आजूबाजूला गुलमोहराचे, सोनमोहराचे घनदाट वृक्ष! त्यावर मधुमालती आणि विविध रंगाच्या बोगनव्हिलाच्या फुलांची दाटी. मध्यभागी सळसळ करणारा अजानवृक्ष; तिथेच ताजा टवटवीत हिरवागार रंग दिलेले लाकडी बाक. बागेच्या त्या एका बाजूच्या कोपऱ्याची मोठ्या रसिकतेने रचना केलेली. बायकांच्या त्या ग्रुपची ती ठरलेली जागा होती. नेमकं काहीही ठरवलेलं नसायचं. जी ती आपापल्या सोयीने यायची. माझाही हळूच एकदा त्या ग्रुपमध्ये समावेश झाला.
खूप मजा यायची. दिवसभराचा सगळा ताण, घरच्या कटकटी, ऑफिसमधली खेचाखेची सगळं सगळं काही तिथे आल्यावर विसरायला व्हायचं. कसली बांधिलकी नाही, जबाबदारी नाही, वर्गणी नाही; हवं तिने यावं, हवं तेवढा वेळ बसावं, हवं तेव्हा जावं!
ग्रुपच्या अलिखित नियमाप्रमाणे कोणीही खासगी माहिती, बोचरे शब्द, नकोसे प्रश्न विचारायचे नाहीत! नेहमीच्या बैठकीमुळे आपोआप संभाषणातून कळेल तितकंच! त्यामुळे तिथे कायम हास्याची खळखळ असायची. वृंदा सगळ्यात पहिली हजर होणारी आणि सगळ्यात शेवटची जागा सोडणारी होती. ग्रुपमध्ये जान आणणारी, सदा प्रसन्न, बडबडी वृंदा सगळ्यांनाच हवीशी वाटायची. रोज तिच्या घरी काहीतरी तळण असायचंच… वडे, समोसे, भजी!
“वृंदा, रोज रोज डीप फ्राय? अग चांगलं नाही तब्येतीला…”
“मी बनवते, पण खात नाही! नवऱ्याला लागतं असं चटकमटक… रोज!”
कशी कोण जाणे तिची आणि माझी जवळीक जरा जास्तच दाट झाली. तिच्या काही उद्गारातून, शब्दातून, वाक्यातून मला तिचं आयुष्य समजायला लागलं आणि मग तिच्या विनोदी गप्पांतून, हसतमुखातून माझ्या मनातील विषादच दाटून यायला लागला. हसऱ्या चेहऱ्याआड तिने लपवलेल्या वेदना मला कळू लागल्या.
हेही वाचा – आजच्या भाजीचा बेत…
वृंदा स्वतः पीएचडी… प्रोफेसर. नवरा केमिकल इंजिनिअर. पण बेवडा म्हणावा इतका पिअक्कड. तो घरातच जांभळाची, काजूच्या बोंडाची, फणसाच्या गऱ्याची, नाना फळांची वाइन बनवायचा. अशी त्याच्याबद्दलची आवई होती. माणूसघाणा, आपल्याच विश्वात रमणारा! तिला फिरायची आवड, तर तो घरकोंबडा! ती त्याचा एक पैसा पण वापरायची नाही. स्वतःच्या पैशाने जगभर फिरायची… एकटी! नवरा जायचा नाही आणि तिला पण त्याला नेणं आवडायचं नाही. असा विकृत, दारुडा नवरा कुणाला आवडणार ना! म्हणजे आमची ही सगळी मतं, ती सांगायची त्यावरून बनली होती.
एक दिवस आम्ही दोघीच असताना मला म्हणाली, “लवकर मरेल तो! इतकं नकोनको ते त्याला खाऊ घालतेय मी, की खाऊन खाऊनच मरेल…” मी नखशिखांत थरथरले. मला वाटतं त्या दिवसापासून मी तिच्यापासून दुरावायला लागले.कितीही वाईट असला तरी, नवऱ्याच्या मरणाची वाट पाहणारी बायको, ही संकल्पना मला पचण्यासारखी नव्हती!
