Monday, March 2, 2026

banner 468x60

Homeफिल्मीधुरंधर… माझ्या नजरेतून!

धुरंधर… माझ्या नजरेतून!

पराग गोडबोले

‘धुरंधर’ चित्रपटाची खूप प्रशंसा ऐकून, नाताळच्या सुट्टीच्या दिवशी सकाळी सव्वानऊच्या खेळाला पोहोचलो… डोळे चोळत. सुट्टीचा दिवस आहे… घरापासून मोजून पाच मिनिटांवर असलेल्या चित्रपटगृहाच्या खिडकीवर तिकीट मिळणार नाही, या आशंकेने ग्रासलेल्या बायकोने, तब्बल साठ रुपये जास्त मोजून ‘बुक माय शो’वरून तिकीटं काढायला लावली. गेल्यावर बघितलं तर, तिकीट खिडकीवर कोणीही नव्हतं आणि आत तर अर्ध्यापेक्षा जास्त खुर्च्या रिकाम्या होत्या!

माझ्या मोजूनमापून कोकणस्थ मनाला साठ रुपये हकनाक गेल्याचं दु:ख झालं, पण खूप सुंदर चित्रपट बघायला आलेलो मी, ते गिळलं. नशीब आम्ही दोघेच गेलो होतो. लेक असती तर, अडीच-तीनशे रुपयांचा, मक्याच्या लाह्यांचा आणखी भुर्दंड बसला असता, तो टळला!

जाहिराती, नव्या येऊ घातलेल्या चित्रपटांचे trailers म्हणजे हल्लीच्या भाषेत teasers झाल्यावर, तंबाखूमुक्तीचा प्रचार करणाऱ्या हिडीस जाहिराती झाल्या, राष्ट्रगीत संपलं आणि चित्रपट सुरू झाला…

कंदाहार, IC 814चं अपहरण, नुकतंच लग्न झालेला प्रवासी, रूपन कात्याल याची नृशंस हत्या आणि तीन कट्टर दहशतवादी मसूद अजहर, अहमद जरगर आणि शेख अहमद उमर सईद यांची सुटका करण्याची नामुष्की ओढवलेला भारत बघून ते जुने दिवस, अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारची हतबलता आठवत गेली… ती घटना सरकली नजरेसमोरून झरझर…

विमानात सुटकेची बातमी कळल्यावर आनंदलेले ओलीस प्रवासी, दहशतवाद्यांच्या भीतीमुळे ‘भारत माता की… जय’ सुद्धा जेव्हा म्हणू शकत नाहीत, तेव्हा गलबलतो आपलाच जीव… उदास वाटत राहतं, ती परिस्थिती पाहून.

हेही वाचा – माझ्यातल्या ‘मी’ची कथा

दिल्ली- संसदेवरील दहशतवादी हल्ला, परत एकदा अटलबिहारी सरकार आणि कोणाचा केसही वाकडा करू न शकलेला, शक्ती असूनही गलितगात्र झालेला, सुन्न झालेला आपला देश… मुंबईत 93 सालचे बॉम्बहल्ले, अक्षरधाम हल्ला, मुंबईतल्या लोकलगाड्यांमधले बॉम्ब हल्ले… असे चित्रपटात न दाखवलेले अनेक प्रसंग घडले, पण बोटचेपी भूमिका घेत आपला देश निषेध व्यक्त करण्याच्या पलीकडे दुसरं काहीच जाहीरपणे करू शकला नाही!

समाजमनाच्या याच दुखऱ्या जखमेवर मलम लावायचा, फुंकर घालायचा प्रयत्न म्हणजे धुरंधर! ‘हिंदू डरपोक होते हैं’, या एका दहशतवाद्याने उच्चारलेल्या वाक्याला जबरदस्त उत्तर म्हणजे धुरंधर!!

