मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्ये वॉशिंग मशीन, भांडी धुवायचे मशीन यासोबत आटाचक्की किंवा जिला ‘घरघंटी’ म्हणूनही संबोधले जाते, ते मशीन घरामधे असणे अगदी अनिवार्य झाले आहे. या मशीनला ‘घरघंटी’ का म्हटले जात असावे, याबाबतीत काही माहिती नाही. ही घरघंटी किंवा आटाचक्की मी जेव्हा पुण्यात माझ्या भाच्याकडे पहिल्यांदा पाहिली, तेव्हा मला जरा नवल वाटले, पण ही वस्तू किती उपयोगी आहे, हे नंतर समजले. त्याच्याकडे तर सर्व काम या इलेक्ट्रॉनिक्स गॅजेटनेच होतात. त्याच्या घराची फरशी पण त्याची ‘गंगाबाई’ नावाची फ्लोअर क्लिनर मशीन किंवा ‘रोबोट’ म्हणू हवं तर ती झाडून पुसून स्वच्छ करते. ही गंगाबाई आकाराने लहान आणि गोल असल्याने प्रत्येक रूममध्ये गरागरा फिरत कानाकोपऱ्यात जाऊन कचरा साफ करते. फरशीवर पाणी स्प्रे करून फरशीपण साफ करते. फक्त तिच रोजचे प्रोग्रॅमिंग सेट करावे लागते.
आजकाल आयटी कंपन्यांमध्ये किंवा कॉर्पोरेट सेक्टरला काम करणारे सकाळीच घराबाहेर पडतात. त्यांची मुलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकतर डे केअर सेंटरला ठेवतात किंवा घरामध्ये त्यांचे आजी-आजोबा असतील तर, ते नातवंडांकडे लक्ष ठेवतात. मेट्रो सिटीजमध्ये राहणाऱ्या अशा परिवारांमध्ये आटाचक्कीसारखी उपकरणे गरजेची आहे. घरघंटी ही जरी आवश्यक बाब असली तरी तिची निगा राखणे आणि स्वच्छता करणे वेळोवेळी जमायला हवे नाहीतर, अशा वस्तू खराब व्हायला वेळ लागत नाही.
माझी एक मैत्रीण आहे, ती घरातील वॉशिंग मशीन, मिक्सर, फूड प्रोसेसर, फ्रीज, ओव्हन यासारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू दर तीन-चार वर्षांत बदलते, परंतु याचा अर्थ असा नाही की, तिचा या वस्तूंचा वापर योग्य किंवा नीटनेटका नाही, ती चांगली स्वच्छता राखत असते. अशा वेळी मला तिचं वागणे सयुक्तिक वाटत नाही. आपल्याकडे सहसा कुठल्याही महाग वस्तू आपण इतक्या लवकर विकत नाही. मी तिला तू असं का करतेस, असं विचारलं तर तिचं असं म्हणण होतं की, एक तर तिला या वस्तूंची मुळातच आवड आहे, बाजारात नवनवीन कंपन्यांच्या या वस्तू दिसल्या की, तिला त्या वापरून बघायची हौसच आहे! दुसरं तिचं मत असं आहे की, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा वापर जास्तीत जास्त चार ते पाच वर्षं करावा, त्यानंतर ते बदलावेत… का ते माहीत नाही! कमाल आहे नाही? काही लोक असे असतात की, ते आपल्या लहानपणाच्या वस्तूपण आयुष्यभर जपून ठेवतात आणि काही लोक असे माझ्या मैत्रिणीसारखेही असतात. तरीही, माझ्या मते वस्तूची उपयुक्तता त्या वस्तूच्या गॅरन्टीवर आणि टिकाऊपणावर अवलंबून असते!
हेही वाचा – Nostalgia : निगाहें मिलाने को जी चाहता हैं…
काही वेळेस असं वाटतं की, आपण विनाकारण काही वस्तू गरज नसताना केवळ हव्यास म्हणून जमा करतो. आता आटाचक्कीचेच उदाहरण घ्या ना! आमच्या विदर्भात आजही गावागावात शहरांमध्ये दळणाच्या चक्क्या आहेत. बहुतांश लोक या चक्क्यांवरूनच महिन्याचे धान्य दळून आणतात. महिन्याकाठी दळणाचे मुख्य काम करणे, हा घराघरातील अविभाज्य घटक आहे. काही ठिकाणी अजूनही गिरणीवर दळणाकरिता लाइन लागते आणि त्याकरिता नंबर लावावा लागतो.
