कमल हा माझा जुना मित्र. गावाच्याबाहेर एकटाच राहतो. मोठे घर. मुलगा पुण्यात सर्व्हिसला… वहिनी कधीच्याच अनंताच्या प्रवासाला गेलेल्या. तर, सांगण्याचा उद्देश असा की, दर दसऱ्याला रात्री तो मला आवर्जून बोलावतो. सोने देऊन एकमेकांना मिठी मारून, मग खास या दिवसासाठी ठेवलेली स्कॉच तो काढतो. सोबत खारवलेले काजू!
अगदी लिमिटेड स्कॉचची ती थोडीशी झिंग घेऊन मी निघतो. रात्रीचे दहा-साडेदहा वाजलेले असतात. थंड हवा असते… मोटरसायकलवर ती थंड हवा आणि पोटातली स्कॉच एन्जॉय करत मी रस्ता कापतो… अजूनही त्याच्या बंगल्याकडे फार वस्ती झालेली नाही. रस्ता निर्मनुष्य असतो. नाही म्हणायला गावाच्या वेशीवर एक मिठाई नमकीनचे मोठे दुकान झाले आहे. दसऱ्याची दिवसभरची गर्दी आटोपून नोकर आवरा आवर करत असतात. सेठ हिशोब करत बसलेला असतो. त्या दिवशी तो नमकीनचा वास माझ्या नाकात जाताच नकळत माझी गाडी त्या दुकानाकडे वळते.
खरेतर मी सुरुवातीला गेलो, तेव्हा नोकर कंटाळलेले होते काम करून… दसऱ्याला तोबा गर्दी असते दुकानात. पण सेठ मात्र लगेच बोलला,
“बोला सर काय देऊ?”
“चांगले असेल ते द्या थोडे थोडे.”
मग त्याने नोकराला फरसाण, शंकरपाळे, चकली सगळ्यांचा थोडा थोडा नमुना द्यायला लावला. सगळेच पदार्थ अप्रतिम होते. नाही नाही म्हणत मी 500 रुपयांची खरेदी केली. पैसे देताच मालक बोलला,
“पुन्हा या साहेब. जय श्रीकृष्ण…”
मालक लक्षात राहिला. उभा चेहरा, उभे गंध, पायजमा, झब्बा आणि शांत चेहरा.
हेही वाचा – सासू, सून अन् लेक…
आता दरवर्षीचा नियमच झाला… परत जाताना शेठकडून फरसाण घेऊनच घरी जात होतो. मी दसऱ्याला गेलो की, सेठ स्वतःच म्हणायचा, “या तुमचीच वाट पाहात होतो.”
पाच-सात वर्षे झाली या सगळ्याला.
यंदाच्या दसऱ्याला कमलकडे गेलो. यावेळी माझ्याही घरी कोणी नव्हते. पत्नी मुलीकडे गेलेली दुसऱ्या गावी. गप्पा रंगल्या. दोनचे चार पेग कधी झाले समजलेच नाही. मधे एकदोनदा उठायचा प्रयत्न केला तर, कमलच म्हणाला,
“जाशील रे, वहिनी नाही घरी, मग जायची कशी घाई करतो?”
घडाळ्याचा काटा साडेअकराच्या पुढे गेला तसा घाईत उठलो. म्हटलं, “बाबा उद्या ऑफिस आहे. घरी जावंच लागेल.”
गाडी मेन रस्त्याला लागली. थोडा स्पीड जास्तच होता. नाका पास केला आणि आठवले नमकीन घेतले नाही यावर्षी. पुढे गेलेली गाडी पुन्हा उलट फिरवली तरी वाटतं होते… दुकान बंद झाले असेल. इतक्या रात्रीपर्यंत काय उघडे राहील?
पण तरी गाडी दामटली. दुकानाचे एक शटर उघडे होते. हुश्श…
गाडी लावून दुकानात गेलो. एकच जुना नोकर जांभया देत बसला होता. मला बघून त्याच्या चेहऱ्यावर सुटकेचे भाव आले…
“या साहेब. तुमचीच वाट बघत होतो.”
“…आणि सेठ गेले घरी?”
“सेठ आलेच नाही दुकानात!”
“का रे?”
“कालच सेठानी वारली…”
“कसे काय?”
“अटॅक आला साहेब.”
“…आणि तरी दुकान उघडले.”
“आम्हीच सेठला सांगितलं, माल तयार होऊन पडलेला, लोकांच्या मोठ्या मोठ्या ऑर्डरी होत्या. आम्ही सगळ्या नोकरांनी मिळून चालवले दुकान. सेठ दरवर्षी आम्हांला बोनस देतो, कपडे देतो, आमच्यासाठी इतकं करतो तर, आम्हीही काहीतरी करायला पाहिजे ना? हा घ्या तुमचा माल. फरसाण, चोळफल्ली, शंकरपाळे, चकल्या पॅकच करून ठेवला आहे.”
मी पैसे दिले आणि सहजच विचारले,
“आज एवढ्या उशिरापर्यंत कसे काय उघडे दुकान?”
“तुमच्यासाठीच साहेब. नऊ-साडेनऊ वाजेपर्यंत सगळे नोकर गेले. मी बंद करणार तेवढ्यात सेठचा फोन आला. ते सर दरवर्षी येतात रात्री उशिरा. त्यांना माल दिल्याशिवाय दुकान बंद करू नको. केव्हाची वाट पाहत होतो साहेब तुमची!”
हेही वाचा – होप फॉर द बेस्ट!
माझी दारू खाडकन उतरली. हायवेवरचे भले मोठे दुकान… चार-पाच नोकर दिमतीला, असा असामी… आणि मी वर्षाला 500 रुपयांचा माल घेणारा किरकोळ गिऱ्हाईक… त्याने माझी आठवण ठेवावी. त्यासाठी मध्यरात्रीपर्यंत नोकराला थांबवावे. मला एकदम भरून आले. माझ्या डोळ्यातले अश्रू थांबायचं नाव घेईना. डोळे पुसून मी घाईघाईने दुकान बंद करत असलेल्या नोकराकडे गेलो.
“तुमच्या सेठचे नाव काय रे?”
(त्यांचे नावही माहीत असू नये, याची पहिल्यांदाच खंत वाटली.)
“लालाजी, लालाभाई म्हणतात त्यांना!”
“कुठे राहतात ते?”
नोकराने पत्ता सांगितला. तो मी नीट लक्षात ठेवला. उद्या सकाळी लालाभाईकडे जाऊन त्यांचे सांत्वन करायचे, हे माझे पाहिले काम असणार आहे.


