नुकताच एक लेख वाचनात आला, ज्यामध्ये स्वयंपाकघर, स्त्री-पुरुषांमधील कामाची विभागणी आणि पुरुषांचा घरकामातील सहभाग यावर भाष्य केलं होतं. तो लेख वाचताना असं जाणवलं की, आपण आजकाल प्रत्येक विषयाकडे ठराविक चौकटीतून पाहू लागलो आहोत. पण या वादात ‘सहजीवन’ हा जो मूळ गाभा आहे, तो कुठेतरी हरवत चालला आहे. कोणत्याही नात्याचा विचार हा एकांगी करून चालत नाही, तर त्यातील परस्पर सामंजस्य समजून घेणं महत्त्वाचं असतं.
बदलत्या काळातील आव्हाने पेलताना आज नवरा आणि बायको दोघांचीही ओढाताण होताना दिसते. आजच्या काळात सहजीवन पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त कठीण झालं आहे. वाढत्या महागाईमुळे पती-पत्नी दोघांनाही नोकरी करणं अनिवार्य झालं आहे. ‘न्यूक्लिअर फॅमिली’च्या संस्कृतीमुळे घरात वडिलधाऱ्यांचा आधार उरलेला नाही. अशा वेळी “मुलं जन्माला घालावीत की नाही?” इथपासून आजची ‘कपल्स’ विचार करतात. वाढत्या महागाईत मुलांचं संगोपन कसं करायचं आणि दोघांनाही वेळ नसल्यामुळे मुलांना ‘डे-केअर सेंटर’मध्ये ठेवताना तिथे त्यांना कशी वागणूक मिळेल, ही काळजी पालकांना सतत पोखरत असते. या धावपळीत एकमेकांसाठी तसेच पाल्यांकरता वेळ काढणं, हेच एक मोठं आव्हान बनलं आहे.
या ठिकाणी श्रमविभागणी ही अन्याय की सोय? असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. तर त्याकरिता अगदी मानवी उत्क्रांतीच्या काळापासून पाहिले तर, कामाची विभागणी ही केवळ कोणा एकावर अन्याय करण्यासाठी नव्हती. तो काळ संघर्षाचा होता. घराचं संरक्षण आणि अन्नाची तरतूद करण्यासाठी शारीरिक ताकदीची गरज होती, म्हणून ती जबाबदारी पुरुषाने स्वीकारली, तर घराचं व्यवस्थापन आणि मुलांचे संगोपन ही जबाबदारी स्त्रीने पेलली. हे एकमेकांना कमी लेखणं नव्हतं, तर ते घराचा गाडा सुरळीत चालवण्यासाठी केलेलं एक समजूतदार ‘श्रमविभाजन’ होतं. यामध्ये कर्तव्याचं भान आणि जिव्हाळा होता… तसेच तो एक वैयक्तिक अनुभव होता.
हेही वाचा – मनात बहरलेला गुलमोहर!
सहजीवन म्हणजे केवळ ‘मी अर्धी भांडी घासतो आणि तू अर्धी घास’ असं गणिती वाटप नसतं. माझ्या पाहण्यात कितीतरी अशी जोडपी आहेत, जे अनेक बिझी कॉर्पोरेट सेक्टर असू देत किंवा पोलीस खात्यासारखे सतत चोवीस तास कर्तव्यात मग्न असणारे व्यक्ती असू देत, त्यांची ड्युटी किती कठीण असते, हे वेगळं सांगायला नको. पण मी हे अनेकांच्या बाबतीत निरीक्षण केले आहे की, नाइट ड्युटीवरून पहाटे चार वाजता घरी आले तरी, दोन-तीन तासांत पुन्हा उठून सकाळी साडेसातला मुलांना शाळेत सोडण्यासारखी कामं त्यांनी नेहमीच आनंदाने केली. रविवारी सुटी असली की, मुलांची आंघोळ, त्यांना जेवू घालणं यात ते हिरिरीने भाग घ्यायचे. माझ्या स्वतःच्या अनुभवातून मी ही बाब निदर्शनास आणते आहे… कारण माझे मिस्टर देखील पोलीस ऑफिसर आहेत आणि हा अनुभव मी स्वतः घेतला आहे. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये माझी मुलं, भाचे आहेत. शैक्षणिक क्षेत्रात, वकिलीच्या व्यवसायात तसेच बँकिंग व्यवसायात माझे भाऊ आहेत, जे त्यांच्या संसाराचा गाडा हाकताना घरामध्ये शक्यतोवर होईल, तितकी मदत ते करत असतात. स्वतःची झोप आणि थकवा बाजूला सारून कुटुंबासाठी दिलेला हा वेळ, हा त्यांचा ‘चांगुलपणा’ तर आहेच, पण त्यासोबतच तो त्यांचा त्यांच्या पत्नीप्रती असलेला एक ‘मूक सन्मान’ आहे.
