“श्रावणी अगं झालीस का तयार? चल बाई, येतीलच आता मुलाकडचे इतक्यात.”
श्रावणीची आई वसुधाताई हाका मारून दमल्या होत्या… आणि खरं सांगायचं तर, त्या कंटाळल्याही होत्या. श्रावणीच्या लग्नासाठी खूपच जोडे झिजवावे लागत होते त्यांना. श्रावणी जगताप आता जवळजवळ 32 वर्षांची झाली आहे. तिला प्रेमविवाह करायचा नाहीये आणि ठरवून केलेल्या लग्नासाठी पण तिच्या दोनच अटी आहेत. मुलगा तिच्या स्वभावाला साजेसा असावा आणि दुसरी महत्त्वाची अट म्हणजे तिच्या आईला सांभाळणारा असावा. या अटीमुळे तिचं लग्न काही जुळता जुळत नाहीये.
यावेळी मात्र वसुधाताईंनी दोन दिवस आधी तिला जवळ बसवून सांगितलं, “अगं श्रानू अशी अट घालशील तर, कायमच माझ्यासोबत रहायला लागेल बिनालग्नाचं! अगं, लोकं मला बोलतात सगळ्या बाजूंनी. मुलगी जास्तीच अपेक्षा ठेवून आहे, असं म्हणतात. किती जणांना आणि कसं तोंड दाखवायचं मी. तुला त्याचं काहीच नाही. अगं, अशी मुलीची आई येऊन रहाते का तिच्या घरी? रीतीला धरून नाहीच आहे हे… आणि मलाही अजिबात मान्य नाही, हे मी किती वेळा सांगितलं आहे तुला. पण तुला त्याचं काहीही नाही.”
श्रावणी नुसतीच हसली आणि म्हणाली, “आई, मी बाबांना जाताना वचन दिलं आहे आईचा तिच्या शेवटपर्यंत कायम सांभाळ करेन. शिवाय, मलाही काळजी वाटते गं तुझी. यात काय चूक आहे? आणि नाहीच झालं लग्न तर राहू की, मग आपण दोघी. काय हरकत आहे. हे बघ मी लग्नाला नाही म्हणतच नाहीये. फक्त माझी अट बदलायला मला लावू नकोस. अगं, मी कुठे म्हणतेय आपण एका घरात रहायचं. पण निदान माझ्या घराजवळ तरी रहावं माझ्या आईने, ही एवढीच अट आहे. मला जर दोन्ही घरं सांभाळायची असतील, तर काय वाईट आहे त्यात?”
हेही वाचा – कौटुंबिक कथा… ‘सुखस्वप्न’
श्रावणी साधासा पण तिच्यावर खुलून दिसणारा आंबा रंगाचा ड्रेस, त्यावर साधंच गळ्यातलं आणि साजेशी केशरचना करून समोर आली आणि वसुधाताईंची तंद्री भंगली. तिच्याकडे बघत मनातल्या मनात वसुधाताई म्हणाल्या, “सावळी असली तरी किती देखणी आहे माझी लेक. अगदी साधी, सरळ आणि मनमिळावू. नोकरी करत असली तरीही कसलाच बडेजाव नाही, की मी किती कमावते, हा माज नाही. नाहीतर आजकालच्या मुली म्हणजे कमवायचं किती आणि दाखवायचं किती… काही हिशोबच नाही. शिवाय, माझ्यासाठी पण किती करते! स्वयंपाक तर अगदी उत्तम करते. तिच्याच नशिबात का, असं आहे कोण जाणे? यावेळी तर येणारा मुलगा जास्त शिकलेला आहे. जर्मनीवरून पीएचडी करून आला आहे म्हणे. जरा शिक्षणाचा अंकुश जास्तच असेल. म्हणजे तर काय बघायलाच नको! अशी जगावेगळी अट कशी मान्य करतील ते.” पण तरीही वसुधाताई नेहमीप्रमाणेच अगत्य करायला तयार होत्या. थोडावेळ गेल्यावर शशांक पोवारकडची मंडळी आली. मुलगा, आणि त्याचे आईवडील होते.
इकडच्या तिकडच्या गप्पा, खाणं-पिणं झाल्यावर जरासा मोकळेपणा पाहून श्रावणीने तिच्या दोन्ही अटी अगदी हळुवारपणे मुलाकडच्यांना सांगितल्या आणि मुलाकडचे एकमेकांकडे बघतच बसले. त्यावर वसुधाताई मात्र लेकीची बाजू सावरून घेत म्हणाल्या, “माझी श्रावणी ना माझ्यासाठी खूप हळवी आहे म्हणून असं म्हणतेय. संसारात रुळली ना, की हे खूळ जाईल अहो निघून तिचं… आणि ती कितीही म्हणाली तरी मी नाही अहो अशी येऊन राहणार. शेवटी जावयाकडे मी तरी कशी राहीन. तुम्ही नका काळजी करू मी समजावेन तिला. पण फक्त या कारणासाठी तिला नकार देऊ नका.”
