दर्शन कुलकर्णी
आज, भारतीय सौर : 21 ज्येष्ठ शके 1947
अर्थात,
दिनांक : 11 जून 2025
वार : बुधवार
तिथि : पौर्णिमा 13:13
नक्षत्र : ज्येष्ठा 20:10
योग : साध्य 14:03
करण : बालव 25:53
सूर्य : वृषभ
चंद्र : वृश्चिक 20:10
सूर्योदय : 06:00
सूर्यास्त : 19:15
पक्ष : शुक्ल पक्ष
मास : ज्येष्ठ
ऋतू : ग्रीष्म
सूर्य अयन : उत्तरायण
संवत्सर : विश्वावसू
शालिवाहन शक : 1947
विक्रम संवत : 2081
युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – एखाद्या व्यक्तीशी असणारे वैर त्रासदायक ठरू शकते. परिणामी आपल्या नातेसंबंधात कायमची फूट पडू शकते. भाऊ, बहीण आर्थिक मदत मागू शकतात. त्यांना मदतीचा हात देताना स्वतः आर्थिक दबावाखाली येऊ शकता. मात्र ही स्थिती लवकरच सुधारेल.
वृषभ – आपल्या कामाबद्दल आणि आयुष्याबद्दलचा दृष्टीकोन स्पष्ट आणि चोख असू द्या. आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ, यामुळे काही काळ विश्रांती घेता येईल. समोर मांडल्या जाणाऱ्या गुंतवणूक योजनांचा नीटपणे विचार करा.
मिथुन – आजचा दिवस लाभदायक असल्यामुळे अनेक घटकांची साथ मिळेल. विवाहोत्सुकापैकी काही जातकांचे विवाह ठरण्याचा योग आहे. नोकरी करणाऱ्या जातकांना कार्यक्षेत्रात विचारपूर्वक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.
कर्क – आर्थिक फायदा संभवतो. अतिशय उत्साही आणि आनंदी राहाल. स्वतःच्या जगात रममाण असाल. मात्र यामुळे जोडीदाराकडे दुर्लक्ष होईल असे वर्तन करू नका किंवा आपल्या प्रियजनांशी कटूतेने वागू नका. घरातील एखादी व्यक्ती तिच्या समस्या सांगण्याची शक्यता आहे.
सिंह – प्रदीर्घ काळ प्रलंबित राहिलेले प्रश्न सुटतील. आर्थिकदृष्ट्या दिवस संमिश्र असेल. धनलाभाचे संकेत असले तरी, यासाठी कठोर मेहनत करावी लागेल. व्यग्र दिनचर्या असूनही आपल्यासाठी वेळ काढणे शक्य होईल. या रिकाम्या वेळेत काही रचनात्मक कार्य करू शकाल.
कन्या – या राशीतील काही बेरोजगारांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. अतिशय क्षुल्लक कारणांवरून प्रिय व्यक्तीसोबतचे संबंध तणावपूर्ण बनतील. उद्यमशील लोकांसोबत भागीदारी करण्यासाठी उत्तम दिवस आहे.
तुळ – आजूबाजूचे लोक तुमच्याकडून भरपूर कामाची अपेक्षा करतील. मात्र जेवढे काम करू शकता तेवढेच करण्याचे वचन द्या. अशा लोकांना खूश ठेवण्यासाठी कामाचा ताण घेऊन दमून जाण्याची गरज नाही. हाती आलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवा.
वृश्चिक – मित्रमंडळी आणि नातेवाईकांवर आपले निर्णय, मते लादू नका. त्यामुळे ते विनाकारण नाराज होण्याची शक्यता आहे. चांगल्या कामाबद्दल तुमचे कौतुक होईल. अडचणीच्या काळात तत्परतेने काम करण्याची क्षमता पुन्हा सिद्ध कराल.
धनु – कलात्मक आनंद देणाऱ्या कामात स्वत:ला गुंतवून घ्या. आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. कुणाला रक्कम उधार दिली असेल तर, ती परत मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या जागी धोरणीपणाने वागा नाहीतर, नव्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
मकर – उत्तम कल्पना आणि वास्तवातील कृती यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होईल. जवळच्या मित्राच्या मदतीने काही जातकांना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. दिवसाच्या उत्तरार्धात मनउल्हसित करणाऱ्या एखाद्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाला जाल.
कुंभ – विवाहित जातकांना सासरकडून धनलाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील ताणतणावांमुळे लक्ष विचलित होऊ देऊ नका. वाईट काळच आपणास अनेक गोष्टी शिकवतो, त्या लक्षात घेऊन मार्गक्रमण करा.
मीन – जमीन, स्थावर जंगम मालमत्ता, किंवा सांस्कृतिक प्रकल्प यासारख्या विषयांवर लक्ष केंद्रीत कराल. मुलांकडून गोड बातमी समजल्यामुळे दिवसभर आनंदी असाल. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस. मात्र दिवसभरातील अतिश्रमांनी प्रचंड थकवा जाणवेल.
दिनविशेष
साने गुरुजी
आंतर-भारती चळवळीचे प्रवर्तक, साहित्यिक, अध्यापक, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, समाजसेवक, लोकशाही समाजवादाचे भाष्यकार असणाऱ्या पांडुरंग सदाशिव साने म्हणजे जनमानसात ओळखल्या जाणाऱ्या साने गुरुजी यांचा आज स्मृतीदिन. 1930 -32 च्या सविनय कायदेभंग चळवळीत सहभागी झाल्यामुळे त्यांना तुरुंगवास भोगला लागला. 1946 मध्ये पंढरपूरचे विठ्ठलमंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे, म्हणून त्यांनी प्राणांतिक उपोषण केले होते. यामुळे पददलितांच्या मंदिरप्रवेशाचा मार्ग मोकळा झाला होता. पुढे त्यांनी विश्वभारतीच्या धर्तीवर ‘आंतर-भारती’ही संस्था स्थापन करण्याचा संकल्प केला. भारतात आंतरभारतीचे केंद्र असावे, त्याच्या शाखा निरनिराळ्या राज्यांत असाव्यात, त्यांच्या माध्यमातून विविध राज्यांतील भाषा, चालीरीती, परंपरा, कला, कारागिरी, लोकसाहित्य, नृत्ये यांचा अभ्यास व्हावा आणि त्यातून राष्ट्रीय एकात्मता साधावी, अशी यामागची संकल्पना होती. 1948 साली त्यांनी पुण्यात साप्ताहिक साधना सुरू केले. साने गुरुजींनी कादंबरी, कथा, बालसाहित्य, कविता, निबंध, चरित्र इत्यादी साहित्यप्रकारांत विपुल लेखन केले. त्यातील “श्यामची आई” हे त्यांचे आत्मकथनपर पुस्तक विशेष उल्लेखनीय ठरले. मात्र, नंतरच्या काळात सभोवतालची सामाजिक-राजकीय परिस्थिती पाहून अत्यंत निराश मनःस्थितीत मुंबई येथे त्यांनी 11 जून 1950 रोजी आत्महत्या केली.