‘शाळा’ ही मिलिंद बोकील यांची गाजलेली कादंबरी. त्यावर सिनेमाही आला आहे आणि नाटकही! आणीबाणीच्या काळात म्हणजे 1977 साली कथानक घडते. कादंबरी ‘शाळेत गेलेल्या प्रत्येकाला अर्पण’ केलेली आहे. शहराजवळच्या अविकसित गावात, अगदीच खेडे नाही अशा ठिकाणी असलेल्या शाळेची, शाळेतल्या मुलांची गोष्ट आहे. होम स्कूलिंग किंवा डी-स्कूलिंग करणाऱ्या मुलांना हे अनुभव कसे मिळत असतील? असा प्रश्न मला कायम पडतो. लेखकाला तारुण्यात पदार्पण करणाऱ्या मुलांची होणारी मानसिक घुसमट दाखवायची आहे. या कादंबरीत वर्गातली मुलं, शिक्षक-शिक्षिका, कर्मचारी, सिनेमाच्या नावाच्या भेंड्या, क्रीडामहोत्सव, स्नेहसंमेलन, परीक्षा, निबंध, वहीला खाकी कव्हर, शाळेचा कॅम्प, टोपणनावे, प्रार्थना इत्यादी संदर्भ येतात… त्यावेळी भूतकाळात रमायला होते. आपल्या शाळेची, शाळेतल्या दिवसांची आठवण होते. केसांना तेल लावून रिबीन बांधून दोन वेण्या, युनिफॉर्म, दप्तर हेही आठवतं!
मुकुंद नावाचा इयत्ता नववीमधला मुलगा आणि त्याचे सुऱ्या, फावड्या, चित्रे हे तीन खास मित्र शाळेच्या रस्त्यालगतच्या इमारतीत पहिल्या मजल्यावरच्या खोलीत जमून धमाल करत असतात. अभ्यास करण्यासाठी त्यांना सुऱ्याच्या वडिलांनी जागा दिलेली असते, पण तिथे बसून रस्त्यावरून जाणाऱ्या शिक्षक, शिक्षिकांची टिंगल करणे, मुलामुलींना चिडवणे असे प्रकार करतात. यात सुऱ्या अशिक्षित पण श्रीमंत वडिलांचा मुलगा, चित्रे सुशिक्षित पालकांचा उच्च मध्यमवर्गीय मुलगा, फावड्या अगदी गरीब घरातला तर या कथेचा नायक मुकुंद हा मध्यमवर्गीय सुशिक्षित पालकांचा मुलगा! या मुलांच्या मैत्रीवर याचा अजिबात परिणाम होत नाही. चित्रेला वैज्ञानिक व्हायचं असतं तर, सुऱ्याने शिकावं अशी त्याच्या वडिलांची इच्छा असते. मुकुंदचे पालक त्याला इंजिनियर करायचं स्वप्न पाहात असतात तर, फावड्या गरिबीमुळे वैतागलेला असतो. खायला घालायला जमत नाही तर, मुलांना जन्म का देता? असा वर्मावर बोट ठेवणारा प्रश्न तो विचारतो.
नुकतेच तारुण्यात प्रवेश केलेला असल्याने शरीरात होणाऱ्या बदलाचं कुतूहल, जिज्ञासा, अर्धवट माहितीमुळे झालेला गोंधळ… अशा मानसिक स्थितीतून ही मुले जात असतात. शालेय अभ्यासक्रमात त्यावेळी या विषयाचा समावेश नव्हता आणि मोकळेपणाने बोलण्याची मुभा नव्हती. आवडणाऱ्या मुलीला सुऱ्या “लाइन देतेस का?” असे विचारतो तेव्हा, ती मुलगी आणि पालक शाळेत जाऊन गदारोळ करतात, त्यावेळी मुकुंदचे वडील फार समजुतीने वागतात, मुलांची बाजू समजावून सांगतात.
हेही वाचा – डॉ. आनंदीबाई जोशी… जीवनाचे सापडलेले ध्येय!
