दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 12 एप्रिल 2026; वार : रविवार
भारतीय सौर : 22 चैत्र शके 1948; तिथि : दशमी 25:16; नक्षत्र : श्रवण 15:13;
योग : साध्य 18:14; करण : वणिज 13:02;
सूर्य : मीन; चंद्र : मकर 27:44; सूर्योदय : 06:25; सूर्यास्त : 18:54;
पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128.
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
प्रतिभासंपन्न लेखक पु. भा. भावे
टीम अवांतर
अष्टपैलू आणि प्रतिभासंपन्न लेखक पुरुषोत्तम भास्कर तथा पु. भा. भावे यांचा जन्म 12 एप्रिल 1910 रोजी धुळे येथे झाला. भावे यांचे बालपण विदर्भात गेले आणि नागपूरला त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पूर्ण विकास झाला. त्यांना वाचनाचे विलक्षण वेड होते, या वाचनामुळेच त्यंच्यातील वाङ्मयाभिरूचीचे पोषण झाले. वयाच्या केवळ पंधराव्या वर्षी त्यांनी ‘ओम् फस्’ ही कथा लिहिली आणि आपल्या लेखनतपस्येचा श्रीगणेशा केला.
हेही वाचा – एक थी बुलबुल…
कथा, कादंबरी, नाटक, ललित गद्य, व्यक्तिचित्र, चिंतनात्मक लेख, चित्रपटकथा, प्रवासवर्णन इत्यादी विविध साहित्यप्रकार त्यांनी यशस्वीपणे हाताळले. प्रथमपुरूषी एकवचनी हे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध असून त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण कशी झाली, हे याद्वारे समोर येते.
रक्त आणि अश्रू हा त्यांचा लेखसंग्रह मराठी निबंधवाङ्मयाताही अद्वितीय असा आहे. वाघनखे, विठ्ठला पांडुरंगा, अमरवेल, रांगोळी इत्यादी त्यांचे चौदा लेखसंग्रह प्रसिद्ध आहेत. स्मरणी हा त्यांनी लिहिलेल्या व्यक्तिचित्रांचा संग्रहही उल्लेखनीय आहे.
त्यांचे एकूण 27 कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. ‘सतरावे वर्ष’, ‘सीमेवर’, ‘सावल्या’, ‘काळ, काम आणि वेग’, ‘ स्वप्न’, ‘ ध्यास’, ‘मुक्ती’, ‘रूप’, ‘प्रतारणा’, ‘पुतळा’, ‘दुःख’, ‘फुलवा’, ‘पहिले पाप’, ‘संगम’, ‘घायाळ’, ‘नौका’ यासारख्या अप्रतिम कथा लिहून भावे यांनी मराठी कथासृष्टीत आपले नाव अजरामर केले आहे. भारताच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या त्यांच्या नौका या कथासंग्रहातील कथा तर जीवनातील तारूण्याचे आणि कारूण्याचे, शाश्वतेचे आणि नश्वरतेचे ते सारख्याच समरसतेने चित्रण करतात. ‘आइसक्रीम’ ही त्यांची विनोदी कथा दृष्टीने उल्लेखनीय आहे.
अकुलिना आणि वर्षांव यासारख्या कादंबऱ्यांतून ते स्त्रीव्यवथेचे विलक्षण हळुवारपणे चित्रण करतात. अडीच अक्षरे या कादंबरीतून प्रेमभावनेचे विविध पदर उलगडून दाखवणारे भावे आग, रोहिणी, पिंजरा, मागं वळून, सायंकाळ, व्याध, रखमाच्या मुली इत्यादी कादंबऱ्यातून मानवी विकारविलसिताचे तसेच नियतीच्या प्रभावाचे अप्रतिम चित्रण करतात. त्यांच्या एकूण 19 कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत.
हेही वाचा – योगासने अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य
नाटककार म्हणूनही भावे यांनी लौकिक प्राप्त केला होता. विषकन्या, स्वामिनी, महाराणी पद्मिनी ही त्यांची गाजलेली नाटके. सौभाग्य आणि माझा होशील का? या चित्रपटांच्या कथा त्यांनी लिहिल्या होत्या. उत्तर-दिग्विजय आणि चितोड यात्रा ही त्यांची प्रवासवर्णने प्रसिद्ध आहेत.
पु. भा. भावे हे हिंदुत्वनिष्ठ होते. स्वातंत्र्यवीर सावरकर हे त्यांचे प्रेरणास्थान होते. हिंदूमहासभेचे ते काही काळ सक्रिय कार्यकर्तेही होते. महात्मा गांधी तसेच काँग्रेस पक्षाच्या धोरणावरही भावे यांनी कडाडून हल्ला केला आहे. भावे सनातन भारतीय संस्कृतीचे तसेच जीवनमूल्यांचे उपासक असले, तरी कर्मठ नव्हते. स्वातंत्र्याचा पुरस्कार करीत असतानाच ते स्वैराचारावर टीका करीत. हिंदू समाजाच्या ऐक्याला विघातक अशा जातिभेदादी गोष्टींवर टीका करीत.
अहमदनगर येथे 1964 साली भरलेल्या मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करून नाट्यरसिकांनी भाव्यांच्या नाट्यसेवेचे कौतुक केले होते. तर, पुणे येथे 1977 साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली होती. 13 ऑगस्ट 1980 रोजी मुंबई येथे त्यांचे निधन झाले.
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


