अध्याय तेरावा
म्हणे एक हेंचि आथी । येर जाणणें ते भ्रांती । ऐसी निकुरेंसी मती । मेरु होय ॥620॥ एवं निश्चयो जयाचा । द्वारीं अध्यात्मज्ञानाचां । ध्रुव देवो गगनींचा । तैसा राहिला ॥621॥ तयाचां ठायीं ज्ञान । या बोला म्हणसी व्यवधान । जे ज्ञानीं बैसलें मन । तेव्हांचि तें तो ॥622॥ तरी बैसलेपणें जें होये । ते बैसतांचि बोलें न होये । तरि ज्ञाना तया आहे । सरिसा पाडु ॥623॥ आणि तत्त्वज्ञान निर्मळ । फळे जें एक फळ । तें ज्ञेयहीवरी सरळ । दिठी जया ॥624॥ एऱ्हवीं बोधा आलेनि ज्ञानें । जरी ज्ञेय न दिसेचि मनें । तरी ज्ञानलाभुही न मने । जाहला सांता ॥625॥ आंधळेनि हातीं दिवा । घेऊनि काय करावा । तैसा ज्ञाननिश्चयो आघवा । वायां जाय ॥626॥ जरि ज्ञानाचेनि प्रकाशें । परतत्त्वीं दिठी न पैसे । ते स्फूर्तीचि असे । अंध होऊनि ॥627॥ म्हणोनि ज्ञान जेतुलें दावीं । तेतुली ही वस्तुचि आघवी । तें देखे ऐसी व्हावी । बुद्धि चोख ॥628॥ यालागीं ज्ञानें निर्दोखें । दाविलें ज्ञेय देखे । तैसेनि उन्मेखें । आथिला जो ॥629॥ जेवढी ज्ञानाची वृद्धी । तेवढीच जयाची बुद्धी । तो ज्ञान हे शब्दीं । करणें न लगे ॥630॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : जेथ नभाचेनि पाडें, समत्वा उणें न पडे
अर्थ
तो म्हणतो की, हे आत्मज्ञान हेच एक खरे आहे व इतर ज्ञाने ती भ्रांति होय, अशा निश्चयाला त्याची बुद्धि मेरुप्रमाणे (आधार) होते. ॥620॥ याप्रमाणे ज्याच्या बुद्धीचा निश्चय अध्यात्मज्ञानाच्या द्वारात आकाशातील ध्रुवाच्या तार्याप्रमाणे स्थिर राहिलेला असतो ॥621॥ त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे, या माझ्या बोलण्यात आडपडदा आहे, असे अर्जुना तू म्हणशील (तर तुला स्पष्ट सांगतो की) जेव्हा त्या पुरुषाचे मन ज्ञानाच्या ठिकाणी स्थिर झाले, तेव्हाच तो (पुरुष) ते (ज्ञान) झाला. ॥622॥ तरी ज्ञानाच्या ठिकाणी मनाची स्थिरता झाली असता जी स्थिती प्राप्त होते, ती स्थिती ज्ञानाच्या ठिकाणी स्थिरता होत असण्याच्या वेळीच होते असे नाही, तरी पण ज्ञानाची व ज्ञानाच्या ठिकाणी मन स्थिर होण्य़ास प्रारंभ झालेल्याची योग्यता सारखीच आहे. ॥623॥ आणखी शुद्ध आत्मज्ञान जे एक फल उत्पन्न करते, ते फल म्हणजे ज्ञेय (ब्रह्म) होय. त्या थेट ज्ञेयापर्यंत ज्याची दृष्टि नीट जाऊन भिडते ॥624॥ वास्तविक ज्ञानाविषयी मनात समजूत पटली असूनही जर ज्ञानाने जाणण्याच्या वस्तूचा मनाला नीट बोध होत नसेल, तर तो ज्ञानाचा लाभ झाला असला, तरी देखील आमच्या मनाला नीटसा पटत नाही. ॥625॥ आंधळ्याने आपल्या हाती दिवा घेतला तरी त्याचा त्याला काय उपयोग? त्याप्रमाणे आपल्यास झालेले ज्ञान जर ज्ञेय दाखवू शकले नाही, तर ते (ज्ञेयाचे) ज्ञान म्हणून जे जे काही ते हेच असा ज्याचा निश्चय असतो, त्याचा तो असला निश्चय सर्व व्यर्थच जातो. ॥626॥ जर ज्ञानाच्या प्रकाशाने परमात्म्याच्या ठिकाणी बुद्धीचा प्रवेश होत नसेल तर ती बुद्धीच आंधळी होऊन राहिली आहे, असे म्हणावयास हरकत नाही. ॥627॥ म्हणून ज्ञान जेवढे दाखवील तेवढे सर्व ज्ञेय वस्तूच असते, परंतु ती ज्ञेय वस्तु पाहील अशी बुद्धी शुद्ध पाहिजे. ॥628॥ याकरिता निर्मळ ज्ञानाने दाखवलेले ज्ञेय जी पाहते अशा शुद्ध बुद्धीने जो संपन्न आहे ॥629॥ जेवढा ज्ञानाचा विकास आहे तेवढाच ज्याच्या बुद्धीचा विकास झालेला आहे, तो ज्ञानाचे रूप आहे, हे शब्दाने सांगावयास नको. ॥630॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : पैं पाणियाचिये भूमिके, पाणी तळपे कौतुकें


