दिप्ती चौधरी
आमच्या पप्पांची बदली अमेरिकेला झाली आणि सगळं चंबूगबाळं उचलून त्या अनोळखी जगात स्थलांतराची तयारी सुरू झाली… कोरोना या जागतिक महामारीमुळे त्यावेळी जरी विमानसेवा सुरू असली तरी, खूप कमी प्रमाणात. Cargo विमानाने जसे सामान पाठवतात, तसे आम्हाला एकट्याला पाठवण्याचा पर्याय होता. सामानाची ने-आण करणाऱ्या विमानातही खास प्राण्यांना ठेवण्यासाठी वातावरण नियंत्रित कप्पा असतो. तिथून प्रवास करायचा… पण त्यासाठी देखील आगाऊ बुकिंग करावे लागते.
कुठल्याही विमान प्रवासाआधी प्राण्यांची शारीरिक तपासणी करून ‘fit to fly’ असे प्रमाणपत्र प्राण्यांच्या डॉक्टरकडून घ्यावे लागते. मग विमानतळावरील कस्टमच्या कचेरीत जाऊन सर्व कागदपत्रे दाखवून, मायक्रोचीप तपासून त्यांच्या काही औपचारिकता पार पाडाव्या लागतात. हे सर्व विमान प्रवासाच्या बरोबर सात ते आठ दिवस आधी करायचे असते.
आमचे सर्व कायदेशीर पूर्ततेकरिता, प्राण्यांच्या स्थलांतरासाठी मदत करणारी एक एजन्सी निवडली होती. आमचे बुकिंग आणि सर्व सोपास्कार पूर्ण करण्यासाठी ते मदत आणि मार्गदर्शन करणार होते. त्यांना परिस्थिती समजत होती. पण विमान सेवेकडून काही कळत नसल्याने तेही हतबल झाले होते. आम्हाला सवय व्हावी, या उद्देशाने प्रवासासाठी लागणारे मोठे पिंजरे त्यांनी आधीच घरी आणून ठेवले.
एक आठवडाआधी होणारी कस्टमची औपचारिकता आपल्या जबाबदारीवर पार पाडू शकतो, असे या एजन्सीने सांगितले. कारण तिथे आम्हाला पिंजऱ्यातून बाहेर काढावे लागत नाही, पण जेव्हा विमानात बसवायची वेळ असते तेव्हा ज्या मोठ्या पिंजऱ्यातून आम्ही प्रवास करणार त्या पिंजऱ्यातून काढून ते पिंजरे X-rayसाठी पाठवावे लागतात. त्यावेळी एकवेळ कुत्रा शांत बसतो, पण मांजराचा भरोसा नाही… मुद्दा अगदी बरोबर होता… कदाचित आधी काही भीषण अनुभव त्यांना आलेही असतील! पण आईचं म्हणणं होतं की, ती जरी त्या ठिकाणी हजर असली तरीही आमचा भरोसा नाही… त्यामुळे तिची अशी योजना होती की, आम्हाला आमच्या छोट्या पिंजऱ्यातून घेऊन जायचे मोठ्या पिंजऱ्याची तपासणी झाली की, मग आमचे छोटे पिंजरे मोठ्या पिंजऱ्याच्या आत उघडायचे. ही कल्पना त्यांना पसंत पडली आणि ते जबाबदारी घ्यायला तयार झाले. ते म्हणाले, तुमचं बुकिंग करा… जर माऊचे उशिरा झाले तर आम्ही त्यांना विमानात बसवून देऊ.
हेही वाचा – अमेरिकेला तर जायचंय, पण कसं?
पण जर आई आधी गेली तर आम्ही राहणार कुठे… यासाठी आईचा इतर कोणावरही विश्वास नव्हता… फक्त एकच व्यक्ती तिला दिसत होती, ती म्हणजे डॉ. इरफान अहमद. कोरोना काळात बहुदा त्यांची कॅटरी बंद होती, पण त्यांच्याशी बोलून बघूया म्हणून फोन लावला. त्यांनी सगळं ऐकून घेतले… त्यांना प्रसंगाचे गांभीर्य लक्षात आले… क्षणाचाही विचार न करता ते म्हणाले, “तुम्हाला जे लवकरात लवकर विमान मिळेल, ते बुक करा आणि निघून जा… परिस्थिती झपाट्याने बिघडत आहे… तुम्ही हा देश सोडल्यापासून जोपर्यंत हे दोघे विमानात बसत नाहीत, तोपर्यंत त्या दोघांची संपूर्ण जबाबदारी माझी! विमान प्रवासाच्या दिवशीही त्यांची विशेष काळजी, त्यांचा आहार सगळं मी बघून त्यांना सुखरूप बसवून देईन तुम्ही निश्चिंत रहा…” देव किती रुपांनी मदतीला उभा ठाकतो! त्याचे काय आभार मानणार…
माणसांचे बुकिंग दहा दिवसांनंतरचे पक्के केले. तारीख ठरली 22 एप्रिल. इतक्यात आमचेही बुकिंग पक्के झाले… त्यानंतर पाचच दिवसांत आम्हीही निघणार होतो, 27 एप्रिलला. त्यामुळे आईला एक बरे वाटले की, जास्त दिवसांचा विरह नाही… आम्ही पाठोपाठ निघणार आहोत.
