पराग गोडबोले
“आई, या फॉर्मवर इथे सह्या कर,” असं सागर म्हणाला आणि मी यंत्रवत ओढली गेले त्याच्याकडे. खरंच, गेल्या काही दिवसांत किती पोक्त आणि समंजस झाला होता माझा बंब्या! पेन दिलं त्याने मला आणि तो म्हणेल तिथे, अगदी मुकाट्याने सह्या केल्या मी… माझं झाल्यावर नीलेशची पाळी. त्याच्या पण सह्या घेतल्या त्याने आणि आम्हाला थांबायला सांगून निघून गेला, आत कुठेतरी…
दहाच मिनिटांत आला परत आणि म्हणाला, “चला माझ्या सोबत.” आम्ही दोघे त्याच्या मागोमाग पोहोचलो एका साहेबांच्या समोर…, आणखी काही सह्या केल्या, एकमेकांना हार घातले आणि काम फत्ते!
साहेबांनी आमचं अभिनंदन केलं. सागरने स्वतः आम्हा दोघांना पेढे भरवले आणि हसत हसत म्हणाला, “झालं बरं का, तुमचं लग्न! तुम्ही नवरा-बायको झालात आता… चला!”
पंधरा मिनिटांत काम झालं इथे, पण त्या मागची कर्म कहाणी मात्र घोंगावू लागली माझ्या मनात, वावटळीसारखी… ढवळून निघाले मी अंतर्बाह्य, परत एकदा… सगळंच आठवू लागलं मला. सगळे प्रसंग, सगळ्या घटना फेर धरून नाचू लागल्या माझ्या भोवती…
माझ्या नवऱ्याचं म्हणजे मकरंदचं अपघाती निधन झालं, माझ्यावर वज्राघात होता. अर्ध्यावर मोडलेला डाव आणि अधुरी कहाणी… मकरंद गेल्यानंतर, सासुबाईंनी तोडून टाकलेले पाश आणि मग आई, बाबा आणि माझ्या दादा, वहिनीच्या आधाराने मी एकटीने लढवलेली संसाराची खिंड…
हेलपाटलेला आणि उन्मळून पडलेला, तेव्हा फक्त सहावीत असलेला बारा वर्षांचा, आमचा गोजिरवाणा लेक. कळतच नव्हतं त्याला काय चाललंय ते! त्याला वाढविण्यात आणि दोन्ही भूमिका एक हाती निभावण्यात, माझी जीवघेणी कसरत… आज सहा वर्षं झाली या प्रसंगाला, सागर चक्क अठरा वर्षांचा झाला. वयाच्या मानाने फारच समजूतदार!
तेही दिवस गेले. आपले म्हणवणारे परके झाले आणि परके आपलेसे झाले. मकरंद गेला तेव्हा मी जेमतेम बत्तीस वर्षांची होते. आयुष्य उभं होतं समोर आ वासून, पण छोटा सागर म्हणजे माझं सर्वस्व होतं. नशिबाने, चांगली नोकरी असल्याने कोणासमोर हात पसरायची आफत नव्हती, पण तरीही एक खोल खड्डा पडला होता आयुष्यात.
हळूहळू सरावत गेले, पण एकटेपणा जीवघेणा वाटायचा. सागर दहावीत गेला आणि माझ्या आयुष्यात नीलेशचा प्रवेश झाला. माझ्यापेक्षा दोन वर्षं लहान अविवाहित नीलेश, माझा ऑफिसमधला सहकारी… धड तारुण्य नाही, धड प्रौढत्व नाही अशा उंबरठ्यावर आम्ही दोघे होतो. कसं कोणास ठाऊक, पण आमचे सूर जुळले. मेसेजेस्-ची देवाणघेवाण सुरू झाली, गप्पा सुरू झाल्या आणि मी गुंतत गेले माझ्या नकळत…
आमच्या भेटीगाठी सुरू झाल्या. एकदा रविवारी मी घरी बोलावलं नीलेशला जेवायला आणि सागरला त्याची ओळख करून दिली. नीलेश, सचिन तेंडुलकरचं ‘Playing it My Way’ हे आत्मवृत्त घेऊन आला होता सागरसाठी. आमच्या बोलण्यातून हा धागा अचूक पकडला होता त्याने! पुस्तक बघताच सागर खुलला आणि मग दोघांच्या मनसोक्त गप्पा रंगल्या, सचिन या दैवताभोवती… किस्से, माहिती, आकडेवारी, मला अगम्य असा विषय. मी आपली स्वयंपाकात व्यग्र. बऱ्याच दिवसांनी मोकळा झालेला सागर पाहून ऊर भरून आला माझा. येणारे अश्रु कसेबसे थोपवले मी, पण सुखावले मनोमन!
