भाग – 7
दोन दिवस माहेरी जा, असे पारूबाई म्हणाल्या खऱ्या, पण उमाला आपल्या सासूबाईंच्या वागण्यातील बदल पाहून आश्चर्य वाटले. रात्री उशिरा जेव्हा महेशराव झोपायला खोलीत आले तेव्हा ती जागीच होती. आत्याबाईंनी माहेरी जा, असे सांगितल्याचे तिने महेशरावांना सांगितले.
“जा की मग. दोन दिवस जरा बदल होईल.”
“हो, पण घरात एवढे पाहुणे आलेत आणि मी माहेरी निघून जायचे हे बरे दिसत नाही ना.” उमा म्हणाली.
“आईने सांगितले आहे ना, मग मागची काळजी तू करू नकोस. ती बघून घेईल,” हे ऐकूनही उमाच्या मनाची रूखरूख कमी झाली नव्हती.
“माझ्या पोटात घराण्याचा वंशज वाढतोय म्हणून अलिकडे आत्याबाईंच्या वागण्यात बदल झाला आहे, असे मला राहून राहून वाटते.” उमाने शेवटी मनातले ओठांवर आणलेच.
ते ऐकून महेशराव चिडले.
“या बायकांना कसंही असलं तरी त्यात काय खोट आहे, हेच शोधायचं असतं. वागतेय ना ती चांगली, मग बाकीचा विचार कशाला करायचा? झोप आता मुकाट्यानं अन् मला पण झोपू दे. मला शाळेत जायचंय उद्या.” असे म्हणत भिंतीकडे तोंड करून ते झोपले. उमाला मात्र बराच वेळ झोप लागली नाही.
हेही वाचा – उमाला आलं होतं टेन्शन…
सकाळी लवकर उठून तिने महेशरावांचा डबा बनवला. चहाचे पातेले चुलीवर ठेवले. “न्याहरीला काय बनवायचे?” असे आत्याबाईंना विचारले.
“त्या करंड्यात हाय की, शिल्लक कानावलं, लाडू अन् सजुऱ्या. त्येच खातील समदी. तुझं आटापलं की, आपलं निघा येरवाळीच. पावन्यास्नी पन दे च्या बरूबर कानावलं.”
चहा पिऊन झाला की, ती काकीसोबत निघाली. प्रवासात काकी तिला काय काय प्रश्न विचारत होती, त्याची उमा तेवढ्यापुरती उत्तरे देत होती, अन् परत गप्प होत होती. तिला जो प्रश्न पडला होता, त्याचे उत्तर आपल्याला बाळंतपणानंतरच मिळेल, असे तिला वाटत होते.
माहेरी गेल्यावर तिला पाहून आईला खूप आनंद झाला. लेकीकडे भरल्या नजरेने पाहतच तिने तिच्यावरून भाकरी तुकडा ओवाळून टाकला आणि तिला घरात घेतले. तिच्याकडे समाधानाने बघत आईने तिची चौकशी करणे सुरू केले. माहेरी गेल्यावर तिच्या चित्तवृत्तीत बदल झाला. ती घरभर फुलपाखरासारखी स्वच्छंदपणे बागडू लागली. मागच्या दाराला जाऊन पेरूच्या झाडाकडे तिने एक कटाक्ष टाकला. तिला तयार झालेला पेरू दिसला, तिने दाद्याला हाक मारली.
दाद्याने आकडीने चार रशरशीत पेरू काढले आणि तिच्यासमोर ठेवले. तेवढ्यात काकी मागच्या अंगणात आली.
“लै पेरू खाऊ नगंस. पित्त खवाळलं तर परत चक्कर बिक्कर यील.” आईच्या तीक्ष्ण कानांनी हे ऐकले.
“परत म्हणजे काय गं सुमे? हिला चक्कर आली हुती?”
आता खरे सांगितल्यावाचून पर्याय नव्हता. तेव्हा तिने काल संध्याकाळी घडलेला प्रकार सांगितला आणि त्यामुळे विहिणबाईंनी उमाला दोन दिवस माहेरी पाठवले आहे, हेही सांगितले. आईच्या डोळ्यात उमटलेली काळजी पाहून उमा म्हणाली,
“काय नाही गं, दोन दिवस जरा शाळेत पण जनगणनेचे काम होते, अन् घरात पण काम जास्त पडले. त्यामुळे चक्कर आली होती. आम्ही दोघं गेल्या आठवड्यातच डॉक्टरांकडे चेकअपला जाऊन आलोय. सातव्या महिन्यातील सोनोग्राफी केलीय. बाळाची वाढ, वजन सगळे व्यवस्थित आहे…” हे ऐकून तिला बरे वाटले.
उमा आलेली कळताच वाड्यातल्या, गावातल्या तिच्या मैत्रिणी गोळा झाल्या. त्यांच्याशी गप्पा मारण्यात दिवस कसा निघून गेला, हे तिला कळले नाही. तिला आता खूप मोकळे मोकळे वाटत होते. बरं झालं आत्याबाईंनी माहेरी पाठवलं असं तिला वाटलं.
आईनं रात्री तिला आवडते म्हणून हरभऱ्याची ओली भाजी केली होती. तेवढ्यासाठी आईने शेतात जाऊन भाजी खुडून आणली होती पुढ्यातील भाजी पाहून ती चित्कारली,
“घोलाना? आन् पावट्याची आमटी? मला तूप वाढ पावट्याच्या आमटीत.”
हेही वाचा – उमाला चक्कर आल्याचं निमित्त अन्…
“तुला तूप कधीपासून आवडायला लागलं?” आईने तूप वाढताना विचारले.
“आत्या रोज आमटीत तूप घ्यायला लावतात. आता चार महिने झाले रोज तूप खायची सवय लागली आहे.”
“सासूबाई चांगलीच काळजी घेतेती की मग! बाळंतपणाला माहेरी धाडणार आहेत ना?” आईने विचारले.
“त्यांनी नाही पाठवले तरी मी येणारच,” उमा म्हणाली.
“का पाठवणार नाहीत? पैलं बाळंतपण माहेरीच असतं, हे काय त्यांना माहीत नाही का?” एवढा वेळ त्यांची चर्चा शांतपणे ऐकणारे आबा जेवता जेवता म्हणाले.
“बघा, नायतर आता दोन दिस पाटीवलंय, बाळातपण तिकडचं करतो म्हणायची,” सुमी काकी म्हणाली.
हे ऐकून आता उमाच्या मनात वेगळीच चिंता निर्माण झाली.
क्रमशः
खरंच तिच्या सासूबाई तिला बाळंतपणासाठी माहेरी पाठवणार नाहीत का? पाहूया पुढील भागात…


