भाग – 17
“आराध्या, तुझं येणं काही योगायोग नाही. तुला इथे आणणं हा ‘पूर्वनियोजित प्लॅन’ आहे… शर्वाय! त्याच्यापासून तुला दूर ठेवायचंय… कारण तू जर त्याच्या जवळ आलीस, तर माझं हे सगळं फसणार आहे…” माधव पुटपुटतो,
दुसऱ्या दिवशी सकाळी… आनंदी आणि सुमित्रा आजी आराध्यासोबत देवपुजेला बसल्या होत्या. घरात शांतता होती… तेवढ्यात माधव मागून येतो, अगदी सौम्य आवाजात…
माधव : “आराध्या, तुला इथे चांगलं वाटतंय ना?”
आराध्या (हसून) : “होSS खूप.”
तो तिच्याकडे अशा नजरेनं पाहतो, जणू त्या डोळ्यांत प्रेम नाही, पण काहीतरी वेगळेच भाव आहेत.
आता आराध्या काही गोष्टी ओळखू लागली होती… वाड्याच्या त्या जुन्या भिंती, गुप्त दालनं… आणि शर्वायचं येणं! पण हे सगळं घडण्याआधी — कोणीतरी तिच्या पायाखालची जमीन हलवणार होतं….
त्यादिवशी दुपारी वाड्यात एक विचित्र गडबड सुरू झाली होती. घरातल्या नोकरचाकरांमध्ये कुजबुज झाली… काहीतरी घडलं होतं, पण कोणी स्पष्ट बोलत नव्हतं… आराध्या पुस्तक वाचत बाजूला बसली होती. इतक्यात आनंदी घाईघाईने येऊन तिला म्हणाली,
“आराध्या, तू तुझ्या खोलीत जा. बाहेर फिरू नकोस. कुणीही बोलावलं तरी बाहेर यायचं नाही.”
आराध्याला काहीच कळलं नाही. वातावरणात एक अस्वस्थता पसरली होती. ती शांतपणे आपल्या खोलीत गेली. खिडकीतून तिने पाहिलं, वाड्याच्या मागच्या अंगणात काही माणसं होती… मोठ्या मोठ्या पेट्या आत नेल्या जात होत्या, ज्या झाकलेल्या होत्या.
तिथे माधवही होता… काहीतरी सूचना देत उभा होता.
आराध्याच्या लक्षात आलं की, ही सामान्य घटना नाही… “हे काय चाललंय?” — तिच्या मनात प्रश्नांचे वादळ उठलं. तेवढ्यात दरवाज्याबाहेर एक सावली येऊन थांबली… हलकीशी खटखट…
“आराध्या, दार उघड.” माधवचा आवाज.
ती गोंधळली. आजी आणि आनंदीने आधीच ताकीद दिली होती. पण आता दरवाजा जोरात ठोठावला जात होता…
“आराध्या, मला तुला काहीतरी महत्त्वाचं दाखवायचंय. लगेच ये.”
आराध्याचं ह्रदय धडधडू लागलं. आता तिच्यासमोर दोन पर्याय होते —दार उघडणं किंवा आत गुपचूप बसून राहणं! तेवढ्यात, खिडकीत काहीतरी चमकलं… एक लहानसं कागदाचं पुडकं. बाहेर झाडाच्या फांदीवर कोणीतरी बांधून ठेवलं होतं.
आराध्याने खिडकी उघडून तो कागद उचलला आणि वाचला… त्यावर फक्त तीन शब्द लिहिले होत – “विश्वास ठेवू नकोस.”
आराध्याचा चेहरा पांढरा पडला… कुणी तरी तिला सावध करत होतं… आता प्रश्न होता — कुणावर विश्वास करायचा? आणि कुणावर नाही?
आराध्याचा जीव घाबरून गेला होता… दारावर अजूनही मधून मधून थाप पडतच होती, पण आता माधव काही बोलत नव्हता. ती दाराजवळ दबकत गेली आणि कान लावून ऐकू लागली.
…शांतता.
हळूहळू, ती मागे वळली. खिडकीजवळ आली आणि पलीकडे बघू लागली. सर्व वाडा एखाद्या रहस्यमय जाळ्यात गुंतल्यासारखा भासत होता. तेवढ्यात तिच्या लक्षात आलं — खिडकीच्या खाली एक अरुंद चोरमार्ग आहे! वयस्कर माणसांसाठी नाही, पण तिच्यासारख्या बारीक मुलगी सहज मावेल असा! थोड्याशा धडधडत्या मनाने तिने तो चोरमार्ग निवडला.
