Saturday, February 14, 2026

banner 468x60

Homeललितगरीबांचा डॉक्टर बनणे, हेच ध्येय!

गरीबांचा डॉक्टर बनणे, हेच ध्येय!

प्रदीप केळुस्कर

भाग – 2

बारावीची परीक्षा संपली, आता रिझल्ट लागायला वेळ होता. आता मी अठरा वर्षांचा झालो होतो. चार दिवसांनी रामनवमी होती. मला विजयाला भेटण्याची ओढ होती. सरू मावशीने रामनवमीला येण्याच्या दिलेल्या आमंत्रणाची आठवण होती. मुंबईहून माझा आतेभाऊ अमर पण सुट्टीत आला. त्याची माझी लहानपणापासूनची गट्टी. तो आल्यावर मी त्याला म्हटले, सरू मावशीच्या गावी रामनवमीला जाऊया. तो पण खूश झाला. आईबाबांची परवानगी घेतली आणि आम्ही एसटीने रामनवमी दिवशी त्यांच्या गावी गेलो.

लहानसे गाव ते. पण रामनवमीला होणाऱ्या जत्रेमुळे माणसांनी फुलले होते. गावभर पताका लागल्या होत्या. रस्ते, पायवाटा पाणी मारून शेणाने सारवले होते. बाहेरील अनेक दुकानदार आपआपली छोटी-मोठी दुकाने थाटून बसले होते. हॉटेलातून भजी, वडे यांचा वास हवेत दरवळत होता. मी एका माणसाला सरू मावशीचे घर विचारले. त्याने त्या ओढ्याच्या पलीकडे बोट दाखविले. मी आणि अमर आमच्या पिशव्या खांद्याला लावून त्या ओढ्यातून पलीकडे गेलो. उन्हाळा असल्याने ओढ्याला जेमतेम पाऊलभर पाणी होते. आम्ही ओढ्याच्या पलीकडे गेलो, तिथे पुन्हा काही दुकाने होती. चौकशी करून आम्ही सरू मावशीच्या घरी पोहोचलो.

घराच्या बाहेरच्या भागात सरू मावशीचे हॉटेल होते. कोकणात इतर ठिकाणी दिसते तसे. बरण्यांमध्ये भरलेले शेंगदाणा लाडू, शेवाचे लाडू, रवा लाडू इत्यादी. एका कोपऱ्यात एक बाई चुलीवर भजी तळत होती आणि सरू मावशी गिऱ्हाईकांना चहा, भजी देत होती. सरू मावशीचे लक्ष माझ्याकडे गेले मात्र, ती हसली आणि तिने हाताला धरून बाकावर बसविले.

‘‘ये रे मनीष, आणि हो कोण बरोबर?’’

‘‘हा अमर. माझा आतेभाऊ, मुंबईहून आलाय.’’

‘‘होय काय, बरा बरा. विजू वाट बघता तुझी कालपासून.’’

‘‘पण तिला कस माहीत, मी जत्रेला येणार म्हणून?’’

‘‘कसा माहीत ता माका माहीत नाय, पण म्हणा होता, मनीषची बारावीची परीक्षा संपली असतली म्हणजे तेका सुटी पडली की, घराकडे येतलो… आणि घराक इलो तर ह्या जत्रेक निश्चित येतलो.’’

‘‘पण विजया गेली कुठे?’’

‘‘अरे देवळाकडे गेला हां. यंदा आमची वर्सल आसा. रात्री पालखीबरोबर यंदा आम्ही आसतलवं, म्हणजे आता विजू पालखीबरोबर आरती घेवन असतला. त्या पालखीची तयारी करुक गेला हां. माका सांगल्यान, चारच्या एसटीन मनीष येयत बहुतेक. तेका चहापाणी दी आणि देवळाकडे धाड. तुमी जाशात ना देवळाकडे?’’

