सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय अकरावा
वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति दष्ट्राकरालानि भयानकानि । केचिद्विलग्ना दशनान्तरेषु संदृश्यन्ते चूर्णितैरुत्तमाङ्गैः ॥27॥
तेथ म्हणे पाहा हो एके वेळे । सासिकवचेंसि दोन्ही दळें । वदनीं गेलीं आभाळें । गगनीं कां जैसीं ॥410॥ कां महाकल्पाचां शेवटीं । जैं कृतांतु कोपला होय सृष्टी । तैं एकविसाही स्वर्गा मिठी । पाताळासकट दे ॥411॥ नातरी उदासीनें दैवें । संचकाचीं वैभवें । जेथींचीं तेथ स्वभावें । विलया जाती ॥412॥ तैसीं साचलीं सैन्यें एकवाटें । इये मुखीं जाहलीं प्रविष्टें । परि एकही तोंडौनि न सुटे । कैसें कर्म देखा ॥413॥ अशोकाचे अंगवसे । चघळिले कऱ्हेनि जैसे । वक्त्रामाजीं तैसे । वायां गेले ॥414॥ परि सिसाळें मुकुटेंसीं । पडिलीं दाढांचां सांडसीं । पीठ होत कैसीं । दिसत आहाती ॥415॥ तियें रत्नें दांताचिये सवडी । कूट लागलें जिभेचां बुडीं । कांहीं कांहीं आगरडीं । द्रंष्ट्रांचीं माखलीं ॥416॥ हो कां जे विश्वरूपें काळें । ग्रासिलीं लोकांचीं शरीरें बळें । परि जीवदेहींचीं सिसाळें । अवश्य कीं राखिलीं ॥417॥ तैसीं शरीरामाजीं चोखडीं । होतीं उत्तमांगें इयें फुडीं । म्हणोनि महाकाळाचांहि तोंडीं । परि उरलीं शेखीं ॥418॥ मग म्हणे हें काई । जन्मलयां आन मोहरचि नाहीं । जग आपैसेंचि वदनडोहीं । संचरताहे ॥419॥ या आघवियाचि सृष्टी । लागलिया आहाति वदनाचां वाटीं । आणि हा जेथिंचिया तेथ मिठी । देतसे उगला ॥420॥ ब्रह्मादिक समस्त । उंचा मुखामाजीं धांवत । येर सामान्य हे भरत । ऐलीच वदनीं ॥421॥ आणीकही भूतजात । तें उपजलेचि ठायीं ग्रासित । परि याचिया मुखा निभ्रांत । न सुटेचि कांहीं ॥422॥
हेही वाचा – Dnyaneshwari : कैसा नव्हता प्रळयाचा वेळु, गोखा तूंचि मिनलासि काळु
अर्थ
हे (अगोदर) भयानक आणि दाढांच्या योगाने (अधिक) भयानक अशा तुझ्या मुखांमध्ये त्वरेने शिरत आहेत. कोणी चूर्ण झालेल्या मस्तकांनी दातांमध्ये अडकलेले दिसतात. ॥27॥
त्या प्रसंगात तो अर्जुन म्हणाला, ‘अहो हे पाहा. ज्याप्रमाणे ढग आकाशामध्ये नाहीसे व्हावेत, त्याप्रमाणे तलवार व चिलखत यासह दोन्हीकडील सैन्ये एकाच वेळेला तोंडात गेली आहेत. ॥410॥ अथवा महाकल्पान्ताच्या अखेरीस ज्या वेळेला विश्वावर सर्वनाशक यमाचा रोष होतो, त्या वेळेला पाताळासह एकवीस स्वर्गांना तो ग्रासून टाकतो. ॥411॥ अथवा, प्रतिकूल दैवाच्या योगाने कृपणाचे ठेवे सहजच जसे जेथच्या तेथे नाश पावतात, ॥412॥ त्याप्रमाणे एकत्र झालेली सैन्ये या तोंडामध्ये एकदम शिरली आहेत. परंतु कसे कर्म विपरीत आहे पाहा की, त्यापैकी एक देखील तोंडाच्या सपाट्यातून सुटत नाही! ॥413॥ ज्याप्रमाणे उंटाने अशोक झाडाचे ढगळे चघळावेत, त्याप्रमाणे हे लोक तोंडामध्ये वाया गेलेले आहेत. ॥414॥ परंतु मुकुटासह मस्तके दाढांच्या चिमट्यात पडलेली कशी पीठ होताना दिसत आहेत! ॥415॥ मुकुटांवरील काही रत्ने दातांच्या फटीत सापडली आहेत; कित्येक रत्नांचे झालेले पीठ, जिभेच्या बुडास लागले असून काही काही दाढांचे अग्रभागही त्या पिठाने माखून गेले आहेत. ॥416॥ अथवा ज्याप्रमाणे विश्वरूपी काळाने लोकांची शरीरे आणि बळे जरी ग्रासली तरी जीवांच्या देहाचे उत्तम भाग जी लोकांची मस्तके, ती अवश्य रक्षण केली गेली. ॥417॥ त्याप्रमाणे मस्तके निश्चयेकरून शरीराचे उत्तम भाग होती, म्हणून ती महाकाळाच्या (विश्वरूपी काळाच्या) तोंडात जरी गेली, तरी पण शेवटी विश्वरूपी महाकाळाच्याही तोंडात नाश पावली नाहीत. ॥418॥ नंतर अर्जुन म्हणावयास लागला, हे काय? जन्माला आलेल्या प्राण्याला दुसरी गतीच नाही! सर्व जग आपोआप विश्वरूपाच्या मुखरूपी डोहात जात आहे. ॥419॥ या सर्वच सृष्ट्या मुखाच्या वाटेस लागल्या असून हे विश्वरूप उगीच जागच्या जागीच त्यास गिळून टाकीत आहे. ॥420॥ ब्रह्मदेव आदिकरून सर्वजण उंच असलेल्या मुखामध्ये वेगाने जात आहेत आणि बाकीचे जे साधारण प्रतीचे लोक आहेत, ते अलीकडील तोंडातच पडत आहेत. ॥421॥ आणखी देखील जेवढे प्राणी आहेत, तेवढ्या सर्वांस उत्पन्न झालेल्या ठिकाणीच मुख गिळून टाकीत आहे, पण याच्या मुखातून खरोखर काहीच सुटत नाही. ॥422॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : ऐसा अर्जुन दुःखें शिणतु, शोचित असे जिवाआंतु


