आपण सध्या अशा जगात राहतोय जिथे नाती ही ‘सोय’ झाली आहेत. जिथे एकमेकांमध्ये मनापासून गुंतण्यापेक्षा व्यवहार महत्त्वाचा झालाय. प्रत्येक गोष्टीचा तोल सांभाळून आणि स्वतःला केंद्रस्थानी ठेवूनच इथे पावलं टाकली जातात. एखादं नातं ‘वर्क’ होत नसेल, तर लगेच ‘मूव्ह ऑन’ करून दुसऱ्या नात्यात गुंतणं आजच्या पिढीला फारसं कठीण वाटत नाही. पण या व्यावहारिक जगाच्या समांतर अजून एक जग चालतं — पुस्तकांच्या पानांमधलं जग. कधी कधी बाहेरच्या जगापेक्षा हे पुस्तकाचं जग विलक्षण वाटतं, कारण ज्या जाणीवा आपण उघड्या डोळ्यांनी बाहेरच्या जगात अनुभवू शकत नाहीत, त्या ही पुस्तकं आपल्याला अनुभवायला लावतात. गीत चतुर्वेदी यांची ‘सिमसिम’ ही हिंदी कादंबरी वाचताना नेमकी अशीच अनुभूती येते.
सामान्यतः आपल्याला काय वाटतं की, प्रेम करण्यासाठी काय लागतं? समोरची व्यक्ती आपल्या मनाप्रमाणे असावी, आपल्याला आवडेल तशी ती वागावी, दिसावी आणि तिच्यासोबत भविष्याची स्वप्नं पाहता यावीत. पण प्रेम करण्यासाठी खरंच समोर ती व्यक्ती असणं गरजेचं असतं का? ‘सिमसिम’ आपल्याला एका अशा उत्कट प्रेमाची कथा सांगते, जिथे प्रेम ही केवळ एक ‘भावना’ रहात नाही, तर ते जगण्याचं ‘साधन’ बनतं.
हेही वाचा – ती अन् तिचं स्वतंत्र अस्तित्व!
या कथेचा नायक आहे — बसरमल जेठाराम पुरस्वानी. फाळणीनंतरच्या त्या विस्थापनाच्या आणि सिंधमधून निर्वासित म्हणून भारतात येण्याच्या काळातील विदारक जखमा काळजात घेऊन आलेला तरुण बसरमल आज एका छोट्याशा लायब्ररीत आपले शेवटचे दिवस काढतोय. तो सध्या स्मृती आणि विस्मृतीच्या अशा सीमेवर उभा आहे, जिथे एखादी गोष्ट आठवली की, त्याला वाटतं— “हे खरंच घडलं होतं की, ही केवळ माझी कल्पना आहे?” विस्मृतीचा पगडा इतका जोरदार आहे की, त्याला त्याच्या पहिल्या प्रेमाचं नावही नीट आठवत नाहीये.
त्याला तिचा चेहराही आता नीटसा आठवत नाही, पण त्याच्या आयुष्यात असलेलं तिचं अस्तित्व मात्र त्याला पावलोपावली जाणवतं. भविष्यात तिला भेटण्याची कोणतीही चिन्हं नाहीत, इतकंच काय तर ती जिवंत असल्याचेही काही संकेत नाहीत; पण तरीही ती त्याच्यासाठी संपलेली नाही. त्याला आठवतोय तो फक्त तिच्या हाताला येणारा पेरूचा तो गोड वास आणि म्हणूनच तो तिला ‘जाम’ असं संबोधतो.
ही कहाणी मुळात एका असीम संघर्षाची आणि विस्थापनाच्या आघातांची आहे. फाळणीच्या त्या काळात मानवी नाती विखुरली गेली, रक्ताची माणसं दुरावली आणि हक्काच्या घरापासून कायमचं वेगळं होण्याचं मरणप्राय दुःख लोकांनी सोसलं. या विरहाच्या छटा, स्थलांतराचा तो काळ आणि सर्वस्व गमावल्याची ती वेदना… इतके सगळे गडद रंग या कादंबरीत असतानाही, बसरमलची एक अतिशय धूसर आणि अस्पष्ट वाटणारी प्रेमसंवेदना इथे प्रकर्षाने हायलाइट होते. जगण्याचं ओझं वाहत असतानाही एका कोपऱ्यात जपलेली ही नाजूक आठवण, या संघर्षमयी कथेला एक वेगळीच उंची देते.
