॥ अथश्री इडलीका कुमारी कथा आरंभस्य ॥
दक्षिण भारताचे प्रमुख खाद्यपदार्थांपैकी एक अशी ओळख असलेली ‘इडली’ ही आता संपूर्ण भारतातच नव्हे तर पार साता समुद्रापलीकडे आपल्या नावाचा डंका पिटत आहे. दक्षिण भारताची ही लाडकी इडली नावाची राजकुमारी भारतातील तमाम अन्नपदार्थांमध्ये आपल्या पौष्टिक घटकांमुळे मानाचे स्थान पटकावून बसली आहे. या इडलीकुमारीची कहाणी देखील मनोरंजक आहे बरं का! तुम्हाला जर सांगितले की, इडली ही दक्षिण भारतीय पदार्थ नाही तर, तुमचा यावर विश्वास बसेल? नाही ना? माझाही नव्हता बसला! परंतु मी जेव्हा इडलीच्या इतिहासाचा मागोवा घेतला, तेव्हा या इडलीकुमारीच्या बऱ्याच रंजक कथा समोर आल्या. तुम्हालाही ऐकायला आवडेल, या इडलीकुमारीची कथा… चला तर मग सुरू करूया!
भारतीय खाद्य इतिहास अभ्यासक के. टी. अचैय्या यांच्या अभ्यासानुसार कर्नाटकातील काही कवितांमध्ये इडलीचा उल्लेख आढळतो. इडलीगा वा इडरीका अस संस्कृतमध्ये त्यांना म्हटलं गेलं आहे. इडली, डोसा, वडा सांबार, अप्पे, उतप्पम् अशा विविध पदार्थांची नावे ऐकली की, आपल्या डोळ्यांसमोर लुंगीवाला साऊथ इंडियन अण्णा उभा राहतो. भारताच्या कानाकोपऱ्यात सकाळी सकाळी कपाळाला पांढरे गंध लावलेले हे लुंगीवाले अण्णा इडली, डोसा विकताना दिसतात. कोणी सायकलवर तर, कोणी हातगाडीवर आपापली दुकाने घेऊन फिरतात. कितीतरी अण्णा लोक या पदार्थांचे हॉटेल्स टाकून श्रीमंत झालेले आहेत. कारण साऊथ इंडियन पदार्थांनी समस्त भारतीयांना तशी भुरळचं पाडलेली आहे. त्यातल्या त्यात पांढरी स्वच्छ, मऊ, लुसलुशीत इडली म्हणजे समस्त आबालवृद्ध लोकांच्या गळ्यातील ताईतच!
तर, अशी ही सर्वांची लाडकी इडली मूळ रुपात आपल्या येथील नाहीच! ही इडलीकुमारी आली आहे इंडोनेशियामधून!! तुम्ही म्हणाल की, काय सांगते ही! वर्षानुवर्ष आपल्या आहारात असलेली इडली इंडोनेशियाची कशी बरं असेल? परंतु हे खरं आहे. के. टी. अचैय्या यांनी इडलीबद्दल लिहिताना म्हटले आहे की, इडली ही दक्षिण भारतीय पदार्थ नाही तर ती इंडोनेशियामधून भारतात आली आहे. वडा सांबार, डोसा यांना दोन हजार वर्षांपूर्वीचा भारीभरकम इतिहास आहे, परंतु इडलीला इतका प्राचीन इतिहास नाही. फार पूर्वीपासूनच इंडोनेशिया, चीनमध्ये वाफवलेले पदार्थ तयार करण्याची परंपरा आहे. आपल्या देशात इडलीसारखा पदार्थ जो आंबवून आणि वाफवून तयार केला जातो, हे त्या वेळेस कोणालाच माहीत नसावं आणि त्याच कारणामुळे जेव्हा सातव्या शतकामध्ये ह्युआन त्सांग नावाचा चिनी बौद्ध भिक्कू प्रवासाकरिता भारतामध्ये आला होता, तेव्हा त्याला पदार्थ वाफवण्याचे भांडे आपल्या देशात कुठेही आढळले नव्हते, हे त्याने आपल्या प्रवास वर्णनामध्ये नमूद करून ठेवले आहे. अचैय्या यांच्या मतानुसार इंडोनेशियातील बल्लवाचार्यांनी पदार्थ वाफवून तयार करण्याची प्रक्रिया