स्नेहल अ. गोखले
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥
गुरू म्हणजे ज्ञान देणारा, मार्गदर्शक, शिकवणारा… म्हणूनच पंडित विजय बक्षी सरांबद्दल हा लेखप्रपंच… ते जरी माझ्यापेक्षा लहान असले तरी, मी त्यांना गुरूसमान मानते. अशी अनेक उदाहरणे आहेत, ज्यांनी लहानांकडूनही गुरुमंत्र घेतला आहे. (उदाहरणार्थ, मुक्ताबाईंकडून चांगदेवांनी गुरुमंत्र घेतला).
आपला ‘जिव्हाळा नागरिक संघ’ 2005मध्ये सुरू झाला. तेव्हा असलेल्या लहान रोपट्याला आता वृक्षाचे (70-80 सभासद) रूप आले आहे. तेव्हापासूनच नवनवीन कल्पना घेऊन कार्यक्रम होत असत. त्यामध्ये प्रामुख्याने पंडित बक्षी सर, सुलभाताई कुलकर्णी आणि बाकी सर्वजण कार्यक्रम महिन्यांतील दोन गुरुवारी करत असत. 2007मध्ये पुण्यातील जेष्ठ नागरिकांच्या विविध 36 संघांची देशभक्तीपर गीतांची स्पर्धा झाली. त्यावेळी पंडित बक्षी सरांनी स्वरचित अतिशय जोशपूर्ण असे गीत तयार केले होते, संगीतही त्यांचेच होते. कधीही गाणे न शिकलेल्या आम्हा ज्येष्ठ भागिनींकडून त्यांनी सरगमसहीत हे गीत बसवले आणि आमचा संघ त्या स्पर्धेत पहिला आला. पुढे खूप उत्साहाने 2-3 ठिकणी ते गीत आम्ही सादर केले. 2009मध्ये मी जरा संकोचानेच सरांना आमच्या छोट्याशा महिला मंडळाच्या वासंतिक उत्सवात गाण्याचा कार्यक्रम कराल का? असे विचारल्यावर कुठलेही आढेवेढे न घेता (मानधन न विचारता) सुंदर कार्यक्रम केला. इथे त्यांचा मोठेपणा ‘दिसून आला.
हेही वाचा – सफर… 83 वर्षांच्या आयुष्याची
त्यांच्या षष्ठ्यब्दीनिमित्त 2008मध्ये त्यांच्या शिष्यांनी गोवा येथे ‘श्रुतिसुधा’ नावाची संस्था स्थापन केली. तेथे त्यांचे रागांवर आधारित गीतांचे कार्यक्रम दरवर्षी होत असत. संगीततज्ज्ञ पंडित अरुण कशाळकर यांनी ‘मेनका’ दिवाळी अंकात त्यांच्यावर फार सुंदर लेख लिहिला होता. अनेकांनी तो वाचला असेलही!
पंडित विजय बक्षी सरांनी आम्हा काही ज्येष्ठ महिलांना दोन वर्षं शास्त्रीय संगीत शिकवले. वाद्यांची माहिती पण ते बारकाव्यासह सांगत. यमन रागावर आमच्याकडून कार्यक्रमही करून घेतला. पंडित विजय बक्षी सर शीघ्रकवीसुद्धा आहेत. गीत गजानन ही स्वरचित 21 पदांची रचना, एकांकिका, दरवर्षी वर्धापनदिनी होणाऱ्या स्वागतगीतांना संगीतही त्यांचेच! आमचे ‘जिव्हाळा’ हे गीत आणि संगीतही त्यांचेच आहे. ते आम्ही सभेच्या सुरुवातीला म्हणतो. ते मी इथे देत आहे. खूप अर्थपूर्ण असून ते नातेवाईक, मित्रमैत्रिणीमध्ये म्हणायलाही छान आहे.
हेही वाचा – बालपणीचा काळ सुखाचा…
जिव्हाळा गीत
जिव्हाळा जिव्हाळा जिव्हाळा
असा वाढता राहू दे हा जिव्हाळा ॥धृ.॥
मिळाली मनाला मने आपुली
अशी मैत्री, सीमा तिला कोठली
धरू एकमेकांवरी सावली
कृपावंत कान्हा निळा सावळा ॥1॥
युगांची भ्रमंती अनादी अनंती
अशा कालचक्रास फेरे किती
सुखाची व्यथेची अम्हा, ना क्षिती
कधी ये हिवाळा, कधी हा उन्हाळा ॥2॥
कुणा दुःख काही तया धीर देऊ
कुणी संकटी सर्व धावून जाऊ
निराशा कधी ना मनी येऊ देऊ
सदैव सुखाचा फुलू दे मळा ॥3॥
पंडित बक्षी सर आणि सुषमाताई त्यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ निबंध स्पर्धा घेतात, त्याचे बक्षीसही तेच देतात. असे कितीतरी उपक्रम सुरू असल्याने सभासदांनाही उत्साह येतो. या सर्वामध्ये त्यांचे सुपुत्र मयुरेश बक्षी कामात व्यग्र असूनही वेळ काढून साथही करतात. सुषमाताई कायमच त्यांच्या पाठीशी असतात. कुठलीही घरगुती अडचण किंवा इतर कारणे न सांगता दोघेही कार्यरत असतात. अशा या हरहुन्नरी व्यक्तिमत्वाच्या संपर्कात आम्ही आलो आहोत अन् ते मला गुरूसमान आहेत.


