पराग गोडबोले
एका लग्नाला जायचा नुकताच योग आला. कार्यालयात रंगीबेरंगी वातावरण. वेगवेगळे वेष परिधान केलेले असंख्य परिचित, अपरिचित चेहरे आणि त्यात अलगद सामावलेले आम्ही… वातानुकूलनाचा हवाहवासा गारवा, बऱ्याच जणांची आणि जणींची चाललेली निर्हेतूक लगबग लगबग… अगदी सगळ्याच लग्नांमध्ये असतं तसं मंगल आणि मोहक वातावरण… समोर आलेला लिंबू सरबताचा, उन्हातून आल्यानंतर हवाहवासा वाटणारा घोट… नवे कोरे कपडे आणि त्यांचा तो विवक्षित गंध. पोरांची पळापळ आणि हे सगळं बघणारा तटस्थ मी… बसून बसून कंटाळा आल्यानंतर, एक चक्कर रुखवतापाशी… संसारोपयोगी विविध वस्तू बघताना, आमच्या लग्नाच्या वेळच्या रुखवताची पण आठवण येत गेली. जवळपास तसाच जामानिमा आणि त्याच भावना!
असा टंगळमंगळ करण्यात तासभर गेल्यानंतर, घटिका समीप आली. मंचावरून खणखणीत आवाजात गुरुजींची जाहीर सूचना – “मंगलाष्टकं सुरू होत आहेत, सगळ्यांनी ती शांत चित्ताने ऐकावीत.” गुरुजींच्या भसाड्या आवाजातली ती अष्टकं ऐकण्यात कोणालाही फारसं स्वारस्य असावं, असं वाटत नव्हतं.
लोकांची चुळबुळ… सर्वांना अक्षता वाटप करणाऱ्या स्वयंसेवकांची प्रतीक्षा होती, पण ते कुठेच दृष्टीपथात नाहीत! लग्न लागताना वधूवरांच्या डोक्यावर अक्षता टाकायच्या, हा समाजमान्य संकेत, पण अक्षता टाकल्यावर, वधूवरांच्या ऐवजी इतर लोकांच्या डोक्यावरच त्या पडणार, हे अगदी अटळ सत्य… त्याच वेळी आणखी एक सूचना आली –
“वधूवरांच्या डोक्यावर टाकण्यासाठी फक्त व्यासपीठावर उपस्थित मोजक्या लोकांनाच अक्षता देण्यात आल्या आहेत, शास्त्र म्हणून. अमूल्य अशा तांदूळरूपी अन्नाचा अपव्यय टाळण्यासाठी, सभागृहातील इतर अभ्यागतांना अक्षता देण्यात येणार नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी.”
उपस्थितांमध्ये थोडीशी चुळबुळ… माझ्या शेजारी उपस्थित असणाऱ्या एक आजी म्हणाल्या, “काय हे, अक्षत टाकल्याशिवाय का लग्न होतं? काहीतरी आपली नवीन फ्याड!!”
हेही वाचा – कुणीतरी आहे तिथे!
मी ऐकून न ऐकल्यासारखं केलं, पण पटली मला ही अभिनव संकल्पना! अक्षता म्हणून दोन-चार किलो तांदळाचा अपव्यय. पुन्हा याच मंगल अक्षता पायदळी तुडवल्या जातात आणि त्यांचं पावित्र्य भंगतं ही आणखी एक दुःखद आणि शोचनीय बाब.
मध्यंतरी कुठेतरी प्लास्टिकच्या अक्षतांची टूम निघाली होती म्हणे. खरं खोटं ठाऊक नाही, पण हे तर रोगापेक्षा इलाज भयंकर असा प्रकार! एकवेळ तांदळाचा अपव्यय परवडला, पण या प्लास्टिकरूपी अक्षता नको… फार गाजावाजा झाला नसावा या प्रकाराचा, कारण हे फार कुठे ऐकण्यात आलं नाही.
हे अक्षताविरहित लग्न भावलं मला. लग्न लागल्यावर वधूवरांना भेटायला लागलेल्या लांबच लांब रांगेत उभं राहिल्यावर, या पद्धतीवर सुद्धा काहीतरी उपाय हवा, असं वाटून गेलं!
आमचा क्रमांक आल्यावर, नमस्कार चमत्कार झाल्यावर मी वधूवरांचं अभिनंदन केलं आणि त्यांच्या अक्षताविरहित लग्नाचं मनापासून कौतुक केलं. भावलं ते कौतुक त्या दोघांना. आमचा दोघांचा हा निर्णय होता, असं ती दोघं म्हणाली आणि मी अगदी भरून पावलो…
स्टेजवरून निघायच्या आधी वधू म्हणाली, “मी माप ओलांडणार आहे गृहप्रवेश करताना, पण ते रिकामं असेल. त्यात तांदूळ भरलेले नसतील. नाही आवडत मला अशी अन्नाची नासाडी! मी शास्त्र म्हणून, लक्ष्मीचं प्रतीक म्हणून चार दाणे उडवेन माझ्या होणाऱ्या घराच्या समृद्धीसाठी, पण शिगोशिग तांदूळ भरलेलं माप नाही ओलांडणार मी! कोणीतरी म्हणालं मला, की ओलांडलेले तांदूळ धुऊन वापरता येतात म्हणून… तसं खरंच होणार असेल तर माझी ना नाही, पण माझ्या मैत्रिणींचे अनुभव आहेत की, हे तांदूळ वापरले जात नाहीत आणि वाया जातात.”
हेही वाचा – दूरदर्शन… कृष्ण-धवल आठवणींना उजाळा!
जेवणावळीमध्ये होणाऱ्या अन्नाच्या नासाडीपुढे ही नासाडी अगदी किरकोळ आणि क्षुल्लक, पण तो वेगळा विषय. त्यावरही व्यापक चर्चा हवीच.
हा आणखी एक स्तुत्य निर्णय. तटस्थ विचार केल्यावर हा निर्णय सुद्धा मला भावला. अर्थात, आपल्या रुढीप्रिय समाजात या अशा निर्णयांना विरोध होण्याची, त्यांची हेटाळणी होण्याची, कुत्सित टोमण्यांची शक्यता गृहीत धरूनही, का कोणास ठाऊक, पण मला त्यांचं परत अभिनंदन करावंसं वाटलं आणि मी ते केलं!
नव्या पिढीचे हे नवे विचार, मला विचारात पाडून गेले आणि त्यांच्या धाडसाचं कौतुकही वाटलं. काही प्रथा, काही रूढी थांबणं आणि त्याऐवजी नवं काहीतरी स्वीकारणं, ही खरोखर काळाची गरज आहे. आज हे विचार फार धाडसी वगैरे वाटतील, त्यांना ‘फुरोगामी’ वगैरे शेलकी विशेषणं बहाल केली जातील, हे ठाऊक आहे मला, पण हे असं प्रवाहाच्या विरोधात काहीतरी करणं, ही काळाची गरज आहे, हे माझं तरी वैयक्तिक मत आहे. याचा प्रत्येकाने अंगीकार करावा, हा आग्रह अनुचित, पण तरीही, नव्या पिढीला शिक्षणाने बहाल केलेली ही व्यापक दृष्टी आणि हे नवे विचार खरोखरच अनुकरणीय!
अन्न हे पूर्णब्रह्म म्हणताना, त्याची नासाडी टाळण्याचे हे दोन्ही निर्णय खरोखर डोळस.
मोबाइल – 9323277620


