वि. स. खांडेकर यांची ‘ययाती’ ही गाजलेली कादंबरी आजही वाचकांची आवडती आहे. महाभारतातल्या ययातीच्या उपाख्यानावर आधारित ही कादंबरी असली तरी लेखकाने साहित्यिक स्वातंत्र्य घेतले आहे. जसे महाभारतातली आणि कालिदासाची शकुंतला वेगळी तसेच या कादंबरीतील देवयानी वेगळी! कादंबरीच्या मलपृष्ठावर असलेले विवेचन पुस्तकाचा सारांश आहे. लेखक म्हणतात, ‘ही कादंबरी ययातीची कामकथा, देवयानीची संसारकथा, शर्मिष्ठेची प्रेमकथा आणि कचाची भक्तीगाथा आहे, हे लक्षात घेऊन वाचकांनी वाचावी.’
ही एक सूडकथा सुद्धा आहे. देवयानीचा अपमान शर्मिष्ठा करते तिच्यावर सूड घेण्यासाठी ती ययातीशी विवाह करून तिला दासी करते आणि ययाती त्याच्या आईने बालमैत्रिणीचा खून केल्याबद्दल तिला शिक्षा करण्यासाठी ब्राह्मणकन्येशी प्रतिलोम विवाह करतो. त्याने क्षत्रिय कन्येशी विवाह करावा, असे तिला वाटत असते. त्याची आई दुखी होते. ही त्यागाची कथाही आहे. कच देवांसाठी सर्वस्वाचा त्याग करतो, शर्मिष्ठा तिच्या देशासाठी दासी होते, राजा वृषपर्वा आपल्या प्रजेसाठी मुलीला दासी होऊ देतात, पुरू ययातीचे वार्धक्य घेतो आणि शुक्राचार्य आपल्या लाडक्या लेकीचे हट्ट पुरवण्यासाठी कचाला जिवंत करून तपोसाधनेने मिळवलेली संजीवनी विद्या शत्रूला देतात.
लेखक कादंबरी लेखनासाठी पौराणिक कथांकडे का वळले? याचे उत्तर देताना स्वातंत्र्यानंतर झालेला भ्रमनिरास, आलेली काळरात्र याबद्दल वैषम्य व्यक्त करतात आणि मॅझिनीची उक्ती सांगतात, ‘Those, who have no vision, perish.’ कालिदासाच्या शाकुंतलामधले वाक्य, “ययातीला जशी शर्मिष्ठा प्रिय होती, तशी तू आपल्या पतीला प्रिय हो.” वाचून ते विचारात पडले. कण्व मुनी असा आशीर्वाद का देतील? या प्रश्नाचे उत्तर शोधताना शर्मिष्ठेबद्दलचे विचार मनात घोळू लागले, त्यातून शर्मिष्ठेचे पात्र तयार झाले. जे महाभारतात वर्णन केलेल्या शर्मिष्ठेपेक्षा भिन्न आहे. शर्मिष्ठेशी ययातीचा विवाह झाला नव्हता, ती राजकन्या असून सुद्धा देवयानीची, एका ऋषीकन्येची दासी झाली होती. तरीही कण्व मुनींनी असा आशीर्वाद दिला, याचा अर्थ ययाती आणि शर्मिष्ठेचे प्रेम श्रेष्ठ असायला हवे, विवाह बंधनापेक्षाही ताकदवान असायला हवे.
हेही वाचा – Bookshelf : वलय… सर्वच कथा सशक्त
राजा नहुषाला त्याच्या उन्मत्त वर्तणुकीमुळे अगस्त्य ऋषींनी शाप दिलेला असतो की, तू आणि तुझी मुले कधीही सुखी होणार नाहीत. सुखाचा शोध घेणारे यती आणि ययाती हे नहुषाचे दोन पुत्र आहेत. यती हा मोठा मुलगा. त्याला या शापाबद्दल कळल्यावर तो संन्यास घेऊन हठयोगाचा मार्ग स्वीकारतो आणि ययाती सम्राट होतो. एक मोहमायेवर विजय मिळवून शरीराला यातना देऊन सुख शोधतो आणि दुसरा शरीराला सर्व सुखे अत्याधिक प्रमाणात देऊन सुख शोधतो. लेखक लिहितात, ‘सुख आणि आनंद यातला फरक यांना समजत नाही.’ हेच या कादंबरीचे सार आहे असे मला वाटते. आनंद देण्यात असतो, जो शर्मिष्ठा ययातीला निर्व्याज प्रेम देऊन मिळवते आणि कच देवांच्या रक्षणासाठी तळहातावर शीर घेऊन मिळवतो.
सर्व पात्रे स्वगत सांगत आहेत. ययातीच्या स्वगतापासून सुरुवात होते आणि कथानक पुढे सरकत जाते. ययाती अश्वमेध यज्ञ करून सम्राट होतो. नहुष महाराजांना अजून जगायचे असते, ते प्रत्येकाच्या आयुष्यातला एक दिवस मागतात, पण कोणीही द्यायला तयार होत नाही. त्यांचा मृत्यू होतो. देवयानीचा दुराभिमान, ययातीची सुखलोलुपता, शर्मिष्ठेला भोवलेला अल्लडपणा, वृषपर्वाची अगतिकता, शुक्राचार्यांचे मुलीवरचे प्रेम आणि कचाची कर्तव्यनिष्ठा हे गुण-अवगुण ठळकपणे कथानकातून उलगडत जातात. राजा असो वा रंक, ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा!’ हे अधोरेखित होत राहते.
