सुहासिनीबाई आज अगदी आनंदात होत्या. त्यांच्या लेकीचा मनस्वीचा आज ‘आदर्श शिक्षिका’ म्हणून शासनातर्फे सन्मान होणार होता. “हे बघायला आज हे हवे होते. ह्यांना खूप आनंद झाला असता, आपल्या लेकीला पुरस्कार मिळतोय बघून… दरवेळी आपल्याला हवं तसं थोडीच घडतं. पण कधीकधी आपल्या मनासारखं नाही घडत तेच योग्य असतं आणि भल्याचं असतं असंच आजच्या दिवसावरून म्हटलं पाहिजे. नाहीतर मनस्वीचा हा सन्मान अशक्यच होता.” असा विचार सुहासिनीबाईंचा सुरू होता. त्या झोपाळ्यावर बसून चहा घेत होत्या.
तेवढ्यात मनस्वी आलीच… “अग आई, मी निघते पुढे. शाळेत एक-दोन कामं आहेत. ती झाली की, आपण सगळेच ह्यांच्याबरोबर निघूयात? नाहीतर मानसच्या गाडीतून जाऊयात. आज त्याने सुट्टीच टाकली आहे कंपनीत.” असं म्हणताच सुहासिनीबाई मानेने होकार भरत्या झाल्या आणि मनस्वी निघाली सुद्धा पायात चप्पल अडकवून. नंतर केदारराव म्हणजे जावईबापू पण काही कामानिमित्त बाहेर गेले आणि मानस त्याचं काहीसं काम करत त्याच्या खोलीत बसला होता.
सुहासिनीबाई आता गाणी ऐकत परत आठवणीत रमल्या. आठ वर्षांपूर्वी गोविंदराव गेल्यावर मनस्वी आणि जावईबापूंनी हट्ट करून आपल्याला इथे त्यांच्या घरी आणलं. “आम्हाला तरी मोठं कोण आहे आता!” असं म्हणत कायमचंच घरात मानाचं स्थान दिलं. तशा पूर्वीपासूनच आपण किती कठोर आणि कडक शिस्तीच्या होतो. पहिल्यापासून पितृसत्ताक समाज असूनही त्याकाळी आपल्यावर आपल्या आईचा धाक आणि मग आपला आपल्या मुलीवर धाक. हे म्हणायचे पण, “अहो, एवढ्या धाकात ठेवाल तर मुलगी दूर जाईल तुमच्यापासून. नाहीतर तुम्हाला किंमत देईनाशी होईल.” पण आपण पण अडून बसलो एकाच गोष्टीवर. मुलीला काय करायचं आहे शिकून. नंतर केवळ घर, संसार, धुणी आणि मुलं एवढंच तर असतं आयुष्यात. याच गोष्टीचा आपण कायम ध्यास घेतला आणि मनस्वीला शिकण्याची आवड असूनही तिला आपण सांसारिक शिक्षणाचे धडे देत होतो.
पण गोविंदरावांना मात्र हे अजिबात मान्य नव्हतं. मनस्वीने खूप शिकावं असं त्यांना वाटायचं. आमचे दोघांचे यावरून वाद सुद्धा व्हायचे. पण मग एके दिवशी मी हुकमी हत्यारच काढलं. आजही मला आठवतो तो दिवस जेव्हा मी त्यांना निक्षून सांगितलं, “हे बघा, तुम्ही या बाबतीत मधे पडू नका. मी आई आहे मला कळतं तिचं भलं! आणि मधे पडायचंच असेल तर मला तसं सांगा. मी यापुढे तिचं काहीच करणार नाही. तुम्हीच तिला शिकवा आणि नंतर उजवा कुठे हवी त्या घरी. म्हणजे कळेल अतिशिकलेल्या मुलीला उजवणं किती कठीण असतं ते.” त्यानंतर मात्र गोविंदराव शांत झाले आणि मी विसाव्या वर्षी मनस्वीला उजवली पाठकांच्या घरी.
हेही वाचा – दृष्टिकोन…
मी मोकळी झाले खरी, पण ही शांत बसेल तर मनस्वी कसली. जावईबापूंना पहिली दोन वर्ष छान प्रेमात गुंडाळलं आणि मग हळूच शिक्षणाबद्दल बोलली. केदाररावांनी पण होकार दिला अगदी लगेचच. हे सांगण्यासाठी ती माहेरी आली तेव्हा किती आनंदी होती, हे मी आजही विसरू शकत नाही. “आई ह्यांनी मला शिकायला परवानगी दिली आहे आणि त्यांनी तर असंही सांगितलं की, मला खरंतर शिकलेलीच मुलगी हवी होती जी स्वतःच्या पायांवर उभी असेल. पण सासू-सासऱ्यांमुळे ते गप्प बसले होते इतकंच.” त्यावेळी का कुणास ठाऊक, पण आपल्याला मनाच्या एका कोपऱ्यात आनंदच झाला. लेकीची पाठवणी केल्यावर तिकडे तिच्या गुणांची कदर होतेय आणि तिची इच्छा पूर्ण होतेय, हे ऐकून बरं वाटलं. मला तरी काय हवं होतं? तिचा आनंदच ना? त्याकाळी आजकालच्या प्रमाणे मुली खूप शिकत नसत त्यामुळे हिला जास्त शिक्षणामुळे कुणी नाकारायला नको इतकीच इच्छा होती. फक्त त्यासाठी मी आजन्माचा कडूपणा घेतला इतकंच.