त्यावर्षी ती ऑस्ट्रेलियाला जाणार होती. “ही माझी आठवी फॉरेन ट्रिप बरं का! मी 80 वर्षांची होईपर्यंत फिरणार आहे. पन्नास ट्रिपचं टार्गेट पूर्ण करूनच मी मरणार बरं का!”
आम्ही सर्वांनी तिला ‘तथास्तु’ म्हटलं. नंतर, सहा महिने मी लेकीच्या मदतीला गेले. परत आल्यानंतर कळलं, हार्ट अटॅक येऊन वृंदा अचानक गेली… तिची ट्रिप झालीच नाही!
तिच्यानंतर हळूहळू आमचा ग्रुप पण गळू लागला. नंतर तर तिथे सगळ्याच नव्या बायका दिसू लागल्या. माझा पण रस संपला. जवळ जवळ दहा-बारा वर्षे झाली या गोष्टीला! आज सकाळी नेहमीप्रमाणे आम्ही दोघे चालायला गेलो होतो. समोर वृंदाचा नवरा! माझ्या नवऱ्याचा परिचित! मला मुळीच बोलायचं नव्हतं त्याच्याशी… पण हा गोष्टीवेल्हाळ ना! थांबलाच बोलायला. नाईलाजाने जिवणी रूंद करून मला थांबावंच लागलं. बोलताना अर्थातच वृंदाचा विषय निघालाच! त्याचे डोळे डबडबले! खूप कौतुक करत होता तिचं. “मी घरी यायच्या आधी माझी बाटली आणि ग्लास… सगळा सरंजाम तय्यार असायचा! खूप लाड केलेन माझे! रोज तऱ्हेतऱ्हेचा, ताजा ताजा चकणा… भजी, चकली, समोसे… जे काय म्हणेन ते. तंदुरी, चॉप्स, झिंगे… सगळं काही स्वतः बनवायची…”
माझ्या नवऱ्याला कुठे काय बोलावं, ते कळतच नाही. “च्यायला रे! तरी तब्येत छान ठेवलीयेस… उलट बायको गेल्यानंतर आणखीनच फिट दिसातोयस! पंच्याहत्तर झाले ना तुझे? साठीतला दिसातोहेस!”
हेही वाचा – असेच कानावर पडलेले संवाद…
तोही खळखळून हसत म्हणाला, “अरे, ती होती तेव्हा रोजची क्वार्टर लागायची मला. आता अगदी मोजून दोन पेग आणि चकणा म्हणजे सलाड आणि फळं! कोणत्याही परिस्थितीत रोज सकाळी पाच किलोमीटर आणि संध्याकाळी तीन किलोमीटर चालतोच! जेवण फक्त पोळी भाजी! अरे आता खाण्यापिण्याचे लाड करायला वृंदा नाही ना!खूप हौस होती तिला… रोज नवे पदार्थ करून मला खाऊ घालायची. मरेपर्यंत जगायचं आणि ते देखील चांगलं आनंदाने जगायचं… जीवन उपभोगायचं!” बोलता बोलता तो गहिवरून आला.
कधीतरी आम्ही त्याचा निरोप घेतला. मी गोंधळून गेले होते. माझी वृंदाच्या नवऱ्याबद्दल काही वेगळीच कल्पना होती… वृंदाने करून दिलेली! हा तर चांगला हसरा, जिंदादिल, शिस्तशीर, आयुष्याकडे सकारात्मक नजरेने पाहणारा, वृंदावर प्रेम करणारा होता… वृंदा पण हसरी, खेळकर वृत्तीची होती. दोन चांगली माणसं एकत्र येतात, तेव्हा चांगलं घडेलच अशी शाश्वती नसते का? एका माणसामध्ये किती विविध माणसं लपलेली असतात. असतं तरी कसं हे अजब, माणूस नावाचं रसायन!!