भारतात आणली असावी. इडली ही तांदूळ + उडिद डाळ यांना सात-आठ तास भिजवून नंतर रवाळ वाटून आणि परत सात-आठ तास फर्मेंट करून ज्याला ‘किनवान’ही म्हटले जाते, अशा पद्धतीने तयार केली जाते. इ. स. 920च्या शतकातील शिवाकोटाचार्य यांच्या लेखामध्ये इडलीचा उल्लेख आढळतो. ते असे लिहितात की, दक्षिण भारतातील एका स्त्रीकडे एकदा एक ब्रह्मचारी अतिथी म्हणून आला असताना तिने बनवलेल्या अठरा प्रकारच्या व्यंजनांमध्ये ही इडली होती. इ. स. 1020मधील एक कवी श्री चामुंडा राय यांच्या एका विवरणामध्ये इडली बनवण्याची प्रक्रिया अशा प्रकारे होती की, ज्यामध्ये तांदळाचा उपयोग नव्हता केला आणि ती किनवान म्हणजे आंबवलेली सुद्धा नव्हती. तर, ही इडली म्हणजे फक्त उडिद डाळ ताकामध्ये भिजवून नंतर ती बारीक करून त्यामध्ये दह्याचे वरचे ताजे पाणी, काळीमिरी पावडर, हिंग, मीठ आणि कोथिंबीर एकत्र करून हवा तसा आकार देऊन तयार केलेला पदार्थ होता, जो इडलीसारखा दिसत होता. परंतु, ती इडली नव्हती. तांदूळ आणि उडिद डाळीपासून इडली फक्त इंडोनेशियात बनवली जात होती. तिला त्या देशात केडली या नावाने संबोधले जात होते…. आहे की नाही मजेशीर?
आपल्याला इडलीची जुळी बहीण केडली, जी कुंभमेळ्यात हरवली होती, हे माहितीच नव्हतं! इ. स. 800 ते 1200 च्या दरम्यान काही इंडोनेशियन राजे आपल्या भारतातील नातेवाईकांकडे गाठीभेटींकरिता, लग्न समारंभांकरिता, तसेच वधू संशोधनाकरिता देखील यायचे. तेव्हा मुदपाकखान्यातील आचारी आपापल्या शाही परिवारांच्या जेवणाकरिता त्यांचे पारंपरिक पदार्थ तयार करत असत. त्यामध्ये तांदूळ आणि उडिद डाळीचा किनवान केलेला हा इडली नावाचा पदार्थ होता. पदार्थ आंबवून म्हणजे किनवान करून आणि वाफवून करण्याची कला ही चीन, इंडोनेशिया, थायलंड, म्यानमार या देशांमध्ये जास्त प्रचलित होती. कारण, तांदुळ उत्पादनामध्ये हे देश पहिल्यापासून आघाडीवर आहेत आणि तांदळाच्या पिठापासून किंवा तांदळापासून अनेक वाफवलेले पदार्थ तयार करता येतात, हे त्यांना माहीत असावं; म्हणून वाफवलेल्या पदार्थांचा त्यांच्या आहारात जास्त समावेश असावा.
हेही वाचा – थंडी अन् विदर्भातील रोडगे पार्टी!
इंडोनेशियातील राजपरिवारांच्या, भारतीय मूळ असलेल्या आचाऱ्यांनी तयार केलेला केडली नावाचा हा पदार्थ भारतीय आचाऱ्यांनीपण शिकून घेतलेला असावा. हे आचारी जेव्हा भारतात राहिले, तेव्हा त्यांनीच तांदूळ आणि उडीद डाळ मिसळून लुसलुशीत पांढरी स्वच्छ इडली तयार करण्याचा आविष्कार केला असेल, जो संपूर्णपणे भारतीय असावा आणि केवळ त्यामुळेच इंडोनेशियाच्या केडलीच्या या जुळ्या बहिणीचा म्हणजे इडलीचा भारतीयांच्या मनात आदरयुक्त भाव निर्माण झाला असावा. इंडोनेशियाच्या केडलीने आपली जुळी बहीण इडलीला भारतीयांच्या मनामध्ये स्थान मिळवुन दिले आणि स्वतः केडली इंडोनेशियातच राहिली.
