नितीन फलटणकर
तुषार आज लवकरच घरी आला होता. त्याला ऑफिसमध्ये अस्वस्थ वाटत होतं. गेल्या काही दिवसांपासून विचारांनी त्याच्या डोक्याचे खोबरे केले होते… त्याला समजत नव्हते, नेमके काय करावं? मनाची समजूत काढता काढता तो पुरता हतबल झाला होता. हे वयही पुन्हा प्रेमात पडण्याचे नव्हते. हे प्रेम होतं, आकर्षण होतं का वासना? मनात नुसता गोंधळ. काही केल्या त्याचं मन त्याला साथ देत नव्हतं. जेव्हा मन हतबल होतं, तेव्हा आपसुकच आयुष्यातील सप्तरंग डार्क ब्लॅक ॲण्ड व्हाइट होऊन जातात.
आपण का जगतोय, हा प्रश्न गोंधळ घालायला लागतो. पंडित भीमसेन जोशी, पंडित वसंतराव देशपांडेंच्या गाण्याची जागा जगजित सिंग, गुलाम अली घेतात. सकाळपेक्षा संध्याकाळ अधिक जवळची वाटायला लागते. रोजच रविवार असावा आणि आपण बेडवरून उठूच नये, असं होतं. पहाटे देवदूतासारखा धावून येत गजर करणारा अलार्म, आता शत्रू वाटायला लागतो. सकाळी तोंडात ब्रश घेतल्या घेतल्या आपल्याला रात्री काय स्वप्न पडलं होते, ‘ती’ स्वप्नात आली होती का? असे प्रश्न आपण आरशापुढ्यात राहून स्वत:लाच विचारायला लागतो. ती चुकून कधी आज भेटलीच तर, आपण काय बोलायचं, याची मनात उजळणी सुरू होते. या विचारांनीच तुषार जागा झाला…
आरती त्याच्या आधीच उठून मुलांचा डबा करत होती. तुषारने डोळे फिरवत घड्याळाकडे पाहिले. सात वाजले होते. त्याने मोबाइल चेक केला, कोणताही मेसेज त्यात नव्हता. त्याला जो हवा होता, तो ‘तिचा’ही नव्हता… मग उदासपणे त्याने अंगावरची चादर हटवली. आरतीने तितक्यात त्याच्यासाठी चहाही टाकला होता. तुषार डिस्टर्ब आहे, हे तिला उमजलं होते. तुषारने चहा घेतल्यानंतर थेट बाथरूमकडे मार्चा वळवला. पटकन तयार होत, ‘आज ऑफिसला जरा लवकरच जायचंय,’ असं त्यानं आरतीला सांगितलं. आरतीने जराशी कचकच केली… ‘काल सांगितलं असतं तर, लवकर उठून तुझा डबा केला असता ना!’ म्हणत, ती तशीच किचनकडे धावली. मी बाहेर खाईन सांगत तुषार आवरून निघाला. आज दीपा लवकर जाणार असल्यानं तुषारची गडबड चालली होती. त्याची आंघोळ होईपर्यंत आरतीने कसेबसे पोहे केले. चमचानेच तोबरा भरत तुषार एव्हाना बाहेरही पडला होता.
नऊ नंबरच्या बसमध्ये ती येणार असल्याने त्याने बस स्टॉपवर 10 मिनिटे आधीच जाऊन थांबणे योग्य समजले. ती मागच्या स्टॉपवरून बसत असल्याने नऊ नंबरची बस आल्या आल्या त्याने बस थांबण्याआधीच पटकन उडी मारली. फारशी गर्दी नसल्याने त्याच्या नजरा दीपाचा वेध घेत होत्या. पण काय आश्चर्य बसमध्ये आज दीपा नव्हती. त्याने पुन्हा खात्री केली. तसा तो पुढच्या स्टॉपवर उतरला. त्याला समजेना… ‘ती’ कुठाय? त्याने आपला फोन चाचपला. त्यावरही कोणताही मिस् कॉल नव्हता…! आज आपला कुणीतरी पाठलाग करत असल्याचा पुन्हा त्याला भास झाला. तो थोडा गांगरला. पण मागे कुणीही नाही, याची खात्री पटल्यावर पुन्हा मागच्या बसची वाट पाहात तो थांबला. त्याला वाटलं, कदाचित दीपाची पहिली बस चुकली असेल. दुसरी बस आली तसा पुन्हा उत्साहाने त्याने बसमध्ये डोकावून पाहिले. याही बसमध्ये ती नव्हती. तो आता सैरभैर झाला. आज का आली नाही ती? तिनेच सांगितले होते, “सोमवारी जरा लवकरच जायचेय. पहिली बस पकडेन मी.”