हेही वाचा – आराध्याने सुमित्रा आजींच्या घरी प्रवेश केला अन्…
हळूहळू ती बाहेर आली… मागच्या अंगणाच्या दिशेने जाऊ लागली. तिथे अजूनही मोठ्या पेट्या ठेवलेल्या होत्या. एका कोपऱ्यात, माधव दोन अनोळखी माणसांबरोबर काहीतरी कुजबुजत होता… आराध्या सावधपणे झाडांआड लपून ऐकू लागली…
“गुरुजींना अजून काही दिवसांमध्ये सगळं सेट करायचं आहे,” माधव म्हणत होता… “शर्वाय आला तरी काही फरक नाही पडणार. आराध्या या मुलीचं काम महत्त्वाचं आहे.”
आराध्याचं रक्त गोठून गेलं.
“मुलीचं काम…?
माधव म्हणाला, “तिचं भविष्य, तिचं आयुष्य — सगळं आपल्या हातात येईल. तिचा उपयोग करायचा आहे मोठ्या योजनेसाठी…”
आराध्या हादरली. तिच्या भोवतीचं सगळं विश्व एकदम कोसळल्यासारखं वाटलं. तिने सावधपणे मागे वळायला सुरुवात केली… पण पायाखालील माती सरकली आणि “खस्स” असा आवाज झाला…
माधव आणि त्याचे साथीदार दचकून मागे वळले.
“कोणी तरी आहे!” माधव जोरात ओरडला.
आता आराध्याला पळायचं होतं! ती वेगाने झाडांआडून धावत सुटली… मागून पावलांचे आवाज येऊ लागले, कोणी तरी तिच्या मागे लागलं होतं… आराध्या जीवाच्या आकांताने धावत होती. वाऱ्याने झाडांची पाने जोरात सळसळत होती. मागे धावणाऱ्या पावलांचा आवाज तिच्या प्रत्येक श्वास जड करत होता… सामोर एका जुनाट वाड्याचा पडका भाग दिसला, ती तेथून आत घुसली… आत अंधार होता, धुळीचा वास आणि जुनाट अस्ताव्यस्त पडलेलं सामान…
आराध्या एका मोडकळीस आलेल्या कपाटाच्या मागे दडली. ती श्वास रोखून बसली होती.
बाहेर माधवचे शब्द घुमले, “ती सापडायलाच पाहिजे. नाही तर सगळं बिघडेल!”
त्याचे साथीदार वेगवेगळ्या दिशेने पसरले.
त्यांच्या टॉर्चच्या उजेडाचा झोत पाहून आराध्याने डोळे मिटले. तेव्हा तिच्या हाताला कपाटाच्या आत काहीतरी गार गुळगुळीत वस्तू लागली. हळूच हात फिरवला… कसला तरी जुना बॉक्स होता. तो उघडल्यावर आत एक छोटा कोड्यातला नकाशा आणि काही श्लोक लिहिलेले कागद सापडले!
ती अचंबित झाली… “हे काय आहे? आणि याचा संबंध माझ्याशी का जोडला जातोय?”
तिच्या मनात प्रश्नांच वादळ उठलं.
बाहेरची पावलं जवळ येताना ऐकू आली… आराध्याने चटकन त्या कागदासकट ती छोटा बॉक्स स्वतःजवळ लपवून ठेवला.
“इथे कोणी नाही वाटतं,” एकाचा आवाज आला.
“चला, दुसरीकडे पाहू!”
पावलं दूर गेली.
आराध्या थोडीशी मोकळी झाली. तिने ठरवलं… काहीही झालं तरी हे रहस्य उलगडायचं. कपाटाच्या आडून सावधगिरीने बाहेर येत, आराध्याने तो छोटा बॉक्स घट्ट आपल्या हातात पकडला. पावलांचा आवाज आता दूर गेला होता, पण भीती अजूनही तिच्या मनात खोलवर रुंजी घालत होती. त्या पडलेल्या वाड्यात एक अरुंद आणि जेमतेम माणूस जाऊ शकेल असा जुना गुप्त मार्ग तिला दिसला. ती एक क्षण थांबली… पण मग कोणीतरी हळूवार, मृदू स्पर्शाने तिच्या पाठीवर हात ठेवावा तसं काहीसं जाणवलं. जणू कोणी तरी अदृश्य शक्ती तिला सांगत होती, “जा, भीती बाळगू नकोस.”
