ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांच्या ‘अफगाण डायरी -काल आणि आज’ या पुस्तकाची पहिली आवृत्ती 1982 साली प्रसिद्ध झाली आणि आता सातवी आवृत्ती प्रसिद्ध झाली आहे. पुस्तक दोन भागात आहे. 1982 ते 2026 या कालावधीत अफगाणिस्तानात बऱ्याच घडामोडी झाल्या. तालिबानची सत्ता आल्यावर तिथे जे बदल घडले, ते समाज माध्यमांवर पाहिले, ऐकले. अफगाणिस्तानबद्दल कुतूहल वाटत होतं. अगदी शेजारचा देश, एकेकाळचा आपल्या देशाचा भाग असलेला, पण एवढा फरक? का झालं असेल असं?
कालचा अफगाणिस्तान…
“आम्हाला कसला आलाय इतिहास? आमचा इतिहास म्हणजे फक्त बाहेरच्या लोकांची एकापाठोपाठची आक्रमणं, त्यांनी केलेली लुटालूट आणि माऱ्यामाऱ्या… अभिमानानं सांगावं असं इथं काय घडलंय?” काबूल युनिव्हर्सिटीमध्ये काम करणारे इतिहासाचे प्राध्यापक विषण्णपणे लेखिकेला म्हणाले. हे वाक्य वाचल्यावर मला ‘फरक का?’ ते लगेच कळलं आणि इतका समृद्ध हजारो वर्षांचा वैभवशाली, गौरवशाली इतिहास असलेल्या भारत देशाची नागरिक असल्याबद्दल अभिमान वाटू लागला. अफगाणिस्तान म्हटलं की, पहिल्यांदा मनात येतो, तो सोमनाथाचं मंदिर फोडणारा गझनीचा महम्मद, हिंदुकुश पर्वत आणि बामियानच्या बुद्धमूर्ती. गझनीच्या महम्मदाबद्दल लेखिका लिहिते, काळानुसार देश, धर्म, संस्कृतीबद्दल वाटणाऱ्या संवेदनांचा तीव्रपणा कमी होतो, तरीसुद्धा शब्दांच्या चौकटीत न मावणाऱ्या ‘आपलेपणा’बद्दलचा आपलेपणा जात नाही. हे पुस्तक वाचताना सर्वात मोठे आव्हान हा आपलेपणा आणि सात्विक संताप बाजूला ठेवून केवळ इतिहास वाचायचा, हे आहे. थोडे कठीण आहे, हे निश्चित.
अफगाणिस्तानातल्या स्त्रियांच्या स्थितीबद्दल लेखिकेने पोटतिडकीने लिहिले आहे. त्यांची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमानुल्ला आणि सरय्याला त्रास सहन करावा लागला आणि स्त्री पुन्हा बुरख्यात गेली. राजेशाही झुगारून लोकशाही तीही नावापुरती यायला विसाव्या शतकाचा उत्तरार्ध आला… आली तीही हास्यास्पद वाटावी अशी! क्रांती होते याबद्दल आपण ऐकलेलं आहे, पण लेखिकेने स्वत: पाहिली आहे. बॉम्ब पडणे, नळकांडी उडणे हे फक्त वाचून माहीत असते. त्यावेळी किती भीती वाटत असेल! अफगाणी लोकांचे सुप्रसिद्ध नेते बादशहाखान त्यांच्या घरी आले होते. अफगाण लोकांना अहिंसा शिकवणारा हा नेता होता. अफगाणिस्तानात कुठलाही बदल किंवा सुधारणा करणे अवघड होते, कारण धर्माच्या विरुद्ध जाण्याची खूप भीती होती. त्यामुळे कम्युनिस्ट राजवट आल्यावर बदल हळूहळू घडवून आणायचा प्रयत्न सुरू झाला. यात रशियन लोकांची संख्या वाढत गेली. हा धोका स्थानिकांच्या लक्षात आला. इथे राज्यकर्ता बदलला की, राष्ट्रध्वज बदलतो! हे अजबच आहे.