बसरमलच्या शेवटच्या दिवसांमध्ये जेव्हा आयुष्यातला संघर्ष त्याला नकोसा होतो, तेव्हा तो याच कल्पना विश्वात ‘जाम’सोबत आपले क्षण घालवतो. इथे कोणतीही तक्रार नाही, कशाची अपेक्षा नाही की, काही मिळवण्याची जिद्दही नाही. ज्या व्यक्तीवर त्याने जिवापाड प्रेम केलं, ती आज या जगात नाही, याचा शोकही त्याला नाही. त्याचं प्रेम मिळवण्याच्या पलीकडे गेलं आहे.
हेही वाचा – सारंग आणि चित्रा यांच्या नात्यातील धुसर छटा…
कादंबरीत एक सुंदर प्रसंग आता येतो, जिथे पुस्तकातलं एक पात्र बसरमलला म्हणतं, “तू जे काही गमावलं आहेस, ते तुला पुस्तकांमध्ये सापडेल.” या एका वाक्याने बसरमलचं आयुष्य बदलतं. तो पुस्तकांवर जिवापाड प्रेम करू लागतो, जणू त्या शब्दांच्या अरण्यात तो आपली हरवलेली ‘जाम’ शोधत असतो.
या पुस्तकातली दुसरी हळवी व्यक्तिरेखा म्हणजे बसरमलची पत्नी— मंगण माँ. तिचं प्रेम तर अथांग आहे. जो मुलगा कधी जन्मालाच आला नाही, त्याच्या प्रेमात ती वेडी झाली आहे. एका साध्या बाहुल्याला ती आपला मुलगा मानते आणि त्याला जीवापाड जपते. तिचं हे वेड वाचताना जाणवतं की, प्रेम हे केवळ दोन व्यक्तींमधलं नातं नसतं, ते एका न पाहिलेल्या अस्तित्वावरही किती उत्कट असू शकतं.
कधी कधी बसरमलकडे पाहताना वाटतं की, तो भूतकाळाच्या पिंजऱ्यात अडकलेला एक पक्षी आहे, जो या व्यावहारिक वर्तमानात स्वच्छंद उडू शकत नाही. पण काही भावना अशा असतात ज्या कुठल्याही नफा-तोट्याच्या पलीकडे असतात. बसरमलसाठी त्याचं न मिळालेलं प्रेम हे दुःख नाही, तर त्याचं जगण्याचं बळ आहे. ‘सिमसिम’ हे पुस्तक प्रेमाच्या प्राप्तीपेक्षा ‘प्रतीक्षेचा उत्सव’ साजरा करणारं पुस्तक वाटतं.
कितीही काळ लोटला तरी खऱ्या प्रेमाला विस्मृती कधीच मारू शकत नाही. वेळ आणि काळ यापैकी कशातच प्रेमाला संपवण्याची ताकद नसते. त्या प्रेमाच्या खुणा उरल्या असोत वा नसोत, त्या प्रेमाची गाथा कुठे लिहिली गेली असो वा नसो; मनाच्या कोपऱ्यात जपलेलं असं निस्सिम प्रेम हे नेहमी अमरच राहतं.
सच्चा प्रेम
“याद है, एक बार तुमने कहा था
‘ये पुराने प्रेम में रंगे काग़ज़ जल भी जाएँ तो क्या?
कथाओं का अंत ही तो नई कहानियों का आरंभ होता है।’
मगर मैं कैसे कहूँ तुमसे…
कि सच्चे प्रेम की प्रकृति,
फिनिक्स जैसी होती है
जो अपनी ही राख से पुनः जीवित होता है।
इनकी गाथाएँ न समय की मोहताज होती हैं, न लेखनी की।“



2 Comments
नेहमीप्रमाणेच छान लिहिलं आहेस 👌👌
मनःपूर्वक धन्यवाद 😊