Sunday, March 1, 2026

banner 468x60

Homeअध्यात्मDnyaneshwari : अगा स्वप्नीं निधान फावे, परि चेइलिया हारपे आघवें…

Dnyaneshwari : अगा स्वप्नीं निधान फावे, परि चेइलिया हारपे आघवें…

सार्थ ज्ञानेश्वरी

अध्याय नववा

ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति । एवं त्रयीधर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते ॥21॥

मग तया पुण्याची पाउटी सरे । सवेंचि इंद्रपणाची उटी उतरे । आणि येऊं लागती माघारें । मृत्युलोका ॥328॥ जैसा वेश्याभोगीं कवडा वेंचे । मग दारही चेपूं न ये तियेचें । तैसें लाजिरवाणें दीक्षितांचें । काय सांगों ॥329॥ एवं थितिया मातें चुकले । जिहीं पुण्यें स्वर्ग कामिले । तयां अमरपण तें वावों जालें । आतां मृत्युलोकु ॥330॥ मातेचिया उदरकुहरीं । पचूनि विष्ठेचां दाथरीं । उकडूनि नवमासवरी । जन्मजन्मोनि मरती ॥331॥ अगा स्वप्नीं निधान फावे । परि चेइलिया हारपे आघवें । तैसें स्वर्गसुख जाणावें । वेदज्ञाचें ॥332॥ अर्जुना वेदु जऱ्ही जाहला । तरी मातें नेणतां वायां गेला । कणु सांडुनि उपणिला । कोंडा जैसा ॥333॥ म्हणऊनि मज एकेंविण । हे त्रयीधर्म अकारण । आतां मातें जाणोनि कांहीं नेण । तूं सुखिया होसी ॥334॥

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना: पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥22॥

पैं सर्वभावेंसी उखितें । जे वोपिले मज चित्तें । जैसा गर्भगोळु उद्यमातें । कोणाही नेणे ॥335॥ तैसा मीवाचूनि कांही । आणीक गोमटेंचि नाहीं । मजचि नाम पाहीं । जिणेया ठेविलें ॥336॥ ऐसे अनन्यगतिकें चित्तें । चिंतितसांते मातें । जे उपासिती तयांतें । मीचि सेवीं ॥337॥ ते एकवटूनि जिये क्षणीं । अनुसरले गा माझिये वाहणी । तेव्हांचि तयांची चिंतवणी । मजचि पडली ॥338॥ मग तिहीं जें जें करावे । तें मजचि पडिलें आघवें । जैशी अजातपक्षांचेनि जीवें । पक्षिणी जिये ॥339॥ आपुली तहानभूक नेणे । तान्हया निकें तें माउलीसीचि करणें । तैसे अनुसरले जे मज प्राणें । तयांचेन काइसेनिहि न लजें मी ॥340॥ तया माझिया सायुज्याची चाड । तरि तेंचि पुरवीं कोड । कां सेवा म्हणती तरी आड । प्रेम सुयें ॥341॥ ऐसा मनीं जो जो धरिती भावो । तो तो पुढां पुढां लागें तयां देवों । आणि दिधलियाचा निर्वाहो । तोहि मीचि करीं ॥342॥

हेही वाचा – Dnyaneshwari : जैसें कल्पतरुतळवटीं, बैसोनि झोळिये पाडी गांठी…

अर्थ

तो विशाल स्वर्गलोक भोगल्यावर पुण्य क्षीण झाले म्हणजे ते मृत्युलोकी प्रवेश करतात. विषयांची इच्छा करून, तीन वेदांनी सांगितलेल्या फलरूपी धर्माला अनुसरून कर्ममार्ग आचरण करणारांना या प्रकारे येणे-जाणे (जन्ममृत्यू) प्राप्त होते. ॥21॥