हेही वाचा – आठवणींचा एक कोपरा हळुवार उघडणारी… ‘शाळा’
रशियनांनी या देशात घुसखोरी केल्यावर अफगाणी लोकांना गुदमरल्यासारखे वाटू लागले. तीन दिवसांत मोठ्या संख्येने रशियन विमाने आली आणि शस्त्रे दारुगोळा तसेच सैनिक अफगाणिस्तानात उतरवले. याची कानोकान खबर कोणाला लागली नाही. फक्त अमेरिकन घसा खरवडून सांगत होते. अमीन, तराकी, बरबक वगैरे राज्यकर्ते परकीयांशी लढण्याचे सोडून एकमेकांना मारण्यात गुंतले होते. एकाने लेखिकेला दंतकथा सांगितली – नेपोलियनने अफगाणिस्थानवर स्वारी करण्यापूर्वी त्याच्या आईला सांगितले नव्हते त्यामुळे ती रागावली. त्याने अफगाणिस्तानातली माती तिच्यासमोर पसरून त्यावर त्याच्या अधिकाऱ्यांना चालायला सांगितले. त्याबरोबर ते एकमेकांशी भांडू लागले. असा दुहीचा गुण या मातीत आहे!
जुलमी राज्यकर्त्यांनी मग ते स्थानिक असोत की रशियन, लोकांना पकडून तुरुंगात टाकले. बायका मुलींना सुद्धा टाकले. रशियन लोकांनी कालांतराने स्त्रियांना सोडले, त्यावेळी त्यापैकी 80 टक्के स्त्रिया गरोदर होत्या. त्यांची ‘सोय’ लावण्यासाठी दवाखाने उघडले. स्थानिक लोक त्यांच्याशी लग्न करायला तयार झाले, कारण पैसे न देता बायको मिळणार होती! तुरुंगात टाकलेल्या हजारो लोकांवर अनन्वित अत्याचार झाले. अम्नेस्टीचे लोक येणार होते त्यावेळी मोजक्या कैद्यांना तुरुंगात ठेवून बाकीच्यांना कडाक्याच्या थंडीत डोंगरात पाठवून दिले होते. एकदा एका भारतीय व्यक्तीच्या घरी रशियन सैनिक घुसले आणि पहाटेपर्यंत पीत राहिले. तेव्हा दूतावासानेसुद्धा मदत केली नाही. सकाळपर्यंत त्याला नर्व्हस ब्रेकडाऊन झाला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अफगाणिस्तानात अधिकारी पाठवून पाहणी करायचा प्रयत्न केला, कारण स्थानिकांच्या मनात भारतीयांबद्दल आस्था होती. तेव्हा ब्रेझनेवनी असे करण्यास मनाई केली. अफगाणिस्तान जणू त्यांचा झाला होता. मार्क्सवादाचा प्रसार जोरात सुरू केला होता. धर्म मानणाऱ्या अफगाणी लोकांना मार्क्सवाद पचनी पडत नव्हता.
पुस्तकाचा दुसरा भाग – ‘अफगाण डायरी आज’ यात वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांबद्दल लिहिले आहे. यात बबरक कारमल, रब्बानी, अहमदशाह मसूद वगैरेंची माहिती आहे. आपले लक्ष जाते ते ओसामा बिन लादेन आणि जवाहिरीकडे! ओसामा बिन लादेन गरीब कुटुंबातला होता. नंतर त्याच्या वडिलांनी अमाप पैसा कमवला, दहा लग्ने केली आणि लादेनला त्रेपन्न सावत्र भावंडे होती. लादेनबद्दल वाचताना दहशतवाद वाढीला लागण्याची कारणे स्पष्ट होतात. रशियन घुसखोरीमुळे अफगाणिस्तानला इतर देशांची येणारी मदत बंद झाली. अफूचा व्यापार वाढला. गालीचा बनवण्याचा उद्योग बंद पडला. अर्थव्यवस्था डबघाईला आली. रशियनना मारण्याचे प्रमाण वाढले. मुजाहिद्दीनच्या क्रौर्याची दहशत निर्माण झाली. अफगाणिस्तानमुळे रशियावर आर्थिक बोजा वाढला. अन्न तुटवडा झाला. रशियन नागरिक सरकारला प्रश्न विचारू लागले. आता रशियाची अवस्था ‘न निगलते बनता, न उगलते बनता’ अशी झाली. शेवटी 1989 साली रशियाने काढता पाय घेतला. अलकाइदाची (अलकायदा नाही) स्थापना कशी झाली याचे विस्तृत विवरण केले आहे.