ती थोडी थरथरत, पण विश्वासाने त्या अरुंद मार्गात शिरली. वाऱ्याची एक मंद, थंडगार झुळूक तिच्या चेहऱ्यावरून गेली. त्या झुळुकीत एक आल्हाददायक सुगंध मिसळला होता… जणू चंदनाचा किंवा पवित्र धूपाचा… आराध्याला जाणवलं, कोणीतरी तिच्या अवतीभवती आहे… पण ते भयकारी नव्हतं…ते आश्वासक होतं…संरक्षण देणारं!
अंधाऱ्या गल्लीतून ती जशी पुढे सरकत गेली, तसा मार्ग थोडा उजळला… छोट्या फुटक्या दगडी जिन्यांतून वर चढत चढत ती एका ओळखीच्या खिडकी समोर पोहोचली….. ती तिच्याच खोलीची खिडकी होती! क्षणभर ती थक्क झाली… “हे कसं शक्य आहे?”
आराध्या घाईघाईने त्या अरूंद भागातून आत शिरली. पाठीमागे वळून पाहिलं, तर जिथून आली होती, तो गुप्त मार्ग गायब झाला होता… जणू काही तो अस्तित्वातच नव्हता.
बॉक्स अजूनही तिने हातात घट्ट पकडून ठेवला होता. तिचं हृदय जोरात धडधडत होतं — पण त्यात आता भीतीपेक्षा एक नवं धैर्य मिसळलं होतं. तिने वळून खिडकीपाशी येऊन आकाशाकडे पाहिलं… चंद्र हलकासा ढगाआडून डोकावत होता आणि त्या चंद्रप्रकाशात तिला जाणवलं, कोणी तरी तिला नजरेआडून आशीर्वाद देतंय… तिच्या मार्गावर प्रेमाने पहारा देतंय.
दुसऱ्या दिवशी सकाळीच सुमित्रा आजी आराध्याला आपल्यासोबत घेऊन गेल्या. घराच्या मागच्या अंगणात, जिथे एक जुना तरीही आकर्षक असा मंडप होता, तिथे गुरुजी दादा ध्यानस्थ बसले होते. त्यांचा तेजस्वी, गंभीर चेहरा पाहून आराध्याचं मन आपोआपच शांत झालं. सुमित्रा आजीने गुरुजींच्या कानाशी काहीसं कुजबुजत सांगितलं. गुरुजींनी डोळे उघडले. त्यांच्या नजरेत अपार प्रेम आणि विलक्षण गंभीरता होती…
“ये आराध्या…” ते शांतपणे म्हणाले.
आराध्या थोडीशी गोंधळली तरी त्यांच्या आवाजातला सौम्य हुकूम ऐकून पुढे आली. तिने अलगद आपल्या हातात ला बॉक्स पुढे धरला.
गुरुजींनी तो पाहिला… पण तो हातात घेण्याऐवजी त्यांनी डोकं हलवलं.
“हे तुझ्याचकडे राहू दे,” त्यांनी ठामपणे सांगितलं.
हेही वाचा – आराध्याला घरी आणण्याचा सुमित्रा आजीचा पूर्वनियोजित प्लॅन!
“हा बॉक्स… साधा नाही. यामध्ये खूप मोठं गूढ दडलंय आणि त्या गूढाची चावी… फक्त एकाच व्यक्तीकडे जाऊ शकते.”
आराध्या घाबरत म्हणाली, “कोण आहे ती व्यक्ती, दादा?”
गुरुजींनी गूढ हसून सांगितलं,
“तो आहे शर्वाय! या घराण्याचा वारसदार.”
आराध्याच्या डोळ्यात उत्सुकता चमकली.
गुरुजी पुढे म्हणाले, “तू कुणालाही या बॉक्सबद्दल काहीही सांगायचं नाही. जरी विश्वासू वाटले तरी नाही. काहीही झालं, कोणी कितीही विचारलं, भीती घातली तरी… शांत राहायचं. वेळ आली की, मी स्वतः तुला सांगेन — कधी, कसे, आणि कुठे हे शर्वायच्या हाती द्यायचं.”
आराध्या गप्प झाली. गुरुजींच्या चेहऱ्यावरचा गहन गंभीर भाव तिला समजावून सांगत होतं की, हा खेळ फार मोठा आहे!
गुरुजींनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि शांत आवाजात आशीर्वाद दिला…
“देव तुझं रक्षण करो. तुला धैर्य आणि चातुर्य देवो.”
आराध्याने डोळे मिटले. त्या क्षणी तिला जाणवलं — आता तिचं आयुष्य आधीपेक्षा वेगळं वळण घेणार आहे.
क्रमशः