तिने आमच्या पिशव्या हातात घेतल्या आणि एका खोलीत ठेवल्या. मी आणि अमर देवळाकडे गेलो. जसजसे देऊळ जवळ येऊ लागले तसतशी गर्दी वाढू लागली. अनेक छोटे-मोठे दुकानदार, सरबतवाले, कलिंगड विकणारे, अगरबत्त्या, केळी विकणारे खूप गर्दी… आम्ही गर्दीतून वाट काढत देवळाभोवती फिरलो. गर्दीमुळे काही दिसत नव्हते. माणसाला माणूस चिकटले होते. माझे डोळे विजयाला शोधत होते. पण विजया दिसेना. कदाचित, ती देवळाच्या गाभाऱ्यात असेल. दोन तास जत्रेत फिरून आम्ही पुन्हा सरू मावशीच्या घरी आलो. आम्हाला पाहताच मावशी म्हणाली –

‘‘अरे विजू आत्ताच येवन गेला. ता तुमका शोधी होता. आता जेवा आणि दहा वाजता पालखी बाहेर पडतली त्या पालखीबरोबर आरती घेवन विजू असतला. ता सांगून गेला हा मनीषाक सांग पालखेकडे ये. चला जेवून घ्या.’’

आम्ही सरू मावशीच्या हातच्या पुरणपोळ्या जेवण जेवलो आणि परत देवळाकडे गेलो. आता पालखी बाहेर पडणार म्हणून खूप गर्दी झाली होती. ढोल-ताशे वाजत होते. मी एका दुकानदाराकडे चौकशी केली पालखी कोणत्या दारातून बाहेर पडते म्हणून. त्याने हाताने दरवाजा दाखविला. मी आणि अमर त्या दरवाजाच्या जवळ जाऊन उभे राहिलो. आता ढोलाचे आवाज वाढू लागले. पालखी बाहेर पडताना दरवाजाजवळ गर्दी जमू लागली. पण आम्ही भिंतीला चिकटून घट्ट उभे होते. थोड्याच वेळात खांद्यावर पालखी घेऊन दोन सेवेकरी बाहेर पडले. आणि त्यांच्या पाठोपाठ काही स्त्रिया. त्यात हातात आरती घेऊन बाहेर पडली विजया. मी पाहातच राहिलो. जवळ जवळ दोन वर्षांनी विजयाला पाहत होतो. दोन वर्षांत तिचे बालपण संपून आता ती पूर्ण स्त्री झाली होती… नऊवारी साडी, नाकात नथ, केसात आबोल्याची वेणी, अंगावर दागिने, चेहरा टवटवीत आणि आरतीतील निरंजनाचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला होता… त्या प्रकाशात ती कमालीची देखणी दिसत होती.

ती दरवाजातून बाहेर पडली ती कुणाला तरी शोधत… हातात आरती होती, पण डोळे भिरभिरत होते. तिचे लक्ष माझ्याकडे गेले आणि चेहऱ्यावर हसू आले. मला हाताने जवळ बोलावले आणि हळूच म्हणाली –

‘‘पुण्यात रवान एकदम चिकणो दिसतस, आता खरो ऋषी कपूर, आणि हो कोण बरोबर?’’

‘‘ हा अमर, माझा आत्येभाऊ.’’

‘‘बरा, बरा… आता पालखीबरोबर चला. माझ्या बाजूक उभो रव.’’ असं म्हणून ती परत पालखीजवळ गेली. मी माझ्याच जाग्यावर पण ती मला हाताने आपल्याजवळ येण्याची खूण करू लागली. माझ्यासोबत अमर होता. मी कसा जाणार? तरी पण पालखीच्या तीन फेऱ्या होईपर्यंत ती मला खुणा करत होती. तीन फेऱ्यांनंतर पुन्हा पालखी देवळात जाणार एवढ्यात विजया मला म्हणाली –

‘‘हयसरच रवां, मी येतय अर्ध्या तासात.’’

आम्ही दोघे तेथेच एका दुकानापाशी तिची वाट पाहत राहिलो. आता लोक घरी जाऊ लागले होते. गर्दी कमी होऊ लागली. अर्ध्या तासाने विजया आली.

‘‘चला जावया घराकडे.’’ आणि आम्ही तिघे त्यांच्याकडे घराकडे निघालो.

‘‘केव्हा इलस पुण्यासून? आणि पुण्यात काय पोरगी पटवूक नाय मां?’’

‘‘नाही गं बाई, अभ्यासापुढे मला वेळच नसतो.’’

‘‘बघ हां, पोरगी पटवशीत तर बघ!’’ असं सांगून मला हळूच म्हणाली, ‘‘मी हय तुझी वाट बघतयं.’’

