अजित गोगटे
गेल्या आठवड्यात मी माझा विनातिकीट लोकलचा प्रवास आणि त्याबद्दलची माझी मते लिहिली होती. काहीजण या संदर्भात आणखी एक मुद्दा मांडतात. ते म्हणतात की, रेल्वे सरकारची म्हणजे लोकांचीच आहे. लोकांनीच महसूल बुडविला तर, सरकारचा गाडा कसा चालणार? त्यामुळे सरकारला प्रामाणिकपणे महसूल देणे, हे नागरिक म्हणून लोकांचे कर्तव्य आहे. पण प्रश्न असा आहे की, स्वत:चा महसूल बुडू नये, याची रेल्वेला आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनाच जर फिकीर नसेल तर नागरिकांकडून तरी प्रामाणिकपणाची अपेक्षा कशी आणि किती ठेवता येईल?
रेल्वेला स्वत:च्या महसूलाची चिंता नाही, या माझ्या म्हणण्याच्या पुष्ठ्यर्थ मी खाली काही अनुभव देत आहे. यातील काही अनुभव प्रत्यक्ष माझ्याबाबतीत घडलेल्या घटना आहेत. तर काही इतरांच्या बाबतीत, पण माझ्या समक्ष घडलेल्या घटना आहेत.
बच्चों का Fine नही लेते!
Jurassic Park हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला तेव्हाची गोष्ट. त्या चित्रपटाच्या जाहिराती वृत्तपत्रात यायच्या आणि त्यात डायनोसॉरचे चित्र ठळकपणे असायचे. माझा मुलगा तेव्हा लहान होता. त्याला सफाईदारपणे वाचता येत नव्हते, पण चित्र पाहून त्याला समजायचे. त्याने ती जाहिरात पाहिली आणि ते काय आहे? असे विचारले. मी त्याला चित्रपटाविषयी माहिती दिली. तो चित्रपट पाहण्यासाठी मागे लागला. परंतु चित्रपट हॉलिवूडचा असल्याने त्याला त्यातील इंग्रजी संवाद कळणार नाहीत, असा विचार करून मी त्याची समजूत काढली.
काही दिवसांनी हिंदीमध्ये ‘डब’ केलेला तो चित्रपट प्रदर्शित झाला. असा हिंदीमधील चित्रपट कल्याणजवळील विठ्ठलवाडी येथील श्रीराम टॉकिजमध्ये लागला होता. रविवारी सुट्टी होती, तेव्हा तो हिंदी चित्रपट दाखवायला मुलाला न्यायचे मी ठरविले.
हेही वाचा – कल्याण ते मुंबई : विनातिकीट रेल्वे प्रवास – एक चिंतन
रेल्वेने अंबरनाथ, कर्जत लाइनवर गेल्यास विठ्ठलवाडी हे कल्याणनंतरचे लगेचचे स्टेशन. स्टेशनवर गेलो तर तिकिटाला प्रचंड मोठी रांग होती. रांगेत उभे राहून तिकीट काढले तर, लोकल जाईल आणि चित्रपटही चुकेल, हे लक्षात आले. ‘एकच स्टेशन जायचे आहे. जाऊ या विनातिकिट. ‘टीसी’ आला तर भरू दंड’, असा विचार करून मुलाला घेऊन धावत लोकल पकडली. दोनच मिनिटांचा प्रवास असल्याने गर्दीतून डब्यात आत न जाता पॅसेजमध्येच उभा राहिलो. लोकल सुरू झाली आणि माझ्या बाजूलाच उभ्या असलेल्या ‘टीसी’ने तिकीट विचारले. मी तिकीट नसल्याचे सांगून 100 रुपयांची नोट त्याच्या हाती दिली.
तेवढ्यात विठ्ठलवाडी स्टेशन आले. ‘टीसी’ आम्हाला सोबत घेऊन खाली उतरला. त्याने दंडाची पावती बनवून माझ्या हाती दिली. ती 52 रुपयांची होती. (50 रुपये दंड आणि दोन रुपये प्रवासाचे भाडे)
यावेळी मी आणि टीसी यांच्यात काहीसा असा संवाद झाला :
मी : गाडी व्हीटी से आयी थी. फिर भी आपने सिर्फ कल्यान से विठ्ठलवाडीतकही किराया क्यों लिया?
टीसी : गाडी व्हीटी से आयी थी, पर आप तो कल्यान में गाडी में चढे!
मी : आप या पॅसेंजर कुछ भी कहें. लेकिन रूल के मुताबिक आप को गाडी जहाँ से आयी वहाँ से किराया लेना चाहिये. आप उतना किराया लीजिये.
टीसी : आप जंटलमन है, इसलिये यह कह रहे हे. लेकिन आप मेरे साथही कल्यान से गाडी में चढे, यह मैंने खुद देखा है. इसलिये मैं आपसे व्हीटी से किराया नहीं वसूल कर सकता.
