परवा रात्री नीताच्या, म्हणजे राघवच्या मोठ्या बहिणीच्या हळदीचा कार्यक्रम धुमधडाक्यात साजरा झाला होता. आवराआवरी करायला एक वाजून गेला होता. राघवने मला गेल्याच आठवड्यात निक्षून सांगितले होते की, हळदीचा कार्यक्रम संपल्यावर त्याला माझ्या आणि त्याचा आणखी एक जवळचा मित्र, चैतन्यसोबत रात्रभर गप्पा मारायच्या आहेत. त्याप्रमाणे राघवच्या बंगल्याच्या गच्चीवर आम्ही निवांतपणे बसलो होतो…
“काका, आजवर एकही दिवस असा नसेल गेला की, मी आणि दिदी भांडलो नसू. खूप भांडायचो आम्ही, पण दुसऱ्या दिवशी सकाळी ते विसरून देखील जायचो! आम्ही कॉलेजला गेल्यावर आमची भांडणं कमी झाली. पण आता दोन दिवसांनी दिदी नसेल भांडायला… खूप कठीण जाणार आहे मला हे सगळं पचवायला,” असं म्हणून राघव भावूक झाला होता.
त्याच्या मांडीवर थोपटत मी म्हणालो, “राघव, अरे बहीण भावाच्या नात्याची स्ट्रॉबेरी अशीच आंबटगोड असते कायम. एकत्र असतात तेव्हा पटत नाही आणि लांब असतात तेव्हा करमत नाही! जरी दिवसभर भांडणं झाली असली तरी, ती वरवरची असतात कारण, रोज सकाळी या नात्याला रात्रीच्या आठवणी नसतात. शाळा संपून जेव्हा तुम्ही कॉलेजला जाता, तेव्हा तुमच्या जगाच्या कक्षा रुंदावतात आणि तुम्ही एकत्र घालवलेले क्षण आपोआप कमी होतात. तू न सांगता उशिरा आल्यावर तिचा ओरडा तुला खटकतो, पण त्याचवेळी त्या ओरड्यामागची काळजी तुम्ही मुलं सोयीस्करपणे विसरता. तुमच्या रिझल्टच्या दिवशी तुमच्या इतकंच टेन्शन तिला पण आलेलं असतं आणि तुझ्या चेहऱ्यावरील आनंद बघायला ती देखील उत्सुक असते…”
हेही वाचा – बेसनाचे लाडू… माँची आठवण
“रक्षाबंधनच्या दिवशी तुझ्या हातावर राखी बांधताना आणि भाऊबीजेला तुला ओवाळताना तिच्या डोळ्यांत दिसणारं आनंद, हा कधीही न विसरता येणारा असतो…! आपल्या घराच्या आकाशगंगेतील आपण सारे ग्रह आहोत, जे देवाने ठरवून दिलेल्या नात्यांच्या कक्षेत फिरत असतात. सुरुवातीला जवळपास असणाऱ्या या कक्षा कालांतराने रूंदावत जातात, कारण एक घररूपी आकाशगंगा सोडून लग्न झाल्यावर मुलींचा सासरच्या आकाशगंगेत प्रवेश होतो… अगदी अलगदपणे! अशावेळी आपल्या आकाशगंगेच्या कक्षेत राहूनच आपल्यापासून दूर गेलेल्या बहिणीला भेटायला आता आधुनिक संदेशवहनाची साधनं उपलब्ध आहेत. शिवाय, त्या नात्याची पोकळी भरून काढण्यासाठी काही वर्षांत तू तुझी सहचारिणी आणणारच आहेस…” मी म्हणालो.
“शेवटी काय नात्याच्या प्रत्येक ग्रहाचा आपल्यापर्यंत पोहोचणारा प्रकाश कालपरत्वे कमी अधिक होतच असतो आणि कालांतराने तो ग्रहच नवीन ग्रहांसाठी आपलं अस्तित्व गमावून बसतो,” असं सांगून मी त्याला म्हणालो, “जरी नीता दिदी तुझ्या सोबत नसली तरी, तुम्हा बहीण भावाच्या नात्याची कोजागरी पौर्णिमा मात्र प्रकाशमान राहून तुम्हा दोघांचीही आयुष्य कायम उजळवत रहातील… याची मुख्य जबाबदारी मात्र तुझी आहे आणि ती तुला शेवटपर्यंत यशस्वीपणे पार पाडायची आहे, हे मात्र कधीच विसरू नको…”
इतका वेळ गप्प बसून माझं बोलणं शांतपणे ऐकणाऱ्या चैतन्यला देखील मी सांगितले की, “चैतन्य मी आत्ताच जे राघवला सांगितले, ते तुला देखील लागू होते हे लक्षात ठेव!”
हेही वाचा – मनाची श्रीमंती… मित्राची अनोखी कहाणी!
“राघव, नीताची अनुपस्थिती थोडे दिवस तुला नक्कीच बैचेन करेल. हीच बेचैनी म्हणजे तुमच्यात असलेलं घट्ट प्रेम, जे व्यक्ती जवळ नसताना आपल्याला त्या नात्याची जाणीव करून देत असतं… मला खात्री आहे की, तू लवकरात लवकर या बेचैनीतून सावरशील आणि तिच्या नसण्याची सवय तुला होईल… आणि जेव्हा जेव्हा तुझी बेचैनी वाढेल, तेव्हा नीता एका फोनच्या अंतरावर असेल, कायम तुझ्यासाठी. तेव्हा जास्त विचार न करता लग्नाच्या दिवसाच्या तयारीला लाग. मला शंभर टक्के खात्री आहे की, नीताच्या वरातीत तू आनंदाने तिला निरोप देशील…”
आणि आज अपेक्षेप्रमाणेच झाले.
आत्ता थोड्या वेळापूर्वी नीताची वरात निघाली आणि डीजेच्या तालावर राघवला चैतन्य आणि इतर मित्रांच्या सोबतीने दणक्यात नाचताना पाहून समाधान वाटलं…