हेही वाचा – कन्फेशन कॉल…
बसचा खेळ संपता संपता आठचे 10 वाजले. पण तुषार स्टॉपवरच उभा! त्याने हताशपणे ऑफिसची बस पकडली. ऑफिसमध्येही त्याच्या डोक्यात एकच विचार घोळत होता, ‘दीपा कुठेय? ती आज का भेटली नाही?’ दीपाचं ऑफिस त्याच्या ऑफिसच्या जवळच होतं. पण तिच्या ऑफिसमध्ये जाऊन आपण कशी चौकशी करायची? कसंबसं दिवसभराचं काम उरकल्यावर त्याला वाटलं, निदान जाताना तरी ती भेटेल. पण नाही! तसं काहीच घडलं नाही. तो रात्री उशिराच घरी पोहोचला. आरतीला त्याने कामाचे कारण सांगितले. पण तो दीपाच्या ऑफिसबाहेर घुटमळत होता.
आरतीही नुकतीच कुठूनतरी आल्याचे त्याला जाणवले. त्याने डोळ्यांनीच तिला प्रश्न केला… “काही नाही रे, भाजी संपली होती. तुझी वाट पाहाता पाहाता म्हटलं जरा भाजी तरी घेऊन यावी म्हणून मी कॉर्नरपर्यंत गेले होते… हल्ली फार काम असतं का तुला? काही टेन्शन आहे का?” आरतीने प्रश्न केला. मानेनेच नकार देत त्याने पानं मांडण्याचा तिला इशारा केला.
दुसऱ्या दिवशी तुषारने सुट्टी टाकली होती. “मला उद्या महिला मंडळाच्या खरेदीला सकाळीच बाहेर जायचे असून आपण संध्याकाळीच परतू,” असे झोपताना आरतीने तुषारला सांगितले होते. ‘एक चिठ्ठी फ्रीजवर ठेवलीय ती उठल्यावर वाच,’ असेही ती म्हणाली होती. तशी सकाळी उठल्या उठल्या आरती स्वयंपाक आणि मुलांचे डबे तयार करून बाहेर पडली. मुलं शाळेला गेली होती. तुषार 8 वाजता उठला. आरती सकाळीच कुठे गेली, हा विचार त्याच्या मनात आला. पण त्याने ते फार गांभीर्याने घेतले नाही. आरतीने काहीतरी चिठ्ठी ठेवल्याचे त्याला आठवले. पण त्याकडे त्याने दुर्लक्ष केले. भाजी, पोळी, भात कुठे ठेवलाय हेच त्यात असेल, असे मनात म्हणत तो मिश्किलपणे हसला. काही वेळ असाच दवडल्यानंतर त्याने चहा करून घेत मोबाइल पाहिला. तसा त्याला दीपाचा मेसेज दिसला. चहा गरम असल्याचे तो विसरला होता, त्याला चांगलाच चटका बसला. त्यात लिहिले होते… ‘आज मी ऑफिसला जाणार नाही, दुपारी भेटू…’ त्याने या मेसेजचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. पण नंतर त्याने तो नाद सोडला. आंघोळ आटोपून तो झोपी गेला. झोपतानाही त्याच्या मनात दीपाचाच मेसेज घोळ घालत होता… ‘दुपारी भेटू… पण कुठे? तिने असे का लिहीले?’
दुपारचे 12 वाजले असतील घराची बेल वाजली. तसे डोळे चोळत त्याने दार उघडले. दारात चक्क दीपा! डोक्यावर हात फिरवत त्याने स्वत:चे केस नीट केले… आपण किती ध्यान दिसत असणार असे त्याला जाणवल्याने त्याने गडबडीत दार बंद करण्याचा प्रयत्न केला. एकदम भानावर येत त्याने पुन्हा दार उघडले आणि दीपाला “ये ना, आत,” असे म्हणत तो दार लावावे का उघडे ठेवावे, याच विचारात दिसला. दीपा दाराशेजारील खुर्चीवर बसली तसा तो बर्मुडा बदलून पँट घालायला आत गेला… “तू कशी काय इथे?” आरती आली तर तिला काय सांगायचे, या विचारात त्याने दाराबाहेर डोकावून विचारलं. आवंढा गिळत त्याने पुन्हा तिला प्रश्न केला… “तू इथे कशी? म्हणजे तुम्ही?”
