पाठवणी हा शब्द जरी ऐकला तरी किती गोष्टी डोळ्यांसमोर येतात. प्रत्येक स्त्रीवर्गाबरोबरच पुरुषवर्गाचा सुद्धा हळवा कोपरा असतो हा शब्द. बायकोच्या पाठवणीच्या वेळेस तिच्या माहेरच्यांना काय वाटले असेल, हे वडील म्हणून मुलीच्या पाठवणीच्या वेळेस जाणवते. एकूणच काय तर, नको असलेला पण हवाहवासा असा हा शब्द!
एक छोटा जीव जन्माला येतो. घरातील सगळे जण त्या छोट्या जीवाचे कोडकौतुक करण्यात दंग होतात. हळूहळू हट्ट करून, रडून, कट्टी-बट्टी करून, दिवस-महिने-वर्ष उलटतात. सगळ्यांना एकमेकांची सवय लागलेली असते. अशा या 20-22 वर्षांच्या (आता 30 किंवा त्यापेक्षा जास्त पण) सहवासानंतर त्या छोट्या जीवाला म्हणजेच मुलीला दुसऱ्याच्या हातात सोपवायचे. किती कठीण आहे ना हे!
त्यानंतर ती मुलगी परत कधी येणार, याची वाट बघायची. तिच्या आठवणींना रोजच्या जगण्याचा भाग बनवायचे. ती घरी येणार ते 4-8 दिवस काय करू, काय नको, या विचारातच निघून जाणार… आणि परत येणार तो पाठवणीचा दिवस! त्या दिवसाची तयारी पण करायची असते. म्हणजे रिकाम्या हाताने कशी पाठवणी करायची म्हणून काही गोडधोड आवर्जून केले जाते. (आता सगळे विकत पण मिळते, त्यामुळे वेळ वाचतो. पण त्यामधील गोडी ही थोडी वेगळी असते. असो, तो विषय वेगळा…)
हेही वाचा – मनाचे ऐश्वर्य संस्कार, मनाचे सौन्दर्य संस्कार
मनामध्ये हुरहूर असते, गोंधळ असतो आणि तो लपवण्यासाठी घरामध्ये पदार्थ करताना डोळ्यांतून भावनांना वाट मोकळी करून दिली जाते. फोडणीमुळे, कांदा चिरत असल्यामुळे डोळ्यात पाणी आले, अशी कारणे पण सांगितली जातात. पाठवणी होते. आई-वडील पुन्हा आठवणींच्या जगात रमतात तर, ती मुलगी आपल्या घरच्या-कामाच्या व्यापात. त्या मुलीला पण आठवण येतच असते. पण पुढच्या जबाबदा-यांमुळे त्यामध्ये अडकून रहाणे जमत नाही. म्हणजे काय तर, दोन्हीकडे हा हळवा भाग असतोच.
आता लग्न झाल्यावरच या सगळ्या गोष्टी घडतात, असे नाही आता, तर शिक्षणामुळे या गोष्टींना लवकरच सामोरे जावे लागते. असं म्हणतात की, मुली या वडिलांच्या जास्त जवळ असतात आणि मुलं आईच्या. पण शेवटी पाठवणीला मुलगा-मुलगी हा फरक कळत नाही ना!
मुलगी असो नाही तर, मुलगा… आता पाठवणी दोघांचीही करावी लागते. ते त्यांच्या भविष्याच्या तयारीसाठी लांब जात आहेत, याचा आनंद तर असतोच, पण त्याबरोबर काळजीपण असतेच. आशा, विश्वास पण असतो या पाठवणीमधे. यानंतर किती तरी चांगल्या गोष्टी घडणार असतात. त्यामुळेच या गोष्टींसाठी पाठवणीला नेहमीच तयार रहावे लागते.
हेही वाचा – अलंकार… भाषेच्या सौंदर्यात भर टाकणारे
हे लिहिताना असेच एक गाणे मनात रेंगाळले…
दाटून कंठ येतो, दाटून कंठ येतो
ओठांत येई गाणे
जा आपुल्या घरी तू, जा आपुल्या घरी तू
जा लाडके सुखाने
दाटून कंठ येतो…
हे गाणे मुलीच्या लग्नानंतर वडिलांनी म्हटलेले आपण बघितले आहे. इथे मुलं (मुद्दामच मुलं असे दोघांसाठी म्हटले आहे) शिक्षणासाठी जाताना पण असेच वाटते ना…
हातात बाळपोथी, ओठांत बाळभाषा
रमलो तुझ्यासवे मी गिरवीत श्री गणेशा
वळवून अक्षरांना केले तुला शहाणे
जातो सुखावुनी मी, या गोड आठवाने…
यासगळ्या गोष्टी मुलगा असो वा मुलगी दोघांसाठी पण तेवढ्याच भावनेने केलेल्या असतात. हो ना?
बोलात बोबडीच्या संगीत जागविले
लय ताल सूर लेणे, सहजीच लेवविले
एकेक सूर यावा, न्हाऊन अमृताने
अवघ्याच जीवनाचे, व्हावे सुरेलगाणे
कुठे मुलगा-मुलगी असा फरकच केला नाही, या सगळ्या गोष्टी करताना..
घेऊ कसा निरोप, तुटतात आत धागे
हा देह दूर जाता, मन राहणार मागे
(धन आत्मजा दुजाचे, ज्याचे तयास देणे
परक्या परी आता मी, येथे फिरुनी येणे)
खरचं प्रत्येक वेळेस मुलं येणार, 4-8 दिवस राहणार आणि परत आपल्या भविष्याकडे झेप घेणार, असे होतंच राहणार. प्रत्येक वेळेस त्यांचे पाऊल अजून पुढे पडलेले आपल्याला दिसणार. त्यांच्यातील वाढलेला आत्मविश्वास आपल्याला दिसणार… आणि मग खरंच या पाठवणीचा सुद्धा अभिमान वाटायला लागणार. या पाठवणीमुळेच त्यांच्या पंखात आलेले बळ बघून आपण सुखावून जाणार.
अशी ही सुखद पाठवणी.
मोबाइल – 9730020494