वर्गातल्या एकाच मुलीला बॉयफ्रेंड असतो म्हणून ती त्यांना चालू वाटत असते… मुकुंदला शिरोडकर नावाची मुलगी आवडत असते आणि तिलाही तो! त्याचं कोवळं प्रेम किंवा आकर्षण लेखकाने रंगवलं आहे. एक मुलगी मुलांशी सुद्धा बोलत असते, त्यामुळे ती त्यांना आगाऊ वाटते. सध्याच्या काळातल्या मुलांनी ही कादंबरी वाचली तर, त्यांना समजणारच नाही; कारण आता मोबाइल आले आहेत… विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आले आहेत… परिस्थिती फार बदलली आहे. मुलाचं मानसशास्त्र हा गांभीर्याने पाहण्याचा विषय आहे, हे लक्षात आलं आहे आणि OTT… हा एक स्वतंत्र विषय आहे!
मुकुंद बहिणीला अंबाबाई म्हणत असतो. तिचं त्याच्या अभ्यासावर वागण्यावर लक्ष असतं. तिचंही चाळीतल्या क्रांतिकारक मुलांपैकी एकावर प्रेम आहे, हे समजल्यावर त्याला धक्का बसतो. मुकुंद एका ठिकाणी म्हणतो, “अंबाबाईच्या मैत्रिणी बावळट आहेत, मैत्रिणीच्या भावाला आपला भाऊच समजतात.” अशा लहानसहान वाक्यांतून मोठा होत असलेला मुकुंद लेखकाने दाखवला आहे. शाळेतले शिक्षक काही कठोर आणि कडक, काही गमतीशीर, तर काही खडूस, काही मैत्रीपूर्ण वागणारे आहेत. मुख्याध्यापक शिस्तप्रिय आहेत. या सर्वांच्याबद्दल असलेली मुलांची मतं, त्यांनी ठेवलेली टोपण नावे याचे बारकाईने वर्णन केलं आहे. त्याला अनुसरून या कादंबरीत लेखकाने प्रसंग घातले आहेत…
याच काळात घरोघरी टीव्ही आले आणि सामाजिक जीवनावर त्याचा परिणाम झाला. एक प्रकारची क्रांतीच झाली. मुकुंदच्या चाळीत संध्याकाळी लोक बुद्धिबळ, कॅरम खेळायचे ते आपापल्या घरात मालिका पाहू लागले. खेळ बंद पडले, एकमेकांशी संवाद कमी झाला. हा बदल नोंदवला आहे. शाळेत ‘टी.व्ही.चे दुष्परिणाम’ असा विषय निबंधासाठी असायचा!
इयत्ता नववीनंतर दहावीचे वर्षं! ’दहावीचे भकास वर्षं सुरू झाले…’ या वाक्याने कादंबरी संपते. त्यावेळी दहावीत अभ्यास सोडून दुसरे काही करण्याची परवानगी नव्हती. अत्यंत महत्त्वाची परीक्षा मानली जायची. त्यामुळे शाळेतली गंमत किंवा शालेय जीवन नववीत संपत असे. एका अर्थाने शाळा संपून नवे आयुष्य सुरू करण्याची तयारी होत असे… ‘शाळा’ नाव असल्याने कादंबरी इथेच संपते. दहावीचे वर्षं हा प्रकार आताच्या मुलांना फारसा कळणार नाही.
हेही वाचा – बनगरवाडी… लहानसे खेडं पूर्ण विश्वाचे प्रतिनिधी
‘’वर्ग आहेत, बाकं आहेत, पोरंपोरी आहेत, सर आहेत, गणित आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्र सुद्धा; पण आपण त्यात कशातच नाही. आपण त्या गायींच्या पाठीवर बसणार्या पांढर्या पक्ष्यांसारखे मुक्त आहोत. त्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी, आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते. खास एकट्याचीच. त्या शाळेला वर्ग नाहीत, भिंती नाहीत, फळा नाही, शिक्षक नाहीत; पण त्यातलं शिकणं फार सुंदर आहे.” हा मजकूर मलपृष्ठावर आहे.
शाळा ही संस्था मुलांच्या भावविश्वाचा भाग असते. सर्वांनाच शाळा आवडत असेल, असं नाही; पण प्रत्येकाच्या शाळेच्या आठवणी मात्र असतात… कडूगोड कशाही! त्या कायम बरोबर राहतात. आताची शाळा बदलली आहे, शिक्षण पद्धत बदलली आहे… पण आजही ही संस्था महत्त्वाची आहे. ‘शाळा’ कादंबरी वाचताना आपण आपले शाळेतले दिवस आठवू लागतो, त्यात रमून जातो. आठवणींचा एक कोपरा हळुवार उघडला जातो. या अनुभवासाठी तरी ही कादंबरी वाचायला हवी.


