दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 06 सप्टेंबर 2026; वार : रविवार
- भारतीय सौर : 15 भाद्रपद शके 1948; तिथि : दशमी 19:29; नक्षत्र : आर्द्रा 19:52;
- योग : सिद्धि 09:44; करण : वणिज 08:41, बव 30:16;
- सूर्य : सिंह; चंद्र : मिथुन; सूर्योदय : 06:23; सूर्यास्त : 18:51;
- पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
आदित्य पूजन
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
कन्नड कवी मंजेश्वर गोविंद पै
टीम अवांतर
कन्नड कवी मंजेश्वर गोविंद पै यांचा जन्म 23 मार्च 1883 रोजी कर्नाटकातील दक्षिण कॅनरा जिल्ह्यातील मंजेश्वर या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मिशन स्कूलमध्ये झाले आणि नंतर ते मंगळूर येथील कॅनरा हायस्कूलमध्ये गेले. पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी पै मद्रास येथे गेले. मात्र वडिलांच्या अचानक झालेल्या निधनामुळे त्यांना परत यावे लागले.
गोविंद पै हे आधुनिक कन्नड कवी व एक श्रेष्ठ संशोधक होते. गोविंद पै यांचे शिक्षण बी.ए.पर्यंत. विविध भारतीय भाषा, जागतिक वाङ्मय, तत्त्वज्ञान आणि इतिहास या विषयांचा त्यांनी स्वयंप्रेरणेने व्यासंग केला. वीसहून अधिक भाषा त्यांना उत्तम प्रकारे अवगत होत्या त्यांत ग्रीक आणि हिब्रू यांचाही समावेश होता. 60 वर्षांहून अधिक काळ त्यांनी साहित्य निर्मिती केली.
हेही वाचा – नातवाचा ‘ध चा मा’ अन् आबा!
त्यांची पहिली कविता ‘सुवासिनी’ त्याच नावाच्या नियतकालिकात प्रकाशित झाली. ‘स्वदेशभिमानी’मध्ये प्रकाशित झालेल्या पहिल्या कविता ‘सुभद्रा विलाप’ आणि ‘कालिया मर्दन’ या होत्या. या कवितांमध्ये आरंभिक यमक होते. या यमकबद्ध कविता 1903 ते 1910 या काळात ‘स्वदेशभिमानी’ नियतकालिकात प्रकाशित झाल्या.
परंपरागत द्वितीय प्रासाचा (चरणातील दुसरे अक्षर तेच येणे) उपयोग न करता रचना करणारे गोविंद पै हे पहिले कवी होत. भावगीतांव्यतिरिक्त येशू ख्रिस्ताच्या जीवनावरील गोलगोथा, गौतम बुद्धाच्या जीवनावरील वैशाखी, भगवान श्रीकृष्णावरील प्रभास आणि महात्मा गांधी यांच्यावरील देहली ही खंडकाव्येही त्यांनी लिहिली. विशेष म्हणजे बुद्ध, कृष्ण आणि गांधीजी यांच्या अखेरच्या दिवसांवर ही खंडकाव्ये आधारलेली आहेत. त्यांची निवडक भावगीते गिळिविंडु या संग्रहात आहेत.
हेब्बेरळू आणि चित्रमानु ही त्यांची दोन नाटके. यांपैकी पहिले नाटक एकलव्याच्या कथेवरील आहे तर दुसरे 1942 च्या छोडो भारत आंदोलनातील एका हुतात्याच्या जीवनावर आधारलेले आहे. काही जपानी ‘नो’ नाट्यांचाही त्यांनी कन्नड अनुवाद केलेला आहे. त्यांनी कन्नडमध्ये सॉनेट हा काव्यप्रकार देखील आणला.
हेही वाचा – श्रीकृष्णाचे आपल्या जीवनातील स्थान
गोविंद पै यांच्या संशोधनपर लेखांची संख्या 160 हून अधिक भरते. त्यांत कर्नाटक आणि तुळुनाडू यांचे इतिहास, प्राचीन भारत-ग्रीस संबंध, इतिहासकालीन राजांची, गौतम बुद्ध, महावीर यांसारख्या धर्मप्रवर्तकांची आणि प्राचीन कन्नड लेखक-कवींची कालनिश्चिती इ. विषयांचा समावेश होतो. धारवाड येथील ‘कन्नड संशोधन संस्थे’त दिलेली त्यांची खास व्याख्याने मुरु उपन्यासगळु या नावाने संग्रहीत करण्यात आलेली आहेत.
सर्जनशील साहित्य आणि ऐतिहासिक संशोधन या दोन्हीही क्षेत्रांत गोविंद पै यांना सारखीच गती होती. देशभक्ती आणि सर्वधर्मीय सुसंवाद साधण्याची दृष्टी या त्यांच्या कर्तृत्वाच्या प्रेरणा होत. याहीपेक्षा ते मानवतावादी होते, हे अधिक महत्त्वाचे होय. ते स्वभावाने प्रसिद्धिपराङ्मुख होते. ही सर्व वैशिष्ट्ये त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झालेली दिसतात. त्यांची भाषाशैली खरंतर सहजसुबोध नाही. मात्र त्यांचा वैचारिक आशय उच्च कोटीतील असल्याने त्याला एक प्रकारचे शाश्वत मूल्य प्राप्त झालेले आहे.
मद्रास राज्य शासनातर्फे 1948 साली त्यांना ‘राष्ट्रकवी’ हा बहुमानाचा पुरस्कार देण्यात आला. 1950 मध्ये मुंबई येथे भरलेल्या अखिल कन्नड साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या नावाने एक राष्ट्रीय पुरस्कार सुरू करण्यात आला असून, मंजेश्वर येथील त्यांचे जुने घर राष्ट्रीय स्मारक बनवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गोविंद पै यांचे 6 सप्टेंबर 1963 रोजी निधन झाले.