दीपाने एक उसासा सोडत बोलायला सुरूवात केली… “आपण मागच्या वर्षभरापासून बसमध्ये भेटतो. तुमची आणि माझी ओळख तिथेच झालेली. ऐकमेकांची सुख-दु:ख आपण शेअर करतो. कधी-कधी तासन् तास आपण बसस्टॉपवर बसची वाट पहात बोलत बसतो… आपल्यात मनाचं एक नातं तयार झालं. मला तुमचा स्वभाव पटला. तुमचा मोकळेपणा, बोलण्याची पद्धत, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा मला आवडला…” तुषार मधेच म्हणाला, “मलाही…” आपल्या ह्रदयाची स्पंदनं वाढल्याचे त्याला जाणवत होते. चक्क दीपा आपल्या घरात आहे, यावर अजूनही त्याला विश्वास बसत नव्हता. टेन्शनमुळे त्याचं अंग तापलंय, असंही त्याला जाणवलं. दीपा बोलत होती…
“पण काही गोंधळ आहे, तो दूर करायला आज मी आलेय…” तुषारने आवंढा गिळला. “गोंधळ?“ तुषारने प्रश्न केला. “हो गोंधळ! आपलं मनाचं मनाशी एक नातं जोडलं गेलंय, या नात्याला काय नाव द्यावं, याचा गोंधळ. मला वाटतं ते नातं तसंच रहावं… यात गैरसमजुतीला जागा नको. आपण एकमेकांना आवडतो, याचा अर्थ स्त्री-पुरूषातलं प्रेम असा घेतला जाऊ नये. प्रेम हे मित्रांचंही असू शकतं. मित्र-मैत्रिणींमध्येही असू शकतं! आपण नाती जोडत जातो, त्या नात्यांना अनामिक नावं जोडली गेली की, त्याचे वेगवेगळे अन्वयार्थ निघतात. मग उगीचच धुसफूस चालू होते. मन संयम सोडतं, संसार मोडतात. मागे उरतो तो फक्त पश्चाताप! मलाही तुमच्याविषयी कधी कधी ओढ वाटते, काळजी वाटते… कधी मनात खूप दाटलं तर, भडाभडा तुमच्याशी बोलावं वाटतं. पण याचा अर्थ मी तुमच्या प्रेमात पडलेय असा होत नाही. तुम्हीही तसा काढू नये, असं मला वाटतं. आपली मैत्री अशीच कायम रहावी…” एवढं बोलून ती क्षणभर थांबली…
“सध्या तुम्ही खूप डिस्टर्ब असता, असं कळलंय. आपण चांगले मित्र आहोत. आपण आधीप्रमाणेच बोलत राहू, एकमेकांशी शेअर करत राहू. इतकंच सांगायचं होतं. निघते मी..” असं म्हणत दीपा निघाली.
हेही वाचा – मनोहर अन् खिडकीजवळचा कावळा…
तुषार तिच्या बोलण्यामुळे शून्यात गेला होता. तो केवळ डोळे मोठे करून तिच्याकडे पाहात होता. ती उठली तसा तो भानावर आला. “थँक्स!” इतकंच तो म्हणाला. दीपा निघून गेली… ती गेल्यावर तुषारने पुन्हा एकदा घराबाहेर डोकावत आरती कुठे दिसतेय का ते पाहिलं… रस्ता मोकळा दिसला. आत येत त्याने पुन्हा दार लावलं. तो पुन्हा विचारांमध्ये गढून गेला. त्याला तिचे एक-एक शब्द आठवत होता… त्यात तो थबकला… ‘तुम्ही हल्ली खूप डिस्टर्ब असता असं कळलं…’ ती अशी का बोलली? तिला हे कुणी सांगितलं? विचारांचे चक्र पुन्हा सुरू झाले. तिच्या विचारांचे चिंतन करताना त्याचा घसा कोरडा पडला होता, तहान लागल्याने त्याने फ्रीजचा दरवाजा उघडला. तशी आरतीची चिठ्ठी फ्रीजवरून खाली पडली. मोठा उसासा सोडत त्याने ती उघडली. त्यात लिहिले होते…
प्रिय तुषार,
मागील काही दिवसांपासून तुझी चाललेली घालमेल मला पाहावत नव्हती. मी काही दिवसांपासून तुझा पाठलाग करत होते. तुझ्या ऑफिसच्या मित्रांनाही मी काही टेन्शन तर, नाही ना, हे विचारलं होतं. ऑफिसमध्ये सगळं सुरळीत आहे, असं कळाल्यावर मी तुझ्या काळजीपोटी जरा विस्तारानेच चौकशी करण्याचा निर्णय घेतला. तू आणि दीपा बसमध्ये एकत्र असल्यावर कित्येक दिवशी मी मागच्या सीटवर बसलेली असायची. पण कदाचित बुरख्यामुळे तू मला ओळखू शकत नव्हतास. मी दीपाला जाऊन भेटलेय. तिच्याशीही मी चर्चा केली. तिची अवस्थाही तुझ्यासारखीच होती. तिने ते कबूल केले. तिला घरी पाठवतेय. प्रेम, आकर्षण आणि वासना या भिन्न बाबी आहेत. तुम्हा दोघांनाही तुमच्या नात्याचा अर्थ लावता येत नव्हता. मी दीपाला कालच भेटून तिला बोलतं केलं. तिनेही तिला तू मित्र म्हणून आवडतोस, हे मान्य केलं. तुम्हाला मनमोकळं बोलायला एकांत मिळावा म्हणून मी बाहेर जात आहे आणि तिला घरी पाठवत आहे. बोलून घे आणि तुमच्या नात्याविषयी माझ्या मनात कोणतीही शंका नाही. तुमचं मैत्रीचं नातं असंच कायम ठेवा. ते गैरसमजुतीमुळे तोडू नका. आपण भेटल्यावर तू उगीच गिल्टी वगैरे फिल करू नकोस. तुझ्या बायकोने मानसोपचाराचा कोर्स केलाय, हे तू कदाचित विसरलास… आणि हो ओट्यावरील डब्यात पोळ्या ठेवल्यात, भाजी कढईत झाकून ठेवली आहे. भात कुकरमध्ये तर वरण फ्रीजमध्ये आहे. गरम करून जेवून घे.
तुझीच आरती