असो. चला मुलीचं आणि यांचं स्वप्न आणि आपलं सुप्त स्वप्न आज पूर्ण होतंय. संकटं आली तरी ती डगमगली नाही. नेटाने अभ्यास पूर्ण केला, अगदी गर्भारशी असताना सुद्धा! मग तिच्या लाडक्या पेशात ती जी एकदाची शिरली की, आज त्याचं फळ म्हणून तिला शासनाचा ‘आदर्श शिक्षिके’चा पुरस्कार मिळतोय. अजून काय हवं! चला सुहासिनीबाई, आपण आता तयार होऊयात. मनस्वी येईलच इतक्यात आणि मी तयार नसेन तर ओरडतील बाई! असं मनातल्या मनात हसत सुहासिनीबाई छान तयार व्हायला गेल्या. साडी नेसून वेणीफणी करून तयार झाल्या आणि काहीतरी कमी आहे, असं आरशात न्याहाळत असतानाच मनस्वी दारातून म्हणाली, “आई, तू जे शोधतेयस ते मी आणलं आहे.” असं म्हणताच तिने आणलेल्या अबोलीच्या गजऱ्याचा गंध त्यांना गोविंदरावांची आठवण देऊन गेला. अबोलीचा गजरा मनस्वीने आईला माळला आणि डोळ्यातलं पाणी लपवत म्हणाली, “आई, बाबा असताना असाच छान गजरा आणायचे नं, तुम्ही कुठे समारंभाला निघालात की? म्हणून मी आणला आज खास तुझ्यासाठी. म्हणजे मला बाबा आसपासच आहेत तुझ्याबरोबर असा कायम दिलासा राहील समारंभात. त्यांचं स्वप्न आज पूर्ण होतंय नाही का?” सुहासिनीबाई हलकेच हसल्या. “हो ग हो. मी तर शेवटी विरोधीपक्षच होते ना? असो, चल निघूयात. मानस तयार झाला का?” असं म्हणत त्या टुकूटुकू निघाल्या आणि मनस्वी हलकेच हसली.
तिकडे पोहोचल्यावर मनस्वीचं खूप छान स्वागत झालं. बाकीच्या घरच्यांना पण मानाचं असं पहिल्या रांगेत बसवण्यात आलं. सुहासिनीबाई भारावून गेल्या. नंतर आदर्श शिक्षिकेचा पुरस्कार घेताना तर सुहासिनीबाईंनी मनस्वीची डोळ्यांनीच दृष्ट काढली आणि मग स्टेजवरती मनस्वीला बोलायला सांगितलं गेलं. मनस्वी बोलताना अगदी लाघवी बोलते हे तर साऱ्यांनाच माहीत होतं, पण आज त्याचं आई म्हणून सुहासिनीबाईंना खूप कौतुक वाटत होतं.
मनस्वी बोलत होती,
“नमस्कार, सर्वप्रथम मला या बक्षिसाची मानकरी केल्याबद्दल शासनाची मी खूप आभारी आहे. पण यात माझा एकटीचा वाटा नाही. सर्वप्रथम मी माझ्या हयात नसलेल्या वडिलांना हा पुरस्कार देऊ इच्छिते आणि तद्नंतर माझी इथे उपस्थित असलेली आई.” सुहासिनीबाई एकदम दचकल्याच तिच्या या वाक्याने! मनस्वी पुढे बोलू लागली… “मी आईचं नाव यासाठी घेतलं की, तिने पहिल्यापासूनच माझ्या शिक्षणाला विरोध केला. पण त्यामुळेच कदाचित माझ्यात ती उर्मी निर्माण झाली की, मी अभ्यास करूनच दाखवेन आणि कुणीतरी होऊनच दाखवेन. आईने नेहमी गोड गोड होऊन कसं चालेल… तिने प्रसंगी कठोर पण असलंच पाहिजे, हे मी तेव्हा तिच्याकडूनच शिकले आणि तेच तर तिने केलं. माझ्या चांगल्यासाठी ती विरोधात जाऊन बसली. पण माझ्या दृष्टीने तीच माझी खरी आदर्श शिक्षिका आहे. जिने मला लढण्याचं बळ दिलं. तेव्हा आईला मी एकच सांगू इच्छिते की, तू मुळीच माझी विरोधक नाहीस. तू तर माझी ताकद आहेस. खरा सत्ताधारी पक्ष तूच आहेस आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आई… आणि हो तिच्यानंतर मी अजून एक महत्त्वाचं नाव घेईन, ते माझ्या अहोंचं. त्यांच्या परवानगी आणि पाठिंब्याशिवाय हे स्वप्न अशक्यच होतं. 26व्या वर्षी मी बी.एड. झाले, मग शिक्षिका म्हणून काम करता करता मराठी विषय घेऊन स्पेशलायझेशन केलं. त्याचं सारं श्रेय मी माझ्या माणसांना देते. बाबा, आई, सासूबाई, सासरेबुवा, माझे हे आणि last but not the least माझा लेक मानस. शिवाय माझे विद्यार्थी आणि सगळे सहशिक्षक यांचाही वाटा आहेच.”
हेही वाचा – आईचं वाण…
पुढेही मनस्वी बरंच काही बोलत होती पण सुहासिनीबाई मात्र आतून खूप रडत होत्या. मुलीने आपल्याला श्रेय दिलं यातच सारं जग सामावलं आहे. अजून काय हवं मला म्हातारीला. त्यांचा ऊर अभिमानाने भरून गेला होता आणि डोक्यावरचं विरोधक असण्याचं मणामणाचं ओझं उतरून हलकं झाल्यासारखं त्यांना वाटत होतं. त्यांनी देवाला म्हटलं, “बाबा आता उचललंस मला तरी चालेल. मन आनंदाने काठोकाठ भरलं आहे रे! माझ्या पदरात अशी समजूतदार मुलगी घातलीस त्याबद्दल तुझी ऋणी आहे मी.” असं म्हणून त्यांनी आनंदानेच डोळे टिपले.