मी अमरकडे पाहिले. नशीब त्याचे लक्ष नव्हते. वाटेत येताना ओढा होता. ओढ्याकडे काळोख होता. काही दिसत नव्हते. आम्ही अंदाजे चाललो होतो. अचानक विजया माझ्या उजव्या खांद्यापाशी आली आणि कानाचा हळूच चावा घेतला. मी कान हुळहूळला म्हणून कानावर हात ठेवला. तोपर्यंत हसत हसत ती लांब गेली… आम्ही घरी आलो. सरू मावशीने दाखविलेल्या खोलीत मी आणि अमर झोपी गेलो. परत एकदा अंथरूण, पांघरूण मिळालं ना, हे पहायला विजया येऊन गेली. खूप दमल्यामुळे कधी आम्हाला झोप लागली, ते कळले नाही.

सकाळी उठून चहा-पोहे खाऊन आम्ही एसटी पकडायला निघालो. विजया आम्हाला पोहोचवायला एसटी स्टॉपवर आली होती. आम्ही गाडीत बसलो, खालून विजू हात दाखवत होती. हात दाखवता दाखवता ती रडत होती. मला पण भरून आले होते. आता एकदा पुण्याला गेलो की, अभ्यास आणि पुढील आयुष्यासाठी धडपड. आता विजया पुन्हा केव्हा दिसेल कोण जाणे? असे विचार मनात येत होते.

हेही वाचा – विजयाला भेटण्याच्या ओढीने गावी जत्रेला गेलो…

अमर मुंबईला गेला आणि मी पुण्याला आलो. बारावी परीक्षेत पुन्हा मी बोर्डात आलो. सगळीकडे फोटो आणि कौतुक. माझे ठरलेले होते. मेडिकलला जायचे आणि हार्ट सर्जन व्हायचे होते. भारतात आता नव्यानेच हृदय शस्त्रक्रिया होऊ लागल्या होत्या. माझ्या देशातील लोकांना त्याची गरज होती. बी.जे. मेडिकलला मला सहजच अॅडमिशन मिळाली. अभ्यासाच्या मागे लागलो. पहिले सेमिस्टर, दुसरे सेमिस्टर एक एक सेमिस्टर पार पडत होते. लेक्चर्स, प्रॅक्टिकल्स, अभ्यास सुरू होता… पण रोज कानात एक वाक्य ऐकू येत होते. विजयाचे वाक्य –

‘‘मी हय तुझी वाट बघतयं.’’

कोकणातल्या लहान गावात तेव्हा टेलिफोन, मोबाइल आले नव्हते. त्यामुळे विजयाशी संपर्क करणे शक्य नव्हते. पण विजया माझी वाट पाहत आहे, या विश्वासात मी निर्धास्त होतो.

साल 1990… मी मेडिकलच्या तिसऱ्या वर्षाला होतो. दिवाळीच्या सुट्टीत आई पुण्याला आली होती. मामा-मामी, भावंडे खूश. खूप वर्षांनी बहिण पुण्याला आली. आईने मामांना भाऊबीजेला औक्षण केले. माझी प्रॅक्टिकल्स सुरू होती. एक दिवस रात्री आई माझ्या खोलीत आली आणि म्हणाली, ‘‘अरे, बरी आठवण झाली, तुला सांगायचे सांगायचे म्हणत होते, अरे सरूताईच्या विजयाचे गेल्या आठवड्यात लग्न झाले…’’

मी ऐकतच राहिलो. विजयाचे लग्न झाले? ‘‘मी तुझी वाट पाहत आहे,’’ म्हणणाऱ्या विजयाचे लग्न झाले? माझे विस्फारलेले डोळे आणि पडलेला चेहरा पाहून आईला काय समजायचे ते समजले. ‘‘अरे गेल्या महिन्यात सरूताई घरी आली होती. म्हणत होती मनीष आणि विजयाचे प्रेम आहे एकमेकांवर. मी तिला म्हटले, आम्ही जात-पात काही मानत नाही. पण मनीष आता मोठा डॉक्टर होईल. कदाचित, उच्च शिक्षणासाठी परदेशी जाईल. त्याला शोभेल अशी डॉक्टर बायको नको का? विजया धड मॅट्रिकपण झाली नाही. तुम्हाला तरी हे पटते का? मनीष तुमचा मुलगा असता तर तुम्ही काय केलं असतं? त्यावर त्या म्हणाल्या, मनीषची आई तुमचे बरोबर आहे. एवढ्या मोठ्या शिकलेल्या मनीषला मोठी डॉक्टरीनच मिळायला हवी. मी सांगते विजयाला. तो नाद सोड. दुसरे एक स्थळ आले आहे त्याच्याशी लग्न कर… त्याप्रमाणे सरुताई गेल्या आणि त्यांनी विजयाचे लग्न ठरविले आणि गेल्या आठवड्यात लग्न झाले पण. सरुताई लग्नाचे लाडू घेऊन आली होती.”

