संध्या हरदास
गेली वीस वर्षे मुंबईत नियमाने सकाळी फिरायला जातेय. सोसायटीजवळच्या मोकळ्या मैदानात किंवा बागेत पोहोचेपर्यंत रस्त्यात अनेक इमारती दिसतात. निऑन, ट्रिऑन, झिऑन यासारखी अपरिचित नावे असलेले टोलेजंग (30 मजली) टॉवर किंवा, ओडिसी, कॉमेट, टोपाझ यासारख्या इंग्रजी नाव असलेल्या सोसायटीच्या इमारती, रोजच्या रोज दिसतात. रोजची सकाळची दृश्येही ठरलेली…!
सकाळी लिफ्ट अखंड शेवटच्या मजल्यावर थांबलेली. आपल्यापर्यंत थांबत थांबत पोहोचते. ‘खुला जा सिम सिम’ आपण म्हणत असताना लिफ्टचे दार उघडते, लिफ्ट गच्च भरलेली… आपण परत वेटिंग लिस्टवर…
तळमजल्यावर सिक्युरिटी वॉचमन कायम वहीत कसली तरी नोंद करीत आपल्याकडे न बघता आपल्याला गुड मॉर्निंग करतो. एखादा भैय्या मोबाइलवर गाणी ऐकत कुणाची तरी कार पुसत असतो (मला तर फडकं फिरवतानाच दिसतो), कामाला येणाऱ्या मावशींची वेगळीच लगबग सुरू असते. झोमॅटो-स्वीगीची मुले ही सकाळपासून पार्सल आणताना सर्रास दिसू लागली आहेत, सफाई कर्मचारीही आपापला ठरलेला एरिया स्वच्छ करताना दिसतात, सोसायटीच्या झाडांना पाणी देण्याचे (जागोजागी पाण्याची तळी तयार करणे) कामही सुरू असते…
दोन विंगचे किंवा जवळजवळच्या सोसायटीचे तिघे चौघे वॉचमन मिळून सकाळ-वार्ता करत असतात, तर क्वचित, पण कार पार्किंगवरुन होणारी भांडणेही दृष्टीस पडतात. चिमुकल्यांना स्कूल बसपर्यंत सोडायला येणारी आई-बाबा, आजी आजोबा मंडळी बघणं मला फार आवडते.
असेच पाच-सहा महिन्यांतून दिसणारे एक दृश्य… मनाला थोडंसं नर्व्हस करणारं, विरक्त करणारे दृश्य म्हणजे सोसायटी समोरची शांत गर्दी किंवा सोसायटीच्या मुख्य दारासमोर तयारीनिशी उभी असलेली पांढरी ॲम्ब्युलन्स.
हेही वाचा – Local train : डोंबिवली ते कसारा प्रवासातील ‘ते’ नातं
ती शांत गर्दी, ती पांढरी ॲम्ब्युलन्स मला काहीसं डिस्टर्ब करते. गर्दीच्या आजूबाजूला इतर घरांचे, इतर लोकांचे रोजचे व्यवहार रोजच्या प्रमाणेच सुरू असतात. नारळपाणीवाला ठरलेल्या घरी नारळ पोहोचवतो, धोबी कपड्यांचे गाठोडे बरोबर नेमक्या घरी अचूक ठेवून येतो. दुधाची पिशवी आणि रोजचे वर्तमानपत्रही ठरलेल्या घरी दाराशी पडलेले असते…
माझाही सकाळचा फेरफटका रोजच्या प्रमाणे सुरू असतो… मनात विचार मात्र अखंड सुरू असतात.
आजही सकाळी एके ठिकाणी शांत गर्दी दिसली आणि वाटले… मृत्यू, आता एक रुटीन झालाय का माणसाच्या आयुष्यात? कुणाच्या जन्माची बातमी आपण ऐकतो, तेव्हा क्षणभर प्रसन्न होतो, दुसऱ्या क्षणाला रोजचे व्यवहार करू लागतो… कुणाच्या तरी घरी नवीन जीव जन्माला आलाय, हे साफ विसरून जातो. तसंच ‘मृत्यू’ची बातमीही आपल्याला फार विचलित करत नाही, मृतात्म्यास शांती लाभो, असे म्हणत पुढच्या कामास लागतो.
आपणही सतत गर्दीत वावरत असतो, दररोज सकाळ उगवते, संध्याकाळ मावळते तसे कुठे जन्म तर कुठे मृत्यू होणारच… असा भाव मनात असतो का की, रोज मरे, त्याला कोण रडे? ही म्हण आपण खरी करून दाखवत असतो…
मृत्यूची भीती कमी झाली की, मृत्यूची वास्तविकता आपण स्वीकारली आहे? की आयुष्य इतकं बिझी झालंय की आपण हळुहळू भावना शून्य होत जातोय?
हेही वाचा – पोटभर आशीर्वाद
एक ना दोन, असे असंख्य विचार मनात पिंगा घालत असतात.
मृत्यूची भीती नाही वाटत, पण सकाळी सकाळी शांत गर्दी दिसली की, मन सैरभैर होतं. संध्या-छाया फेर धरू लागतात. ‘मरे एक त्याचा, दूजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे…’ हा श्लोक हमखास आठवतो. मग माझी मीच स्वतःला समजावते,
जे अटळ आहे, जे घडणार आहे, त्याची चिंता कशाला करायची? तो येईल तेव्हा स्वागतच आहे! पण या क्षणी मला घरी जाऊन नातवाच्या दुपारच्या खाण्याची सोय करावयाची आहे, मला लवकर घरी जायला हवे, असे म्हणत मी माझी प्रभात फेरी पूर्ण करते आणि घरी येताच आपले ‘रूटीन’ सुरू करते.