लेखिकेने बारकाईने तथ्य समजावून सांगितले आहे. राजकारणात घडलेल्या घटनांचा अर्थ लावला आहे. गुंतागुंतीचे अंतरराष्ट्रीय राजकारण त्यांनी अभ्यासले आहे आणि सोपे करून सांगितले आहे. दहशतवादी संघटना, अमेरिका आणि पाकिस्तान यांचे लागेबांधे, रशिया अमेरिकेचे शीतयुद्ध, दहशतवाद्यांचे प्रशिक्षण याबद्दल वाचताना वैषम्य वाटते. रशियाने अफगाणिस्तानातून निघून जायचा निर्णय घेतल्यामुळे अमेरिकेचा रस संपला आणि मुजाहिद्दींना मोकळे रान मिळाले. अमेरिकेवर त्यांचेच शस्त्र उलटले. पण यात भरडला गेला स्थानिक अफगाणी ज्याच्यासाठी ‘जो नान देईल तो’ त्याचा पक्ष होता. त्याला या राजकारणात काही रस नव्हता. पण यामुळे दहशतवादाचा राक्षस पोसला गेला.
तालिबान आले आणि त्यांनी स्त्रियांवर कडक बंधने घातली. पुरुषांवर सुद्धा अनेक बंधने आली. अफगाणी लोकांना फूटबॉल, चित्रपट, संगीताचं आणि अत्तान या लोकनृत्याचं वेड आहे. त्यावर बंदी आली. स्त्रियांच्या मेकप आणि कपड्यांवर सुद्धा बंधने आली. स्त्रियांना आकर्षक सुंदर दिसावे, असे नैसर्गिकरीत्या वाटत असते, त्यामुळे हा मोठा आघात होता. स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य मिळू नये म्हणून त्यांना नोकरी-व्यवसाय करण्यावर बंदी आली. ज्या कुटुंबात स्त्रियाच कमवत्या होत्या, त्यांची उपासमार झाली. शाळेत सत्तर टक्के शिक्षिका असल्याने शाळा बंद पडल्या. पण यातूनही काही जणांनी मार्ग शोधला. माणसाची जात मोठी चिवट आहे.
अफगाणिस्तानात कायद्याचे राज्य आले, शांतता स्थापित झाली; पण ती अशी! याला काय म्हणायचे? अमेरिकेतले ट्वीन टॉवर उडवण्याची घटना आपण कधीच विसरू शकणार नाही. लादेनने हे कृत्य का केले, याची पाळेमुळे या पुस्तकात सापडतात. मुरत जाणारा द्वेष, त्यातून आलेली सूडाची भावना, यापाठी असलेले राजकारण, स्वार्थी हेतू यात सामान्य माणसाचे जीवन अस्ताव्यस्त होते, त्यांना मोठी किंमत चुकवावी लागते. 2001 फेब्रुवारीमध्ये बामियानच्या बुद्धमूर्ती फोडण्याचे आदेश दिल्यावर जगभरातून प्रतिक्रिया आल्या, तीव्र विरोध झाला. भारतीय तंत्रज्ञांनी या मूर्तींचा जीर्णोद्धार केला होता, जे काम इतर कोणा तंत्रज्ञान्यांना जमले नव्हते. तालिबानने कोणाचेच ऐकले नाही. मूर्तींच्या खाली स्फोटके ठेवून बंदूका डागून मूर्ती नष्ट केल्या आणि पहाडात दोन मोठे खड्डे उरले. अत्यंत दुखदायक घटना आहे.
संग्रहालयातल्या मूर्तींची चोरून विक्री सुरू होती. अशाप्रकारे केवळ अफगाणिस्तानचा नव्हे तर, विश्वाचा ठेवा नष्ट झाला. बलाढ्य राष्ट्र आणि सुसंस्कृत नागरिक, मूठभर विनाशकारी लोकांचे काही बिघडवू शकले नाहीत. याचवर्षी अमेरिकेतले ट्वीन टॉवर उडवले गेले होते. राष्ट्राध्यक्ष बुश यांनी जगाची विभागणी दोन भागांत केली – दहशतवाद्यांना पाठींबा देणारे आणि विरोधी असणारे. यानंतरचा घटनाक्रम आपण पाहिलाच आहे. पाकिस्तानने मदत करण्याच्या नावाखाली भरपूर फायदा करून घेतला. अफगाणिस्तान मात्र लादेनला अमेरिकेच्या स्वाधीन करायला ठाम नकार देत होता.