आपल्या भारतीय बल्लवाचार्यांनी या इडलीची अनेक बाळंतपणे करून तिची नवनवीन रुपे जन्माला घातली. जुन्या इडलीकुमारीचा जन्म फक्त तांदूळ आणि उडिद डाळ यांचे मिलन झाले तरच शक्य होता, परंतु ही इडलीकुमारी भारतात आली आणि तिची अनेक रूपे तयार झाली. भारतामध्ये तांदळाचे लग्न फक्त उडिद डाळीसोबत न लावता मूग डाळ, काळे उडिद यांच्यासोबत लावून तिला नव्याने जन्माला घातले गेले. तिरुपती बालाजीला गेलात तर तिथे आजही काही ठिकाणी काळे उडीद वापरून तयार केलेली काळी इडली मिळते. आता तर या आधुनिक काळात इडलीची कितीतरी रूपे पाहायला मिळतात, जी इंडोनेशियातील लोकांनाही माहीत नसतील. यामध्ये दक्षिण भारत नेहमीच पुढे राहिला आहे. आता 21व्या शतकात थट्टे इडली, मिनी इडली, पोडी इडली, रागी इडली, रवा इडली, मूग डाळ इडली, मिलेट्सची इडली, स्टफ इडली, बटर इडली… इत्यादी नवनवीन इडलीने आपले जग व्यापून गेले आहे. मी तर असेही ऐकले आहे की, आमच्या नागपूरमध्ये मिळणाऱ्या काळ्या इडलीने खवय्येगिरी करणाऱ्या लोकांची उत्कंठा वाढीस लावली आहे. एमटीआर आणि कांचीपुरम इडलीने तर आता लोकप्रियतेचा कळस गाठला आहे.
आज इंडोनेशियाच्या केडलीपेक्षा तिच्या या भारतीय जुळ्या बहिणीचा, जिचे नाव एक परंतु रूपे अनेक असे वैशिष्ट्य आहे, अशा इडलीचा दबदबा सर्व जगात पसरला आहे. तांदळापासून वाफवलेले इतके सारे पदार्थ बनू शकतात, हे आपण जगाला दाखवून दिले आहे. भारतामध्ये आजमितीला तांदळाचे दोन लाख वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतीत, हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
हेही वाचा – वर्ध्यातील गोरस पाक म्हणजे स्वर्गीय सुख!
आपल्या देशात विविध प्रांतांनुसार चटपटीत व्यंजनेसुद्धा आपापल्या रंगारूपाने, चवीने विविधतेत एकता साधून आहेत. आपल्या सहिष्णु वृत्तीमुळेच इंडोनेशियातील केडलीला आपण इडलीची नानाविध रूपे देऊन भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये मानाचे स्थान दिले आहे. इडलीसारखे असे कितीतरी पदार्थ आज भारतीयांच्या आहारात “मिले सूर मेरा तु्म्हारा, तो सूर बने हमारा” असे म्हणत हिंदुस्थानच्या घराघरात विराजमान झाले असतील. परकीय खाद्य संस्कृतीचे स्वागत करून आणि तिला आपलेसे करून भारतीयांनी “अतिथी देवो भव” म्हणण्याची परंपरा जपली आहे. अशी गरमा गरम, मऊ, लुसलुशीत पांढरी स्वच्छ जाळीदार हलकी इडली जेव्हा सांबरच्या आंबटगोड वाटीरूपी तळ्यात डुबक्या मारून आपल्या जीभेवर विसावते, तेव्हा स्वर्गीय अनुभव तो काय वर्णावा? या इडली सांबारसोबत ओल्या नारळाची चटणी खाल्ली की ब्रम्हानंदी टाळी लागलीच समजा!
“अहाहा!!! क्या कहना इडली राजकुमारी… तुम्हारी तारीफ करते करते जबान थकती नही!” मी इथे इडलीकुमारीची कहाणी संपवते. खाद्य परंपरेत अशीच एक नवीन पदार्थाची कथा मी तुम्हाला पुढील भागात सांगेन.
॥ इतिश्री इडरीगा कहाणी सुफल संपूर्णम ॥


