नमस्कार मी अभिनेत्री हर्षा गुप्ते, पुन्हा एकदा तुमच्या भेटीला.
“भाऊ काका तुमच्या हातचा गरमा गरम चहा…” जयू आत्याने माझ्याकडे पाहिलं. आत स्वयंपाकघराकडे वळून म्हणाली, “अहो पपी आलीय… चहा ठेवा हो तिच्यासाठी.”
भाऊ काका धडपडत बाहेर आले. त्यांच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर कितीतरी आनंदाची फुलं फुलली होती…
“ये ग बस. आधी पाणी पी. मी तुझा फेव्हरेट चहा ठेवतो… आणि तुझ्या चहासाठी मी आता कुंडीत पुदिना लावलाय, बरं का!” आम्ही तिघेही खळखळून हसलो.
भाऊ काकांनी मस्त चहा बनवून आणला आणि आम्ही तिघे गप्पामध्ये बुडालो.
जयू आत्या. आमच्या समोर राहणाऱ्या रघूअण्णा मोगरे यांची मुलगी. तिची भाची माझी मैत्रीण. लहानपणी आम्ही त्यांच्याच घरी खेळायचो. एके दिवशी जयू आत्याचं लग्न झालं. 13-14 वर्षांनी तिचा घटस्फोट झाला. ती एका हॉस्टेलमध्ये राहून छोट्या-मोठ्या नोकऱ्या करत होती. त्यानंतर माझंही लग्न झालं आणि सगळं काही दुरावलं.
हेही वाचा – बारीक व्हायचंय? तर मग…
अचानक तिचा कोल्हापूरचा फोन नंबर आणि पत्ता मिळाला. अनायासे माझ्या एका मराठी सिनेमाच शूटिंग कोल्हापूरला होतं… मग काय, घर शोधत शोधत पोहोचले भाऊ काकांच्या घरी. पपी म्हणून जयू आत्याने मिठी मारली… भाऊ काकांशी ओळख करून दिली. भाऊ काका तिचे दुसरे पती. पण पहिल्याच भेटीत 100 वर्षांपासून आमची ओळख असल्यासारखं वाटल. जयू आत्याने मस्त स्वयंपाक बनवला. मी म्हटलं, “तिखट नको बनवूस गं.”
तसं ती म्हणाली की, “आम्हा भटांचा स्वयंपाक… तो कुठे तिखट असणाराय!”
मस्त मला आवडणारं जेवण नाही… स्वयंपाक बनवून मला मनसोक्त खाऊ घातलं… जेवण, गप्पा, भाऊ काकांच्या हातचा चहा पिऊन मी हॉटेलवर आले. सकाळी उठून शूटला निघायचं होतं.
आता हा एक अलिखित करार झाला होता आमच्यात… मी कोल्हापुरात पोहोचले की, आधी अंबाबाईचं दर्शन घ्यायचं आणि नंतर भाऊ काकांच्या हातचा चहा! फोटो अल्बम, तिच्या सासूबाईंनी केलेली तिची साठी! तिला घेतलेली नारायणपेठ साडी, मोत्याचा तन्मणी… तिचं या घरी कौतुक लाड सगळंच होतं होतं. मेहनती तर ती होतीच. छान छान पदार्थ बनवायची आणि भाऊ काका त्यांच्या नेहमीच्या घरी जाऊन डिलिव्हरी द्यायचे.
तसं बरं चाललं होतं. अचानक फोन आला दोन दिवसांपूर्वी… जयू आत्या गेली! म्हणजे सगळं काही संपल्यावर माझ्यापर्यंत बातमी आली. शेवटच दर्शन सुद्धा घडलं नाही. भाऊ काकांनी फोन केला. खूप रडले… कदाचित ते माझी किंवा किमान माझ्या फोनची वाट बघत होते. जयू आत्या गेल्यापासून रडलेच नव्हते! तसं मायेचं पण कोणी हवे होतं ना त्यांना!
हेही वाचा – आठवणींचा जागर…
भाऊ काका आजही मला फोन करतात. आवर्जून जयू आत्याची आठवण काढत नाहीत. माझी, माझ्या नवऱ्याची, मुलांची चौकशी करतात. अगत्याने घरी येण्यासाठी आग्रह करतात… अवांतर गप्पा होतात आणि फोन बंद होतो. पण तिची आठवण न बोलता सुद्धा एकमेकांच्या मनात येतच असते!
जेव्हा जेव्हा हातात चहाचा कप असतो, तेव्हा तेव्हा अदृश्यपणे ते दोघेही माझ्या जवळपास राहात असावेत. त्यांचं प्रेम आणि माया माझ्यावर उधळण्यासाठी…
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