मी : आपने सिर्फ मेरा फाइन लिया है. लेकिन मेरा लडका भी मेरे साथ है. उसका भी पूरा फाइन और आधा किराया आप लीजिये.
टीसी : बच्चा छोटा और नासमझ है. आपने बिनाटिकट लाया इसलिये वह आया. अपने मर्जी से वह बिनाटिकट नहीं आया.
मी : आप कह रहे हैं वह बिलकूल सही हैं. इसीलिए बच्चे का भी फाइन और किराया ले लो, ऐसा मेरा कहना है.
टीसी : आपने कहा ठीक है. लेकिन मैं बच्चे का फाइन नहीं ले सकता.
शेवटी त्या टीसीने आधीची पावती रद्द करून नवी बनवायला लागेल, अशी सबब सांगून, होती तीच पावती आणि राहिलेली रक्कम मला दिली. माझ्या एकूण बोलण्यावरून कुतूहल वाटल्याने त्याने मला, ‘आप क्या करते हो?’, असे विचारले. ‘मै इंडियन एक्स्प्रेस ग्रुप के मराठी अखबार का रिपोर्टर हूँ,’ असे मी उत्तर दिले. तो टीसी सिंधी होता आणि उल्हासनगरला राहणारा होता. माझे उत्तर ऐकून तो म्हणाला, ‘मेरे साले भागू तरनेजा इंडियन एक्स्प्रेस के उल्हासनगरके रिपोर्टर है. आप पहले बताते तो मैं बनाया वो रिसीट भी नहीं बनाता.’
यावरून त्या टीसीने मी पैसे द्यायला तयार असूनही नियमानुसार दंडवसूली न करून रेल्वेचा महसूल बुडविला, हे स्पष्ट दिसते. शिवाय ‘मी प्रेस रिपोर्टर आहे’, असे सांगितले असते तर विनातिकrट असूनही माझ्याकडून अजिबात दंड न घेण्याचीही त्याची तयारी होती.
हेही वाचा – नातवंडांचे वजन करणारे आजोबा!
नियम बाजूला ठेवून मनमानी
विनातिकीट प्रवास करण्याच्या 12 वर्षांच्या कालखंडातच एकेवर्षी देशाच्या प्रजासत्ताक दिनी म्हणजे 26 जानेवारी रोजी मी ऑफिसला जाताना तशाच पद्धतीने कल्याण ते व्हीटी हा प्रवास केला. लोकल रिकामी होती आणि दादरच्या पुढे तर डब्यामध्ये मी एकटाच प्रवासी होतो. गाडी मस्जिद बंदर स्टेशनमधून सुटत असताना टीसी डब्यात चढला. त्याने मला तिकीट विचारले. मी पाकिटात बाजूला काढून ठेवलेली 100 रुपयांची नोट त्याला दिली. तोपर्यंत व्हीटी स्टेशन आले. आम्ही दोघे गाडीतून खाली उतरलो. आधीच्या प्रसंगाप्रमाणे याही वेळी टीसीने मला 54 रुपयांची पावती बनवून हातात दिली. त्याने 50 रुपये दंड आणि दादरपासूनचे तिकिटाचे पैसे अशा रकमेची पावती बनविली होती. गाडी कर्जतहून आली होती. त्यानुसार कर्जतपासूनचे भाड्याचे पैसे घ्यावे, असा मी आग्रह धरला. परंतु टीसीने तसे केले नाही.
या टीसीच्या शर्टावर ‘नेम बॅज’ लावलेला नव्हता. त्यामुळे मी त्याचे नाव विचारून घेतले. ऑफिसात जाऊन मध्य रेल्वेच्या मुख्य विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांच्या (Chief Divisional Commercial Manager) नावे, तुमच्या टीसीने रेल्वेचा महसूल कसा बुडविला याचा तपशील देऊन त्याच्यावर कारवाई करण्यची मागणी करणारा अर्ज तयार केला. दुसर्या दिवशी तो अर्ज रेल्वेच्या संबंधित ऑफिसात देऊन रीतसर पोच घेतली. त्यानंतर सहा महिने मी पाठपुरावा केला. परंतु त्या टीसीवर कोणतीही कारवाई केली गेली नाही.
प्रवाशाने सांगूनही न ऐकणे
एकदा बोरिबंदर स्टेशनमधून बाहेर पडत असताना टीसीने मला तिकिट विचारले. अर्थात, माझ्याकडे तिकीट किंवा पास नसल्याने मी दंडाची रक्कम त्याला दिली. या टीसीने मात्र 68 रुपयांची पावती बनविली. यात 50 रुपये दंड आणि गाडी अंबरनाथहून आली होती म्हणून तिथपासूनचे दुसर्या वर्गाचे भाडे 18 रुपये होते. मी पहिल्या वर्गाने आलो, त्यामुळे दंडाखेरीज माझ्याकडून पहिल्या वर्गाचे भाडे घ्या, असे मी सांगूनही टीसीने तसे केले नाही.
(क्रमश:)