डॉ. आनंद नाडकर्णी यांची निधनाची वार्ता वाचली आणि खूप व्यथित झाले… आणि डोळ्यासमोर उभी राहिली, पालकांसाठी डॉ. आनंद नाडकर्णी यांनी आयोजित केलेली ‘पालक शाळा.’
वास्तविक, मी माझ्या मुलासाठी ‘मानस उपचार केंद्र’ – डॉ. आनंद नाडकर्णी, ठाणे यांना भेटण्यासाठी आले होते. तेव्हा माझा मुलगा आठवीत शिकत होता. त्याच्या बाबतीत शाळेतून आणि अर्थात, पालक म्हणून माझी एकच तक्रारन- ‘हुशार आहे, पण लिहिण्याचा अतोनात कंटाळा-आळस.’ हा प्रश्न सोडवायचा कसा म्हणून ही माझी या संस्थेला भेट ठरलेली होती. अनपेक्षित पणे 15 नोव्हेंबर 1995 रोजी पालकांसाठी असलेल्या पालक शाळेत मी दाखल झाले, केवळ कुतूहल म्हणून! हाच अनुभव मला आज डॉक्टरांच्या स्मृतीप्रीत्यर्थ तुम्हाला सांगायचा आहे, तो असा…
मग घरच्यांच्या, अर्थात, पतिराजांच्या संमतीविनाच परस्पर निर्णय घेऊन मी या शाळेत दाखल झाले. सुखद बाब म्हणजे शाळेत दाखल होण्यासाठी आम्हा पालकांना कोणत्याही ‘मुलाखत’ वा ‘देणगी’ प्रकाराला सामोरं जावं लागलं नाही. पाल्यांच्या तुलनेत आम्हा पालकांचा या शाळेतला प्रवेश खूपच सहज आणि सोपा. मनाला सहज विचार चाटून गेला – ‘आमच्या मुलांना आमच्या घराजवळच्या शाळेत इतक्या सहजपणे प्रवेश मिळाला तर? आम्ही पालकांनीही अमुकच शाळा हवी असा हट्ट सोडला तर?’
हेही वाचा – विद्यार्थ्यांना क्लासेसची आवश्यकता किती?
झरकन डोळ्यांसमोर उभं राहिलं ते आमचं बालपण, आमचं शालेय जीवन. पाठीवर छोटंसं दप्तर, खाऊचा डबा, मित्र-मैत्रिणींचा किलबिलाट… खरं म्हणजे, चक्क लहानच व्हावंसं वाटलं मला! आजच्या विद्यार्थ्यांच्या मानानं आमची विद्यार्थीदशा खूपच आनंददायी होती. डोक्यावर अभ्यासाचं ओझं तर नव्हतंच, पण पाठीवरही वह्या-पुस्तकांचं प्रचंड ओझंही नव्हतं…
आज माझ्यातलंच एक पाल्य जेव्हा एक पालक म्हणून उभं राहिलंय तेव्हा प्रकर्षाने जाणवतंय, आमचं पालकत्व पूर्वीच्या तुलनेत अवघडच आहे. ती चक्क एक तारेवरची कसरत वाटतेय. आमची दमछाक होतेय. आम्ही इतके दमतोय तर आमची पाल्ये?
आमच्या या शाळेत डॉ. आनंद नाडकर्णी, कामत बाई, तनुजा दोंदे, प्रतिमा नाईक, डॉ. शुभा थत्ते आदी तज्ज्ञ मंडळींची पालकत्वाशी संबंधित अशा विविध विषयांवर अत्यंत उद्बोधक आणि मार्गदर्शक व्याख्याने झाली. या संपूर्ण सत्रात आम्ही फक्त श्रोते कधीच नव्हतो. आमच्या शंका, प्रश्न विचारण्यास आम्हाला पूर्ण परवानगी होती, त्यामुळे त्या त्या वक्त्यांबरोबर आमच्या चर्चाही तितक्याच रंगतदार झाल्या. आम्हाला आमच्या प्रश्नांना योग्य अशी उत्तरे मिळू शकली.
या संपूर्ण सत्रात विषयांचा थोडक्यात आवाका पुढीलप्रमाणे होता- 1) पालकत्व म्हणजे काय? योग्य आणि अयोग्य पालकत्व कोणते? 2) पालकांची जबाबदारी, 3) पालक-पाल्य संबंध आणि संवाद, 4) पाल्याच्या पालकांकडून अपेक्षा आणि त्यांची परिपूर्ती.
आम्हा पालकांच्या, आमच्या पाल्यांच्या बाबतीत सर्वसाधारण तक्रारी असतात त्या बहुदा अशा 1) शिस्त, 2) वर्तन, 3) अभ्यास, 4) आहार याबाबतीत. चर्चांद्वारे एक गोष्ट ठामपणे लक्षात आली की, या तक्रारींचे निवारण करावयाचे असेल तर, आम्ही पालक जर पाल्याच्या भूमिकेतून त्या त्या समस्येला सामोरे गेलो तर, उत्तर शोधण्यास अनेक पर्याय उपलब्ध होऊ शकतात आणि कोणताही ताणतणाव निर्माण होऊ शकत नाही आणि काय ही विद्यार्थीदशा आणि पालकदशा असा प्रश्न उभा राहात नाही.
