200॥ ज्याप्रमाणे दिव्याला आलिंगन देण्यात पतंगाला अचूक मरण ठेवले आहे, त्याप्रमाणे विषयाचरणात अचूक आत्मनाश होतो. ॥201॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : देखें पुढिलाचें वोझें, जरी आपुला माथां घेईजे…


