भाग – 12
सुमित्रा आजी आराध्याला आपल्या सोबत नेत होती. आराध्या थोडं आश्चर्यचकित झाली. तिच्या आयुष्यात एवढ्या सहजतेनं कोणीतरी तिचा हात धरून नवं दार उघडून देईल, असं तिला वाटलंच नव्हतं. तिच्या मनातलं गोंधळ, भीती आणि आतापर्यंतचा तिरस्कार… काही क्षणांसाठी तरी मागं सरकला होता. आता तिचं आयुष्य एका नव्या दिशेकडे वळत होतं — गुरूजींच्या मार्गदर्शनाखाली!
आराध्या तिच्या मनातला गोंधळ लपवत आजीकडे परत जाते, पण तिचं लक्ष अजूनही त्या जाणिवेवरच फिरत होतं. सुमित्रा आजी तिला आतल्या एका विस्तृत, शांत खोलीत घेऊन जातात. खोलीत भिंतींवर काही सुंदर चित्रं लावलेली असतात — काही ध्यानस्थ योगी, काही मंदिरांचे दृश्य… आणि एक अत्यंत वेधक चित्र — एका तरुण साधकाचं…! डोळ्यांत विलक्षण तेज आणि कपाळावर त्रिपुंड…
ते पाहताच आराध्या थोडी स्तब्ध होते… “आज्जी… हे कोण?” ती विचारते.
सुमित्रा आजीने मंद स्मित केलं, “हेच तर दादा… आमचे गुरू!”
“हेच दादा?” आराध्या नजरेनं चित्रात बुडते… “तरुणपणी किती वेगळे दिसत होते…?!”
आजी तिला त्याच्या साधक अवस्थेतल्या कथा सांगू लागल्या — त्यांचं गूढ आयुष्य, त्यांचे अनुभव आणि त्यांची अलौकिक दृष्टी…
“कधी वाटायचं, ते आपल्यातले नाहीतच… काहीतरी वेगळंच आहे त्यांच्यात. त्यांचं बोलणं ऐकताना वाटायचं, आपल्यात खोल कुठे तरी प्रकाश पेटतोय…”
आराध्या तन्मयतेने ऐकत होती आणि त्याच क्षणी तिला पुन्हा जाणवतं — त्या खोलीतही कुणी तरी आहे! काही तरी अदृश्य, पण सतत तिच्या विचारात खोल डोकावणाऱ्या नजरेसारखं…
अचानक खोलीच्या दुसऱ्या बाजूचं दार कर्कश्श आवाज करत उघडलं… आणि एक शांत सावली आत शिरली… सुमित्रा आजी एक क्षण चमकून पाहू लागल्या अन् ताठ उभ्या राहिल्या…
” अरे माधवा तू ? तू कधी आलास?”
आराध्याचं हृदय जोर जोरात धडकू लागतं… एक वेगळाच प्रसंग, एक वेगळाच अध्याय सुरू होतोय, असंच काहीसं जाणवत होतं. ती पहिल्यांदाच त्या व्यक्तीला भेटत होती — जिच्या शब्दाला घरात मान आहे. सुमित्रा आजीच्या अंगणात पाऊल टाकताच, तिथल्या आकर्षक टाईल्सवरून थेट दाराशी आलेली एक मजबूत शरीरयष्टी असलेली, जरा सावकाश दबकत चालणारी मध्यम उंची असणारी व्यक्ती… ती आराध्याकडे रोखून पाहात उभी राहिली. त्याच्या डोळ्यांत एक विचित्र चमक होती, जणू नुसतं पाहात नव्हती तर, आराध्याला आरपार वाचत होती!
“काय रे, एकटाच आलास की काय? उषा नाही आली सोबत?” सुमित्रा आजी थोड्या चकित स्वरात विचारत पुढे सरसावल्या.