सामान्य माणसाला जे घडावंसं वाटतं, पण स्वतः घडवू शकत नाही, ते पडद्यावर दाखवायचं श्रेय जातं बच्चनकडे. Angry young man म्हणवून घेऊन, समाजमनावर ताबा मिळवणारा तो पहिला नायक आणि म्हणून महानायक!

दहशतवादाच्या भळभळत्या जखमेवर अशीच फुंकर घालायचं काम करतो तो धुरंदर. भारतीय गुप्तचर यंत्रणेने पाकिस्तानात पाठवलेला एक हेर म्हणजेच असेट, ‘हमजा बलोच’. रणवीर सिंगने साकारलेला, लांब केसांचा, देखणं पौरुष लाभलेला हमजा बलोच… त्याचं वावरणं, गुन्हेगारांच्या टोळीमध्ये करून घेतलेला शिरकाव, मिळवलेला विश्वास सगळंच अतर्क्य! पण आपल्या भावना सुखावणारं. इतर भूमिकांमध्ये माकडचाळे करणारा, म्हणून कधीच न आवडलेला रणवीर इथे आवडून जातो आणि आपण आपसूकच प्रेमात पडतो या हमजाच्या.

बलूची अस्मितेला साद घालत, रहमान डकैत बलोचचा विश्वास संपादन करून, त्याच्यासाठी जीवाला जीव देणारा हमजा आणि त्याचा अभिनय, जिंकतो आपल्याला. त्याची वेदना, सूड घ्यायची आकांक्षा आणि 26/11 चा हल्ला थांबवता न आल्याने आलेली विफलता… अचूक उमटते त्याच्या मुद्राभिनयात. ‘नारा ऐ तकबीर, अल्ला हू अकबर’, म्हणावं लागताना त्याचा उद्वेग जाणवत राहतो आपल्याला.

दुसरा तगडा अभिनय अर्थातच ‘रहमान बलोच’ म्हणजे अक्षय खन्नाचा! स्वतःच्या मुलाचा झालेला अपमृत्यू पचवतानाचा त्याचा अभिनय म्हणजे, लाजवाब! आक्रोश, आक्रसताळेपणा न करता, अपरिमित दु:ख, फक्त ओठांच्या हालचालीने व्यक्त करणं म्हणजे कमाल… अक्षय खन्नामध्ये दडलेला सशक्त अभिनेता आपल्याला रहमानमध्ये जाणवत राहतो पदोपदी. त्याचा तो गाजलेला नाच आणि ते वेगळ्याच ठेक्याचं गाणं म्हणजे एक भन्नाट आविष्कार, खिळवून ठेवणारा…

हेही वाचा – वेंधळेपणा, पुन्हा एकदा!

आणखी एक उल्लेखनीय पात्र म्हणजे राकेश बेदी. राजकारणी कसे उलट्या काळजाचे असतात आणि आपलं ईप्सित साध्य करण्यासाठी कुठल्या थराला जाऊ शकतात, याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे राकेश बेदीने साकारलेला ‘जमील जमाली’. या माणसात आणि आपल्याकडच्या राजकारण्यांमध्ये फारसा फरक नसावा, हे आपल्याला पदोपदी जाणवत राहतं!

संजय दत्तने साकारलेला पोलीस अधिकारी ‘अस्लम’ हे आणखी एक सशक्त पात्र. जमील जमालचं प्यादं… पण स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व आणि आकांक्षा असणारं! राजकारणाच्या बुद्धिबळात स्वतःचं अस्तित्व ठळकपणे टिकवणारा अधिकारी. नेमकं साम्य, आपल्या पोलीस यंत्रणेशी आणि काही अधिकाऱ्यांशी…

जमील जमालीच्या लेकीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, तिच्याशी लग्न करून, तिचा आपल्या फायद्यासाठी वापर करणारा हमजा… आपल्याला प्रेमवीर आणि उलट्या काळजाचा हेर, दोन्ही एकाच वेळी दाखवतो.