लेखक लिहितात, ‘यतीने निसर्गाचे स्वामीत्वच नाही तर, अस्तित्वच अमान्य करायला सुरुवात केली.’ जीवन म्हणजे शुद्ध आत्मा किंवा केवळ शरीर या दोन्ही कल्पना चुकीच्या आहेत. देवयानी हे अहंकाराचे प्रतीक आहे. आपल्या रूपाचा, गुणांचा आणि शुक्राचार्यांची पुत्री असण्याचा अहंकार तिला असतो. कच ययातीला पत्र लिहितो. त्यात म्हणतो, ‘संसार यज्ञ सफल व्हावा म्हणून पती-पत्नीने सर्व प्रथम आपल्या अहंकाराची आहुती द्यायला हवी.’
यात मंदार नावाच्या ऋषीचे पात्र आहे जो ढोंगी आहे. जीवन म्हणजे आज उमलून कोमेजणारे फूल असल्याने जितका सुगंध लुटता येईल तेवढा लुटावा, असे तत्वज्ञान सांगतो आणि लोकांना व्यसनाधीन करतो. हाही सुख शोधण्याचा एक मार्ग आहे, जो केवळ दु:खाकडे जातो. महाभारतातील एका श्लोकाचा अर्थ सांगताना लेखक लिहितात, ‘जसे दिव्यात अधिकाधिक तेल घातले तर, त्याची वात मोठी होते, तसेच शरीराला अधिकाधिक सुख दिले तर सुखाची लालसा वाढत जाते.’
कच देवयानीच्या कथेत त्यांनी काही पात्र घालून कथेची वीण पक्की केली आहे. स्वगत असल्यामुळे यातले प्रत्येक पात्र आपली बाजू मांडते. त्यांचे गुणदोष दिसून येतात, त्याच बरोबर माणसाची अगतिकताही दिसते. देवयानीला सम्राज्ञी व्हायचे असते, पण ययातीवर तिचे प्रेम नसून कचावर असते. शर्मिष्ठेचे ययातीवर प्रेम असते, पण तिचा त्याच्याशी विवाह होत नाही. तिने कुठलीच अपेक्षा ठेवलेली नसते, परिस्थितीचा स्वीकार केलेला असतो. ययातीला देवयानी झिडकारते, त्यामुळे तो व्यसनाधीन होतो आणि मदिरा मदिराक्षीच्या आहारी जातो. शुक्राचार्य ऋषी असून सुद्धा तापट होते. त्यांनी मुलीला अतिलाडाने बिघडवले आहे. कच हे परिपूर्ण पात्र आहे. तो देवयानीला गुरूंची कन्या असल्यामुळे बहीण मानतो. तो म्हणतो की, ‘शुक्राचार्यांनी विद्ध्वंस करायची सिद्धी मिळवायची, मी ती त्यांच्याकडून कुठल्या न कुठल्या प्रकारे शिकून घ्यायची. मग त्यांनी पुन्हा अशीच विद्ध्वंसाची सिद्धी मिळवायची आणि मी पुन्हा ती हस्तगत करायची, याला कधी अंत नाही. त्यांनी त्यांचे सामर्थ्य मानवाच्या कल्याणासाठी वापरावे.’ आजच्या जगातही अशी एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या सिद्धी देश मिळवतच आहेत.
हेही वाचा – Bookshelf : मनात खोलवर प्रभाव पाडणाऱ्या ‘चौघीजणी’
मुखपृष्ठावर अश्वमेधाच्या पांढऱ्या घोड्याचे चित्र आहे. पुढचे दोन्ही पाय वर करून तो उडी मारण्याच्या आवेशात आहे. हे फारच बोलके चित्र आहे. अश्वमेधाचा घोडा हा जग जिंकायला लागणाऱ्या शौर्याचे, शक्तीचे प्रतीक आहे. त्याचबरोबर दुसऱ्यावर सत्ता गाजवण्याच्या लालसेचेसुद्धा! माणसाच्या मनाचे प्रतीक असलेला हा वारू चौखूर उधळला आहे, कारण त्याला लगाम घातलेला नाही. त्याच्या शक्तीची, सौंदर्याची त्याला पुरेपूर जाणीव आहे. घोडा हे पौरुषाचे प्रतीक आहे. माणसाच्या पंचेन्द्रियांच्या अश्वाला विवेकाचा लगाम घातला नाही तर, ययाती, देवयानीसारखे सम्राट, सम्राज्ञी सुद्धा सुखी होऊ शकत नाहीत.
नहुषाला मिळालेला शाप खरा होतो. यती आणि ययाती भिन्न मार्गांवरून चालून सुद्धा सुखी होत नाहीत. महाभारतातले हे उपाख्यान माणसाच्या अनंत काळाच्या सुखाच्या शोधाचे उत्तर देते. सुख आणि आनंद यातला फरक हेच याचे उत्तर आहे.
हे उपाख्यान कालजयी आहे, कारण माणसाचा स्वभाव बदलणार नाही. तेव्हाही तसाच होता आणि आजही तसाच. सुखाचा शोध सुरूच राहील आणि अश्वमेधाचा घोडा कधीतरी बेलगाम होतच राहील, उधळत राहील… कारण जगात कच कमी आणि ययाती जास्त आहेत. माणसाच्या जीवनाचा अर्थ काय? या प्रश्नाचे उत्तर या कथेत लपलेले आहे. ययाती आजही मनाला भिडते ती याच कारणासाठी.


