अध्याय तेरावा
तेथ अंतरबाह्य गेले । निर्मळत्व एक जाहलें । किंबहुना उरलें । शुचित्वचि ॥474॥ म्हणोनि सद्भाव जीवगत । बाहेरि दिसती फांकत । जे स्फटिकगृहींचे डोलत । दीप जैसे ॥475॥ विकल्प जेणें जेणें उपजे । नाथिली विकृति निपजे । अप्रवृत्तीचीं बीजें । अंकुर घेती ॥476॥ तें आइके देखे अथवा भेटे । परि मनीं कांहींचि नुमटे । मेघरंगें न कांटे । व्योम जैसें ॥477॥ एऱ्हवीं इंद्रियांचेनि मेळें । विषयांवरी तरी लोळे । परि विकाराचेनि विटाळें । लिंपिजेना ॥478॥ भेटलिया वाटेवरी । चोखी आणि माहारी । तेथ नातळें तियापरी । राहाटों जाणें ॥479॥ कां पतिपुत्रांतें आलिंगी । एकचि ते तरुणांगी । तेथ पुत्रभावाचां अंगीं । न लगेचि कामु ॥480॥ तैसें हृदय चोख । संकल्पविकल्पीं सनोळख । कृत्याकृत्य विशेख । फुडें जाणें ॥481॥ पाणियें हिरा न भिजे । आधणीं हरळु न शिजे । तैसी विकल्पजातें न लिंपिजे । मनोवृत्ती ॥482॥ तया नांव शुचित्वपण । पार्था गा संपूर्ण । हें देखसी तेथ जाण । ज्ञान आहे ॥483॥ आणि स्थिरता साचें । घर रिगाली जयाचें । तो पुरुष ज्ञानाचें । आयुष्य गा ॥484॥ देह तरी वरीलीकडे । आपुलिया परि हिंडे । परि बैसका न मोडे । मानसींची ॥485॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : कैवल्यसुखासाठीं, परमाणु घे किरीटी
अर्थ
त्या स्थितीत आतील व बाहेरील शुचित्व हा भेद गेला व दोन्ही शुचित्वे एक झाली, फार काय सांगावे! केवळ एक शुचित्व मात्र राहिले. ॥474॥ म्हणून स्फटिकाच्या तावदानात ठेवलेले दिवे मंद मंद हालतांना जसे बाहेरून दिसतात, तशा अंत:करणातील चांगल्या मनोवृत्ती बाहेर (इंद्रियद्वारा) प्रगट झालेल्या दिसतात. ॥475॥ ज्या ज्या योगाने संशय उत्पन्न होतो, ज्या योगाने वाईट मनोविकार उत्पन्न होतात व ज्या योगाने कुकर्मांची बीजे अंकुर घेतात (ज्या योगाने निषिद्ध कर्मांकडे प्रवृत्ति होते) ॥476॥ अशा ज्या गोष्टी, त्या ऐकल्या, पाहिल्या किंवा भेटल्या, तरी त्या योगाने, ज्याप्रमाणे मेघांच्या रंगांचे डाग आकाशावर पडत नाहीत, त्याप्रमाणे मनामधे काही विकार उत्पन्न होत नाहीत. ॥477॥ एरवी इंद्रियांच्या संगतीने विषयांचा संबंध त्याला जरी घडला तरी तो विटाळाच्या विकाराने लिप्त होत नाही. ॥478॥ वाटेवरून ब्राह्मणाची स्त्री अथवा महाराची स्त्री या दोघी गेल्या असता ती वाट एकीच्या स्पर्शाने पवित्र होत नाही अथवा दुसरीच्या संगतीने ती अपवित्र होत नाही, तर ती वाट दोघींपासून अलिप्त असते, त्याप्रमाणे अलिप्तपणाने व्यवहारात वागण्याचे त्यास ठाऊक असते. ॥479॥ एकच तरुण स्त्री पतीला व पुत्राला आलिंगन देते; परंतु पुत्राला आलिंगन देतेवेळी तिच्या मनात जे पुत्राविषयी प्रेम असते त्या प्रेमात कामाचा स्पर्श नसतो. ॥480॥ त्याप्रमाणे त्याचे हृदय शुद्ध असते. संकल्प व विकल्प, या दोघांची त्या अंत:करणास ओळख असते, विशेषत: कृत्य आणि अकृत्य काय आहे, हे ते अंत:करण पक्के जाणते. ॥481॥ जसा हिरा पाण्याने भिजत नाही, आधणात खडा शिजत नाही, त्याप्रमाणे कोणत्याही मनोविकाराने त्या वृत्ति लिप्त होत नाहीत. ॥482॥ अर्जुना, यास पुरे शुचित्व म्हणतात. ही वर सांगितलेली शुचित्वाची लक्षणे तू जेथे पहाशील, तेथे ज्ञान आहे असे समज. ॥483॥ आणि ज्या पुरुषाच्या घरात स्थिरतेने खरोखर प्रवेश केला आहे तो पुरुष ज्ञानाचे आयुष्य आहे. ॥484॥ त्या पुरुषाचा देह तर वरच्या दृष्टीने पाहिले असता आपल्या स्वभावानुसार हिंडत असतो, परंतु मनातील विचारांची स्थिरता बिघडत नाही. ॥485॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : भलतेथ बुद्धी बळी, रजे आरिसा उजळी