आता मात्र शशांक शांत बसला नाही. शशांक तसा बोलका, सावळ्याहून सावळा पण नाकीडोळी उत्तम, स्मार्ट आणि मुख्यतः माणसांमध्ये रमणारा! तो कायमच जिथे जाईल तिथे माणसांच्या घोळक्यात असायचा. इतका की, त्याची आई हसत म्हणायची ही, “शशू तुला शक्य असतं ना, तर तू अख्खं जगच आपल्या घरात आणून ठेवलं असतंस.” या त्याच्या स्वभावामुळे तर त्याचं लग्न पण जमत नव्हतं. कारण, आजकाल मुलींना मुलाचे आईवडील सुद्धा नकोसे असतात तर बाकीची माणसं तर दूरच…! पण आत्ता तर शशांकला श्रावणीचा फोटो बघताक्षणी आवडला होता. त्यामुळे त्याने लगेचच श्रावणीकडे बघून सांगितलं, “मला तुझ्या अटी मान्य आहेत. मी लग्नाला तयार आहे.”
वसुधाताई अवाकच झाल्या. अटी मान्य आहेत असं म्हणणारा मुलगा त्यांच्या मते या जगात नाहीच आहे. त्यावर सगळेच शांत आहेत बघून पुन्हा शशांकच म्हणाला, “श्रावणीची आई, अहो तुम्ही तिची आई असलात तरी माझ्यासाठी पण लग्नानंतर आईच आहात ना? मुलगी मोठी झाली, तिचं वय वाढलं आणि जगाचे अनुभव घेतले की, आयुष्याच्या एका वळणावर तिला आईचा हात सोडून जायची भीती वाटते. त्यात ती तुमची एकुलती एक आहे. त्यामुळे तुमची सगळी जबाबदारी तिच्यावर आणि थोडक्यात लग्न झाल्यावर माझ्यावर आहे. मी माझ्या आई-वडिलांना तिच्यावर थोपवायचं आणि तिच्या आईवडिलांची जबाबदारी झटकायची यात कसला आला पुरुषार्थ? आणि त्याने आमच्यामधलं प्रेम वाढेल का? मी तिच्या भावनांचा आदर नाही केला तर, ती माझ्या आई-वडिलांना मान देईलच हे कशावरून… त्यामुळे मी तयार आहे या अटींना. तुम्हाला एका घरात रहायचं नसेल, तर आपण जवळच घर घेऊ, पण एकत्र गुण्यागोविंदाने राहू.”
हेही वाचा – गुलकंद
त्यावर शशांकची आई पण स्मित करत म्हणाली, “हो, आम्हालाही हे मान्य आहे वसुधाताई. अहो, शिक्षणाने माणूस शिकला नाही, तर काय उपयोग. आम्ही सगळे एकत्र कुटुंब पद्धतीत राहिलेलो आहोत. त्यामुळे या जुन्या खुळचट कल्पना आता विसरून पुढे जाऊयात… आणि अहो, अजून एक गंमत म्हणजे मी माझ्या सुनेच्या कागाळ्या तुम्हाला करेन तशा तुम्ही तुमच्या जावयाच्या कागाळ्या मला करा. म्हणजे आपला वेळ पण छान जाईल…” असं त्या म्हणताच सगळे हसायला लागले.
वसुधाताई तर आनंदाने रडायलाच लागल्या. त्यांनी एकवार श्रावणीकडे बघितलं आणि म्हणाल्या, ” आज माझा विश्वास दृढ झाला. जगात प्रत्येकासाठी कुणी ना कुणी जोडीदार देवाने बनवलेला असतोच. फक्त तो समोर येण्यासाठी वाट पहायला लागते. शिक्षण माणसाला हुशार करते तसं सारासार विवेकबुद्धी पण देते. तुझी इच्छा पूर्ण झाली श्रावू… चला आता लग्नाच्या तयारीला लागते मी…” हे ऐकून श्रावणी लाजली. आणि मनोमन म्हणाली, “आज खऱ्या अर्थाने बाबांच्या आत्म्याला शांती मिळेल.” श्रावणीने वडिलांच्या फोटोकडे पाहिलं. तो संध्याकाळच्या वेळी सुद्धा उजळून निघालाय असा भास तिला झाला.