सुरक्षितता आणि विश्वासावर नवरा, बायकोचे नाते अधिक समृद्ध होतं, असं मला वाटतं. आजच्या धावपळीच्या युगात एकमेकांना वाटणारी ‘सुरक्षितता’ अधिक मोलाची असते. आजही अनेक ठिकाणी बाई दोन पावलं मागे राहणं पसंत करते, पण ते न्यूनगंडातून नाही, तर त्या पुरुषाच्या कर्तृत्वावर आणि त्याने दिलेल्या सुरक्षिततेच्या कवचावर असलेल्या विश्वासामुळे! बाहेरील जगाशी संघर्ष करताना जेव्हा पुरुष ढाल बनून पुढे उभा राहतो, तेव्हा ती सुरक्षितता स्त्रीला मानसिक बळ देते. माझी एक मैत्रीण आज सरकारी खात्यामध्ये चांगली कमिश्नरेट पदावर असती, परंतु तिच्या नवऱ्याची बिझी श्येड्युल्ड असलेली नोकरी पाहून तिने स्वतःहून नोकरी न करण्याचा निर्णय घेतला आणि आज ती तिच्या संसारात समाधानी आहे. हा सर्व प्रकार एकमेकांच्या सहमतीने आणि सामंजस्याने झाला तर, त्या नवरा, बायकोला या बाबतीत कुठलाच कमीपणा न वाटता उलट ते नातं अजून चांगले बहरतं!
अधिकारशाहीला छेद देऊन कुटुंबात पोषक वातावरणही असणे वैवाहिक जीवनात महत्त्वाचे आहे, नाही का? त्याच सोबत समाजातल्या त्या वास्तवाकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही, जिथे आजही काही पुरुष हेकेखोरपणे आपला अधिकार गाजवतात. स्त्रीला केवळ ‘रांधा, वाढा, उष्टे काढा’ या चौकटीतच पाहिलं जातं. काही घरांत आजही पुरुष स्वतःचा पाण्याचा ग्लास सुद्धा स्वतः भरून घेत नाहीत! ही मानसिकता बदलायला हवी. सहजीवन म्हणजे सत्तेचा खेळ नाही, तर ते एकमेकांसाठी पूरक वातावरण निर्माण करणारं एक नातं आहे.
हेही वाचा – चाळ नावाचे एकत्र कुटुंब!
सहजीवनात विसंवाद तेव्हाच होतो, जेव्हा तिथे अहंकाराचा प्रवेश होतो. हेकेखोरपणा हा केवळ पुरुषांकडेच असतो, असे नाही. समाजात जसे काही पुरुष अधिकार गाजवणारे असतात, तशाच काही स्त्रिया सुद्धा टोकाच्या हेकेखोर आणि आक्रमक स्वभावाच्या असतात. छोट्या-छोट्या गोष्टींवरून आक्रमक होणे किंवा स्वतःचेच म्हणणे खरे करणे, यामुळे नात्यातील लवचिकता संपते. स्त्री असो वा पुरुष, जर स्वभाव लवचिक नसेल आणि एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती नसेल, तर त्या संसाराचा डोलारा कोसळायला वेळ लागत नाही.
स्वयंपाकघरात मदत करणारा पुरुष कौतुकास्पद आहेच, पण जो पुरुष आजच्या कठीण काळात आपल्या पत्नीच्या श्रमाचा सन्मान करतो, तिच्या विश्रांतीचा विचार करतो आणि संसाराच्या प्रत्येक चढ-उतारात ‘आपलं घर’ या भावनेतून स्वतःला झोकून देतो, तो खऱ्या अर्थाने ‘देखणा’ असतो. सहजीवन हे केवळ हक्क गाजवण्याचं नाव नसून, ते एकमेकांना सावरून घेण्याचं आणि समृद्ध करण्याचं नाव आहे!