बाकी मग, बनावट शस्त्र बनवण्याचा कारखाना, भारतीय चलनातल्या पाचशे आणि हजाराच्या खोट्या नोटा छापण्याचा गोरखधंदा आणि त्यात गुंतलेले भारतीय राजकारणी, नोटबंदी का करावी लागली असेल यावर झोत टाकतात आणि तो निर्णय का घेतला गेला असावा, हे कळत जातं आपल्याला.

आयएसआय या पाकिस्तानी हेरखात्याच्या कारवाया, पकडलेल्या भारतीय हेराचे अनन्वित हाल आणि त्याच्यावर केले गेलेले अत्याचार, आपल्याला संभाजी महाराजांच्या छळाची आठवण करून देतात. काटा येतो अंगावर. काळ बदलला, पण त्यांची वृत्ती आणि प्रवृत्ती अजूनही तीच आणि तशीच! हा छळ निर्विकार नजरेने बघणारा, मनातली खळबळ चेहेऱ्यावर दिसू न देणारा हमजा, परत एकदा अभिनयाच्या ताकदीने आपलं मन जिंकून जातो.

26/11 चा हल्ला आणि त्यावेळचा पाकिस्तानी लोकांचा उन्माद बघून उन्मळून पडलेला हमजा, जमीलशी हातमिळवणी करून, कराचीचा अनभिषिक्त सम्राट बनण्याची स्वप्न त्याला दाखवत रहमान बलोचलाच संपवण्याची चाल रचतो, पण हे रहमानला कळतं आणि मग पुढचा थरार… अपघात आणि त्या नंतरचा भयंकर हिंसाचार डोळे मिटून घ्यावे, असं वाटणारा.

गंभीर जखमी झालेल्या रहमानला इस्पितळात घेऊन जाण्यासाठी केलेला आटापिटा, हमजाच्या एकंदर स्तिमित करणाऱ्या बुद्धिबळाच्या चालीची जाणीव आपल्याला करून देतो आणि कोणालाही त्याची कुठलीही शंका न येता, त्याचा सगळा खेळ गुलदस्त्यातच राहतो.

शह, काटशह आणि भयंकर गुंतागुंत असणारा हा चित्रपट, ‘यह नया भारत है, यह घर में घुस के मारता हैं’ या वाक्याने, पुढील भागाची उत्सुकता जागवत आणि आपल्याला सुखावत संपतो, अनेक प्रश्न मागे ठेवून…

पडद्यावर दिसणारे प्रसंग म्हणजे हिमनगाचं टोक! आत किती खोल, काय दडलेलं असेल याची आपण कल्पनाही करू शकणार नाही, इतकं काहीतरी अकल्पित.

अतिशय वेगळा, पण अतिरंजित हिंसाचाराने लडबडलेला, शिवराळ भाषेचं प्रदर्शन मांडणारा हा चित्रपट, भडक दृश्य न दाखवता, शिव्यांचा वर्षाव थोपवत, थोडा संयत असता तर त्याचा प्रभाव आणखी पडला असता का? असा प्रश्न मनात येत राहतो. गळे चिरणे, वाहनाला बांधून फरफटत नेणे, गरम पाण्याच्या पातेल्यात बुडविणे, झाडाला किंवा पंख्याला उलटे लटकावणे, डोकी फोडणे, असे काटा आणणारे बीभत्स चित्रीकरण टाळून सुद्धा विषय पोहोचवता आला असता, हे माझं मत आहे.

अर्थात, 2025 मधल्या यशस्वी चित्रपटांच्या यादीत प्रथम क्रमांकावर असणारा हा चित्रपट, ‘मागणीप्रमाणे पुरवठा’ या न्यायाने, ‘लोकांना जे बघायला आवडतं तेच देतो’, हे त्या मागचं क्रूर सत्य आणि हेच त्याच्या यशस्वी होण्यामागचं खरं कारण…

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!