तो, माधव, हळूवार हसला. पण ते हास्य जरा अनाहूत होतं — काहीसं बनावट. “ती येणार होती, पण अचानक काही काम निघालं. मी म्हटलं, काकीला भेटायला एकटंच जावं…”
पण त्याचं लक्ष अजूनही आराध्याच्या चेहऱ्यावरच होतं. आराध्या थोडीशी अस्वस्थ झाली. तिला जाणवत होतं — ही नजर नुसती उत्सुकतेची नाही, तर काहीतरी खोल, अस्पष्ट हेतूने भरलेली आहे.
हेही वाचा – आराध्याच्या गुणांची कदर कोणीतरी केली होती!
“ही कोण नवी पाहुणी?” अखेर माधव बोललाच, पण त्याचा स्वर थोडा खोल आणि थेट आराध्याच्या आत उतरावा असा होता.
“ही? ही आराध्या… माझ्या मैत्रिणीची नात. थोडे दिवस राहायला आलीय. अगदी गोड आणि शिस्तबद्ध मुलगी आहे,” आजी कौतुकानं म्हणाल्या.
“आराध्या…” माधवने नाव हळूच उच्चारलं. त्या उच्चारलेल्या नावाच्या शेवटच्या अक्षरातही काहीसं गूढ दडलेलं होतं. आराध्या मागे सरकली, पण त्याच क्षणी सुमित्रा आजीनं तिचा हात पकडला — आपुलकीनं, आणि हळुवार प्रेमाने.
“चला, आत जाऊ. थोडा चहा घेऊया,” आजी म्हणाल्या. पण आराध्याच्या मनात आता काहीतरी हलकासा डेंजर अलार्म वाजायला लागला होता…
दुपारी जेवणानंतर सगळे थोडं विसावले होते. सुमित्रा आजी आणि आनंदी स्वयंपाकघरात काही तयारी करत होत्या. आराध्या त्या प्रशस्त हॉलमधील जुन्या पुस्तकांच्या कपाटाकडे आकर्षित झाली होती. तिने हलक्या हातांनी एक जुनं पुस्तक उचललं आणि त्यातली पानं चाळू लागली. तेवढ्यात माधव तिथे आला…
“तुला पुस्तकांत रस आहे वाटतं?” त्याने विचारलं, थोड्या गूढ आवाजात. आराध्या किंचित चमकली, पण सौम्य हसत म्हणाली, “हो… ही पुस्तकं फार वेगळी वाटतात. खूप जुनं ज्ञान भरलेलं आहे, असं वाटतंय.”
माधव हसला, पण त्याचं हास्य उबदार वाटण्यापेक्षा थोडं संशयास्पद होतं.
“हे पुस्तक सहज वाचायला नको… काही ज्ञान हे योग्य वेळेला मिळालं पाहिजे, आणि योग्य व्यक्तीला,” तो म्हणाला.
“म्हणजे?” आराध्या ने विचारलं, तिच्या कपाळावर आठ्या पडल्या.
“अजून तुला वेळ आहे… तू इथे आलीयस, म्हणजे काही कारणानेच. काही गोष्टी तुला स्वतः शोधाव्या लागतील,” असं म्हणून तो वळून निघून गेला.
आराध्या मात्र त्या क्षणानंतर गप्प झाली. त्याच्या बोलण्यात काहीतरी गूढ होतं, आणि ते काहीतरी तिच्या आयुष्याला स्पर्शून जाणारं होतं – हे ती नकळत ओळखून गेली होती.
त्या रात्री आराध्या झोपली खरी… पण मन मात्र अस्वस्थ होतं. माधवच्या नजरेतून झिरपत आलेली अस्वस्थता तिच्या विचारांवर गडद सावली टाकून गेली होती. रात्रीच्या गूढ शांततेत तिला एक स्वप्न पडलं… ती एका घनदाट जंगलात उभी होती. पाठीवर ओझं, कपाळावर घाम… समोर एक संथ चालणारी व्यक्ती —पांढऱ्या झब्ब्यात, केस मोकळे, पाठीवर एक पट्टा अडकवलेला. तो सतत चालतोय, पण मागं वळून पाहात नाही. आराध्या त्याच्या मागं चालतेय, पण तो व्यक्ती थांबतच नाही…
आणि मग अचानक, समोरून एक अंधारात लपलेली आकृती दिसते — तीच माधवची छाया. रोखलेली नजर… नजरेत काहीतरी विचित्र रसायन. त्याच्या हातात एक साखळी आहे, जी हळूहळू जमिनीवर ओढली जाते. आणि तो गुरुजींच्या त्या छायाकृतीकडे पाहून हसतो… गूढ, थंड हसू…
“ही मुलगी… योग्य वेळ आलीय…” तो कुजबुजतो.
