सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय अकरावा
पैं तुज अखंडिता काळा । तिन्ही आहाती जी वेळां । त्या तिन्ही परी सबळा । आपुलालां समयीं ॥495॥ जे वेळीं हो लागे उत्पत्ती । ते वेळीं स्थिति प्रळयो हारपती । आणि स्थितिकाळीं न मिरविती । उत्पत्ति प्रळयो ॥496॥ पाठीं प्रळयाचिये वेळे । उत्पत्ति स्थिति मावळे । हें कायसेनही न ढळे । अनादि ऐसें ॥497॥ म्हणोनि आजि तरी भरें भोगें । स्थिति वर्तिजत आहे जगें । एथ ग्रसिसी तूं हें नलगे । माझां जीवीं ॥498॥ तंव संकेतें देव बोले । अगा या दोन्ही सैन्यांसीचि मरण पुरलें । तें प्रत्यक्ष तुज दाविलें । येर यथाकाळें जाण ॥499॥ हा संकेतु जंव अनंता । वेळु लागला बोलतां । तंव अर्जुनें लोकु मागुता । देखिला यथास्थिति ॥500॥ मग म्हणतसे देवा । तूं सूत्री विश्वलाघवा । जग आला मा आघवा । पूर्वस्थिती पुढती ॥501॥ परि पडिलिया दुःखसागरीं । तूं काढिसी कां जयापरी । ते कीर्ती तुझी हरी । आठवीत असे ॥502॥ कीर्ती आठवितां वेळोवेळां । भोगितसें महासुखाचा सोहळा । तेथ हर्षामृतकल्लोळा । वरि लोळत आहों ॥503॥ देवा जियालेपणें जग । धरी तुझां ठायीं अनुराग । आणि दुष्टां तयां भंग । अधिकाधिक ॥504॥ पैं त्रिभुवनींचिया राक्षसां । महाभय तूं हृषीकेशा । म्हणोनि पळताती दिशां । पैलीकडे ॥505॥ येथ सुर सिद्ध किन्नर । किंबहुना चराचर । ते तुज देखोनि हर्षनिर्भर । नमस्कारित असती ॥506॥
कस्माच्च ते न नमेरन् महात्मन् गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे ।
अनन्त देवेश जगन्निवास त्वमक्षरं सदसत्तत्परं यत् ॥37॥
हेही वाचा – Dnyaneshwari : बापा विरुद्ध जें जाहलें, तें उपजतांचि वाघें नेलें
अर्थ
देवा, अखंडित असे जे आपण काळ, त्या आपल्यास तिन्हीही वेळा (उत्पन्न, स्थिती आणि लय) आहेत. परंतु त्या तिन्हीं वेळा, आपापल्या समयास पूर्ण सामर्थ्यवान आहेत. ॥495॥ ज्यावेळेस उत्पत्ती व्हावयास लागते, त्यावेळी स्थिती आणि प्रलय या दोन्ही अवस्था नाहीशा होतात आणि स्थितीच्या वेळेस उत्पत्ती आणि प्रलय या दोन्हीही दिसत नाहीत. ॥496॥ प्रळयाच्या वेळेला उत्पत्ती, स्थिती या दोहोंचा लोप होतो. हे कशानेही बदलत नाही. असा हा क्रम अनादि कालापासूनचा आहे. ॥497॥ म्हणून आज तर स्थितिकाली जग हे भोगाच्या भरात वागत आहे. म्हणून या स्थितिकाली, तू (कालरूप श्रीकृष्ण) त्याचा (जगाचा) संहार करशील, हे माझ्या मनाला पटत नाही. ॥498॥ तेव्हा खुणेने देव म्हणाले, अरे अर्जुना, फक्त या दोन्ही सैन्यांचेच आयुष्य संपले आहे. ते मी तुला प्रत्यक्ष दाखविले. त्यांच्याशिवाय इतर सर्व लोक आपापल्या योग्य काळी मरण पावतील. ॥499॥ हा इशारा देण्यास देवाला जितका वेळ लागला तितक्या वेळात अर्जुनाने पुन्हा पूर्वीप्रमाणे सर्व लोक सुखरूप असलेले पाहिले. ॥500॥ मग अर्जुन म्हणावयास लागला, देवा, या विश्वरूपी सोंगाचा तू सूत्रधार आहेस. हे सर्व जग पुन्हा पूर्वस्थितीला आले ना? ॥501॥ परंतु (या तुझ्या खेळात) दु:खसागरात पडलेल्या जीवांना तू ज्याप्रकारे बाहेर काढतोस ती तुझी कीर्ती, हे हरी मी आठवीत आहे. ॥502॥ वारंवार आपली कीर्ती आठवीत असताना आम्ही ब्रह्मसुखाचा सोहळा भोगतो आणि त्या भोगात हर्षरूप अमृताच्या लाटांवर आम्ही लोळत आहोत. ॥503॥ अहो देवा, जग हे जगल्यामुळे तुझ्या ठिकाणी प्रीती धरीत आहे आणि त्या दुष्टांना तुझ्यापासून अधिकाधिक नाश आहे. ॥504॥ परंतु हे देवा, त्रिभुवनातील राक्षसांना तू साक्षात मृत्यूच आहेस. म्हणून ते भयाने (दहा) दिशांच्या पलीकडे पळून जातात. ॥505॥ बाकीचे सुर, सिद्ध, किन्नर फार काय सांगावे, हे स्थावर जंगमात्मक जे जग आहे, ते सर्व तुला आनंदभरित होऊन नमस्कार करत आहे. ॥506॥
हे महात्मन्, अत्यंत महान अशा महद्ब्रह्माचा देखील आदिकर्ता जो तू, त्या तुला, ते (राक्षस इत्यादि) का नमस्कार करीत नाहीत? हे अनंता, देवाधिदेवा, जगन्निवासा, तू अक्षर आहेस आणि सत् आणि असत् म्हणून जे आहे ते तू आहेस; त्याच्या अतीत जे आहे, तेही तू आहेस. ॥37॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : ना अर्जुना मी काळु आणि ग्रासिजे तो माझा खेळु