नॉर्दन अलायन्सने काबूल जिंकले आणि तालिबानच्या हातून सत्ता गेली. जनमानसात आनंदाचा स्फोट झाला. निर्बंध हटले. पण तालिबानने जाताना साडेचार लाख डॉलर्स नेले होते. सरकारी खाती कंगाल केली होती. नव्या सरकारने तालिबान कायदे रद्द केले आणि जुन्या सरकारचे कायदे आणले. उदा. जाहीर फटके मारणे, दगडांनी ठेचून मारणे अशा शिक्षा होत्या. कायदे बदलले, पण स्त्रियांचे हाल सुरूच राहिले. तेवीस वर्षे अन्याय सोसलेली जनता आता व्यक्त होत होती. संग्रहालयातली चित्रे युक्तीने वाचवणाऱ्या संग्रहालय प्रमुखाच्या धैर्याचे कौतुक करावेसे वाटते. याच काळात उपपंतप्रधान एक स्त्री झाली. तिने अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली. रावा नावाची स्त्रियांची संघटना झाली, पण सर्वांच्याच मनात प्रचंड भीती होती. सरकार कधीही उलथू शकेल, पुन्हा कट्टरपंथीयांच्या हातात सत्ता जाईल!
हेही वाचा – Bookshelf : ‘नाच ग घुमा’… लेखिकेला रिंगणाच्या बाहेर पडायचेच नाही!
पुस्तकाच्या मुखपृष्ठावर बुरखा घातलेल्या अफगाणी स्त्रीचा चेहरा आहे. तिचा डोळा अर्धा दिसतो आहे आणि दुसऱ्या डोळ्यात शस्त्रधारी पुरुष आहे. तिचा चेहरा घाबरलेला आहे. भोवती हिरवा रंग आणि रक्तवर्णी रेषा आहेत. खाली गुलाबाची फुले आहेत. बोलके मुखपृष्ठ आहे. मृत्यूचे थैमान असूनही कुठेतरी जगण्याची प्रबळ इच्छा आहे. परंतु चित्रापेक्षा अफगाणी पुरुषापाठी मुले अंगाखांद्यावर असलेली मान खाली घालून तळपत्या उन्हात अनवाणी चालणार्या अफगाणी स्त्रीचे पाहिलेले चित्र अधिक सार्थ वाटते. तिचा कैवारी कोण? हा मोठाच प्रश्न आहे. दोन भिन्न विचारसरणीच्या सत्ताकांक्षी मूठभर लोकांची हाव अफगाणिस्तानच्या लोकांचे आयुष्य बरबाद करायला कारणीभूत झाली, सामान्य जनता भरडून निघाली.
कोणे एके काळी घोड्यांची पैदास करणारा प्रांत म्हणून अश्वगणस्थान असणारा हा प्रांत. जगभर राष्ट्रांची निर्मिती होत असताना आपापल्या टोळ्यांना राष्ट्र मानणारे हे लोक. इतर राष्ट्रांनी धर्माबरोबर आधुनिकतेचे बोट धरले, पण इथे असे झाले नाही. 1980 सालापर्यंत अफगाणिस्तानात लेखिकेचे वास्तव्य होते. तिथे रहात असताना त्यांनी डोळसपणे अफगाणिस्तान समजून घेतला आणि इतिहासाचा वेध घेतला. गेल्या काही वर्षांत झालेल्या घडामोडी आपण पाहिल्या आहेत. पुन्हा तालिबान सत्तेवर आले, ते पाहिले आहे. काबूलवरून सुटलेल्या विमानाला धरून आकाशात लोंबकाळणारा आणि नंतर पडणारा अफगाणी नागरिक आपण समाज माध्यमांवर पाहिला आहे. ते दृश्य मनात कोरले गेले आहे.
पुस्तक सहज एका बैठकीत वाचता येत नाही, कारण त्यात भरपूर माहिती आहे. नावे लक्षात राहत नाहीत. काळाचा पट डोळ्यासमोर येतो, मनाला भिडतो, विषण्णता येते. इतिहासाकडून शिकावे लागते, धडा घ्यावा लागतो; नाहीतर इतिहास आपल्याला धडा शिकवतो. यासाठी हे पुस्तक वाचायला हवे.