त्या क्षणी, गुरुजी मागे वळतात. त्यांचा चेहरा अस्पष्ट, पण डोळ्यांत केवळ शांततेचा झरा. ते हात उंचावून आराध्याकडे येतात, आणि म्हणतात — “तू भीतेस का? हा माधव तुझ्या वाटेचा अडथळा ठरेल, पण तूच त्यातून मार्ग काढू शकतेस.”
स्वप्नातच आराध्या घाबरून उठली. घामाघूम झाली होती… छाती धपापत होती. खिडकीजवळ जाऊन तिनं बाहेर पाहिलं… आणि तिच्या लक्षात आलं की, मागच्या अंगणात कोणी तरी तिला पाहून लपलं.
दुसऱ्या दिवशी पहाटे… आराध्या नुकतीच तयार होऊन बाहेरच्या व्हरांड्यात आली होती. हवेत गारवा होता, पण आज काहीतरी विचित्र होतं. हवेत गारवा होता खरा… पण शांतता नव्हती. जणू ती शांतता नसून वाट पाहणाऱ्या संकटाची श्वास रोखून थांबलेली सावली होती!
सुमित्रा आजींच्या खोलीतून एक मंद प्रकाश येत होता. आराध्या दाराशी पोहोचणार इतक्यात तिला उजेडात एक सावली दिसते… क्षणभर वाटतं आजींचीच, पण दुसऱ्याच क्षणाला ती सावली नुसती हळूच हवेत विरते… आराध्या दचकते, पण पाय आपोआप पुढे सरकतात. आत गेल्यावर सुमित्रा आजी तिला एक छोटंसं ताबीज देतात – काळं, गोलसर, चांदीच्या साखळीत अडकवलेलं.
“हे फक्त त्या वेळेला उघड, जेव्हा आत्मा आणि सावली यांचं भान सुद्धा गोंधळून जाईल.”
आजीनं सांगितलेले शब्द आराध्याच्या मनात ठसले.
हेही वाचा – आराध्याच्या घरात एकीकडे अध्यात्म तर दुसरीकडे कटकारस्थान…
गुरुजींच्या दर्शनासाठी ‘ध्यानगृहात’ गेलेल्या आराध्याला एका भिंतीवर कोरलेली एक रेखाचित्र दिसलं. ते रेखाचित्र दिसायला साधं वाटत होतं — एक मोठं वृक्ष, त्याच्या खाली एक बालक उभा आहे आणि झाडाच्या सावलीत एक पुरुष, त्याच्या हातात साखळी. बालक त्याच्या पायाशी बसलेलं… पण एक गोष्ट विचित्र होती — त्या पुरुषाच्या चेहऱ्यावरच्या रेषा स्पष्ट नव्हत्या आणि त्या बालकाच्या डोळ्यात… तीच राखाडी झाक जी लोक आराध्याबद्दल बोलत आले होते!
इतक्यात, माधव मागून आला. त्याच्या पावलांचा आवाजही दबका होता. तो हसला — “हे चित्र बघून खूप विचार येतात ना?” त्याने विचारलं.
आराध्या काही बोलली नाही, पण तो हळूच पुढे आला, तिच्या खांद्यावर हात ठेवला… “काही गोष्टी लपवलेल्या असतात, कारण त्या उघडल्या तर, सगळं संपतं. पण काही वेळा, उघडणं अपरिहार्य असतं…”
त्याच्या नजरेत काहीतरी वेगळंच होतं. त्या नजरेत दडलेला अभिमान (माज)… किंवा मालकीहक्क सतत काही मिळवण्याची इच्छा प्रकर्षाने दिसत होती…
क्रमशः