मी उद्ध्वस्त झालो. पण माझ्या आईचे पण काही चुकले नव्हते. आमचे प्रेम इतरांपेक्षा वेगळे होते. ते माझे शिक्षण, डिग्री, पैसे, जात या पलीकडचे होते. कुणीतरी लांब अंतरावर आपली वाट पाहात असणे, यासारखे समाधान नसते. वयाच्या पंधराव्या वर्षी भेटलेली प्रेयसी, तिचे आडमुठे वागणे, थोडीशी दांडगाई मला आवडत होती…

हेही वाचा – एका संपाची कहाणी

माझा पडलेला चेहरा पाहून आई माझ्याजवळ आली. केसावरून हात फिरवत म्हणाली, “विजया आम्हाला पण आवडली होती, पण एवढ्यात लग्नाची बेडी अडकवून तुला कसे चालेल? तुला शिक्षण घ्यायचे आहे आणि गरीब लोकांसाठी डॉक्टर बनायचे आहे. तुझ्या वडिलांचे ते स्वप्न आहे. आम्हाला आमचा मुलगा खोऱ्याने पैसे कमवणारा डॉक्टर नाही बनवायचा! पण त्यासाठी आणखी काही वर्षे तुझे तुझ्या करिअरकडे लक्ष हवे.” आईच्या मांडीवर डोके ठेवून मी झोपलो होतो. हळूहळू केव्हातरी मला झोप लागली.

सकाळी मी उठलो तो आईचे शब्द कानात साठवून… ‘‘तुला गरीबांचा डॉक्टर बनायचा आहे.’’ मी अभ्यासाला लागलो. याच दरम्याने माझी डॉक्टर अनिल अवचट यांची भेट झाली. डॉक्टर अवचट, त्यांची पत्नी डॉक्टर सुनंदा अवचट आणि त्यांच्या अवतीभवतीचे लोक यांच्या ‘‘व्यसनमुक्ती’’ चळवळीत मी सामील झालो. माझा रिकामा वेळ ‘‘मुक्तांगण’’मध्ये घालवू लागलो. डॉक्टर अवचट यांचा अकृत्रिम स्नेह या काळात मिळाला. दुसरे आमचे बी.जे. मेडिकल मधील आमचा नाट्यग्रुप त्यामध्ये मी मिसळलो.

सन 1995… मी कार्डियाक सर्जन म्हणजे हृदयरोगावरील सर्जन होऊन पुण्यात सरकारी हॉस्पिटलमध्ये रुजू झालो. पुण्यात एम.बी.बी.एस. केल्यानंतर स्कॉलरशिप मिळवून मी लंडनमध्ये गेलो आणि त्या काळात नवीन असलेली बायपास शस्त्रक्रिया हा विषय शिकून घेतला आणि पुन्हा पुण्यात आलो. बायपास शस्त्रक्रिया करणारे त्यावेळी भारतात मोजके डॉक्टर होते आणि पुण्यात दोन तीन होते. त्यामुळे पुण्याच्या मेडिकल क्षेत्रात जोरदार स्वागत झाले. अनेक खासगी हॉस्पिटल्स मी यावे यासाठी गळ टाकत होते. पण त्याला न जुमानता सरकारी हॉस्पिटलमध्ये कमीत कमी खर्चात ऑपरेशन करू लागलो. माझे नाव मेडिकल क्षेत्रात मानाने घेऊ लागले. रोटरी, लायन सारख्या अनेक संस्था मी त्यांच्यात सहभागी व्हावे म्हणून धडपडत होत्या. पण मी डॉक्टर अवचट यांच्या मुक्तांगण तसेच हेमलकसाच्या डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या हॉस्पिटलमध्ये रमू लागलो.

क्रमश:

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!