आता अक्षरशः रणधुमाळी उडाली होती, कारण जी आवराआवर आम्ही एक महिन्यात करणार होतो, ती दहा दिवसात करायची होती! सामानाची बांधाबांध सगळ्यात मोठी होती. कारण आम्ही काही प्रवासाला जाऊन परत येणार नव्हतो… आम्ही कायमचे घर सोडून चाललो होतो. त्यामुळे प्रत्येक वस्तूची विभागणी करून मार्गी लावायची होती. काही महत्त्वाच्या वस्तू आमच्याबरोबर येणार होत्या, काही पॅकर्समार्फत अमेरिकेला पोहोचणार होत्या. काही अमेरिकेला न्यायच्याच नव्हत्या म्हणून त्या दुसऱ्या पॅकरमार्फत गावाला पाठवून द्यायच्या होत्या. काही इथेच कलोनजी, नमिता आणि इतरांना वाटून टाकायच्या होत्या आणि काही चक्क फेकून द्यायचा होत्या.
दिवस-रात्र हीच विभागणी चालू होती. त्यात आमचीही तयारी सुरू होती. रेबीजचे इंजेक्शन दिल्याचे प्रमाणपत्र एका विशिष्ट स्वरूपात हवे होते, त्यासाठी डॉक्टरकडे जाऊन ते आणले. प्रवासासाठी पाणी पिण्यासाठी चाटून पिता येतील अशा बाटल्या… आम्हाला त्यातून पाणी पिण्याचे शिकवण्याचा अयशस्वी प्रयत्न… त्यात आई आणि दिदीने असे वाचले की, विमान प्रवासाआधी माऊ थोडी धीट करावी… म्हणजे कमी घाबरेल. थोडी बाहेर फिरवून इतर माणसांचे आवाज, वास, गडबड असे अनुभव करू द्यावे.
हेही वाचा – मांजर पाळले, असे खोटे बोलू नका!
मला बाहेर नेण्याचा अनुभव त्या दोघी विसरल्या नव्हत्या! म्हणून त्यांनी दनूला पहिलं नेण्याचे ठरवले. पहिल्या दिवशी दनू एकदम शिस्तीत होता. त्याच्या पिंजऱ्यात ओरडत बसला, पण बाहेर निघाला नाही. त्यामुळे यांचा आत्मविश्वास भलताच वाढला त्यांनी दुसऱ्या दिवशी त्याला पिंजऱ्यातून बाहेर काढायचे ठरवले. साहेब दबकत-दबकत बाहेर निघाले. भिंतीच्या कडे-कडेने हळूहळू निघाले. माझ्याबरोबरच्या अनुभवातून पट्टा खेचायचा नाही, हे त्या शिकल्या होत्या म्हणून त्याच्या पाठी निघाल्या. दनूने हळूच मोर्चा एका गाडीखाली वळवला… तो बहुदा गाडीखाली बसेल असे वाटून त्या आरामात बघत होत्या. इतक्यात दनूच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या! त्याने सरळ खालून गाडीच्या इंजिनात वर चढण्याचा पवित्रा घेतला! आता मात्र त्यांचे धाबे दणाणले! पट्टा टाकून दोघी मातीत पूर्ण आडव्या झाल्या… घाईघाईने सरपटत गाडीखाली शिरल्या आणि त्याला पकडून खाली खेचला. सरळ पिंजऱ्यात घातला आणि घर गाठलं! आधीच इतका गोंधळ सुरू होता की, आमचे कुठलंही कांड निस्तरायची ताकत कोणाकडे नव्हती! त्यामुळे आम्हाला काही शिकवण्याचा आगाऊपणा त्यांनी ताबडतोब सोडून दिला!
आई, दिदी आणि दादा सारेच जण खूप-खूप काम करत होते. आईच्या खालोखाल दिदी सारी जबाबदारी उचलू बघत होती, पण तरीही आई खूप ताणाखाली होती. रात्री झोपतानाही डोक्यात सतत कामाची चक्र फिरत असत… या सगळ्यात आम्हीपण आमची जबाबदारी उचलली…
रात्री आईला शांत झोप लागावी म्हणून मी पायाशी झोपून तिचे लाड करायचो आणि दनू डोक्याशी बसून तिचे डोकं चाटत राहायचा……!
हेही वाचा – डॉ. इरफान अहमद यांच्याशी ऋणानुबंध
क्रमशः
(पिदू या मांजराची आत्मकथा)
diptichaudhari12@gmail.com