आयपीएलच्या ‘मुंबई इंडियन्स’च्या एका सामन्याला नीलेश त्याला घेऊन गेला आणि अशा छोट्या छोट्या प्रसंगांमधून मग त्यांचं गुळपीठ होत गेलं. सागर त्याला नीलेश काका म्हणायचा. त्याचा जवळपास दुप्पट वयाचा मित्र! माझ्यापेक्षा, तेच जास्त एकमेकांच्या जवळ येत गेले. मी परत एकदा एकटी पडल्यासारखी झाले. नाही म्हणायला माझं वाचन, थोडंसं समाजकार्य होतं माझ्या सोबत, पण एकटेपणा जाणवत राहायचा कायम, कुठेही गेलं तरी!
हेही वाचा – वेंधळेपणा, पुन्हा एकदा!
एकदा ऑफिसमधून निघाल्यावर, कॉफी घेताना नीलेशने मला लग्नाबद्दल विचारलं आणि मी एका नव्या वावटळीत सापडले. त्याला काहीतरी मोघम उत्तर देऊन घरी आले. पुढचे काही दिवस मी अस्वस्थ, विचलित आणि सैरभैर होते… एवढा मोठा दहावीतला मुलगा आणि मी परत संसारात अडकणं, याकडे समाज कुठल्या दृष्टीने बघेल हे मला उमगत नव्हतं. इकडे आड तिकडे विहीर कशाला म्हणतात, त्याचा प्रत्यय येत होता मला.
दोन जीवलग मैत्रिणींशी बोलले आणि त्या म्हणाल्या, “तुझ्या मनाचा आणि सागरचा कौल महत्त्वाचा. लोक काय म्हणतील याला किंमत द्यायची काही एक गरज नाही! तुला वाटत असेल नीलेश योग्य आहे आणि त्याच्या घरच्यांची तयारी असेल तर टाक पाऊल पुढे.”
नीलेश म्हणाला, “सागरशी आपण दोघे एकत्र आणि सविस्तर बोलू. बघू काय म्हणणं आहे त्याचं. प्रथम त्याची दहावीची परीक्षा होऊन जाऊदे.”
मला कौतुक वाटलं त्याच्या समंजसपणाचं.
दहावीची परीक्षा झाली आणि आम्ही सागरशी बोललो, या विषयावर. मला वाटलं होतं, तो त्रागा करेल, आदळआपट करेल, अद्वातद्वा बोलेल, पण असं काहीच झालं नाही! आमचं बोलणं अतिशय शांतपणे ऐकून घेतलं त्याने आणि खांदे उडवत, एकही शब्द न बोलता तो निघून गेला त्याच्या खोलीत…
हाच प्रस्ताव नीलेशने त्याच्या घरी पण ठेवला आणि मी त्याच्या घरच्यांना भेटून आले. थोडीशी खळखळ झाली, पण सरतेशेवटी गंगेत घोडं न्हालं!
अडनिडया वयाचा सागर आणि त्याची मानसिक तयारी, हाच एक मोठा प्रश्न होता, पण नीलेशनी अगदी सावकाश हातांनी त्याच्या भावनांचा गुंता सोडवला आणि त्या दोघांच्या नात्याला एक वेगळाच आयाम प्राप्त झाला.
सागर उत्तम गुणांनी दहावी उत्तीर्ण झाला. त्याला सीए व्हायचं होतं, त्याच्या बाबांसारखं! म्हणून कॉमर्स कॉलेजला प्रवेश घेतला. या सगळ्यात नीलेश आणि सागर आणखी जवळ आले.
तो बारावी झाला आणि मग एकदा स्वतःहूनच म्हणाला, “कधी करताय मग लग्न तुम्ही?” आश्चर्याचा सुखद धक्काच बसला मला. “खरंच करा तुम्ही, माझी काहीच हरकत नाहीये.”
हेही वाचा – कोंड्याचा मांडा… लेकीने खास बाबासाठी केलेला!
पुढच्या सगळ्या बाबी मग पटापट पुढे सरकल्या आणि आज सागर, फॉर्म्सवर सह्या घेऊन, धावपळ करून, स्वतःच्या आईचंच लग्न लावत होता!
सह्या करताना, हा अवघा प्रवास माझ्या डोळ्यांसमोरून झरझर सरकत गेला आणि पाणावल्या डोळ्यांनी मी बघत राहिले माझ्या लेकाकडे. माझ्या नव्या आयुष्याची सुरुवात आणि त्यात सागरचं अबाधित स्थान, सुखावत होतं मला.
खरंच असंही घडू शकतं आयुष्यात? मी स्वतःलाच चिमटा काढून, वास्तवात असल्याची खात्री करून घेतली. मी, नीलेश आणि सागर, एक नवं नातं उदयाला येत होतं, आजपासून! ते यशस्वी होईल, का भोवऱ्यात सापडेल? हे आता काळच ठरवणार होता.


