विवेक वैद्य
दवाखान्यात गर्दी नसली की (ती कधी असते म्हणा!) मी जवळच असलेल्या मन्नूभाईच्या किराणा दुकानात गप्पा मारायला जातो. समोरच फ्लायओव्हर आहे. आम्ही पुलाखालचे व्यावसायिक… त्यामुळे लिमिटेड धंदा असणारे! पुढे पूल खाली उतरतो तिथे जागा असते, आडोसा असतो तिथे काही टपऱ्या आहेत… पान, चहा वगैरे. रात्री तिथे 1-2 भिकारी झोपतात. त्यातला एक वयस्कर किंचित स्थूल म्हातारा मन्नूभाईकडे किरकोळ माल घ्यायला येतो म्हणून मी ओळखतो.
तर त्या दिवशी मी नेहमीप्रमाणे गप्पा मारत होतो. थंडीचे दिवस होते. तो म्हातारा दुकानात आला. त्याच्याकडे एक नवेकोरे ब्लँकेट होते.
“हे विकायचे आहे.”
मी आणि मन्नूभाईने ब्लँकेट बघितले, खरोखच ते उत्तम होते… ऊबदार. बहुदा कोणीतरी दानशूर माणसाने किंवा एखाद्या स्वयंसेवी संघटनेने ते भिकाऱ्यांना वाटले असावे.
“केवढ्याला?”
तिथेच उभ्या असलेल्या एका गिऱ्हाईकाने विचारले.
“चार-पाचशे रुपयांचे असेल. पण तुम्ही (इथे मन्नू भाईकडे इशारा करत) माझ्या कामाची माणसे आहेत. मला 200 पुरे…”
“पण बाबा… थंडीचे दिवस आहेत. तुम्ही ब्लँकेट विकलं तर थंडी वाजेल ना!” मी म्हणालो.
“आहेत माझ्याकडे पांघरायचे आधीचे…”
हेही वाचा – अनिता… भूतकाळ अन् वास्तव!
“…तुम्हाला पैसे कशासाठी पाहिजेत?”
“साहेब, लोक पैसे देतात… जेवण बी भेटतं… पण तरी बी काहीतरी लागते. सकाळचा चहा टपरीवाला देतो मोफत… पण नंतर पैसे लागतात. विडी आहे, तंबाकू आहे. जास्त नाही पण लोक पैसे देतात ते पुरत नाहीत. वरती बी लागतात!”
“पण बाबा, हे दोनशे रुपये किती दिवस पुरतील?”
“महिनाभर पुरतील!”
बाबाकडे अगोदरचे पांघरूण मी पहिले होते. ते मला इतके जाड आणि ऊबदार वाटले नव्हते. ते जुनेही होते खूप! मन्नूभाई आणि मी एकमेकाकडे पहिले…
“बाबा, हे ब्लँकेट सध्या विकू नका. आम्ही म्हणजे मी आणि हे डॉक्टरसाहेब मिळून तुम्हाला 200 रुपये देऊ दर महिन्याला… पण आता थंडी आहे तोपर्यंत राहू द्या.”
म्हाताऱ्याने मला बघून हात जोडले.
“बाबा अजून काही लागले तर मागा…”
“नाही लागणार साहेब… पुरतील तेवढे…” म्हाताऱ्याने प्रामाणिकपणे सांगितले.
मी आणि मन्नूभाईने लगेच 100-100 रुपये काढून दिले. म्हाताऱ्याने पुन्हा हात जोडले आणि निघाला. तेवढ्यात मी पुन्हा म्हणालो,
“बाबा, मी रोज रात्री बघणार की, तुम्ही हे ब्लॅंकेट घेऊन झोपता की नाही ते?”
म्हातारा मनमोकळ हसला.
हेही वाचा – होप फॉर द बेस्ट!
त्यानंतर काही दिवस मी दवाखाना रात्री 10 वाजता बंद करून जायचो, तेव्हा मुद्दाम म्हातारा झोपायचा तिथे नजर टाकायचो. म्हातारा त्या नवीन ब्लँकेट घेऊन झोपलेला दिसायचा.
4-5 दिवस खात्री झाल्यावर मी नजर टाकायचे विसरलो… म्हातारा बिडी-काडीसाठी मन्नूभाईच्या दुकानात येत असल्याने पैसे संपले तर, मागेल हे माहीत होते. महिना संपल्यावर पैसे द्यायचे हे ठरवलेच होते! पण पुढच्या महिन्यात पैसे द्यायची वेळच आली नाही…
एकदा सकाळी सकाळी मन्नूभाईचा फोन आला… “डॉक्टर साहेब, तो म्हातारा गेला हो!”
“गेला..? कसं काय?”
“माहीत नाही, मलाही आतच समजले.. चला येता का?”
आम्ही गेलो तेव्हा तिथे काही लोक उभे होते गर्दी करून. त्यांच्याशी बोलल्यानंतर समजले असे की, म्हातारा दोन-तीन दिवसापासून काही खात-पीत नव्हता. गल्लीतल्या पोरांनी, टपरीवाल्यांनी त्याच्यासाठी मग ताजा मऊ भात, सफरचंद वगैरे आणले. पण म्हाताऱ्याने फारसे काही खाल्लेच नाही. दवाखान्यात यायलाही नकार दिला आणि काल रात्री झोपला तर सकाळी उठलाच नाही… मी आणि मन्नूभाई भराभर पुढे गेलो. म्हातारा पडलेला होता शांतपणे आणि त्याने अंगाभोवती गुरफटून घेतलेले ब्लँकेट तेच होते… नवे मिळालेले.