मूल वाढवताना त्याच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक गरजांचा विचार जर पालक म्हणून आम्ही नीट केला नाही तर, अनेक चुका आम्हां पालकांच्या हातून नकळतपणे घडत असतात आणि मग प्रश्न सुटण्याऐवजी तो वाढण्याकडेच त्याची वाटचाल सुरू होते. उदाहरणार्थ, आम्ही आमच्या पाल्यांना किती सहजपणे मूर्ख, बावळट, बेअक्कल, आळशी इत्यादी विशेषणे बहाल करतो. इतकेच नव्हे तर, या विशेषणांचा संबंध दुसऱ्या कोणत्यातरी व्यक्तीशी जोडून मोकळे होतो. म्हणजे, बापासारखा हट्टी, आईसारखी मूर्ख, काकासारखा आळशी इत्यादी इत्यादी… आम्ही मुलांना बहाल करतो. परंतु हे चुकीचे ठरते, हे या चर्चांद्वारेच आम्हाला जाणवले आणि समजले.
पालकत्व पेलताना मला जसे एक व्यक्तिमत्व घडवायचे आहे, तसेच मला माझे व्यक्तिमत्वही जपायचे आहे, मी एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, याचे भानही आम्हाला ठेवायचे आहे, याची फार चांगली जाणीव आणि भान या शाळेमुळेच आम्हाला समजले. साहजिक, आमच्या त्यागाचं भांडवल आम्ही करणार नाही आणि त्याचं ओझं आमच्या मुलांवर कधीच लादणार नाही आणि मुलांकडून परतफेडीची अपेक्षाही केली जाणार नाही, याचीही शहाणी जाणीव आम्हाला झाली.
ही शाळा संपवताना एक प्रश्न मनात निश्चितपणे डोकावत होता, मला या पालक शाळेने काय दिलं?
या शाळेत दाखल होण्यापूर्वी ज्या उलट सुलट प्रतिक्रिया ऐकाव्या लागल्या, त्यांचीही दखल घेणे आवश्यक वाटतं म्हणून सांगते-
- उगाचच काहीतरी फॅड आहे झालं!
- कोणीही उठावं आणि काहीही उद्योग चालू करावा- पैसे कमवायला एक उत्कृष्ट साधन.
- आम्हाला आमची मुलं वाढवताना नाही जरूर वाटली या असल्या शाळेची, म्हणून आमची मुलं बिघडली का?
- मूल वाढवायचं कसं हे शिकावं लागतं का? ते आपोआप घडत असतं. मूर्खांचा बाजार आहे झालं!
- एवढं करून यांची मुलं काय दिवे लावणार आहेत देव जाणे!
या सर्व प्रतिक्रिया लक्षात घेऊन सुद्धा ही शाळा संपवताना मला अजिबात पश्चात्ताप झालेला नाही किंवा उगाचच माझा पैसा, श्रम, वेळ या गोष्टी वाया घालवल्या, असंही मला अजिबात वाटलं नाही. उलट, मला त्यावेळी खूप धीर आला. माझ्या पालकत्वाला एक भक्कम वैचारिक बैठक मिळाली. पालकत्व ही तारेवरची कसरत न वाटता तो एक आनंददायी अनुभव वाटू लागला. आमचं पालकत्व अत्यंत डोळसपणे आम्ही स्वीकारणार होतो आणि आदर्श पालकत्वाची कल्पना दूर जाणाऱ्या क्षितिजासारखी असली तरी, क्षितीज गाठण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करणार… मग भलेही ते क्षितीज पुढे पुढे सरकत राहो… कारण, या क्षितिजाच्या पल्याड जेव्हा आम्ही गेलेले असू तेव्हा आजची आमची पाल्ये ‘उगवतीला’ पालक म्हणून उभी राहणार आहेत, हीच भावना होती.
हेही वाचा – पाण्याशी आपले अतूट नाते!
ही शाळा संपवताना आम्हा पालकांना कोणत्याही परीक्षेला सामोरं जावं लागलं नाही. त्यामुळे आज काय ‘निक्काल’ लागणार देव जाणे, हा ताण मनावर अजिबात नव्हता.
‘पालक शाळा’ हा एक अत्यंत स्तुत्य उपक्रम असून, आमचे अत्यंत धकाधकीचे, गतिमान आणि स्पर्धात्मक जीवनमान लक्षात घेता, तो आवश्यकही आहे असंच सांगावसं वाटतं.
सांगायला आनंद वाटतो, पालक शाळेच्या समारोपाच्या दिवशी माझ्या या लेखाचे वाचन उपरोक्त संस्थेत करण्यात आले.
धन्यवाद!