जोपर्यंत आमच्या गावागावात या गिरण्या आहेत, तोपर्यंत तरी तेथील स्थानिक लोक गिरणीवरून दळण आणणेच पसंत करतील, असं माझं मत आहे. याचा अर्थ असा नाही की, आमच्या भागातील लोक घरघंटी किंवा आटाचक्की वापरतच नसतील. आमच्या नागपूरमध्ये ही घरघंटी आता बहुतांश घरात दिसायला लागली आहे, परंतु मुंबई, पुण्याच्या तुलनेत कमीच आहे.
माझ्या माहितीतल्या काही लोकांना घरी आटाचक्की ठेवणे काही दिवसांनी नकोसं वाटतं, कारण मुंबई-पुण्यातील सतत ओलसर आणि दमट हवामान! त्यांचं असं म्हणणं आहे की, या आटाचक्कीची कितीही साफसफाई केली, निगा राखली तरी याच्या बारीकसारीक जागांमध्ये पीठाचे, धान्याचे बारीक कण अडकून असतात, त्यामुळे त्या ठिकाणी सोंडे किंवा टोस / टोके तयार होतात. तसेच, या हवामानात घरातील वाणसामानाची जर नीट काळजी घेतली नाही तर, ते किडण्याची शक्यता जास्त असते. याउलट, आमच्याकडील हवामान उष्ण आणि कोरडे असल्यामुळे आमच्या भागात या घरगुती आटाचक्की व्यवस्थित कार्यरत राहतील. दळण काढल्यानंतर आटाचक्की जर व्यवस्थित स्वच्छ केली गेली नाही तर, त्याच्या आतील ब्लेड्स, जाळ्या खराब होतात. अशा वेळेस ते पाण्याने धुतले तर स्वच्छ कापडाने पुसून, पंख्याखाली कोरडे करून, शक्य झाल्यास उन्हात वाळवून मगच पुन्हा वापरात आणावे. परंतु, वेळेच्या अभावामुळे हे नियमितपणे करणे काहीजणांना शक्य होत नाही किंवा कंटाळा हे देखील एक कारण असू शकतं.
हेही वाचा – गोष्ट एका ‘व्हेज अंडाकरी’ची!
दरवेळी दळण झाल्यावर आटाचक्क्की कोरड्या कॉटनच्या कपड्याने आतून बाहेरून स्वच्छ पुसून काढावी तरचं तिच मशीन व्यवस्थित काम करेल. थोडक्यात काय तर घरगुती वस्तूंची नियमितपणे स्वच्छता आणि काळजी घेतली तर, त्या वर्षानुवर्षे चांगल्या राहतात. अशा वस्तूंना अधूनमधून ऊन दाखवणे पण गरजेचे असते. काही लोक असेही पाहाण्यात आहेत की, त्यांच्याकडे या आटाचक्की दहा-बारा वर्ष झाली तरी ती निटनेटक्या परिस्थितीत वापरात आहेत. याची जितकी उपयुक्तता आहे, तितकीच ती टिकवणे देखील आपल्या हातात आहे. घरातच आटाचक्की असल्यामुळे पीठ संपले तरी, वेळेवर पटकन पीठ दळता येतं. गिरणीत जाऊन लाइनमध्ये नंबर लावून पीठ दळून आणायची कटकट नसते. गिरणीत काही वेळेस पीठ मिक्स व्हायची, किंवा एकतर जाड नाहीतर एकदम बारीक देण्याच्या तक्रारी असतात, परंतु घरघंटीवर आपण आपल्या मनासारखे हवी ती पिठं तयार करू शकतो. अशी ही आटाचक्की काही तोटे सोडले तर, फायदेशीर आहे. परंतु ती आमच्याकडे अजून इतकी चलनात नाहीये.
चक्कीवाला म्हणतो की, “तुमच्या दळणांवर माझी गिरणी अवलंबून आहे. ज्यावर माझं कुटुंब मी पोसतो, जर तुम्ही सगळ्यांनीच या अशा मशिन्स घरोघरी आणल्या तर आमच्यासारख्यांनी काय कमवायचं?” त्यांचेही म्हणणे योग्य आहे. आटाचक्की जर घरोघरी आल्या तर त्या कंपन्यांचाच फायदा होईल आणि या छोट्यामोठ्या दुकानदारांचे नुकसान होईल. त्यामुळे शक्य होईल तोपर्यंत गिरणीवर जाऊन दळण आणायचा शिरस्ता आम्ही कायम राखला आहे. ‘जगा आणि जगू द्या!’ इतकंच काय ते आपण लक्षात ठेवायचं बाकी काही नाही. उरलंसुरलं ज्याचं त्याच्याजवळ!


