Sunday, June 15, 2025
Homeअवांतरभारतातील देवस्थानांचे अर्थकारण…

भारतातील देवस्थानांचे अर्थकारण…

जी. भालचंद्र

मागील काही दिवसांमध्ये माझ्या वाचनात दोन बातम्या आल्या.

पहिली बातमी – एका सुप्रसिद्ध देवळातील पुजाऱ्याच्या मुलीचे लग्न पार पडले. त्या लग्नात वधूने अंगावरती घातलेल्या सोन्याच्या दागिन्यांचे वजन इतके होते की, त्या वधूस लग्नाचे विधी पार पडताना चालणेसुद्धा अशक्य झाले होते.

दुसरी बातमी – एका हिंदू देवस्थानात जनसंपर्क अधिकारी म्हणून एका परधर्मीय व्यक्तीची निवड करण्यात आली होती. पाच वर्षे नोकरी केल्यानंतर त्या व्यक्तीने ती नोकरी सोडली. नोकरी सोडल्यानंतर काही दक्ष नागरिकांनी त्या व्यक्तीविरुद्ध भ्रष्टाचाराची तक्रार केली. चौकशीमध्ये त्या व्यक्तीच्या घरी इतके सोन्याचे दागिने सापडले की. कुठल्यातरी शहरात सोन्याच्या दागिन्यांचे दुकानही उघडता आले असते. या दोन बातम्या प्रातिनिधिक स्वरूपात आपल्यासमोर मांडल्या आहेत.

भारतातील मंदिरे हे धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाची आहेत. या मंदिरांच्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि कला यांचे प्रतिबिंब तर दिसतेच आणि त्यांचा गौरवही असतो.

हेही वाचा – व्यवहार तर एक पैशाचाही नाही, तरी बँकेचा ससेमिरा

भारतीय राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणच्या रिपोर्टनुसार भारताच्या एकूण जीडीपीमध्ये धार्मिक यात्रांची हिस्सेदारी 2.32 टक्के आहे आणि भारतातील एकंदर सर्व मंदिरांचे अर्थकारण सहा लाख कोटी रुपये आहे. या सर्वेक्षणप्रमाणे असेही समोर आले आहे की, 55 टक्के हिंदू धार्मिक यात्रा करीत असताना आपल्या यात्रेतील 50 टक्के हिस्सा हा मंदिरांवर खर्च करतात.

तुलनात्मक अभ्यास केला असता असे लक्षात आले आहे की, प्रत्येक व्यक्ती धार्मिक यात्रेवरती सरासरी 2717 रुपये, सामाजिक यात्रेवर सरासरी 1086 रुपये आणि शैक्षणिक यात्रेवरती 2286 रुपये दर दिवशी खर्च करते. भारतात धार्मिक यात्रेवरती दर दिवशी अंदाजे 1645 कोटी रुपये खर्च होतात, याचाच अर्थ, वर्षाला खर्च सहा लाख कोटी रुपये आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या मंदिरांना मिळालेल्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स नाही.

सर्वोच्च न्यायालयाने एका जनहितयाचिकेवरील सुनावणीमध्ये हे निरीक्षण नोंदवले होते की, लोकांनी मंदिराला दिलेल्या दानातील पैसा परत लोकांकडेच युनिव्हर्सिटी, कॉलेजेस, हॉस्पिटल, शाळा तसेच इतर सामाजिक संस्था स्थापन करण्याच्या स्वरूपात खर्च व्हावा.

हेही वाचा – केवायसीच्या घोळात लॉकर सील

पण वर दिलेल्या दोन प्रातिनिधिक बातम्यांवरून हेच दिसून येते की, अनेक मंदिरांमध्ये दान म्हणून मिळालेला पैशांचा तसेच इतर दागदागिन्यांचा दुरुपयोग होत आहे आणि याला आळा कोण घालणार? हा एक गहन प्रश्न आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!