मग त्या पुण्याने प्राप्त झालेला दर्जा नाहीसा झाला म्हणजे, त्याबरोबरच यज्ञकर्त्यात असलेले इंद्राच्या ऐश्वर्याचे तेज नाहीसे होते आणि मग ते मृत्यूलोकाला परत येऊ लागतात. ॥328॥ ज्याप्रमाणे वेश्येच्या नादात पैसा नाहीसा होतो, मग तिच्या दारास हात लावण्याचीही सोय राहात नाही, त्याप्रमाणे (पुण्याची पुंजी सरलेल्या) यज्ञकर्त्यांची स्थिती लज्जास्पद आहे. त्याचे काय वर्णन करावे? ॥329॥ या प्रमाणे ज्यांनी पुण्याच्या जोरावर स्वर्गाची हाव धरली, ते अमरपणही व्यर्थ गेले असता, त्यांना (पूर्वीचा) मृत्यूलोक पुन्हा प्राप्त झाला. ॥330॥ आईच्या उदररूपी गुहेत, नरकाच्या उकडीतील थरात, नऊ महिनेपर्यंत उकडून पुन: पुन: ते जन्माला येऊन (पुन्हा) मरतात. ॥331॥ अर्जुना, स्वप्नामध्ये द्रव्याचा ठेवा सापडतो, पण जागे झाले असता तो सर्व नाहीसा होतो. त्याप्रमाणे वेद जाणणार्‍या यज्ञकर्त्याचे स्वर्गसुख समजावे. ॥332॥ ज्याप्रमाणे धान्य टाकून नुसता कोंडा उफाणावा, त्याप्रमाणे अर्जुना, मला जाणले नाही तर, प्रत्यक्ष एवढा वेद झाला तरी तो व्यर्थ होय. ॥333॥ म्हणून एक मला टाकून केलेले, तिन्ही वेदांनी सांगितलेले धर्म (ज्योतिष्टोमादिक यज्ञकर्मे) निरर्थक आहेत. यास्तव अर्जुना, मला एक जाणलेस, मग जरी दुसरे काही जाणले नाहीस, तरी तू सुखी होशील. ॥334॥

एकनिष्ठेने माझे चिंतन करून जे लोक माझी उपासना करतात, त्या सतत (माझ्या ठिकाणी) युक्त असलेल्या लोकांचा (सायुज्य अथवा मत्सेवा यापैकी पाहिजे असेल त्या गोष्टीचा) योग (अप्राप्त वस्तूची प्राप्ती) आणि क्षेम (प्राप्त वस्तूचे रक्षण) मी करतो. ॥22॥

जे सर्व प्रकारच्या वृत्तीसहित चित्ताने मला उक्ते विकले गेले, ज्याप्रमाणे मातेच्या गर्भातील मूल कोणत्याही व्यवहाराला जाणत नाही ॥335॥ त्याप्रमाणे माझ्याशिवाय दुसरे काही ज्यांना चांगलेच वाटत नाही आणि पाहा, ज्यांनी आपल्या जगण्यास माझेच नाव ठेवले आहे (ज्यांना माझ्याकरिता जगण्यातच आपल्या जीविताची सार्थकता वाटते). ॥336॥ याप्रमाणे एकनिष्ठ चित्ताने माझे चिंतन करीत असता जे माझी उपासना करतात, त्यांची सेवा मीच करतो. ॥337॥ ते ज्या क्षणी एकनिष्ठ होऊन माझ्या मार्गाला लागले, त्याच वेळेला त्यांच्या संबंधांच्या काळजीचा भार माझ्यावर येऊन पडला. ॥338॥ मग जे जे म्हणून त्यांस करावयाचे असते, ते सर्व मलाच करावे लागते. जसे पंख न फुटलेल्या पिल्लांच्या जगण्याने पक्षीण जगते, ॥339॥ आपली तहानभूक (ज्याला) काही कळत नाही, त्या लहान मुलाला जे हितकर असेल, ते आईलाच करणे भाग पडते, त्या (मुला)प्रमाणे जे मला अंत:करणपूर्वक भजले, त्यांचे काहीही करण्यास मी लाजत नाही. ॥340॥ त्यांना जर माझ्या एकरूपतेची इच्छा असेल तर, तीच त्यांची आवड मी पूर्ण करतो किंवा ते माझ्या सेवेची इच्छा करतील तर आम्हा दोघांमध्ये प्रेम घालतो. (म्हणजे मी मद्विषयक प्रेम त्यांना देतो) ॥341॥ याप्रमाणे ते जो जो हेतू मनात धरतात, तो तो मी त्यांच्या पुढे पुढे होऊन त्यांना द्यावयास लागतो, आणि दिलेल्याचे रक्षणही मीच करतो. ॥342॥

क्रमश:

हेही वाचा – Dnyaneshwari : जेथ अमरत्व हेंचि सिंहासन, ऐरावतासारिखें वाहन…

(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!